Monday, January 22, 2024

२२ जानेवारी २०२४

 

आजचा दिवस खास होता. सर्व भारत देश राममय झाला होता. सर्वजण भारावून काही ना काही करत असताना दिसत होते. प्रसन्न वातावरण सगळीकडेच होते आज ! इतके काही छान वाटत आहे. सर्वांना आनंदाच्या उकळ्या फूटत आहेत जणु ! सणासारखेच वातावरण आहे. रांगोळ्या लाईटिंग दिसत आहे. आजच्या या आनंदाच्या दिवसात अजून थोडी भर पडली. मी अमेझॉनवरून काही वस्तू मागवल्या होत्या. त्याही आल्या. थ्री इन वन मध्ये सिडी-कॅसेट आणि रेडिओ असे आहे. एक जुनी कॅसेट म्हणजे आम्ही दोघी शाळेत असतानाची मी लग्नानंतर आणली होती. त्यात काही काही होते. आता आठवत नाहीये. ती पहिल्याप्रथम लावली आणि एक सुखद धक्का बसला. माझे मन १९८९ सालात गेले. त्या कॅसेट मध्ये मी बरीच गाणी रेकॉर्ड केली आहेत. कॅसेट जेव्हा लावली तेव्हा मी गायलेले चांदणे शिंपीत जाशी आणि बाबांनी गायलेले वाजवी पावा गोविंद ही दोन गाणी होती.


आम्ही दोघे जेव्हा आयाटी पवई मध्ये रहात होतो वसतिगृहात तेव्हा पहिल्याप्रथम आम्हाला आजुबाजूच्या खोल्या होत्या. नंतर लग्न झालेल्या जोडप्यांसाठी तुलसी ब्लॉक्स बांधले. विनायकची शिष्यवृत्ती १२०० वरून २१०० झाली होती. आम्हाला खूप आनंद झाला होता. आमची लग्नानंतरची पहिली खरेदी रेडिओ कम टेप रेकॉर्डर होती. मी बरीच गाणी रेडिओ वरून कॅसेट मध्ये रेकॉर्ड केली होती. रेडिओवर आवडते गाणे लागले की लगेच प्ले व रेकॉर्ड बटण दाबायचे आणि आतल्या आत रेडिओवरचे गाणे कॅसेट मध्ये रेकॉर्ड व्हायचे. एका साईडची सर्व गाणि आज ऐकली आणी खूपच छान वाटले. आता रोज एकेक करत सर्व कॅसेट आणि सिडीज पण ऐकेन. रेडिओवर जर एखाद्या स्टेशनवर हिंदी गाणी लागतात का ते पण पाहीन. तसे तर फोन वर मी इंडिया रेडिओ डा ऊनलोड ऍप डा ऊनलोड केला आहे. त्यावर विविध भारती, पुणे केंद्र आणि एफ एम गोल्ड ही स्टेशने लागतात. अजूनही काही आहेत. विविधभारतीवर अजूनही काही गाणी लागतात जी पूर्वी ऐकलेली आहेत पण स्मरणात नाहीत. अशी गाणी लागली की लगेच गुगल करून लिरिक बघते, युट्युब वर आहेत का ते पण बघते.


नंतर २००१ साली अमेरिकेत असाच टु-इन-वन घेतला होता. ते दिवस पण आठवले. त्यावर २४ तास हिंदी गाणी डॅलस वरून प्रसारित व्हायची. आठवणींना खूप उजाळा मिळाला. मी एक अल्बम पण विकत घेतला आहे. त्यात मी आईबाबंच्या घरातले सर्व फोटो लावणार आहे. शिवाय कृष्ण धवल फोटोही ! अजून काही फोटो डिजिटल कॅमेराने काढलेले की जे फोटो खूप खास आहेत असे. त्याकरता आम्ही पूर्वी कलर प्रिंटर घेतला होता. त्यावरून काही फोटोज प्रिंट केले होते. आता परत एकदा तो प्रिंटर बाहेर काढून ठाकठीक करून कलर फोटो प्रिंट करीन म्हणते. कसे काय जमते ते बघू.


एक सॅंड्विच मेकर घेतला आहे. पूर्वीचा सॅंडविच मेकर बिघडला म्हणून एक घेतला. पूर्वी बरेच वेळा बनवायचे सॅंड्विच व टोमॅटो केच अप बरोबर खायचे. आता परत बनवीन. रॉक पेंटिंगला सुरवात करीन आणि रिकाम्या सीडीज पण रंगवीन. फोनसाठी एक स्टॅंड घेतला आहे. त्याचा पण उपयोग करण्याचा विचार चालू आहे. आजचा दिवस खरच खूपच खास होता. सर्वांचाच. त्यानिमित्ताने मी आज रात्रीच्या जेवणात भरली वांगी, कोशिंबीर, वरण भात, तूप मीठ, लिंबू आणि गोडाचा शिरा बनवला आहे.युट्युबवर अयोध्येत घडलेल्या गोष्टी बघितल्या. त्यात अमिताभ बच्चन, माधुरी दिक्षीत, डॉक्टर नेने, जॅकी श्रॉफ, हेमामालिनी, रणबीर कपूर, आलिया भट, सचिन तेंडुलकर दिसले आणि अजूब बरेच जण असतील. सर्वजण अयोध्येत रामाच्या ओढीने आले होते. 
 
तुम्ही सर्वांनी काय काय केले आजच्या दिवशी? कमेंट मध्ये लिहा. आजच्या बनवलेल्या गोडाच्या शिऱ्यात मी नेहमीप्रमाणे काजू बदाम केळे घातले. सढळ हाताने साजूक तूप, दूध आणि सुक्या क्रॅनबेरीज आणि खजूर घातला आहे. जय श्रीराम !!
Rohini Gore


 

Friday, January 19, 2024

१९ जानेवारी २०२४

 

२०२४ वर्षातल्या रोजनिशीतले हे पहिले पान. जरा काहीतरी वेगळे घडले तर त्या दिवसाचे मी लिहिते. २०११ सालापासून मी रोजनिशी लिहीत आहे. वर्षातून काही थोडी पाने लिहिली जातात. नंतर वाचताना मजा येते आणि हासूही येते की अरे या दिवशी मी अमुक तमुक केले होते तर ! एक प्रकारचा विरंगुळा. तर आजचा दिवस खास असा नाही गेला पण तरीही थोडे वेगळे केले. एक तर हिमवृष्टी झाली. पूर्वीचे स्नो डे मी जास्त छान साजरे करायचे आणि बरेच काही केले जायचे. बाहेर थोडावेळ का होईना फिरून येतेच मी.


काल रात्रभर मला झोप नाही. पहाटे ४ ला लागली ते थेट १० ला उठले. विनायक ऑफीसला जाताना सांगून गेला तेही मी ऐकले नाही. खूप गाढ झोप लागली होती. झोप न लागण्याचे कारण असे काहीच नसते. मला झोपेचा प्रोब्लेम अजिबात नाहीये. पण काही वेळा लागता लागत नाही. झोप लागली नाही तर मध्यरात्री उठून मी काहीतरी खात असते. तर काल पहाटे ३ वाजता चुरमुऱ्यांचा चिवडा खाल्ला. सकाळी उठल्यावर मला मळमळायला लागले. त्यातून बाहेर सूर्यदर्शन नाही. प्रचंड थंडी आणि हिमवृष्टी मुळे सगळीकडे पांढरे शुभ्र झालेले ! बर्फाकडे पाहून डोळे दीपतात.


खरे तर रात्री पोळी न खाता भाजी उरेल म्हणून त्याबरोबर भात खाल्ला होता. कालच्या अडीच पोळ्या शिल्लक होत्या. त्या पोळीचे मी गूळ तूप घालून लाडू बनवले. तेच आजचे जेवण. १० लाडू बनले. आज मला बरेच बरेच दिवसांनी सामोसे करायची हुक्की आली. ते खाताना मन प्रसन्न झाले. दुपारचा चहा झाला. स्नोच्या विडिओ क्लिप्स रेकॉर्ड केल्या. खरा तर आज इरादा होता १ मैल चालायचा पण चालले नाही. नुसती थंडी आणि स्नो असला तरी चालते पण बर्फासारखे गार बोचरे वारे सहन होत नाही. तरी सुद्धा आज विशेष वारे नव्हते पण मनाला आवर घातला. सामोसेची तयारी केली होती. त्याचे सामोसे बनवले. आता रात्री कालची चवळीची ऊसळ आहेच. फक्त भात टाकायचा. सामोसे आज आणि उद्यालाही थोडे होतील. मी अमेझॉनवर काही ऑर्डर केले आहे ते उद्या आणि परवा येईल. त्याची खूपच उत्सुकता आहे. Rohini Gore






 


Tuesday, January 16, 2024

अघटित ....... (4) शेवटचा भाग

 

खाली लिहिलेली कथा ही पूर्णपणे काल्पनिक आहे. मला ही कथा आपोआप सुचली आहे विल्मिंग्टन मध्ये रहात होते तेव्हा २०१५ साली. आता ही कथा मी पूर्ण करणार आहे.

अघटित ....... (3) शेवटचा भाग
पेशंटचे नाव गाव काहीच माहिती नसल्याने मानसीचे नाव रुही ठेवतात. डॉक्टर तिला तपासायला आल्यावर विचारतात कशी आहे रुही? नर्स म्हणते अजून काहीही हालचाल नाही. फक्त श्वास चालू आहे. हेच तर खूप महत्वाचे आहे रिटा! हळूहळू ती पूर्णपणे शुद्धीत येईल. मला माझे मन सांगते आहे. काही दिवसानंतर रुहीमध्ये थोडे थोडे बदल व्हायला लागतात. काही वेळा ती डोळे उघडते. इकडे तिकडे बघत राहते. रिटा ही त्या हॉस्पिटल मधली एक भारतीय तरूणी असते. तिनेच रुही असे नामकरण केलेले असते. आता रुही थोडे थोडे पेय घ्यायला सुरवात करते. तिच्या डोळ्यात मात्र कोणतेही भाव नसतात. रिटा तिच्याशी बोलत रहाते पण त्याचा काहीही उपयोग होत नाही. रिटा त्या दिवशी रात्रपाळीवर असते. तिला मध्यरात्री थोडी डुलकी लागते. तिला खूप मोठा किंचाळण्याचा आवाज येतो आणि ती उठते आणि रुही जवळ जाते. तिथले कर्मचारी गोळा होतात. थोड्याच वेळात डॉक्टर येतात आणि तिला झोपेचे इंजेक्शन देतात. रुही गाढ झोपी जाते. डॉक्टर म्हणतात ती जोरात ओरडली ही चांगली गोष्ट झाली. तिला आता थोडे थोडे आठवायला लागेल. रिटा, आता तू फक्त रुहीचीच काळजी घ्यायची आहे. या पेशंटला बरे करण्याचे काम आता मी तुझ्यावर सोपवत आहे. त्याबदल्यात हॉस्पिटल तुला योग्य तो मोबदला देईलच. रिटा म्हणते मला जास्तीचा मोबदला नको डॉक्टर. रूही पुर्ण बरी झाली की मला खूप बरे वाटणार आहे. रूही शुद्धीत आली की तिला कसे बोलते करायचे हे रिटाला माहीत आहे. 
 
 
मानसीच्या खिशात तिला एक कीचेन मिळते. शिवाय एक कार्ड. ते बहुधा हॉटेलचे असावे असा तिचा अंदाज आहे. मुख्य म्हणजे तिच्या गळ्यातले नाजूक मंगळसूत्र रुहीला बोलते करायला नक्कीच मदत करेल असा रिटाचा विश्वास आहे. एके दिवशी रुही झोपेतून जागी होते तेव्हा तिला रिटा दिसते. तिच्याकडे पाहून ती स्मितहास्य करते. रिटा म्हणते कशी आहेस तू रूही? तुझे नामकरण मी रूही केले आहे. मला तुझे नाव माहिती नाही. ते तू सांगणार आहेस. मी मानसी. रुही उत्तर देते. पण मी तुला रुहीच म्हणणार बरं का? काय पाहिजे तुला चहा, कॉफी, ब्रेड की ज्युस आणि कुकीज? "चहा दे" रिटा तिला चहा आणि कुकीज देते. तिच्या जेवणामध्ये तिला सलाड, ब्रेड, ज्युस, फळे असे देत असतात. रिटा तिच्याशी रोज काही ना काही बोलत रहाते. प्रश्नाला उत्तर इतकेच रूहीचे बोलणे असते. डॉक्टर येतात आणि विचारतात कशा आहात रूही मॅडम? तुमचे खरे नाव मानसी आहे ते कळाले आम्हाला आज. रूही स्मितहास्य करते. हळूहळू मानसीच्या तब्येतीत सुधारणा दिसते पण तिला काय आठवत आहे काय आठवत नाही याचा काहीच पत्ता लागत नाही. रिटा डॉक्टरांना सांगते आज मी तिला तिच्या खिशात मिळालेल्या वस्तू दाखवणार आणि मंगळसूत्र दाखवले की हिला नकीच सर्व आठवेल अशी माझी खात्री आहे. 
 
 
तो दिवस उजाडतो. गप्पा मारता मारता रिटा मानसीला कीचेन, कार्ड दाखवते. आम्हाला तुझ्या खिशात हे मिळाले. कीचेन आणि कार्ड बघितल्यावर तिचा चेहरा बदलतो. तिला काहीतरी आठवत आहे आणि तिला त्याचा त्रास होत आहे ते रिटाला कळते. रूही तू आठवण्याचा प्रयत्न कर. तुला नक्की आठवेल. कीचेन मध्ये अडकवलेला गणपती पाहून ती ढसढसा रडायला लागते. रिटा म्हणते आज तुला झोपेचे इंजेक्शन देते पण हे शेवटचे हं. तुझी तब्येत आता सुधारत आहे. रिटा हिंदीतून बोलत असते त्यामुळे मानसीला कळते ही भारतीय आहे. आपण इथे कसे आलो, का आलो, मला काय झाले आहे हे ती आठवायचा प्रयत्न करत असते. तिला काही काही आठवत असते पण त्या गोष्टींचा तिला क्रम लावता येत नाही. तिला आठवून रडूही फुटत असते. 
 
 
आणि एके दिवशी टिव्हीवर बातम्या चालू असतात. एक वादळ आलेले असते आणि त्यात समुद्र, त्याच्या लाटा, पाऊस असे दाखवत असताना ती जोरात ओरडते. अमित, अमित तू कुठे आहेस? रिटा म्हणते काय झाले. हा अमित कोण? ती उत्तरते माझा नवरा. ती लगेचच तिचे छोटे मंगळसूत्र काढून तिला दाखवते आणि तिला आता लख्ख सगळे आठवायला लागते आणि ती ओक्साबोक्शी रडायला लागते. रिटा तिला जवळ घेते. मानसी तू घाबरू नकोस. मी तुला हवी ती सर्व मदत करणार आहे. हळूहळू मला सर्व जे आठवेल ते सांग. रिटा तिला सर्व सांगते आणि तिला म्हणते आता मी काय करू? कुठे जाऊ? हे कोणते शहर आहे? माझ्या डोक्यात काय चालू आहे ते माझे मलाच कळत नाहीये. अमित कुठाय? मी कशी वाचले? तितक्यात डॉक्टर येतात. मानसीला तपासतात. तिला सांगतात काळजी करू नकोस. आम्ही तुला सर्व प्रकारची मदत करणार आहोत. आता व्यवस्थित दोन वेळा जेवायचे. औषध घ्यायची. टॉनिक घ्यायचे आणि ठणठणीत बरे व्हायचे आहे. नंतर जी जेवून झोपते. रिटा म्हणते मी इथेच आहे तुझ्याजवळ. काही लागले तर मला सांग. त्या दिवशी रात्री ती तिचे मंगळसूत्र घालून झोपते. बराच वेळ तिला झोप येत नाही. अमितचा चेहरा सतत समोर येत असतो. तिला तो भयानक प्रसंगही आठवत असतो. 
 
 
मानसीला रिटाचा खूप आधार वाटतो. ती पूर्णपणे शुद्धीत येते. रिटाला ती तिच्या घरचा सविस्तर पत्ता सांगते. शिवाय अमितचा फोन नंबरही देते. डॉक्टर येऊन मानसीला तपासून जातात. तुमची तब्येत चांगली आहे. सर्व काही व्यवस्थित आहे. तुमच्या शरीरावर आणि मनावर झालेल्या जखमा कालांतराने पूर्णपणे बऱ्या होतील असे आश्वासनही डॉक्टर देतात. रिटा अमितला फोन करते. फोन आंन्सरिंग मशीनवर जातो. तिथे ती सविस्तर निरोप ठेवते. काही वेळातच अमितचा फोन येतो आणि त्याचे आधी रिटाशी व नंतर मानसीशी बोलणे होते. अमित म्हणतो मी उद्या सकाळी लवकरच तुला घ्यायला येतो. तु ज्या हॉस्पिटल मध्ये आहेस ते आपल्या घराच्या २ तासांच्या ड्राईव्ह वर आहे. हॉस्पिटलमधून निघण्याचा दिवस उजाडतो. रिटा तिचे सर्व काही आवरून देते. शिवाय तिला नवीन ड्रेसही घेऊन देते. अमित येतो. डॉक्टरांचे व रिटाचे तो खूप आभार मानतो. हॉस्पिटलचे बिलही भरतो. आणि ते दोघेही कारमध्ये बसतात. रिटा मानसीला एक भेटवस्तू देते आणि म्हणते घरी गेलीस की भेटवस्तू पाहा. तुला नक्कीच आवडेल. डॉक्टरांकडून अमितला रिटा बद्दल कळते. रिटाने आपल्या बायकोची खूप काळजी घेतली होती त्यामुळे अमित रिटाला एका पाकिटातून पैसे घालून देतो आणि म्हणतो याला नाही म्हणू नका. तुमच्यामुळे मानसी मला मिळाली आहे. अमित मानसी कारमध्ये बसतात आणि घरी आल्यावर मानसी ढसाढसा रडायला लागते. अमित म्हणतो खूप रडून घे आणि मोकळी हो.
 
 
त्या दिवशी मी जागा झालो आणि तू माझ्या शेजारी नव्हतीस. सगळीकडे शोधले तुला. वेड्यासारखा सर्वांना विचारत राहिलो. होटेल सोडण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. ९११ ला फोन करणार होतो पण वाटले नको. नसते लचांड मागे लागेल. मी घरी आल्यावर माझी काय अवस्था झाली होती ते मला शब्दात नाही सांगता येणार. मित्रांना सल्ला विचारला. मी तुझी रितसर मिसिंग कंप्लेंट नोंदवली. २ ते ३ वेळा आपण उतरलो होतो त्या होटेल मध्ये आलो. त्यांना तुझा फोटो दिला आणि इथल्या सर्व होटेलमध्ये तो द्या आणि माझी बायको कुठे दिसली तर सांगा असेही सांगितले. होटेलचा मॅनेजर म्हणाला मी शक्य तितके प्रयत्न करीन. मी माझ्या ऑफीसच्या कामात स्वत:ला झोकून दिले होते. घरी मी फक्त झोपायला यायचो. तुझ्या व माझ्या आईवडिलांना कळवले तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. ते सर्व इथे यायला निघाले होते. 
 
मानसी म्हणते माझे नशिब खूप बलवत्तर म्हणून मी वाचले आणि खरे सांगू का? मला देवाने वाचवले आहे. माझ्या पॅंटच्या खिशात आपल्या घराची माझ्याजवळ असलेली दुसरी चावी होती. यात गणपतीचा फोटो मी चावीत अडकवून ठेवला होता. तुला आठवत आहे का? आपल्याला दोघांनाही गणपतीची छोटी फ्रेम आवडली होती ते ! मला रिटाने सांगितले की समुद्राला भरती होती म्हणून मी वाचले. लाटांनी मला जसे आत खेचले होते तसेच मला बाहेरही फेकले होते. मी वाळूत निपचित पडले होते. बेशुद्ध होते. समुद्रकिनारी रहात असलेल्या एका जोडप्याने मला घरी नेले. नंतर एका दवाखान्यात नेले. तिथून मला मी आत्ता असलेल्या चांगल्या हॉस्पिटल मध्ये दाखल केले. त्या जोडप्याचे मी कसे आभार मानु? अमित म्हणतो आपण त्यांचा शोध घेऊ आणि त्यांच्या घरी नक्की जाऊ. आता तू शांतपणे झोप. दोघेही कितीतरी वेळ बोलत बसतात.. त्या रात्री दोघांनाही निवांत झोप लागते. सकाळी मानसी उठते आणि आलं घालून चहा करते. घरात खूपच पसारा पडलेला असतो. एकेक करत ती सर्व गोष्टी जागेवर लावायला घेते. अमितही ऑफीसला जाण्यासाठी निघतो. अघटित घडते त्याला २ महिने उलटून गेलेले असतात.
समाप्त..... Copyright @ Rohini Gore

Saturday, January 13, 2024

आई कुठे काय करते.... (मराठी मालिका)

 आई कुठे काय करते.... (मराठी मालिका)

संजनाची बहीण गौरी अमेरिकेतून भारतात येते. देशमुखांच्या समोरच्या इमारतीत ती भाड्याने जागा घेते आणि रहायला लागते. समोर कुणीतरी रहायला आले आहे ते यशच्या लक्शात येते. हळूहळू त्या दोघांची मैत्री होते आणि गौरी देशमुखांच्या घरातली एक सदस्यच होऊन जाते. गौरीला अमेरिका पसंत नाही. तिला भारतातली नातीगोती पसंत आहेत. भारतात येऊन ती फॅशन डिझाईनचा कोर्स करते. तिला तशी कामेही मिळू लागतात. यशचे क्षेत्र हे पण वेगळेच आहे. त्याला संगीतात करीयर करायचे आहे. तसे त्याचे प्रयत्न चालू असतात. आता यश आणि गौरी एकमेकांच्या प्रेमात पडतात. इतके की दोघेही आता एकमेकांशिवाय राहू शकत नाही. देशमुखांच्या घरात गौरी लाडाची होऊन जाते. अरूंधती तिचे खूप लाड करते. अनिरूद्धला गौरी आवडत नसते. यश हा अनिरूद्धचा दोडका मुलगा असतो. त्यानंतर एक दिवस गौरी तिचे गुपित यशला सांगते. तिचा पूर्वी एक अपघात होतो आणि त्यातच तिचे गर्भाशय काढून टाकण्यात येते. यश तिला खूप समजून घेतो. नंतर देशमुखांकडचे सर्वच तिला समजून घेतात. आता आजी म्हणते इतके दिवस नुसते तुम्ही फिरत आहात तर साखरपुडा करा. यश आणि गौरी एकमेकांना अंगठ्या घालतात. देशमुखांच्या घरात गौरी इतकी रूळते की देशमुखांच्या घरातले तिला सर्व प्रसंग माहिती होतात. आणि एकदम अचानक गौरीला वाटु लागते की परत अमेरिकेत जावे, तिथे करीयर करावे. यश ला ती समजावते की आपण इथे किती दिवस रहाणार. बाहेरच्या जगात जाऊ आणि अनुभव घेऊ. यशला हे अजिबात मान्य नसते. तो गौरीला सांगतो की माझ्या कुटुंबाला सोडून कुठेच जाणार नाही. यशही आता त्याच्या संगीत क्षेत्रात धडपड करून चांगले पैसे कमावत असतो. त्याकरता तो मध्ये इंग्लडलाही जाऊन येतो. 
 
 
गौरीला म्हणे एक ऑफर आलेली असते. ती यशला त्याच्या सोबत यायला भाग पाडत असते. यशचे मत ठाम असते की मी येणार नाही. शेवटी गौरी म्हणते की मी ही संधी सोडणार नाही. मी जाणार. यश चालाख असतो. तो म्हणतो की आता ही काही परत येणार नाही. तो म्हणतो मी तुझ्या करियरच्या आड येणार नाही. ती म्हणते आपण एकमेकांच्या संपर्कात राहू की ! विडिओ कॉल करू, मेसेज करू. यश म्हणतो ठीक आहे. या दोघांच्या मतभेदात यशने तिला घातलेली अंगठी की रागारागात देते आणि म्हणते की जाते आता. साखरपुडा का करतात? नंतर लग्न होणार असते म्हणून ना? जास्तीत जास्त एक वर्ष लग्न लांबणीवर टाकू शकतो ना ? गौरी अंगठी जेव्हा परत करते तेव्हा यश समजून चुकतो की आता आपले आणि गौरीचे संबंध संपल्यातच जमा आहेत. अमेरिकेत गौरी जाते. नंतर ती त्याचे फोन उचलत नाही. की मेसेजला उत्तर देत नाही. गौरी लग्न करत आहे असे इशाकडून यशला कळते. 
 
 
यशला खूप नैराश्य येते. त्यातून तो बाहेरही येतो. आता त्याच्या आयुष्यात आरोही आलेली आहे आणि ती दोघे आता एकमेकांना अंगठ्या घालणार आहेत. आता ही उपटसुंभी गौरी परत भारतात आली आहे ती केवळ तिचे करियर सोडून ?! बरं का? आणि तिने आता तिचा जीव संपण्याचा प्रयत्नही केला आहे म्हणे ! माणसाने किती स्वार्थी असावे? जेव्हा ती अमेरिकेला जाते तेव्हा पण ती म्हणते की आता म्हणे तिला तिच्या आई वडिलांकडे पहायला हवे. या आधी तिला तिच्या आई वडिलांची कधीच आठवण आली नाही. तिची आई तर खूप मोठ्या पोस्ट वर असते आणि सतत फिरतीवर असते. आणि आता सर्वजण यशला दोषी ठरवत आहेत. गौरी आल्यामुळे त्याचेही मन दोलायमान झाले आहे. अरूंधती यशला सांगते की आता गौरी हा विषय मागे पडला आहे. तू जर गौरीला भेटायला गेलास तर आरोहीवर अन्याय होईल. संजनाला गौरीचा पुळका कधीपासून यायला लागला. तिचे आणि गौरीचे तर कधी पटायचे नाही. मूर्ख अभिषेक, अति लाडावलेली आणि स्वार्थी ईशा आणि आजी हे सर्वजण यशला दोषी ठरवत आहेत. अरूंधतीने यशचे कान भरवले आहेत ही पण बोंब ठोकत आहेत.
 
 
यश आणि गौरीच्या प्रेमात यश मनापासून गौरीवर प्रेम करत आहे. गौरी स्वार्थी आणि व्यवहारी आहे. यश भावनाप्रधान आहे याचा गौरीने पुरेपुर फायदा घेतला आहे. व्यवहारी मन कधीच प्रेम करत नाही. गौरीला वाटले असेल की देशमुखांच्या घरात काही ना काही घडतच असते. ती म्हणते आता आपण आपल्या करियरवर फोकस करायला पाहिजे. आता अजून किती फोकस करायचा? त्या दोघांचे काम व्यवस्थित चालू आहे. जेव्हा ती यशच्या प्रेमात पडली? तेव्हा तिला सर्व माहित होते की! आणि तिलाही एकत्र कुटुंब आवडत होते की! गौरी एक नंबरची दुटप्पी आहे. यश तसा नाही. तो अगदी पहिल्यापासूनच म्हणत आहे की मी माझ्या कुटुंबाला सोडून कधीच कुठे येणार नाही. आणि गौरी तिचे अमेरिकेतले करियर सोडून परत आली? साफ खोटे ! तिथे तिचे काहीच जमलेले नाहीये म्हणून ती परत आलेली आहे.
गौरीने साखरपुडा कशासाठी केला? या आधी तिला सांगता येत होते ना यश ला की मला परदेशात करीयर करायचे आहे ते ! म्हणजे काय साखरपुडा करून ठेवायचा. अमेरिकेत जायचे. तिथे मुलाच्या प्रेमात पडायचे, लग्न करायचे आणि यशला डच्चू द्यायचा हाच तिचा इरादा होता. 
 
मुली मुलांना गृहीत धरतात. त्याला प्रेम हे लेबल देतात. अशी काही उदाहरणे मी प्रत्यक्षात पाहिली आहेत.
 
१. दोघांचे प्रेम होते. मुलगी अमेरिकेत गेली. मग मुलगा गेला. मुलगा तिथे गेल्यावर मुलगी म्हणते आता मला विसरून जा. तो भारतात परत येतो आणि निराशेत जातो.
२. दोघांचे प्रेम, लग्नाचे रूपांतर प्रेमात, नंतर काही वर्षांनी ती अमेरिकेत येते आणि दुसऱ्या मुलाशी लग्न करते आणि प्रियकर (लग्न झालेल्या नवऱ्याला) घटस्फोट देते.
३. इथे २ विद्दार्थिनी अशा होत्या. बरेच वर्ष एकत्र राहिलेले दोघे. सांगताना सांगितले की तो माझ मित्र आहे. मुलीचा एम. एस नंतरचा ओपिटी काळ संपला आणि तिने लगेच त्या मुलाशी लग्न केले. ओपिटी काळ संपला आणि नोकरी मिळाली नाही की देश सोडावा लागतो. मग लगेच या मुली लग्नानंतर डिपेंडंट विसावर (Dependent Visa )जातात.
 
४. एक जण लग्न होऊन इथे आले. ती भारताचे खूप कौतुक करायची. तिच्या नवऱ्याने भारतात नोकरी घेतली आणि भारतात परत येण्याचा निर्णय घेतला. नंतर तिचा मूड पूर्णपणे गेला आणि नंतर भारतात गेल्यावर त्या दोघांचा घटस्फोट झाला. आणि ती आता इथे अमेरिकेत येण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. घटस्फोट घेतला याचा तिला आता पश्चाताप होत आहे.
 
५. लग्न होते. आणि नवऱ्यामुळे तिलाही ग्रीन कार्ड मिळते आणि घटस्फोट होतो. लगेच दुसऱ्या मुलाच्या प्रेमात पडून लग्नही होते.
rohini gore