Thursday, May 28, 2026

आहार - व्यायाम - वजनातील घट आणि वाढ (१)

मला गोड पदार्थ अजिबात आवडत नाही आणि मला भातही आवडत नाही. शिवाय मी एका वेळेला खूप खाऊ शकत नाही. कदाचित यामुळेच माझे वजन नेहमी आटोक्यात राहत असावे असे मला वाटते. लग्ना आधी माझे वजन ३८ किलो होते. माझी उंची ५ म्हणजे माझे वजन ४५ ते ५० पर्यंत असायला पाहिजे. आईकडे आहार चौरस होता तरीही वजन इतके कमी का होते याचे कारण मला सटरफटर अरबट चरबट खाण्यात जास्त स्वारस्य होते. कधीही पोळी भाजी आमटी भात आवडीने खाल्ला नाही. व्यायाम करत नव्हते. व्यायाम म्हणजे दोरीवरच्या उड्या मारायचे. खेळायचे म्हणजे लंगडी, शिवाशिवी इतकेच. लग्नानंतर आम्ही दोघे जेव्हा आयायटी वसतिगृहात रहायला आलो तेव्हा विनुने मला विचारले तू व्यायाम करत नाहीस का? मी म्हणाले नाही. तर तो म्हणाला की सूर्यनमस्कार घालत जा. बायकांकरता हा व्यायाम चांगला आहे. त्याने मला एक-दोन सूर्यनमस्कार घालून दाखवले. मी एका दमात १२ सूर्यनमस्कार घातले. दुसऱ्या दिवशी परत विचारले व्यायाम केलास का? मी म्हणाले की नाही. मला ताप आल्यासारखे वाटत आहे. तर म्हणाला असेच वाटते. तुला व्यायामाची सवय नाही. २-३ दिवस सलग सूर्यनमस्कार घातल्यावर मला छान वाटायला लागले. माझे वजन हळूहळू वाढायला लागले. विनु दंड बैठकांचा व्यायाम करायचा. शिवाय काही योगासने पण करायचा. विनुचे लग्नावेळी वजन होते ७२ किलो. त्याची उंची ५ फूट ११ इंच आहे. त्यासाठी वजन बरोबर होते. शिवाय केमिस्ट्री लॅब तिसऱ्या मजल्यावर असल्याने आणि आमचे वसतिगृहामधले घर पण तिसऱ्या मजल्यावर असल्याने जिने चढ-उतार होत होते. शिवाय आयायटी लॅब पर्यंत जा ये चालतच व्हायची. मी पण मैत्रीणीबरोबर भाजी आणायला किमान १ मैल असेल अंतर (जास्तीच असावे) आठवड्यातून २ वेळा चालत जायचे. धुणे भांडी घरीच करायचे. धुणे-भांडी करणे हा पण एक व्यायामच आहे. टबातून भांडी बाथरूम मध्ये ठेवून त्यात भरपूर पाणी घालून ठेवायचे. त्यावेळेला विम बार साबण होता. त्याने भांडी घासायचे. भांडी खाली बसून घासून झाल्यावर उभी राहून वाकून बादलीतल्या असलेल्या पाण्याने भांडी विसळायचे. धुणे धुवायचा व्यायाम तर जास्त चांगला आहे. यात हातापायांना जास्त व्यायाम होतो. कपडे आघळून पिळण्यासाठी दोन तीन वेळेला स्वच्छ पाण्यातून खळखळावे लागतात. त्यासाठी पण वाकावे लागते. वाकल्यामुळे पोट सपाट रहाते. आणि कपडे वाळत घालण्यासाठी वर किती वेळा बघावे लागते? त्यामुळे मानेलाही व्यायाम. आजकाल वर कोणीही बघत नाही. सरळ लॅपटॅप समोर आणि खाली वाकून मोबाईल मध्ये ! विनुची शिष्यवृत्ती वाढल्यावर मी धुणे-भांडीला बाई लावली व शिवणाचा क्लास लावला. शिवणाच्या क्लासला मी आठवड्यातून २ वेळेला साधारण २-३ मैल जा ऊन येऊन चालत होते. माझे वजन ३८ वरून ४० ते ४२ पर्यंत गेले. मला खूप आनंद झाला. लग्ना आधी विनुचा आहार जेमतेमच होता. वसतिगृहाच्या कॅन्टीनमधले जेवण आणि रात्रीचा डबा. त्यात पोळ्या चांगल्या नसायच्या. भाजी म्हणजे रसाची पातळच असायची. 
 
 
लग्नानंतर आमचा आहार असा काहीसा होता. सकाळी न्याहरीला विब्स ब्रेडचे ३ ते ४ स्लाईस भाजून त्यावर अमुल बटर पसरवून खायचो. त्यावर दुधाची instant कॉफी. दूध खूपच पातळ असायचे. दुपारी जेवणाला पोळी,भाजी, कोशिंबीर, आमटी, भात, ताक , संध्याकाळच्या खाण्याला पोहे, उपमे, साबुदाणा खिचडी. हे पदार्थ खाण्यासाठी खोलगट चिनिमातीच्या डिशा होत्या. मी आईकडून आणल्या होत्या. त्या खोलगट डिशा आईने बोहारणीकडून घेतल्या होत्या. डीश भरून खायचो. एकदा नाही तर परत डिश भरून भरपूर खायचो. दुपारच्या जेवणाला माझ्यासाठी २ पोळ्या व विनुच्या ४ पोळ्या असायच्या. रात्रीच्या जेवणात आमटी भात, मुगाच्या डाळीची खिचडी असायची. विनु सकाळी नाश्ता करून ९ ला लॅब मध्ये जायचा. जेवायला घरी येऊन थोडावेळ विश्रांती घेऊन परत लॅब, नंतर परत संध्याकाळच्या खाण्याला येऊन परत लॅब, परत रात्री जेवायला येऊन परत लॅब. रात्रंदिवस लॅब. मी म्हणायचे पण त्याला की तू लॅबमध्येच का नाही रहात? 😃 लग्नानंतर विनायकचे वजन ७२ चे ८० किलो झाले आणि माझे ३८ चे ४५ किलो झाले. विनुचे व माझे आयाटीमध्ये खूपच चालणे व्हायचे. 
 
 
विनायकला मी सल्ला दिला की तू नुसते जोर बैठकांचा व्यायाम करू नकोस. जोडीला सूर्यनमस्कारही घाल.दंड बैठकाने शरीर कडक होते. सूर्यनमस्काराने लवचिक होते. तर तो म्हणाला की तू पण दंड बैठका घाल. त्याने स्नायुंना बळकटी येते. मी आधी नाही म्हणाले. सुरवातीला मी १२ नमस्कार घालत होते. ते नंतर २५ केले. पण त्याने खूपच दमायला व्हायचे. नंतर १२ नमस्कार, ८ दंड व ८ बैठका असा व्यायाम सुरू केला. पण त्याचा त्रास व्हायला लागला. त्यानंतर मी माझा व्यायाम सेट केला. १२ सूर्यनमस्कार, ४ दंड, ४ बैठका व काही योगासने. विनुने पण सूर्यनमस्कार घालायला सुरवात केली. योगासनामध्ये विनुला शिरसासन खूप चांगले जमायचे व मला ते कधीच जमले नाही. मला सर्वांगासन खूप छान जमायचे. आम्हाला दोघांना कमान चांगली जमायची. पद्मासन घालायचो. अजून काही योगासने होती पण त्यांची नावे आता आठवत नाहीत. copy right - rohini gore 
 
 
लेखाचा दुसरा भाग लवकरच.....

Thursday, May 14, 2026

14 May 2026

 आज दिनांक १४, मे २००१ ला रात्री आम्ही दोघे मुंबईच्या आंतराष्ट्रीय विमानतळावर होतो. आम्हाला सोडायला विनायकचा मित्र राम भट, त्याची बायको शकुंतला व त्याचा लहान मुलगा असे आले होते. आम्ही आमच्या मोठाल्या बॅगा धावपट्टीवर सोडल्या व परत बाहेर येऊन त्यांच्याशी शेवटच्या प्रत्यक्षातल्या समोरासमोर उभे राहून गप्पा मारल्या. काहीवेळा नंतर चला, आता निघतो आम्ही, विमान सुटायची वेळ झाली असे सांगून कुटुंब मित्राला टाटा बाय बाय केले. मी मित्राच्या मुलाच्या हातात खाऊसाठी पैसे ठेवले. शकुंतला आम्हाला म्हणाली की तिथे पोहोचल्यावर आम्हाला ईमेल ने कळवा. विनायकची रेडिफ मेल होती. त्यावेळेचा आंतराष्ट्रीय विमानतळ मला अंधुक आठवत आहे. लुफ्तांझा एअरलाईनची फ्लाईट होती. 15 मे चा भारतातला सूर्योदय होण्या आधी आमचा प्रवास सुरू झाला. विमानात बसण्यापूर्वी २ वर्षे सलग आम्ही दोघे एका अग्निदिव्यातून गेलो होतो. मानसिक आणि शारिरीक खच्चीकरण झाले होते. आमचे विमान सुटले. खिडकीतून मी बाहेर पाहिले तर मुंबई नगरीचे असंख्य पिवळे दिवे, जणू काही दिव्यांच्या माळाच पसरलेल्या आहेत असे चित्र दिसले. काही सेकंदातच खिडकीतून काळाकुट्ट अंधार दिसायला लागला आणि डोळ्यात पाणी आले. आमच्या विमानात फक्त एकच भारतीय होता. Frankfurt विमानतळावर आमचा काही तासांचा अवधी होता. तो एक भारतीय व आम्ही दोघे पुढच्या प्रवासाकरता कोणत्या गेटवर विमान लागले आहे हे तिथे असलेल्या डिजिटल पटलावर शोधत होतो. जर्मनीच्या त्या विमानतळावर तिथे वावरत असलेल्यांचा तुटकपणा खूपच जाणवत होता. सगळ्यांचे चौकोनी चेहरे. कोणाच्याही चेहऱ्यावर हास्यमुद्रा दिसत नव्हती. डॅलस विमानतळावर येण्याकरता आमचे विमान जसससे खाली उतरत होते तेव्हा मी खिडकीतून खाली पाहिले तर हायवे वर प्रचंड वेगाने कार जाताना दिसल्या. बाकी कोणतेही वाहन दिसले नाही. आणि अशा रितीने १५ मे ला निघून आम्ही अमेरिकेतल्या डॅलस विमानतळावर १५ मे रोजीच पोहोचलो. rohinigore



Sunday, April 19, 2026

18 April 2026

 18 April 2026 - ही आहे कालच्या दिवसाची रोजनिशी. ती दिसेनाशी झाली. आज आता उठल्यावर दिसली म्हणून पोस्ट करत आहे.

आजचा दिवस छान गेला. एक तर थंडी पुर्णपणे गेली आहे. तशी अधुन मधून डोकावत रहाते पण थंडी, बोचरे वारे, बर्फ हे सर्व संपल्यामुळे छान वाटत आहे. नेहमीप्रमाणेच विकांताची कामे आटपून आम्ही चांद पॅलेसला जेवायला गेलो. पूर्वी फक्त एकदाच गेलो होतो. कोरोनानंतरच अर्थात ! सर्व उपाहारगृहांनी पैसे अवाच्या सवा वाढवले आहेत. बफे ला आता २५ डॉलर्स ! म्हणजे दोघांचे ५० आणि त्यावर टॅक्स आणि चांद पॅलेस ला तर अजून एक टॅक्स लावतात. म्हणजे दोघांचे मिळून ६० डॉलर्स ! इडली डोसे खाऊन कंटाळा आला होता म्हणून काहीतरी वेगळे खाण्याचा विचार केला आणि मनाचा हिय्या करून गेलो कारण तिथल्या पदार्थांची चव चांगली असते ते माहीत होते. मी पूर्वी बटाटेवडे, सामोसे आणि बरेच काही बरेच वेळा बनवायचे. आता बनवत नाही. भांडी खूप पडतात घासायला. त्यामुळे मनात असूनही केले जात नाही. आज चांद पॅलेस मध्ये ठराविक पदार्थ खाल्ले त्यामुळे खूप बरे वाटले ! अर्थात जे खाल्ले ते अगदीच मोजून मापून. खाणे पण खूप कमी झाले आहे. गोड पदार्थ तर तोंडात खूपच घोळत रहातात.

तर आज मी २ स्प्रिंग रोल, २ भजी, १ सामोसा, छोटे तळलेले पापड २, २ पुऱ्या, बटाट्याची रस्सा भाजी, खाल्ली. गोडामध्ये १ गुलाबजाम, थोडे आईस्क्रीम, थोडी रसमलाई असे खाल्ले. बफे मध्ये बरेच काही असते. भाज्या भात, पाणीपुरी, सलाड. शिवाय तुम्हाला विचारतात की नान व डोसा पाहिजे का? मी नाही सांगितले. विनुने डोसा घेतला व बाकीचे म्हणजे सांबार, छोले, सूप आणि दही वडे, भजी घेतले. जे घरी करतो ते मी कधीच घेत नाही म्हणजे भात-नान-पोळी. बाकीचे चव येणारे पदार्थ घेते की जे मी आता करत नाही. गोड तर करणे बंदच झाले आहे. वर्षातून एकदा पुरणपोळी बनवायचे ती पण आता बनवत नाही. एक तर दोघच असतो आणि त्यातून खाणेही खूप कमी झालयं, भांडी पण खूप पडतात. म्हणजे काही करायचे म्हणले तर व्याप आणि तापच जास्त असतो. साधी ओळी भेळ पण आता बनवत नाही. क्वचित काही वेळा बटाटेवडे आणि साबुदाणे वडे बनवते.


आज संगीत के सितारे मध्ये एक थीम होती ती म्हणजे कोणीही हिरो,हिरोईन, किंवा इतर आरशासमोर बसून/उभे राहून मेक अप करत आहे. मला जे गाणे हवे होते त्याचा विडिओच उपलब्ध नाहीये युट्युबवर, पूर्वी होता. ना जिया लागेना गाणे त्या थीम मध्ये टाकणार होते. २-३ गाणी आठवत होती त्यापैकी एक गाणे टाकले ते म्हणजे पिया का घर है ये रानी हु मै रानी हु घर की. या गाण्यात जया भादुरी आरशासमोर उभे राहून केस विंचरते. खरे तर माझ्या मनात अजून एक गाणे होते ते तर थीम मध्ये अगदी चपखल बसत होते पण ते आधी कुणीतरी टाकले होते. ते गाणे म्हणजे पिया ऐसो जियामें समाय गयो रे के मै तनमन की सुदबुद गवा बैठी.
अजून २ गाणी आठवली ती म्हणजे मित ना मिला रे मनका. या गाण्यात शेवटी एक बाई गाणे ऐकता ऐकता आरशात पाहून लिपस्टिक लावत असते. आणि पलभर के लिए कोई हमे प्यार कर ले झुठा ही सही. या गाण्यात हेमामालिनी आरश्यासमोर उभी राहून केच विंचरते. गाण्यात आरशासमोर उभे राहून कोणीतरी मेक अप करत आहे मग ते काही सेकंदासाठी असले तरी चालेल अशी थीम होती. मला ही थीम खूपच आवडली. विनुचे आवडते गाणे की जे या थीम मध्ये अगदी चपखल बसते ते मी विनुसाठी ठेवले होते पण तेही कुणीतरी आधीच टाकले होते. ते गाणे म्हणजे देखती ही रहो आज दर्पण ना तूम, प्यार का ये महुरत निकल जाएगा. हे गाणे पण कोणीतरी आधीच टाकले होते. तर एकूण आजचा दिवस चांगला गेला. rohinigore

Sunday, April 12, 2026

१२ एप्रिल २०२६ भावपूर्ण श्रद्धांजली आशाताई


१२ एप्रिल २०२६ भावपूर्ण श्रद्धांजली आशाताई 

आज सकाळी उठले आणि बातमी वाचली ती आशा ताईंच्या निधनाची. खूप गदगदून आलं आणि मी ओक्साबोक्शी रडायला लागले. आपल्या घरातलेच कुणीतरी गेलयं असे वाटले. सुरांची एक खूप मोठी पोकळी निर्माण झाल्यासारखी वाटली. जेव्हा लताताई हे जग सोडून गेल्या तेव्हा मला रडू नाही फुटले, का ते माहीत नाही. आशा-लता दोघींचे सूर प्रचंड ताकदीचे बनले आहेत. मूळातच आवाजात गोडवा. हा गोडवा दोघींचाही निराळा ! कुणीतरी आपल्यावर जादू करतयं असच वाटतं त्यांची गाणी ऐकताना. दोघींचेही स्वर आसमंतात निनादत राहतीलच आणि आपल्या मनातही ! लता - आशा म्हणजे एक सूर्य तर एक चंद्र. एक राम एक कृष्ण. आशाच्या आवाजाला एक प्रकारची धार आहे, फिरत आहे. गाण्यांमधले शब्द ती अश्याप्रकारे गाते की त्या शब्दांनी आपण आकर्षित होतो. लताचा आवाज ऐकताना डोळे मिटावे, मंत्रमुग्ध व्हावे. एक प्रकारची समाधीच लागते. या दोघींची काही गाणी परत परत ऐकाविशी वाटतात. मन भरतच नाही !



मला लताची हिंदी गाणी जास्त आवडतात तर आशाची मराठी गाणी. उदाहणार्थ लताचे धानी चुनर मोरी हाय रे जाने कहा उडी जाए रे तर आशाचे पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नकीळ फाकती प्रभा ! कितीही लिहिले तरी थोडेच आहे. दोघींची तुलना होउच शकत नाही. दोघींच्या नावाचा एकेरी उल्लेख आदरार्थी आहे. त्यांच्या गायनाने सर्वांनाच खूप जवळ केलयं अगदी आईसारखं ! गाण्यांचा राग, प्रकार कुठलाही असो, जन्मापासून मरेपर्यंतच्या प्रत्येक वळणावर घेऊन जातो. गाणं कळायला लागल्यापासून ते आजतागायत आपण सर्वच त्यांची गाणी ऐकत आहोत. आशा-लताचा आवाज आपल्या सर्वांच्या जीवनात चैतन्य निर्माण करतात हे आपले खूप मोठे भाग्य आहे ! copyright rohinigore

Friday, March 27, 2026

२७ मार्च २०२६

 27 March 2026

आजचा दिवस खूप वेगळा होता. आज मी २ मैत्रिणींशी बोलले. एक मैत्रीण पुण्यातली आहे. ती खूपच बिझी असते तरीही ती माझ्याशी अधुन मधून ऑडिओ मेसेज मधून बोलते. ज्याला बोलायची इच्छा आहे तो काहीतरी मार्ग काढून बोलतोच बोलतो. बोलायचे नसेल तर हजार कारणे सांगितली जातात. हे तर सर्वांनाच माहीती आहे. आम्ही दोघींनी एकमेकींना ऑडिओ मेसेजेस पाठवले. ते ऐकून आम्हाला दोघींनाही छान वाटले. हल्ली टाईप करायचा खूपच कंटाळा येतो. मी तर सोडूनच दिले आहे. वहीत लिहीते. पण आज टंकण्याचा मूड लागला म्हणून आजची ही रोजनिशी ! दुसरी मैत्रीण तिच्या मुलीकडे लंडनला सध्या आहे. ती पण तिला जसा वेळ मिळेल तशी बोलते. तर आजचे आमचे डब्ल्युस्लॅशए 🙂 वर खूप बोलणे झाले. तब्बल २ तास बोलत होतो. तिचा ऑनलाईन गाण्याचा क्लास असतो. तिने परिक्षेला निवडलेली गाणी मला स्कॅन करून पाठवली होती. तीच आज तिने म्हणून दाखवली. आणि परिक्षेसाठी काय काय अपेक्षीत आहे ते पण सांगितले. तर ती म्हणाली मला गाणे ऐकून सांग कसे वाटले ते. गाणी निवडताना ती कोणी गायली आहेत, गाण्याचे गीत, संगीत, संगीतप्रकार, भावार्थ हे सर्व बघितले जाते. तर तिने निवडलेल्या प्रत्येक गाण्याचे पहिले कडवे ती गात होती. काही गाण्यांना मी दुरूस्ती सांगितली. म्हणजे गीत-संगीत- कोणाचे आहे ते सांगितले. आठवणीतली गाणी या साईटवर बघ, तिथे सर्व माहिती खरी असते असेही सांगितले. काही गाणी मी नव्यानेच ऐकत होते. काही गाणी तिने खूप जुन्या काळातली निवडली होती. काही गाण्यांचे गीतकार आम्हाला दोघींनाही नव्यानेच कळत होते. राग प्रकार पण नव्यानेच कळत होते. त्यामुळे एकंदरीत मजा येत होती. तिने एक लावणी निवडली होती ती होती तुम्हावर केली मी मर्जी बहार नका सोडून जाऊ रंगमहाल. मला हे गाणे आवडते. मग मी पण तिला हे गाणे म्हणून दाखवले. अर्थात फक्त एकच कडवे. मला म्हणाली छान गातेस गं ! मी तिला म्हणाले की माझी गाणी पाठ नाहीत. मी गुगल वर शब्द शोधते आणि बघून म्हणते. तिने एक गाणे निवडले ते होते शरदाचे चांदणे मधुबनी. तिला म्हणले की हे बाबांचे आवडते गाणे होते. ती मला गाणे सांगायची आणि मी ते आठवणीतली गाणी या मध्ये शोधायचे आणि तिला सर्व माहिती सांगत होते आणि ती लिहून घेत होती म्हणजे गीत-संगीत-गायक. ती म्हणाली बरे झाले ग. परिक्षेची तयारीच झाली माझी. नाचनाचूनी अती मी दमले याचा भावार्थ तिने मला सांगितला. तिने खूप छान गाणी निवडली आहेत. आता पुढच्या आठवड्यात आम्ही विडिओ कॉलवर येणार आहोत आणि ती मला गाणी म्हणून दाखवणार आहे. ती म्हणाली की परिक्षेत गाण्याप्रमाणे चेहऱ्यावर हावभावही आणावे लागतात. त्यालाही मार्क असतात.

संगीत एक सितारे या ग्रुपवर गेली कित्येक वर्ष आम्हा दोघांची हजेरी नाही. पण गेल्या काही आठवड्यात काही थिमांनी आमचे लक्ष वेधून घेतले आणि त्याप्रमाणे आम्ही गाणी पोस्ट केली. आजची थीम छान होती. थीम अशी होती की नायक-नायिकांचे हाथ एकमेकांच्या हातात आहेत अशा ओळी गाण्याच्या गीतात कुठेतरी असल्या पाहिजेत. जसे की हाथोमें तेरे मेरा हाथ रहे जीवनमे पिया तेरा साथ रहे. आज मी त्या ग्रुपवर एक मराठी गाणी टाकले ते म्हणजे दिसते मजला सुखस्वप्न नवे मी संसार माझा रेखिते हे अष्ट्विनायक मधले गाणे. एका कडव्यात हात तुझा हाती असावा असे आहे आणि ते थीम मधे बसणारे गाणे आहे. मागच्या एका थीम मध्ये गाण्यात फुगे दिसायला हवेत असे होते तर विनायकने सपनोंका सौदागर आया हे गाणे पोस्ट केले. या गाण्यात भरपूर फुगे आहेत. मला सुचले होते दिल उसे दो जो जां दे दे पण मी ते पोस्ट केले नाही. आज एकंदरीत गाण्यांच्या मूड मध्ये होते त्यामुळे दिवस चांगला गेला. आज तिखटमिठाचा शिराही छान झाला होता. थोडी वेगळी चव आली होती. गाणी ऐकणे, गुणगुणणे हे एक टॉनिक आहे. शिवाय मनमोकळ्या गप्पा मारणे हे पण आपला मूड चांगला व्हायला मदत करते. - rohinigore


Wednesday, March 04, 2026

२५ फेब्रुवारी २०२६

 



२८ फेब्रुवारी २०२६

 

आज स्वच्छ हवा. वसंत ऋतूची सुरवात होण्याची चिन्हे आजच्या हवेत होती. मागच्या आठवड्यात पडलेला स्नो अजूनही वितळतोय. आज दुपारी एका उपाहारगृहात पण बरेच दिवसांनी गेलो. सा ऊथ इंडियन थाळी छान असते तिथली. अर्थात दोघात एक ! छान चवीचे जेवण व सोबत पंचमची गाणी ! अजून काय हवे? आज बरेच वर्षांनी संगीत के सितारे या ग्रुपवर गाणे पोस्ट केले. थीम मध्ये बऱ्याच गाण्यांचा चॉईस होता! थीम अशी होती की गाण्याच्या मुखडा व अंतरा कुठेही दिनांक, महिन्यांची नावे, किंवा आठवड्याची नावे, यापैकी एक आले पाहिजे. थीम वाचल्या वाचल्या पटकन एक गाणे डोळ्यासमोर आले ते म्हणजे सोमवार को हम मिले, मंगलवार को नैन, ते कुणीतरी पोस्ट केले होते. नंतर एक गाणे आठवले ते म्हणजे सावन का महिना पवन करे सोर हे गाणे मला खूप आवडत नाही. नंतर एक आठवले ते पोस्ट केले. सावन के झूले पडे तुम चले आओ. संगीत अर्थातच आरडी बर्मन. जुर्मानातली गाणी मी पूर्वी म्हणायचे ते आठवले. त्यात अजून एक गाणे आहे तेही मला आवडते ते म्हणजे छोटीसी एक कली खिली थी एक दिन बागमें. हे गाणे मागच्या एका महिन्यात ऐकले होते आणि छान वाटले होते. तसेच आज झाले. एकाने चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी पोस्टे केले तर एकाने आज सोमवार है, तुमको मुझसे प्यार है, बागोमें बहार है हे ते गाणे ! एका पाठोपाठ बरीच गाणी आठवली व युट्युबवर पाहीली. विनुची आवडती गाणीही पाहिली. त्यात सावन के झुले पडे हे गाणे तलत आणि लताने गायले आहे. प्यार की प्यास या चित्रपटातले गाणे. शिवाय अजून एक त्यातलेच एक गाणे ऐकले.


नंतर मला आशा भोसलेचे दिवसामागुनी दिवस चालले ऋतु मागुनी ऋतू हे गाणे आठवले. या गाण्यातही मराठी महिने आहेत. तर आजचा दिवस आम्हाला दोघांना भूतकाळात घेऊन गेला. त्या दिवसात आम्ही दोघेही २ ग्रुपवर थीम आली रे आली की त्याप्रमाणे गाणी पोस्ट करायचो. खूप रमून जायचो आम्ही गाण्यात आणि एखादे चांगले गाणे पोस्ट करायचे निसटून गेले की हळहळ वाटायची. ते ग्रुप्स म्हणजे संगीत के सितार व गीतसंगीत.