Wednesday, May 14, 2014

हिमवर्षाव २०१४













यावर्षीचा हिमवर्षाव २ ते ३ वेळा झाला पण तरीही खूप नाहीच. एके दिवशी बराच पडला. त्यादिवशी बदके थोडीच फिरत होती. आणि झाडांवरच्या पर्णहीन फांद्यांवर बर्फ चिकटून राहिला होता. दुसऱ्या दिवशी स्वच्छ उन पडले आणि आधी रस्त्यावरचा बर्फ वितळला. हिरवळीवरचा बराच वेळ तसाच राहिला होता. सूर्यप्रकाशात बर्फ उजळलेला छान दिसत होता. आमची नवीन गाडी पण बर्फाने भिजली तेव्हा पावन झाल्यासारखी वाटली.

हिमवर्षाव २०१४






















Monday, May 12, 2014

१२ मे २०१४

आजचा दिवस आठवणींचा होता. एक तर कालच्या आठवणीतून बाहेर पडले नव्हते आणि त्यात अजून काहींची भर पडली. आज आईशी फोनवर बोलता बोलता जेवणाचा विषय निघाला. आईबाबांना उद्या माझ्या मामे वहिनीने जेवायला बोलावले आहे आणि ती आमरस करणार आहे. तिने आईला विचारले की आमरसाशी पोळ्या करू की पुऱ्या? तर आईने पुऱ्या कर असे सांगितले. बोलताना मी पण आईला सांगितले की मलाही आजकाल पुऱ्या आवडायला लागल्या आहेत. पूर्वी माझ्या पुऱ्या बिघडायच्या पण आता नाही. त्यामुळे मग मी मुद्दामहून सणावारी पुऱ्याच  करते. आमरस , बासुंदी, खीर आणि श्रीखंड आणि याबरोबर पुऱ्याच पाहिजेत आणि त्या कश्या तर टम्म्म फुगलेल्या ! गरम गरम पुरी किंवा पोळी खायला किती छान लागते. त्याबरोबर खरे तर काहीही नसले तरी नुसती पुरी किंवा पोळी छान लागते. यावरून मी व आई पूर्वीच्या आठवणींमध्ये शिरलो. शाळा कॉलोजात असताना आम्ही आमच्या आजोबांबरोबर जेवायला बसायचो व त्यानंतर शाळेत जायचो. आई आम्हाला तिघांना गरम पोळ्या वाढायची. एका पोळीचे ३ भाग करायची. एकाला अर्धी पोळी तर दुसऱ्या दोघांना चतकोर पोळी, म्हणजे प्रत्येकावर अर्धी पोळी खायची एकेक टर्न यायची. किती छान दिवस होते ते !






दुपारी ऑफीसमधून विनायक घरी जेवायला येतो.  जेवून परत ऑफीसमध्ये जाताना मी पण थोडावेळ गॅलरीत उभी राहते आणि आकाशातले ढग न्याहाळत राहते. आज आकाशात ढग होते पण जास्तीचे काळे ढग नव्हते तरीही पाऊस पडायला सुरवात झाली. पाऊस पडताना गारा पडतात की काय असा भास झाला. इतका मोठा त्या थेंबांचा आवाज होता. एकेक मोठाले थेंब जमिनीवर पडताना पाहत होते आणि पावसाचा जोर थोडा वाढला. का कोण जाणे पण आज पावसात भिजावेसे वाटले.  अमेरिकेत आल्यापासून पहिल्यांदाच पावसात भिजले. भिजल्यावर इतके काही छान वाटले की परत माझे मन आठवणीत गुंतले. भारतात असताना वळबाचा पावसात भिजल्यावर खूप आनंद व्हायचा. शिवाय जूनच्या पहिल्या सरी अंगावर घेतल्या नाहीत असे कधी झालेच नाही.





आज संध्याकाळी नेहमीची चक्कर मारायला गेले. तळ्यावर बसले आणि शिवाय तळ्याभोवतीने पण एक चक्कर मारली. तळ्यावर एक बाई येते. तिला मी काही वेळेला बघितले आहे. कार थांबवून ती बदकाना खायला देते. थोडावेळ उभी राहते आणि नंतर जाते. आज मी फोटो काढत असताना मला म्हणाली तु फोटोग्राफर आहेस का? तर म्हणाले हो. मला फोटो काढायला आवडतात. मग ती बाई माझ्याशी गप्पा मारायला लागली. त्यात तिने सांगितले की माज्या वडिलांची इथे काही मालमत्ता आहे तर ती सांभाळण्यासाठी मी रोज इथे येते. या रोडवरून डाव्या हाताला आणि नंतर उजव्या हाताला वळले की तिथे एक मोठे तळे आहे असे ती सांगत होती. तळ्याभोवती खूप मोठे कुंपण घातले आहे म्हणाली. शिवाय तिथे तिने बरीच झाडेही लावली आहेत. तिने मला अजून काही माहिती पुरवली की तुमच्या अपार्टमेंट समोर जे तळे आहे तिथली सर्व बदके आमच्या इथल्या तळ्यात हलवली आहेत. तुला जर का बदकांचे फोटो काढायचे असतील तर आमच्या तळ्यावर ये. मला मजाच वाटली. त्यात तिने हेही सांगितले की ती पक्की शाकाहारी आहे. हे ऐकून तर मला नवलच वाटले. मग तिने मला विचारले तू कुठली, इथे किती वर्षे आहेस, तुला अमेरिका आवडते का? मी तिला सांगितले की मी इथे येऊन १३ वर्षे झाली. मी भारतात मुंबई शहरात राहत होते. तर म्हणाली हो मुंबई मला माहीत आले पण मी भारतात कधी गेले नाही. ती पूर्णपणे शाकाहारी आहे हे ऐकून तर मला खूपच छान वाटले आणि तिला म्हणाले की आम्ही दोघे नवरा बायको दोघेही पक्के शाकाहारी आहोत. माझा शाकाहारी रेसिपींचा ब्लॉगही आहे. तर तिने माझ्या ब्लॉगचा पत्ताही घेतला आणि म्हणाली की परत भेटूच आणि ती कारने निघून गेली. आजचा दिवस काही वेगळाच होता ! आणि म्हणूनच रोजनिशीत लिहिला ,कालचा सूर्यास्ताचा फोटो ली रिंगरला पाठवला. बघू आता तो केव्हा दाखवतो ते !

Sunday, May 11, 2014

११ मे २०१४


आज सकाळी जाग आली आणि बाहेर बाल्कनीत जाऊन उभी राहिले तर आकाशात काही ढग जमा झाले होते आणि थोडे रंगही होते पण सूर्योदय मात्र होऊन बराच वेळ झालेला दिसत होता.  थोडी आधी जाग आली असती तर छान सूर्योदय बघायला मिळाला असता. चहा घेतला आणि दिनक्रमाला सुरवात केली. काल ठरवलेली साफसफाईची कामे झाली नाहीत म्हणून आज करावी असे मनात घोळत होते. पण करावी का, किंवा करूच नयेत? परत झोपावे? असे मनातल्या मनात ठरवत होते आणि कामे सुरू केली. कामाला सुरू करायलाच वेळ लागतो. आपण आपल्याला "चला आता कामाला लागा"  अश्या सूचना द्याव्या लागतात तरच काहीतरी होते. तर ते असो. गेले तीन चार दिवस तापमान चांगलेच चढे होते त्यामानाने आज कमी होते म्हणून आम्हाला दोघांनाही आवडणाऱ्या समुद्रकिनारी जायचे ठरवले.






बाहेर जेवून थेट समुद्रकिनारा गाठला. आज हवा थोडी ढगाळ होती आणि विशेष म्हणजे हवेत आद्रता नव्हती त्यामुळे समुद्रावर गेल्यावर छान वाटले. आज गर्दी होती. आज समुद्रावर नेहमीपेक्षा जास्त भरती होती. लाटा खटाखट खडकांवर आदळत होत्या. मुले मजा करत होती. नेहमीप्रमाणे चालायला सुरवात केली. आज समुद्रावर रंगांच्या छटा छानच उमटल्या होत्या. निळा, हिरवा, मातकट, असे रंगांचे थर खूपच छान दिसत होते. वरती आकाशात निळा रंग आणि त्यावर थोडे पांढरे, निळे व काही काळे ढगही चान दिसत होते. मस्त वारा सुटला होता. हवेत आद्रता नसल्याने बरे वाटत होते. नेहमीची चाल पूर्ण केली आणि समुद्राच्या दुसऱ्या टोकाला जाऊन वाळून बसायचे ठरवले. वाळूत बसलोही. पण आज भरती अशी काही जोराची होती की पाण्यात जावेसे वाटत होते. अर्थात आम्ही दोघे पाण्यात कधीच जात नाही. एक तर मला समुद्राच्या पाण्याची आणि लाटांची खूप भीती वाटते. आणि खारट पाण्याने पाय चिकट होतात म्हणूनही जात नाही. पण आज पहिल्याप्रथम इतक्या वर्षानंतर पाण्यात उभे राहिलो. मला तर भीतीच वाटत होती. लाटा जोराच्या येत होत्या. पण थंडगार पाणी पायावर आल्यावर इतके काही छान वाटले की तिथेच पाण्यात बराच वेळ उभे राहिलो. तिथून हलावेसेच वाटत नव्हते. नंतर पाण्याबाहेर आलो आणि तिथल्या एका खडकावर बसून लाटांकडे खूप वेळ बघत बसलो. असे वाटत होते की उठूच नये. थोडे ढगाळ वातावरण वाढले आणि दोन चार पावसाचे थेंबही पडले. पाऊस आला असता तर पावसातही भिजायला नक्कीच आवडले असते पण पाऊस पडला नाही. समुद्रावर असताना मुसळधार पावसाला बघायची माझी खूपच इच्छा आहे.






आज अंजलीला फोन केला होता तर तिने सांगितले की फिरायला जाताना पंजाबी सूट घाल म्हणून घातला. तसे तर मी ठरवलेच आहे की उन्हाळ्यात बाहेर जाताना पंजाबी सूट घालायचे नाहीतर बॅगेत पडून राहतात. पण तरीही मैत्रिणीने सांगितले म्हणून माझ्या ठरवण्याला अजूनच उत्साह आला आणि ड्रेस घातला. तशी तर मी पण तिला सांगते. की बाग केलीस तर फुलांचे फोटो काढ. झोपाळ्यावर बसून फोटो काढ. तर तसे तिनेही केले.  मैत्रिणींचे असे एकमेकींना सांगणे किती छान असते ना ! घरी आलो तर डोके ठणठण करत होते. चहा घेतला. कशीबशी मुगाच्या डाळीची खिचडी टाकली. पापड तळले. टोमॅटो काकडीचे काप केले आणि याबरोबर दही आणि खिचडी असा जेवणाचा बेत केला. जेवलो तेव्हा जरा थोडे डोके उतरल्यासारखे वाटत आहे. आज सूर्यास्तही खूप छान होता. आज एक खूप सुंदर फुल पहायला मिळाले. आजचा एकूण दिवस खूप छान गेला. लक्षात राहील असा गेला. अजूनही समुद्राचे पाणी, लाटांचा खळखळाट, समुद्राचा थंडगार पाण्याचा पायाला झालेला थंडावा, मनात साठून राहिले आहे.  आहाहा एकूणच सर्व काही छान छान !!