आजचा दिवस तुम्ही मनापासून दिलेल्या शुभेच्छांमुळे खूपच छान गेला ! अनेक धन्यवाद ! आजचा दिवस लक्षात कायमच असतो पण काहीवेळा वेगळे असे काही घडले तर मी ते रोजनिशीमध्ये लिहिते. तर आज सकाळी उठल्यावर तुमच्या शुभेच्छा पाहिल्या. फोनवर आणि ईमेलमधूनही शुभेच्छा आल्या. आज मी विशेष असे काहीच केले नाही पण तरी वेगळे काहीतरी केले. दुपारच्या जेवणाच्या वेळी २ पोळ्या लाटल्याआणि आदल्या दिवशीची उसळ त्याबरोबर खाल्ली. मला नोकरी लागल्यापासून म्हणजे २०१५ सालापासून मी रात्रीचे जेवण आणिदुसऱ्या दिवशीचे जेवण एकत्रच बनवते. आता घरीच आहे गेले वर्षभर पण तरीही तेच कायम ठेवले आहे. इथे राहणारे सगळेच असे करतात.
Friday, February 26, 2021
२६ फेब्रुवारी २०२१
Friday, February 19, 2021
वास्तू (९)
Saturday, February 06, 2021
६ फेब्रुवारी २०२१
आजचा दिवस खूप वेगळा आणि छान गेला. उद्या परत स्नो डे आहे. पहिला स्नो वितळून झाला नाही तो लगेच दुसरा येत आहे. काल तापमान थोडे वाढले होते म्हणून नेहमीचे चालून आले. ते साधारण १ ते सव्वा मैल आहे. चालताना आजुबाजूने बर्फाचे ढीग रचलेले होते. ते पाहताना छान वाटत होते. पायवाट चालणाऱ्यांसाठी साफ करून ठेवली होती. निसर्ग खूप आनंद देत असतो. उद्या बर्फ पडणार म्हणून आजच सर्व बाहेरची कामे केली. त्यामुळे आजचा दिवस पूर्णपणे कामात गेला.
आज मला एक सुखद धक्का बसला. माझी ऑर्कुट पासून असलेली मैत्रिण हिने मला एक पत्र पाठवले. हस्तलिखित पत्र जेव्हा आपण वाचतो तो आनंद काही वेगळाच असतो. तिच्या मुलीने पण मला पत्र लिहिले आहे. ही दोन्ही पत्रे वाचताना मला त्या दोघी प्रत्यक्षात भेटल्या असे वाटले. पत्रं लिहिणे हे संपलयं असे म्हणतो. काही जण पत्रंप्रेमी अजूनही आहेत. अवनी ही त्यातलीच एक आहे. मी पण तिला पत्र लिहिणार आहे. पत्र लिखाण केले तर ते होतेच होते. संपलयं म्हणले तर सगळच संपलेले असते. गोष्टी टिकवाव्या लागतात. मला आज खरच खूप आनंद झाला आहे. हा आनंद काही वेगळाच आहे ! तिच्या मुलीने सुरेख चित्र काढले आहे.
आज मला अजून एका गोष्टीचा आनंद झाला आहे. विनायकचा मित्र हरीश याने एक फारवर्ड पाठवले. पुण्यातली जूनी चित्र होती. ती चित्रे बघून मला पूर्वीच्या गोष्टी आठवल्या. ती चित्रे होती पुण्यातली काही टॉकीजे. वसंत, निलायम, आर्यन, मला निलायम टॉकीज खूप आवडायचे. निलायम मध्ये गोलमाल पाहिला होता. या टॉकीजची रचना खूप वेगळी आणि छान आहे. चतुश्रुंगीचे चित्र होते. शिवाय अभ्यंकर खून खटल्या
मधील आरोपींची चित्रे केसरी वृत्तपत्रात आली होती आणि त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. तो केसरी पेपर आणि त्यामधली ती चित्रे पाहून खूपच छान वाटले. प्रभात/भांडारकर? रोडवर अभ्यंकरांचा बंगला होता आणि त्या बंगल्यात राहणाऱ्या सर्व सदस्यांचे खून झाले होते. त्यावेळी पुण्यात खूपच भीती पसरली होती.
पत्रासोबत मला अवनीने ३ पुस्तके पाठवली आहेत. आमचा लग्नाचा वाढदिवस २६ फेब्रुवारीला असतो. त्यानिमित्ताने तिने आम्हाला पुस्तके भेट म्हणून पाठवली आहेत. ही तीन पुस्तके अध्यात्मिक आहेत. आजचा सूर्यास्त पण वेगळा आणि छान होता. आजचा दिवस कायम लक्षात राहावा म्हणून हे रोजनिशीतले एक पान लिहिले.
photo credit - whatsapp forward
आज खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
Monday, January 25, 2021
भारतभेट २०१९
यावर्षीची भारतभेट लांबली. काही कारणांमुळे आधीचे तिकिट रद्द करावे लागले आणि मग नंतर जायचे ते गणपतीच्या दिवसात जाऊ असे ठरवले आणि गेलो. पुण्यातले गणपती बघून कितीतरी वर्षे लोटली होती. पण गणपती बघणे झाले नाही. आईने ठरवले होते की तिची एक मैत्रिण आणि आम्ही दोघी एक रिक्षा करायची व गणपती बघायचे. ही भारतभेट खूपच वेगळी होती. आईच्या घरी जी बाई आहे ती आईकडे सर्वच्या सर्व कामे करते. अगदी स्वयंपाकापासून ते लादी पुसणे, कपड्याच्या घड्या घालणे इथपर्यंत. पण या मावशी त्यांच्या गावी गेल्या होत्या. त्यांना पण काही कारणा निमित्ताने जावेच लागले. त्यामुळे मला सर्वच्या सर्व कामे धुणे भांड्यांपासून करावी लागली. एक समाधान होते की मला माझ्या हातचे आईबाबांना जेवण मिळाले. सकाळचा चहा आलं घातलेला आईबाबांना आवडत होता. बाबांना माझ्या हातचे आमटी भात, पिठले खूपच आवडून गेले त्यामुळे मलाही खूप आनंद झाला. आईला मी साबुदाणे वडे गरम गरम करून घातले. पोहे उपमेही करून घातले. शिवाय मी भाजी आणायला जायचे तिथे एक दुकान होते तिथला वडा पाव तर खूपच चविष्ट होता. हा वडा पाव मी २ ते ३ वेळा आणला.
नंतर ८ दिवसांनी मावशी आल्या पण झाले काय की तोपर्यंत गणपती करता लोकं फिरायला बाहेर पडतात आणि खूपच गर्दी होते त्यामुळे आमचे गणपती बघायचे राहून गेले. गणपतीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही जाणार होतो. मावशी आल्यावर त्यांनी सीताफळ बासुंदी बाहेरून आणली व पुऱ्या गरम करून मला वाढल्या. माझी एक वहिनी होती तिच्याकडे मी व आई सवाषण म्हणून गेलो हा दिवस तर खूपच छान गेला. मी व आईने पैठणी साड्या नेसल्या. रिक्शाने गेलो वहिनीकडे. तिने व तिच्या सुनेने आमचे स्वागत केले आणि वहिनी म्हणाल्या मी आता चहा ठेवत नाही, तुम्ही लगेचच जेवायला बसा. आम्ही दोघी आयते जेवायला बसलो. तिने व तिच्या सुनेने खूप आग्रहाने वाढले. वहिनीने आम्हाला गरम पुरणाच्या पोळ्या वाढल्या व त्यावर भरपूर साजूक तूपही वाढले. एकीकडे तिच्या सुनेने आम्हाला घोसावळ्याची भजीही गरम गरम वाढली. बटाट्याची भाजी, नारळाची चटणी. काकडीची कोशिंबीर असा खूप साग्रसंगीत स्वयंपाक केला होता. मला तर असे आयते आणि चविष्ट जेवायला खूपच छान वाटत होते.
नंतर तिने आमच्या दोघींची ओटी भरली. पाकिटातून पैसे दिले. आणि आम्ही सगळेच थोडे आडवे झालो. उठल्यावर चहा घेतला. तिचे घर बघितले. दुमजजली घर खूपच छान सजवले होते. ते बघून खूप बरे वाटले .
नंतर तिच्या मुलाने आमच्याकरता उबर टक्सी बोलावली, आम्ही पूर्वी राहत होतो ते शेजारचे भालेराव काका त्यांच्या घरी पण जाऊन आलो. वहिनीच्या आणि त्यांच्या
घरातल्या गणपतीचे छान दर्शन झाले.
आईच्या घरी ढेकूण झाले होते म्हणून आम्ही माझ्या बहिणीकडे गेलो होतो २ दिवस राहयला त्यामुळे तिच्या गणपतीचे पण छान दर्शन झाले. आम्ही तिघींनी मिळून गणपतीचा नैवेद्द केला. मी माझी बहिण व भाची मिळून तुळशीबागेत खरेदी करायला गेलो. तिथे मी माझ्या करता गाउन घेतले. आणि मी जिथे काम करते त्या मैत्रिणींकरता पर्सेस घेतल्या. शिवाय एक खोटे मंगळसूत्र घेतले. शनिपाराशी रस प्यायलो. यावेळेला पुण्यावरून थेट विमानतळावर गेलो. तिथे गेल्यावर कळाले की फ्लाईट कॅन्सल झाली आहे. मग आम्ही पूर्ण रात्र विमानतळावर
काढली.
झोपेच चांगलच खोबरं झालं त्यात आधीचा प्रवास पुणे ते विमानतळ त्यामुळेही पाठ खूप दुखायला लागली. यावेळेला
भारतावरून
परत अमेरिकेत येताना खूपच त्रास सहन करावा लागला. गणपती बघायला मिळतील ते पण बघणे झाले नाही.
माझ्या मामे वहिनीने आम्हाला दोघांना जेवायला बोलावले. तिने पाव भाजी, फ्रुट कस्टर्ड, आणि सफरचंदाचे मिल्क
शेक केले होते. खूपच चविष्ट बेत होता. रात्रभर विमानतळावर काढायला लागल्यामुळे अधून मधून मी व विनायक इकडे तिकडे चकरा मारत होतो. तिथले फूड स्टॉल छांनच होते. काहीतरी खावेसे वाटत होते. पण खाल्ले नाही. कारण आम्ही ५ वाजता पुण्यावरून निघालो आणि रात्री ९ ला
विमानतळावर पोहोचल्यावर पोळी भाजी खाल्ली होती त्यामुळे भूक नव्हती आणि विमानात बसल्यावर पण लगेच खायला देतात त्यामुळे पण खाल्ले नाही. पहाटेचा चहा विमानतळावर घेतला. विमानतळावर गर्दी नव्हती त्यामुळे आम्ही चक्क खाली झोपलो होतो. वरच्या बॅगेतले टॉवेल खाली अंथरले आणि त्यावर आडवे झालो. झोप कुठची लागायला? पण निदान पाठ तरी जमिमीवर टेकली जात होती. कँसल झालेली फ्लाईट शेवटी पहाटे ६ ला लागली.
रात्रभर मुंबईच्या विमानतळावर काढली त्यामुळे सुरक्षित वाटत होते.
२०१९ च्या भारतभेटी मध्ये जे ठरवले होते ते झाले नाही. पण जे झाले ते चांगले झाले यात समाधान नक्कीच आहे.
Tuesday, January 12, 2021
१२ जानेवारी २०२१
आजचा दिवस वेगळाच होता. नव्या वर्षातले हे माझे पहिलेच रोजनिशीतले पान ! आजकाल रोजनिशी लिहिली जात नाही. विल्मिंग्टनला असताना काही ना काही वेगळे घडायचे आणि ते लिहिले जायचे. तर आजचा दिवस आनंद देणारा होता. व्हॉटस ऍप वर एक युट्युबची लिंक मला माझ्या मैत्रिणीने फॉरवर्ड केली ती होती दोन बहिणींची वय वर्षे ८८ आणि ८६ मोठ्या बहिणीने छोट्या बहिणीला वड्या कश्या
बनवायच्या ते शिकविले. वड्या होत्या सफरचंदाच्या आणि त्यामध्ये घातला होता ओला नारळ.
या वड्या मी त्यांच्या पद्धतीनुसार करून पाहिल्या. चव छान लागते. सफरचंदाचा स्वाद छान लागतो. आज कराओकी ट्रॅकवर कही दूर जब दिन ढल जाए हे गाणे रेकॉर्ड केले. तेही मनासारखे झाले. हे गाणे मला खूपच आवडते. यात फिलोसॉफी सांगितली आहे आणि कवीची कल्पना तर खूपच छान आहे.
आज बरेच दिवसांनी साबुदाणे वडे केले. काल मी माझ्या आईबाबांची एक आठवण लिहिली ब्लॉगवर. त्या आठवणीमध्ये मी आजही आहे. आईला फोन करते तेव्हा गप्पांच्या ओघात काही वेळेला तिच्या तरूणपणातल्या आठवणी सांगते. मग मी पटपट वहीत लिहून घेते आणि ब्लॉगवर टंकते.
Monday, January 11, 2021
माडीवाले कॉलनी - पुणे (२)
आईबाबांचे लग्न १९५७ साली
झाले. त्यानंतर त्यांचा संसार पुण्यातील आगाशे
वाड्यात सुरू झाला. आगाश्यांच्या वाड्यात लग्ना आधी बाबा, काका आणि मामा
(म्हणजे माझे आजोबा) रहायचे. बाबा, काका आणि मामा १९५१ साली आगाशे वाड्यात
राहायला आले. तिथे ते वाड्यातल्या माडीवर राहायचे. आगाशे काका भुताच्या
गोष्टी सांगत असत. १९५१ ते १९५७
सालापर्यंत बाबांनी इंग्रजी आणि गणित मुलांना फुकट शिकवले. जेव्हा बाबांचे
लग्न झाले तेव्हा त्या घरात पहिल्यांदाच बाईमाणूस आले.
बाबांची आई त्यांचा लहानपणीच देवाघरी गेली. आणि बाबांची बहिण वयाच्या १५ व्या वर्षी देवाघरी गेली. तिला टायफॉइड झाला होता आणि नंतर तो उलटला आणि त्यातच ती गेली. जेव्हा आईचा बघण्याचा कार्यक्रम झाला तेव्हा मामा (आजोबा) म्हणाले की निळू हीच मुलगी तुझी बायको होईल. मामांना आईमध्ये त्यांची मुलगी दिसली. माझ्या आत्याचे टोपण नाव "बेबी" होते. आईचे लग्न झाले तेव्हा आई फक्त २० वर्षाची होती. आगाशे यांच्या आईला माझ्या आईचे खूप कौतुक होते. १९६१ साली पूर आला आणि आगाशे वाड्यात पाणीच पाणी झाले होते. आई बाबा
वेगवेगळ्या दिशेला होते. काका आणि आजोबा वलसाडला होते.
माडीवाले कॉलनी मध्ये साने माई यांचा दुमजली बंगला होता. या सानेमाई आईला ओळखत. ही ओळख म्हणजे अशी की आईची पनवेलची एक मैत्रीण मालू ही लग्न होऊन माडीवाले कॉलनीत राहायला आली होती. आणि आई पण लग्न होऊन पुण्याला आली आणि परत या दोघी मैत्रीणींची भेट झाली. मालूमावशी आईपेक्षा वयाने मोठी होती आणि तिला आईचे खूप कौतुक होते असे आई सांगते.
मुलांना शिकवायला जात असत.
माईंनी आणि आजीने आईचे सर्व डोहाळे पुरवले. आई सांगते आईला खूप कडक डोहाळे लागले होते. आईची सर्व प्रकारची डोहाळेजेवणे झाली. फक्त एक चांदण्यातले डोहाळेजेवण राहिले होते. मालू मावशी म्हणाली की गच्चीत चांदण्यातले डोहाळेजेवण करू. आईला सांगितले की तू फक्त तळण कर बाकी इतर स्वयंपाक सर्व आम्ही करू. मग मालूमावशी (आईची मैत्रीण) तिचे यजमान व दोन मुली, सानेकाका आणि माई, आजी आजोबा, आईबाबा असे सर्व चांदण्यातल्या डोहाळेजेवणाला हजर होते.