Showing posts with label माझ्या आईबाबांचे अनुभव. Show all posts
Showing posts with label माझ्या आईबाबांचे अनुभव. Show all posts

Monday, January 11, 2021

माडीवाले कॉलनी - पुणे (२)

 आईबाबांचे लग्न १९५७ साली झाले. त्यानंतर त्यांचा संसार पुण्यातील आगाशे वाड्यात सुरू झाला. आगाश्यांच्या वाड्यात लग्ना आधी बाबा, काका आणि मामा (म्हणजे माझे आजोबा) रहायचे.  बाबा, काका आणि मामा १९५१ साली आगाशे वाड्यात राहायला आले. तिथे ते वाड्यातल्या माडीवर राहायचे. आगाशे काका भुताच्या गोष्टी सांगत असत. १९५१ ते १९५७ सालापर्यंत बाबांनी इंग्रजी आणि गणित मुलांना फुकट शिकवले. जेव्हा बाबांचे लग्न झाले तेव्हा त्या घरात पहिल्यांदाच बाईमाणूस आले.


बाबांची आई त्यांचा लहानपणीच देवाघरी गेली. आणि बाबांची बहिण वयाच्या १५ व्या वर्षी देवाघरी गेली. तिला टायफॉइड झाला होता आणि नंतर तो उलटला आणि त्यातच ती गेली. जेव्हा आईचा बघण्याचा कार्यक्रम झाला तेव्हा मामा (आजोबा) म्हणाले की निळू हीच मुलगी तुझी बायको होईल. मामांना आईमध्ये त्यांची मुलगी दिसली. माझ्या आत्याचे टोपण नाव "बेबी" होते. आईचे लग्न झाले तेव्हा आई फक्त २० वर्षाची होती. आगाशे यांच्या आईला माझ्या आईचे खूप कौतुक होते. १९६१ साली पूर आला आणि आगाशे वाड्यात पाणीच पाणी झाले होते. आई बाबा
वेगवेगळ्या दिशेला होते. काका आणि आजोबा वलसाडला होते. 

माडीवाले कॉलनी मध्ये साने माई यांचा दुमजली बंगला होता. या सानेमाई आईला ओळखत. ही ओळख म्हणजे अशी की आईची पनवेलची एक मैत्रीण मालू ही लग्न होऊन माडीवाले कॉलनीत राहायला आली होती. आणि आई पण लग्न होऊन पुण्याला आली आणि परत या दोघी मैत्रीणींची भेट झाली. मालूमावशी आईपेक्षा वयाने मोठी होती आणि तिला आईचे खूप कौतुक होते असे आई सांगते.


सानेमाई आईला म्हणाल्या की बाबी तु काही काळजी करू नकोस. मी तुला आमच्या गच्चीला लागून जी खोली आहे ती देते. आणि माईंनी आईकरता आंबेमोहोर तांदुळही घेऊन ठेवले होते. आईचे लग्नातले दागिने बाबांनी माईच्या कडे ठेवायला दिले होते. माडीवाले कॉलनीमध्ये माई साने यांच्या बंगल्यात वर गच्चीला लागून जी खोली होती ती बऱ्यापैकी मोठी होती. गच्चीमध्ये त्यांनी एक छोटी बाथरून बांधून दिली होती. या घरात आईबाबा, मामा (आजोबा) आईची आई ( आजी)  असे राहत होते. मामा वलसाडहून जेव्हा आले तेव्हा त्यांनी बाबांना सांगितले की मी आता इथेच कायमचा तुझ्याकडे राहणार आहे. माईंनी आईला एक मोठे पिंप पाणी भरून ठेवण्याकरता दिले. शिवाय पिण्याचे पाणी पिण्याकरता एक मोठा हंडा दिला. बाबा व आई दोघे मिळून वरच्या मजल्यावरून खाली एक हौद होता तिथून पाणी भरायचे. हौदाच्या शेजारीच पाण्याचा नळ होता. आईकडे जी बाई धुणे भांड्याला यायची ती याच नळावर धुणे भांडी करायची. त्याकाळी ती ५ रूपये घ्यायची या कामाचे ! आणि आईबाबा ज्या खोलीत राहायचे त्या खोलीचे भाडे होते रूपये १८ !  १९६१ ते १९६५ पर्यंत आईबाबा व आजोबा इथे राहिले.

आईबाबा पहाटे ४ ला उठायचे ते आधी पाणी भरायचे व नंतर तळ्यातल्या गणपतीला जायचे. तिथून पर्वतीला जायचे. तिकडून आले की आई सर्वॉचा चहा  करायची  व नंतर बाबा सायकलने विश्रामबाग वाड्यात कामाला जायचे. जेवायला घरी येऊन थोडी विश्रांती घेऊन परत कामावर जायचे. ज्या खोलीत हे सर्वजण राहत होते. तिथेच छोटे स्वयंपाकघर केले होते. म्हणजे आडोशाला पडदा लावला होता. आई व आजी स्वयंपाकघरात झोपायच्या. आणि बाकीच्या खोलीत दोन पलंग होते त्यावर मामा व बाबा झोपायचे. अंघोळी गच्चीत बांधलेल्या बाथरूम मध्ये होत असत. उन्हाळ्यात आई आणि आजी गच्चीमध्ये भरपूर वाळवणे करायच्या. स्वयंपाकघरात दोन प्रकारचे स्टोव्ह होते, एक वाजणारा आणि दुसरा वातीचा (न वाजणारा) स्वयंपाकघरात लाकडाच्या दोन छोट्या मांडण्या होत्या पातेली कढई ठेवण्याकरता. स्वयंपाक खाली बसूनच केला जाई. गच्चीचा उपयोग छान होत होता.
 
 
 सानेमाईंच्या इथे राहत असतानाच आईने शिवणाचा क्लास केला व शिवाय एसटीसी पण केले. आई म्हणाली आजी (आईची आई) होती म्हणून मला घरचे काही बघायला लागत नव्हते. आजी सर्व करायची.  माझे आजोबा, आम्ही त्यांना मामा म्हणायचो. दुपारचे जेवण झाल्यावर ते ग्रंथालयात जाऊन वाचत बसायचे ते संध्याकाळी घरी यायचे. 
या खोलीतच आईबाबा शिकवण्या घेत.  काही घरी जाऊन घेत. प्रभात रोड व भांडारकर रोडवर दोन घरी आईबाबा
मुलांना शिकवायला जात असत.
 
 
 जेव्हा आईला दिवस गेले तेव्हा साने माईना खूप आनंद झाला. आईला त्यांनी वर्षभराचे लोणचे घालून दिले.
माईंनी आणि आजीने आईचे सर्व डोहाळे पुरवले. आई सांगते आईला खूप कडक डोहाळे लागले होते. आईची सर्व प्रकारची डोहाळेजेवणे झाली. फक्त एक चांदण्यातले डोहाळेजेवण राहिले होते. मालू मावशी म्हणाली की गच्चीत चांदण्यातले  डोहाळेजेवण करू. आईला सांगितले की तू फक्त तळण कर बाकी इतर स्वयंपाक सर्व आम्ही करू. मग मालूमावशी (आईची मैत्रीण) तिचे यजमान व दोन मुली, सानेकाका आणि माई, आजी आजोबा, आईबाबा असे सर्व चांदण्यातल्या डोहाळेजेवणाला हजर होते. 
 
माझा  जन्म इथलाच सानेमाईंच्या बंगल्यातला. लक्ष्मीरोडवरच्या ताराबाई लिमये यांच्या दवाखान्यात माझा जन्म झाला. साने माईंना एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगी डॉक्टर होती. आणि त्यांचा मुलगा आणि सून फलणटला राहत असत. माईंंनी माझ्या आईवर मुलीप्रमाणे प्रेम केले. मी आईला ६ वर्षांनी झाले. साने माईंना खूप आनंद झाला. त्यांनि माझे बारसे खूप थाटामाटात साजरे केले. जिलबी करायला आचारी बोलावला होता. स्वयंपाकाला बाई बोलावली होती. पण ती बाई यायच्या आतच त्यांनीच बरासचा स्वयंपाक केला होता. 
 
साने माई आईला म्हणाल्या की तुझ्या नातेवाईकांना बोलाव.  शिवाय तुझ्या शिवणाच्या क्लासच्या मैत्रिणींनाही निमंत्रण दे. आई सांगते की  माईंचे आणि माझे मागच्या जन्मीचे नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असणार, नाहीतर इतके कोणीही कोणासाठी करत नाही.
 
 
 माझे आजोबा मला दुपट्यात घेऊन गच्चीत सतरंजी टाकून खेळवत बसायचे. जेव्हा मी बसायला लागले तेव्हा आईकडे मुले शिकायला यायची त्यांच्यातच मी बसायचे. स्वयंपाकघराला जो पडदा होता तो मी माझ्याभोवती गुंडाळून घ्यायचे व पेन्सिली खायचे.


आम्ही पूरग्रस्त म्हणून मामांनी एक फॉर्म आणून भरला होता. ती जागा केव्हा मिळेल या चौकशीसाठी त्यांनि अनेक फेऱ्या मारल्या. शेवटी गोखलेनगरला भाड्याची जागा मिळाली. आईने जेव्हा माडीवाले कॉलनी सोडली तेव्हा आई रंजनाच्या वेळेस (म्हणजेच माझ्या बहिणीच्या वेळेस) गरोदर होती. निघण्याच्या वेळी मालूमावशीने (आईच्या मैत्रिणीने) माझे आवरले. मी पावणे दोन वर्षाची होते. मालूमावशीने माझ्या छोट्या केसाची एक शेंडी बांधली. माझे तोंड धुतले. किंचित पावडर लावून ओल्या गंधाचा एक ठिपका कपाळावर लावला. मला फ्रॉक घातला. दूध प्यायला दिले.
 
 
 आम्ही जेव्हा गोखले नगरला राहयला गेलो तेव्हा तिथे अजिबात वस्ती नव्हती.गोखले नगरला आम्ही स्थिरस्थावर झालो तेव्हा सानेमाई आईबाबांकडे येवून गेल्या आणि खूप रडल्या. आईला म्हणाल्या इतकी काय घाई होती जाण्याची ? इथे खूप विरळ वस्ती आहे. आमच्या इथेच राहिली असतीस तर काय बिघडले असते? गरोदर होतीस तर दुसरे बाळंतपणआमच्या घरीच करून जायचेस. तर माझे आजोबा म्हणाले अहो तुम्ही आम्हाला त्यावेळेला जागा दिलीत तेव्हा आम्हाला किती हायसे वाटले ते शब्दात सांगता येणार नाही. आम्ही पूरग्रस्त त्यामुळे लगेचच हालचाल करायला हवीच होती. नंबर लावून खोल्या तयार होत्या आणि चाळीतल्या दोन खोल्या मिळाल्या त्या लगेच घ्यायला हव्या होत्या म्हणून आम्ही तातडीने इथे आलो.


गोखलेनगरच्या जागेत जेव्हा आईबाबा रहायला आले तेव्हा आईला ७ वा महिना चालू होता. फेब्रुवारी महिन्यात माझी बहिण जन्माला आली. तिच्या जन्माच्या वेळेसच बाबांनी जाईचा वेल लावला. जाई आणि माझी बहीण एकाच वयाच्या ! 

Saturday, June 06, 2020

आईच्या आठवणी

आईच्या आठवणी - बरेच वेळा गप्पांमध्ये आई तिच्या आठवणी सांगते. पण आता मी ठरवले आहे. फोनवरून आई आठवणी सांगायला लागली की लगेच एक वही घ्यायची आणि एकीकडे भरभर लिहून काढायचे.

माझी आई तिच्या लहानपणीच्या आठवणी सांगते. ती अलिबाग व पनवेल मध्ये राहिली आहे. आईला ८ भाऊ. पनवेल, अलिबाग आणि पुणे इथे आईचे भाऊ नोकरीनिमित्ताने राहिले. स्थिरस्थावर झाले. पनवेलला ३ वाडे होते. २ वाडे होते त्यांना खरे वाडा म्हणत. एक खरे वाडा होता तो गिरणीजवळ होता आणि दुसरा खरे वाडा होता तो तळ्याजवळ होता. अजून एक वाडा होता तो होता जाईल वाडा. आईच्या मैत्रिणी अनुक्रमे छबी वाळिंबे, काशी गोरे आणि मालू घांघूर्डे. जाईल वाड्यात खूप मोठा लाकडी झोपाळा होता. या सर्व मैत्रिणी आणि भानू वहिनी होत्या त्यांच्या दोन मुली होत्या. या सर्व जणी मिळून जाईल वाड्यात लाकडी झोपाळ्यावर बसायच्या आणि गाणी म्हणायच्या. गाणी म्हणजे हिंदी सिनेमातली हिंदी गाणी. विशेष करून राज कपूर नर्गिस ची गाणी.

सर्व जणी मिळून पिठलं भात आमटी भात करायच्या. आयस्क्रीम करायच्या. आयस्क्रीम खूप वेगळे होते हं हे ! एक मोठे पातेल , त्यात एक डबा, मग त्यात दूध, वेलची पावडर असे काय काय टाकून डब्याचे झाकण लावायच्या आणि तो डबा हाताने फिरवायच्या. पातेल आणि तो डबा यामध्ये बर्फ घालायच्या. काय काय करायच्या या मैत्रिणी ! पनवेल मध्ये रतन टॉकीज होते. तिथे या सर्व मैत्रिणी हिंदी पिक्चर पहायला जायच्या. जाईल वाड्यामध्ये ज्या भानू वहिनी होत्या त्यांचा भाऊ रतन टॉकीज मध्ये कॅशियर होता. त्याला काही तिकिटे बाजूला काढून ठेवायला सांगायच्या या मैत्रिणी ! आई सांगते की तिला तिचे भाऊ पिक्चर बघायला पैसे देत असत. त्यावेळेला तिकीट ४ आणे होते.

आई जेव्हा पुण्यात राहायची तेव्हा तिथे जोगेश्वरीच्या बोळात करकरे वाडा होता. प्रभात टॉकीजची मागची बाजू या वाड्याला लागून होती. तिथे करकरे यांची उषा आणि आई पिक्चर सुरू झाला की जाळीचा जो दरवाजा होता त्याला कान लावून गाणी ऐकायच्या. किती ती गाण्याची आवड ना ! पुण्यात शुभ कार्य झाले की जोगेश्वरीला पाया पडायला येत असत. तर त्या दोघी मैत्रिणी वाड्याच्या दिंडीत उभे राहून बघायच्या नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना , मुंज झालेल्या बटूला. कुतूहल म्हणून ! पनवेल ला एक मनोहर संगीत विद्यालय होते तिथे अप्प्पा मामाने म्हणजे आईच्या सर्वात मोठ्या भावाने आईला गाण्याच्या क्लास ला घातले होते. फी होती ५ रूपये फक्त !

आई सांगते तिच्या आईने म्हणजे माझ्या आजीला जेवण गरम गरम करून वाढायला खूप आवडायचे. आई व तिची एक वहिनी विहीरीवर धुणे धुवायला जायच्या. रहाटाने पाणी काढायला लागायचे. धुणे धुवून आले की आईला शाळेत जायचे असायचे. आईला आजी लगेच गरम गरम भात द्यायची. कढईत तेल टाकून चार चिकवड्या तळायची. त्यातच बटाट्याच्या काचऱ्या आणि त्या पानात वाढल्या की लगेच त्याच कढईत पिठलं करायची. आईचे सर्व आवडीचे करायची मग आई पण खूप खुश व्हायची. त्यावेळेला आई सांगते पनवेलला खूप पाऊस पडायचा. सतत धार असायची. अप्पा मामा आईचा सर्वात मोठा भाऊ धूतपापेश्वर कंपनीत होता. त्याला पण आजी गरम गरम जेवण वाढायची. तो कामावरून आला की त्याच्या पुरती ३ पोळ्यांची कणीक तिने ठेवलेली असायची. पहिला आमटी भात झाला की लगेच तव्यावरची गरम पोळी पानात वाढायची. आमटी भात पिठलं भात सर्वांच्याच आवडीचे होते. अप्पा मामा कंपनीत होता त्यावेळेला तो व त्याचे
मित्र दर शुक्रवारी बटाटेवडे आणून खायचे. प्रत्येकी २. त्यातला आठवणीने १ वडा तो आई साठी बांधून आणायचा.

एका भाजीवाली कडून आजी टोपली भर मावळी काकडी घ्यायची. त्यादिवशी सगळ्यांना खमंग काकडी असायची. आईचे वडील पूजा
खूप छान करायचे. आजी त्यांना पूजेची सर्व तयारी करून द्यायची. पूजा झाली की ते शंख वाजवायचे. आजोबा दत्तजयंती करायचे. त्यादिवशी अळीतली सर्व मंडळी जेवायला असत. आजी सर्व स्वयंपाक करायची. ही दत्तजयंती खरे वाड्यात व्हायची. सुंठवडा असायचा. पंचखाद्याचा नैवेद्य. दत्तजयंती आईचे आजोबा करायचे मग आईचे वडील , नंतर मामा व आता मामाचा मुलगा मुरलीधर दादा करतो.

आईचे ८ भाऊ पनवेल, मुंबई, व पुण्यात नोकरीनिमित्ताने राहिले. आजी जिथे राहील तिथे आई पण राहायची. साहजिकच आहे. जिथे आई तिथे मुलगी. आईच्या सतत स्थलांतरामुळे आईच्या शाळा बदलायच्या. त्यामुळे आईचे शिक्षण एके ठिकाणी झाले नाही. माझ्या आजीने सर्वांची बाळंतपणे केली. कितीतरी ! वाड्यामध्ये पण आजी सर्वांच्या मदतीला जायची. अशा एक ना अनेक आठवणी आईच्या बालपणाच्या !

देवधर आईचे माहेर ज्या वाड्यात होते तो होता खरे वाडा. माझ्या आईचे माहेरचे नाव रेवती व टोपण नाव बाबी. आई शेंडे फळ. आईला एक बहिण होऊन ती गेली. आई म्हणाली की मावशीच्या लग्नात ती केवळ ४ महिन्यांची होती. जेव्हा आईच्या मैत्रिणी एकत्र जमतात तेव्हा भरभरून गप्पा मारतात आणि आठवणी काढतात. Rohini Gore

Wednesday, May 17, 2017

माडीवाले कॉलनी - पुणे (1)

१९६१ साली पूर आला. पुरात जवळजवळ सगळेच वाहून गेल्यानंतर पुढे काय? हा प्रश्न होताच. साने माई यांचा बंगला माडीवाले कॉलनीमध्ये होता. त्या आईला म्हणाल्या  "तू अजिबात काळजी करू नकोस. माझ्याकडे एक खोली रिकामी आहे तिथे तुम्ही रहायला या." पूर आला तेव्हा माझे बाबा विश्रामबागवाड्यात कामावर गेले होते तर आई शिवणाच्या क्लासला गेली होती. माझी आजी (आईची आई) घरी पोळ्या करत होती. तिघेही तीन दिशेला होते. माझे आजोबा त्यावेळी वलसाडला होते काकाकडे. पूर येतोय ही बातमी कळताच बाबा कामावरून घरी आले  तोपर्यंत औंकारेश्वराजवळील नदीचे पाणी वाड्याच्या आतपर्यंत पोहोचत होते. बाबा सांगतात की जवळजवळ कमरेइतक्या पाण्यातून वाट काढून आम्ही कसेबसे बाहेर पडलो. बाबांनी पटापट जे सुचेल तसे आईचे दागिने, थोडीफार घरी असलेले पैसे आणि जे काही सुचेल तसे पटापट पँटच्या खिशात कोंबले आणि आजीला म्हणाले, चला चला लवकर बाहेर पडा. केव्हाही पाण्याची पातळी वाढेल आणि वाडा बुडेल. आजी म्हणाली, एव्हड्या पोळ्या करून घेते. तर बाबा म्हणाले, अहो पोळ्या कसल्या करताय, लवकर उठा आणि माझ्याबरोबर बाहेर पडा. आगाशे वाड्यात आईबाबांचे बिऱ्हाड होते. श्री व सौ आगाशे यांना बातमी कळताच सामान पटापट कुठेतरी उंचावर, गच्चीवर जसे जमेल तसे ठेवले होते आणि तेही बाहेर पडत होते. श्री आगाशे यांचे वडील गच्चीत जाऊन बसले होते. ते म्हणाले मी इथून कुठेही हालणार नाही. माझे काय व्हायचे ते होईल. त्यांना समजावता समजावता नाकी नऊ आले.




आई शिवणाच्या क्लासमध्ये होती. तिलाही बातमी कळली आणि ती आणि तिच्या मैत्रिणी लक्ष्मी रोडकडे जायला निघाल्या. खरे तर बातमी रात्रीच कळाली होती की पानशेतचे धरण फुटले आहे आणि पाण्याचे लोटच्या लोट वहायला लागले आहेत.  बाबा, श्री आगाशे आणि त्यांच्या शेजारचे आदल्या रात्री गप्पा मारताना "काही नाही हो, अफवा असतील, दुसरे काही नाही" अशा भ्रमात ! बाबा सांगतात आम्हाला पूर रात्री  आला असता तर आम्ही दोघेही या जगात नसतो आणि तुम्हा दोघी बहिणींनाही हे जग पाहता आले नसते. सगळेजण सदाशिव पेठेत राहणाऱ्या एका मामाच्या खोलीत येऊन पोहोचले. एका खोलीत १० - १५ माणसे!  आळीपाळीने काही आत आणि काही बाहेर असे करत होती. पूर येऊन गेल्यानंतर किती नासधूस झाली होती हे आईबाबांनी मला फोनवरून सांगितले आहे, त्याचे वर्णन पूढच्या लेखात करीनच. पण माडीवाले कॉलनीमध्ये सौ माई साने व श्री साने यांच्या बंगल्यामधल्या एका खोलीत आईबाबांनी त्यांचा नवा संसार कसा थाटला याचे वर्णन अप्रतीम आहे. मुद्दे लिहून ठेवलेत मी ते नंतर विस्तारीन.


माडीवाले कॉलनीतल्या त्यांच्या दुमजली बंगल्याच्या वर गच्ची होती. त्या गच्चीला लागून एक खोली होती. तिथेच माझा जन्म झाला. माझ्या बहीणीचा जन्म गोखलेनगरचा पण माई माझ्या आईला म्हणतात की अगं रंजना खऱ्या अर्थाने इथलीच ! आईला रंजनाच्या वेळी दिवस गेले व गरोदरपणाच्या ७ व्या महिन्यात तिने व माझ्या बाबांनी श्री व सौ साने यांचा निरोप घेतला ते गोखलेनगरला येण्यासाठी. गोखले नगर ही पूरग्रस्तांची कॉलनी आहे. तिथे माझ्या  आजोबांनी  पूरग्रस्तांच्या यादीमध्ये बाबांचे नाव लिहून जागेसाठी खटपट केली. वलसाडला असताना पुर आल्याची बातमी कळाल्यावर  त्यांनी मन खूप घट्ट केले आणि मनाशी म्हणाले की पुण्यात गेल्यावर  मला दोनापैकी एकच चित्र दिसेल ते म्हणजे की निळू आणि निर्मला जिवंत असतील किंवा नसतील !

क्रमश : ...