Showing posts with label अनुभव. Show all posts
Showing posts with label अनुभव. Show all posts

Friday, October 14, 2022

बदल, तुलना आणि बरच काही ..... (3)

 

आमच्या दोघांच्या आयुष्यात मोठा बदल खूप पूर्वीच झालेला आहे. विनायक नोकरी निमित्ताने मुंबईत आला आणि मी लग्न होउन मुंबईत आले. हवामानाचा मोठा बदल झाला. मुंबईत येणारा सततचा घाम मला अजिबात आवडत नाही. अर्थात मुंबईत कोणतेही तीव्र हवामान नाही. थंडी नाही. मला पुण्यातल्या थंडीचा खूप त्रास व्हायचा तो मुंबईत आल्यावर बंद झाला. विनायक आधी नोकरीसाठी बोरिवली वरून मुलुंडला यायचा. म्हणजे दोन टोके. नंतर डोंबिवली वरून अंधेरीला नोकरीसाठी जात असे. ही पण दोन टोके. चढण्या उतरण्यासाठी डोंबिवली हे स्टेशन म्हणजे रोज युद्धासारखे सज्ज व्हायचे. नंतर ते सवयीचे होऊन जाते असे म्हणले तरी ती सवय होत नाही. विनायक डोंबिवली वरून ७.१२ ची लोकल पकडायचा आणि यायला त्याला रात्रीचे ८ ते ९ वाजायचे. म्हणजे डोंबिवलीचे घर हे फक्त जेवण आणि झोपण्यापुरतेच होते त्याच्याकरता. गर्दीतून आल्या आल्या मोज्यांसकट सर्व कपडे धुवायला टाकायला लागायचे आणि रोज आल्यानंतर अंघोळ करायलाच लागायची. कारण गर्दीतून येताना घाम, धूर , धूळ. शनिवारी अर्धा दिवस काम असले तरी ४ तास प्रवासात जायचेच. नोकरीवर जाण्यासाठी रोज ४ तास प्रवास. अशी १० वर्षे. 
 
 
मी मुंबईत नोकरी करण्याच्या फंदात पडले नाही कारण रोजच्या रोज धक्का बुक्की मला सहन झाली नसती पण गरज असती तर नोकरी करावीच लागली असती. मी डोंबिवलीत ४ वर्षे नोकरी केली. त्यामुळे घरातले स्वयंपाक पाणी सांभाळून गावातल्या गावात नोकरी ठीक होती. अत्यंत गरज होती पैशाची म्हणूनच ही नोकरी मी केली. मी दादर, ठाणे, बोरिवलीला ट्रेन ने गेलेली आहे काही कामानिमित्ताने पण जेव्हा गर्दी नसेल तेव्हा. डोंबिवलीवरून दादरला जायचे असेल तर दुपार नंतर जावे. गर्दी लागत नाही आणि दादर वरून डोंबिवलीला यायचे असेल तर सकाळी ८ नंतर यायचे. ऑफीसची गर्दी टाळून जायचे. उलट्या दिशेने गर्दी केव्हा असते कोणत्या स्टेशनला असते त्याप्रमाणे. आधी मला पत्ताच लागायचा नाही ईस्ट कोणते, वेस्ट कोणते, रेल्वे फलाटावर येते तेव्हा जी घोषणा होते ती पण डोक्यावरून जायची. विनायकने मला सर्व सांगितले. जेव्हा विनायक आणि मी रेल्वेने प्रवास करायचो तेव्हा मी लेडीज डब्या मध्ये शिरायचे. फर्स्ट क्लासचा डबा कुठे येतो, लेडीज डबा कुठे येतो हे माहीत झाले होते. तिकिट काढताना पण खूप मोठ्या रांगा असायच्या. तेव्हा दोघांनी वेगवेगळ्या रांगेत उभे रहायचे आणि ज्याचा नंबर आधी लागेल त्याने तिकिटे काढायची. कोणत्या फलाटावर कोणती गाडी येणार त्या पाट्यांकडे लक्श ठेवायचे असते. 
 
 
मुंबईत नोकरी करणाऱ्या बायकांचे मला खूप कौतुक वाटते. रोजच्या रोज गर्दीतून येताना घरी आल्यावर पण स्वयंपाक, आला गेला, सणवार करणे हे जिकीरीचे आहे. त्यातून खुद्द मुंबईत राहाणाऱ्या बायकांना शाळा कॉलेज करताना ट्रेन ने येण्याची सवय असते पण ज्या बायका लग्न होऊन मुंबईत येतात त्या बायका हा बदल आत्मसात करतात त्यांचे विशेष कौतुक वाटते. लोकल मध्ये जाताना स्टेशन ज्याप्रमाणे येते त्याप्रमाणे बायका एका पाठोपाठ उतरण्यासाठी उभ्या राहतात म्हणजे पटकन उतरणे सोपे होते. चोथी सीट बसायला देतात. लोकल मध्ये हळदी कुंकू, डोहाळेजेवण असे कार्यक्रमही करतात. इतकी प्रचंड धावपळ, गडबड करून थकतात पण चेहरे आनंदी असतात. घाम येत असला तरी फुल मेक अप मध्ये असतात. टापटीप राहतात. पावसाळ्यात तर लोकल ट्रेन ने प्रवास करणाऱ्यांचे खूपच हाल होतात. रूळांवर पाणी साठते त्यामुळे लोकल बंद पडतात. आणि कामावर गेल्यावर लोकल बंद पडल्या तर जास्तच हाल. विनायक एक दोन वेळा अंधेरी ते घाटकोपर कमरे इतक्या पाण्यातून चालत आला होता. पूर्वी मोबाईल फोन कुठे होते? आमच्याकडे लॅंडलाईन फोन पण नव्हता. मी बाहेर पिसीओ मध्ये जाऊन फोन करायचे. मुंबईचे लोक एकमेकांना सामावून घेतात. मदत करतात. इथे अमेरिकेत पब्लिक ट्रान्सपोर्टची बोंबाबोंब आहे. फक्त काही ठिकाणी लोकल्स आहेत. पुण्यातही हीच कथा. त्यामुळे नोकरीला जाताना वाहन असणे अत्यावश्यक आहे. क्लेम्सन आणी विल्मिंग्टन इथे मी बसने बरीच हिंडली आहे ती केवळ वेळ जाण्याकरता आणि घरात बसून बसून बोअर होते म्हणून. न्यु जर्सीला रहाणारी लोकं न्युयॉर्कला ट्रेन ने नोकरी वर जातात. जस्ट लाईक डोंबिवली व्हिटी.
 
 
पूर्वी आम्हाला एकजण भेटले होते तेव्हा ते म्हणाले की न्यु जर्सी म्हणजे दुसरी डोंबिवली. त्यांचे आडनाव शेवडे. ते पण डोंबिवलीचे होते. ते असे का म्हणतात ते इथे आल्यावर कळाले. आम्ही अजूनही इथल्या लोकल ट्रेनचा अनुभव घेतला नाहीये. बघू कधी जमते ते.Rohini Gore
क्रमश : ...

Friday, October 07, 2022

बदल, तुलना आणि बरच काही ..... (2)

 

अमेरिकेत येताना स्टीलचा देव्हारा, त्यावर छत्री असलेला घेऊन आले. सहाण खोड गंध उगाळायला आणले होते. सुरवातीला मी गंध उगाळत असे. पण आता फक्त हळदी कुंकू लावते. इथे सुवासिक फुले मिळत नाही. इंडियन स्टोअर मध्ये सर्व काही मिळते पण आम्हाला इंडियन स्टोअर खूपच दुरवर असल्याने काही गोष्टींसाठी इथल्या अमेरिकन स्टोअर मध्ये हिंडले. त्यात मला कापूस आणि काडेपेटी या गोष्टी Dollar General मध्ये मिळाल्या. कापूस वात करण्यासाठी व काडेपेटी निरांजन लावण्यासाठी. इंडियन स्टोअर दूरवर असल्याने काही गोष्टी आठवणीने आणायला लागायच्या. त्यात मी कुंकू आणले होते म्हणजे हळदी कुंकवातले कुंकू. इथे आल्यावर सुरवातीला मी डाळी ठेवायला जे डबे केले होते प्लॅस्टीकचे ते अजूनही आहेत. प्रोटीन पावडर आम्ही दोघे दुधातून घेतो. प्रोटीन पावडर संपली की तो प्लॅस्टीकचा डबा धुवून पुसून वाळवून त्यात मी चार प्रकारच्या डाळी ठेवायला लागले.


भारतात स्टीलचे तसेच हिंडालियमचे डबे होते. त्यात मी गहू, तांदूळ, डाळी ठेवायचे. महिन्यातून एकदा हे सर्व डबे धुवायचे. पालथे घालून वाळवायचे. अर्थात हे काम कामवाली बाईच करायची. मी तिला मदत करायचे. इथे आल्यावर चहा साखरेचे स्टीलचे डबे मी आणले नव्हते. फक्त मिसळणाचा डबा आणला होता. चहा साखर मी डॅननचे दही संपले की ते डबे घासून व वाळवून त्यात ठेवायचे. नंतर प्लॅस्टीकचे डबे आणले. एका मैत्रिणीने तिचे घर इतके काही छान सजवले होते. तिने काहीही प्लॅस्टीकचे विकत आणले नव्हते. इथे आईस्क्रिमच्या बादल्या मिळतात, त्या तिने धुवुन वाळवल्या व त्यात डाळी आणि पिठे ठेवली. इथे भाजके दाणे मिळतात मीठ लावलेले व न लावलेले. सुरवातीला मी इंडियन स्टोअर मधून दाणे आणले. ते भाजले, त्याची साले काढली व कूट केले इंडियन स्टाईल. नंतर मी भाजके दाणे आणून त्याचे कूट करायचे. त्या भाजलेल्या दाण्याच्या डब्यात मी लाल तिखट, हळद, व मीठ ठेवले होते सुरवातीच्या काळात.


तिकडे भारतात राहत असताना दळणाचे डबे असायचे. गहू, ज्वारी , बाजरी, तांदुळ, हरबरा डाळ, अंबोळी, थालिपीठाची भाजणी. ही सगळी पिठे मी ताजी ताजी दळून आणायचे. त्यामुळे थोडे थोडे जसे की १ किलो, बाकीचे सर्व आणि गहू पीठ ५ किलो. इथे आल्यावर सर्व पीठे तयार. ती कधी आणि किती दिवसाची असतील याबद्दल माहिती नाही. भाकरी करण्याचे प्रयोग केले. पण भाकरी थापायला गेले की तुटायची, तव्यावर टाकली तरी तुटायची. त्यामुळे फक्त आणि फक्त पोळ्या. इथे फ्रोजन फूड भरपूर मिळते पण सततचे चांगले नाही.


विल्मिंग्टनला असताना मी रोजच्या रोज दोन्ही वेळेला ताजा स्वयंपाक करायचे कारण की विनायकचे ऑफीस जवळ असल्याने तो दुपारी जेवायला येत असे. १० वर्षे बऱ्याच रेसिपी केल्याने भांडी खूपच पडायची. ब्लॉगवर लिहिण्याकरता मी आठवड्यातून २ वेळा वेगवेगळ्या रेसिपी करायचे. मी भारतात असताना काही वर्षे भांडी घासली. धुणे पण धुतले. पण नंतर कामवाली असल्याने साधा चमचाही विसळला नाही. इथे सर्वजण हातानेच भांडी घासतात डीश वॉशर असला तरीही. एक तर आपल्या स्वयंपाकात फोडणी असते. पोळ्यांनाही थोडे का होईना तेल लावतो. त्यामुळे भांडी नुसती विसळून ती डीश वॉशर मध्ये ठेवून चालत नाही. वास राहतो. आम्ही भांडी हाताने घासतो आणि डिश वॉशर मध्ये पटापट विसळून ठेवतो. वाळून पण निघतात. त्यामुळे डिश वॉशर वापर ताटाळ्यासारखा पण होतो.


दोघच्या दोघं असली तरी भांडी ही पडतातच. २ जणांकरताही भाजीसाठी कढई आणि ४ जणांकरताही. म्हणते ती घासावी तर लागतेच ना ! दिवसातून सकाळ, संध्याकाळ दोघांचा चहा म्हणजे ४ कप, कूकर लावला २ भांडी, सूप सार केले तर ते एक भांड. कणिक मळली, पोलपाट लाटणे. पाणी जरी प्यायचे म्हणले आणि ते भांडे जरी विसळते तरी दिवसातून एकदा घासावे तर लागतेच ना ! अगदी सुरवातीच्या दिवसात प्रत्यक्षातले मित्रमंडळ जमले होते तेव्हा जेवणावळी खूप व्हायच्या. तेव्हा तर खूप भांडी पडायची. तिकडे भारतात कसे दूध, पेपर, वाणसामान सर्व काही घरपोच. शिवाय तिथे धुणे भांडी करायच्या बायका येतात, वरकामाला बाई, स्वयंपाकाची बाई. केराची टोपली घराच्या बाहेर ठेवला की केरवाला येऊन जातो. इथे वन मॅन शो असतो. तुलना ही केली जाते. इकडची आणि तिकडची. गोळा बेरीज सारखीच. इथे आणि तिथे फायदे तोटे आहेतच. Rohini Gore
क्रमश : ...

Monday, October 03, 2022

बदल, तुलना, आणि बरच काही.... (१)

 

बदल हा प्रत्येक गोष्टीत होतो. शहर बदलले की, देश बदलला की. माहेराहून सासरी आल्यावर सुद्धा ! आपण जिथे काम करतो ते ऑफिस बदलले की ! कितीतरी गोष्टी आहेत. तर हा बदल माझ्या बाबतीत कसा होत गेला त्याचे हे पुराण ! तुमचे पुराण पण वाचायला आवडेल की ! तर पहिल्याप्रथम मला विळीवर चिरायला खूपच आवडते. खाली फरशीवर बसून विळीवर कोणतीही भाजी मला बारीक चिरायला आवडते. अगदी धारदार विळी असली तरीही ! विळीकडे न बघता एकीकडे टीव्ही बघत बघत काकडी चोचवत असे. जेव्हा अमेरिकेला जायची वेळ आली तर तिथे कशी काय विळी न्यायची बुवा ! तर अंजली आली की धावत माझ्या मदतीला. अंजली चॉपरचा बॉक्सही होता. त्यासकट भरला की वो सामानात मी ! आन काय सांगू अंजलीच्या ल ई म्हंजी ल ई च प्रेमात पडले मी. एकदा मोठे कलिंगड कापताना अंजली चॉपर तुटला. १०/१२ वर्षाची साथ होती तिची नि माझी. मग काय आता सुरीने कापणे आले. सुरीची पण छान सवय झाली ती आजतागायत. सुऱ्या पण २ - ४ प्रकारच्या आणल्या. एक भाजी चिरायला, कलिंगड, टरबूज कापायला धारदार सुरी. ब्रेडचे सॅंडविच कापायला छोटी सुरी. दरम्यान एक फूड प्रोसेसर आणला भाज्या चिरायला. त्यात कांदा, बीन्स, सिमला मिरची असे काही कापून बघितले. त्यात कणिक पण मळता यायची. पण रोजच्या रोज कोण धुणार याला. कणिक तर इतकी काही म उ म उ व्हायची की त्याच्या पोळ्या कच्च्या व्हायच्या. आणि एक दिवस मोडला की वो ! त्यात इडलीसाठी पीठ बारीक करायला घेतले आणि संपल की वो सगळं. इतक काही बी वाईट वाटलं न्हाई मला.
 
 
मला दुध दुभतं जपायच भारी वेड होतं. वारणा - गोकुळ चे दूध. त्यावर येणारी जाड साय. घुसळलेलं ताक, पांढरे शुभ्र लोणी, आणि कणिदार तूप ! अमेरिकेत येताना मी रवि आणली होती बरोबर ताक घुसळायला. पहिल्यांदा कॅन मधले दूध पातेल्यात तापवलं. सायीचा पत्ताच नाही की वो ! इंडियन स्टोअर जवळ नाही देशी तूप आणायला. मग एका मैत्रिणीने इथल्या बटरचे तूप बनते असे सांगितले आणी तेव्हापासून तूप बनवण्याचा प्रश्न मिटला. आणि खरे सांगू का मी इंडियातल्या सारखे खाली रहाणाऱ्या एका तेलगू मैत्रिणीकडून विरजण लावायला दही आणले होते. ती माझ्या सारखीच. तिच्याकडे दही पाहिजे म्हणजे पाहिजेच. मी घरी विरजण लावून दही बनवायचे अगदी इंडिया सारखेच ! बरेच वर्ष असे घरचे दही लावले. नंतर मात्र विकत आणायला लागले. इथे दह्याचे बरेच प्रकार मिळतात. मला डॅननचे दही आवडले. आणि आता नॉन फॅट दही आणायला लागलो. मला दही खायला इतके काही आवडत नाही. कोशिंबीरीसाठी जास्त वापरते. 
 
 
नंतर काही वर्षांनी मला दूध पचेनासे झाले आणि मी लॅक्टोज free दूध प्यायला लागले. चहाचेही तसेच झाले. आधी इंडियन स्टोअर जवळ नसल्याने डिप डिप चा चहा प्यायचो. नंतर त्यातली भुकटी काढून ती पाण्यात घालून चहा उकळायचे. इलेक्ट्रिक शेगडीवर चहा व्हायला खूपच वेळ लागायचा. एका मैत्रिणीने सांगितले की मायक्रोवेव्ह मध्ये चहा होतो. तेव्हापासून आजतागत मी मायक्रोवेव्ह मध्येच चहा बनवते. आधी डिप डिपचा आणि आता चहाची पूड घालून !
 
क्रमश : ...

Wednesday, March 04, 2020

आहार,व्यायाम, वजनातील घट आणि वाढ - स्वानुभव (2)

मी माझा फक्त अनुभव लिहीत आहे. वजन कमी करण्यासाठी मुद्दामहून मी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. माझे वजन मुळातच जास्त नव्हते. ते व्यायामामुळे वाढले. अर्थात नंतर जे १५ किलोने वाढले ते जास्तच आहे उंचीला अनुसरून. आम्हाला दोघांना चालायला खूप आवडते. माझ्या वजनात वाढ कशी होत गेली आणि ते घटले कसे याचे निरिक्षण केले आणि तेच मी इथे शेअर करत आहे इतकेच. उपदेशाचे डोस अजिबातच नाहीत. मला इंगल्स मध्ये नोकरी लागली ती डेली सेक्शनला उत्पादन विभागात. ही नोकरी प्रचंड अंगमेहनतीची आहे. एक तर ८ तास उभे राहून ही नोकरी होती. उभे राहून ८ तासात मी माझ्या सहकारी मैत्रिणीबरोबर काही ना काही बनवत होते. हाताची प्रचंड प्रमाणात हालचाल होत होती. शिवाय जे काही बनवायचे असेल त्याचे जिन्नस आणण्याकरताही स्टोअर्स मध्ये फेऱ्या होत होत्या. खाली वाकणे, हात वर करणे, ढवळणे, कापणे, चिरणे अशा हाताच्या बऱ्याच हालचाली होत होत्या. जेवायच्या सुट्टीमध्ये अर्धा तास बसणे आणि नंतर १० मिनिटांच्या ब्रेक साठी बसणे इतकीच विश्रांती मिळत होती. ही नोकरी करून मी सव्वा मैल चालत घरी जात होते. घर पण दुसऱ्या मजल्यावर होते. या चालण्यामध्येही रस्ते उंचसखल होते. चालताना मध्ये वाटेत मी एका कट्यावर बसायचे. आणि घर आले की जेव्हा मी जिन्यात बसायचे तेव्हा मला इतका दम लागलेला असायचा की माझ्या हृदयाचे ठोके मला ऐकायला यायचे. श्वासही खूप खोलवर मोकळा यायचा. मनात मी म्हणायचे पण की हा खरा व्यायाम.




अर्थात हे चालणे आठवड्यातून २ वेळा म्हणजे अडीच मैल होत होते. शनिवार रविवार मला विनायक कारने सोडायचा आणि आणायचा. या चालण्यामुळे मला पायांना खूप व्यायाम झाला. नोकरीत ८ तास उभे असल्याने पायांना तितका व्यायाम होत नव्हता. पण हाताना भरपूर व्यायाम. या नोकरीमुळे आणि चालण्यामुळे माझे पोट आत गेले आणि चपळता वाढली. उत्साह वाढला. अर्थात दमणूक प्रचंड होत होती. माझे २ वर्षात वजनही घटले. वजन घटले आणि ताकदही वाढली. नुसते वजन घटून उपयोगी नाही. ताकदही टिकली पाहिजे. वजन कमी आणि चेहरा ओढग्रस्त असेही उपयोगाचे नाही. माझे वजन हळूहळू करत ६० वरून ५५ वर आले. शिवाय खांद्यावरची आणि कमरेवची हाडेही दिसायला लागली.




नोकरीच्या या ४ वर्षात माझा व्यायाम बंद झाला. आठवड्यातून १ वेळा जेमतेम व्हायचा. तसा तर व्यायाम गेले काही वर्षे कमी कमी होत गेला. रोजच्या रोज न होता आठवड्यातून २ ते ३ वेळा होतो. आता तर आठवड्यातून १ वेळाच होतो. मला हल्ली व्यायामाचा खूप कंटाळा येतो. चालण्याचा कंटाळा मात्र येत नाही. पहिला जो व्यायाम करायचे तोही कमी होत गेला. म्हणजे १२ सूर्यनमस्कारा ऐवजी आता मी ८ सूर्यनमस्कार घालते तेही २ - २ करत घालते. चाराच्या ऐवजी २ जोर २ बैठका आणि आसने करत नाही. आसनांच्या ऐवजी मी पिटीचे प्रकार करते. हात वर हात खाली. सर्व अँगलने हात फिरवते. सर्व अँगलने मानही फिरवते. उभे राहून हात जमिनीवर टेकण्याचा प्रयत्न करते. मांडी घालून हाताची घडी मागे घालून डोके जमिनीवर टेकण्याचा प्रयत्न करते. १९८८ ते २०१२ पर्यंत रोजच्या रोज चालणे होत होते. तेही आता होत नाही. चालणे आठवड्यातून १ वेळाच होते.



निरिक्षणामध्ये असे लक्षात आले की व्यायामापेक्षा चालण्याने वजन कमी होते. चालणे म्हणजे आठवड्यातून १ मैल किमान २ वेळा. असेही लक्षात आले की चालण्याने सर्वांगाला व्यायाम होतो पण पायांना जास्त होतो म्हणून मग हाताचे व्यायाम करायचे. वजने उचलणे किंवा जोर मारणे. सूर्यनमस्कारानेही सर्वांगाला व्यायाम होतो. मुख्य म्हणजे चपळता वाढते. या नोकरीमुळे असे कळाले की शरीराची जास्तीत जास्त हालचाल व्हायला पाहिजे.आहाराबद्दल लिहीन पुढील लेखात.@Rohini Gore
क्रमश : ....

Tuesday, March 03, 2020

आहार,व्यायाम, वजनातील घट आणि वाढ - स्वानुभव (1)

मला गोड पदार्थ अजिबात आवडत नाही आणि मला भातही आवडत नाही. शिवाय मी एका वेळेला खूप खाऊ शकत नाही. कदाचित यामुळेच माझे वजन नेहमी आटोक्यात राहत असावे असे मला वाटते. लग्ना आधी माझे वजन ४५ किलो होते. माझी उंची ५ म्हणजे माझे वजन ५० ते ५५ असायला पाहिजे. लग्नानंतर मी व्यायाम सुरू केला आणि माझे वजन वाढायला लागले. मी १२ सूर्यनमस्कार घालत होते. एका दमात १२ सूर्यनमस्कार घालायचे. नंतर ते साधारण 25 पर्यंत गेले. पण २५ सूर्यनमस्काराने मला खूप दमायला व्हायचे. याउलट १२ नमस्काराने छान वाटायचे. माझे वजन ४५ वरून ५० पर्यंत गेले. मला खूप आनंद झाला. त्यानंतर मी १२ सूर्यनमस्कार, 8 जोर आणि 8 बैठका घालायला लागले. त्याचबरोबर काही आसने करत होते. ८ जोर आणि ८ बैठकाने खूप जडत्व आले. मग मी माझा व्यायाम सेट केला. तो म्हणजे १२ सूर्यनमस्कार, ४ जोर आणि ४ बैठका. आणि काही आसने.


सूर्यनमस्काराने आणि आसने केल्याने अंग खूप लवचिक बनते. जोर बैठका घातल्याने स्नायुंना बळकटी येते.
अर्थात लग्नानंतरच मी व्यायाम करायला लागले. विनायक मला म्हणाला की सूर्यनमस्कार हा व्यायाम बायकांसाठी चांगला आहे. पहिल्या दिवशी सूर्यनमस्कार घातले. दुसऱ्या दिवशीही घातले. नंतर खांदे मान दुखायला लागली. विनायक म्हणाला की तसेच रेटून तिसऱ्या आणि ४ थ्या दिवशी व्यायाम कर. तसे केल्याने अंगदुखी थांबली आणि मला खूप छान वाटायला लागले आणि रोजच्या रोज नमस्कार घालायला लागले. चपळता वाढली. उत्साह वाढला. आयायटी पवई मध्ये भाजी आणण्याकरता खूप चालावे लागते. त्यामुळे चालणेही आठवड्यातून एकदा अंदाजे २ मैल व्हायला लागले. नंतर मी शिवणाचा क्लास जॉईन केला तो जाऊन येऊन २ मैल होता. आठवड्यातून १ वेळा २ मैल चालणे सुरू झाले. भाजी घाटकोपरवरून बसने जाऊन आणायला लागले.विनायकचे वजन त्याच्या ५ फूट ११ इंच उंचीनुसार ७२ किलो पाहिजे. तसे ते होते. शिवाय खाणे म्हणजे डब्यातले. त्यातल्या पोळ्या म्हणजे दिव्यच असायच्या. आणि भाजीही पातळ असायची. त्याचे केमिस्ट्री डिपार्टमेंट ३ ऱ्या मजल्यावर होते. त्यामुळे चालत जाऊन शिवाय जिनेही चढणे उतरणे व्हायचे. याशिवाय त्याचा जोर बैठकांचा वेगळा व्यायाम्ही असायचा.



लग्नानंतर आमचा आहार असा काहीसा होता. विब्स ब्रेड स्लाईस भाजून त्यावर अमुल बटर पसरवून ते स्लाईस ४ ते ५ खायचो. त्यावर दुधाची कॉफी. दुपारी जेवणाला पोळी भाजी, कोशिंबीर, आमटी भात, ताक , संध्याकाळच्या खाण्याला पोहे उपमे आणि रात्री मुगाच्या डाळीची खिचडी किंवा आमटी भात. लग्नानंतर विनायकचे वजन ७२ चे ८० किलो झाले आणि माझे ४५ चे ५० किलो झाले. विनायकला मी सल्ला दिला की तू नुसते जोर बैठकांचा व्यायाम करू नकोस. जोडीला सूर्यनमस्कारही घाल. डोंबिवलीला आल्यावर आमच्या दोघांचा व्यायामाचा पॅटर्न एकच झाला तो म्हणजे आधी सूर्यनमस्कार, नंतर जोर बैठका आणि नंतर काही आसने. मी काही वर्षे नोकरी केली आणि माझे वजन ५० चे ५४ झाले. नोकरी करताना आपण चहा खूप पितो. म्हणजे जितका चहा पितो तितकी साखर तुमच्या पोटात जाते. शिवाय सटर फटर खाणे होते. मित्रमैत्रिणींबरोबर होटेल मध्ये खाणे होते. माझा अनुभव म्हणजे नोकरी करताना वजन वाढते आणि घरी बसल्यावर कमी होते. विनायकला हिंदुस्ताने लिव्हर मध्ये नोकरी लागली आणि त्याचे जेवण तिथेच व्हायला लागले. तो म्हणाला की लोकल ट्रेन मध्ये जाताना गाडी पकडण्यासाठी दोन्ही हात मोकळे असलेले चांगले म्हणून मला डबा धरण्याचे लोढणे नको.



विनायकने डोंबिवलीवरून अंधेरीला ट्रेन आणि बसने १० वर्षे नोकरी केली. घरचे जेवण रात्रीचेच असायचे त्यामुळे मी रात्री पोळी भाजी भात आमटी असे सर्व करायला लागले. विनायकचे वजन ८० वरून ८५ वर गेले. वजन वाढण्याचे मुख्य कारण कॅंटीन मधले जेवण. शिवाय चहाबरोबर बिस्किटेही असायची. धकाधकीच्या जीवनातही विनायक रोजच्या रोज व्यायाम करायचा. कधी पहाटे उठून तर कधी रात्री जेवणानंतर तासाभराने. व्यायाम एक व्यसन आहे ते कधीही सुटत नाही. अंधेरीत रहायला आल्यावर दुपारचे जेवण व्हायला लागले. विनायक दुपारी जेवायला घरी यायचा त्यामुळे परत पोळी भाजी भात आमटी कोशिंबीर, ताक असे व्हायला लागले. अंधेरीत आल्यावर उपहारगृहामध्ये इडली, डोसे खायला लागलो. अंधेरीत आल्यावर माझे वजन ५४ चे ५८ झाले.
अमेरिकेत आल्यावर युनिव्हरसिटी परिसरात आमचे दोघांचेही चालणे खूपच वाढले. सुरवातीला इतर खाणेही वाढले होते. आईस्क्रीम, बटाटा चिप्स आणि कोक भरपूर खाल्ले. आणि एका पॉईंटला आम्ही हे खाणे पूर्णपणे थांबवले. विल्मिंग्टनला आल्यावर माझे वजन ६० किलोपर्यंत झाले. विल्मिंग्टन मध्ये रहायला आल्यावर आम्ही वजनाचा काटा आणला.



व्यायामातही चालण्याने वजन घटते. चालणे म्हणजे किमान १ मैल आठवड्यातून २ ते ३ वेळेला. आणि नुसते चालून उपयोगी नाही. सूर्यनमस्कार, जोर बैठकाही हव्यात नाहीतर स्नायुंची ताकद निघून जाते. विल्मिंग्टन मध्ये असताना मी रोजच्या रोज १ मैल चालायचे. बाकीचा व्यायाम रोजच्या रोज व्हायचा नाही. तो आठवड्यातून २ वेळा व्हायला लागला. विनायक शनिवार रविवार मध्ये एक दिवस २ मैल चालायचा. एके दिवशी माझे चालणे थांबले. रोजच्या रोज मैलोंमैल चालण्याने खांदे आणि पाठ खूप दुखायला लागली. नंतर मी एका स्टॉप साईन पर्यंत रोजच्या रोज चालायचे ठरवले.


माझे खरे वजन घटले ते हँडरसनविलला आल्यावर इंगल्सच्या नोकरीमुळे. कसे ते पुढील लेखात.@Rohini Gore
क्रमश : ...


Friday, December 11, 2009

टंकलेखन (३)

तक्ते बनवताना सर्व गोष्टींचा अंदाज आधीच घ्यावा लागतो. त्यात रकाने किती आहेत, प्रत्येक रकान्यात मजकूर किती आहे, आकडेवारी किती आहे. शिवाय डाव्या व उजव्या बाजूने कितीवर मार्जिन सेट करायचे. तक्त्याच्या खाली जो कोणी सही करणार आहे त्याचे नाव व पद. सही करण्याकरता सोडलेली जागा, शिवाय तक्त्यावरचे शीर्षक. प्रत्येक गोष्टीचे मोजमाप, अंदाज घेणे, शिवाय तक्ता कशा प्रकारे सुबक दिसेल हे पण विचारात घ्यावे लागते. तक्त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे टॅब लावणे. किती अंतरावर किती टॅब लावायचे आणि टॅब लावताना विचारात घ्यावे लागते ते म्हणजे दोन टॅबमधले अंतर. उदाहरण घ्यायचे झाले तर पहिला रकाना no. of items तर याचे आधी स्ट्रोक मोजायचे, दोन शब्दांच्या मधली जागा मोजायची, शिवाय अलीकडे व पलीकडे एकेक मोकळी जागा आणि दोन रकान्यांमधल्या रेषा मोजायच्या. आता no. of items मध्ये १२ स्ट्रोक आहेत दोन शब्दांच्या मधल्या मोकळ्या जागा धरून. शिवाय अलीकडे व पलीकडे एकेक आणि दोन रेषा म्हणजे १२ + ४ = १६ म्हणजे पहिला टॅब १६ अंकावर लावायला लागेल याप्रमाणे सर्व टॅब लावून घ्यायचे. टॅब लावायची एक की असते कळफलकावर ती दाबायची प्रत्येक टॅब लावल्यावर म्हणजे मग ते लागतात. हे टॅब नेमलेल्या ठिकाणी लागलेले आहेत का नाही ते कळफलकाच्या सर्वात वरची पट्टी असते स्पेसबारसारखी दिसणारी ती दाबली की कळते. सर्व तक्ता कळफलकाच्या साहाय्याने बनवता येतो. उभ्या रेषेसाठी एक युक्ती आहे. कॅरेज वर कागद लावलेला असतो त्यावर एक पट्टी असते तिथे एक छोटे भोक असते तिथे बॉलपेन घालायचे व रोलर फिरवायचा की त्या रकान्यासाठी उभी रेष मारली जाते. अशाच बाकीच्या उभ्या रेषा मारून घ्यायच्या. तक्ते बनवून झाले की सर्व लावलेले टॅब मोकळे करायचे. याकरताही एक की असते. स्पेसबार सारखी दिसणारी पट्टी दाबायची की ज्या ठिकाणी टॅब लावलेले आहेत तिथे जाता येते. त्या त्या ठिकाणी जाऊन टॅब मोकळे करण्याची की दाबायची की ते मोकळे होतात.



टंकलेखन मशीनमध्ये रिबीन बसवण्यासाठी ती नीट बघून बसवायला लागते कारण की रिबीन अर्धी लाल व अर्धी काळी असते. उलटी बसली तर लाल अक्षरे उमटतील. कार्बन पेपर दोन कागदांमध्ये घालताना तो सुद्धा नीट घालावा लागतो. तोही उलटा नजरचुकीने बसवला जाऊ शकतो. दोन कागदांमध्ये कार्बन पेपर नीट खोचला गेला आहे ना हे बघावे लागते. आता टंकताना ज्या चुका होतात त्या चुका खोडणे पण त्रासदायक आहे. चुका टाळण्यासाठी टंकलेखन वेगाबरोबर कमालीची अचूकता असणे फायद्याचे ठरते. एखादे अक्षर चुकीचे टंकले गेले तर ते एकतर खोडरबराने खोडायचे नाही तर व्हाईटफ्ल्युएडने. खोडरबराने खोडायचे असेल तर मुख्य कागदाच्या मागे जिथे खोडायचे असेल तिथे एक जाड कागद ठेवायचा व खोडायचे कारण की कार्बन पेपर लावलेला असल्याने खोडताना सर्व प्रतींवर खोडले जाते व बाकीच्या प्रतींची वाट लागते. सर्व काळे होऊन जाते. व्हाईट फ्ल्युएडने खोडायचे असल्यास ते आधी पातळ करून घ्यायचे व अलगद नेमक्या चुकलेल्या जागी नेलपॉलिश लावतो त्याप्रमाणे लावायचे. ते लावल्यावर थोडी फुंकर मारायची की मग ते वाळते आणि मग बरोबर शब्द अगदी त्याच जागेवर परत टंकायचा. हे खूपच कटकटीचे व त्रासदायक असते. शिवाय बाकीच्या कार्बन लावलेल्या कागदांवरही असेच नेमके व अचूक करायचे.

http://www.youtube.com/watch?v=CIBnKb-L-D8&feature=related इथे टंकलेखन प्रात्यक्षिक पहा.

सुधारित टंकलेखन पुढील भागात पाहू.

क्रमश:...

Monday, November 23, 2009

टंकलेखन (२)

टंकलेखनामध्ये प्रत्यक्ष टंकलेखन करताना काय काय करावे लागते ते पाहू. कळफलकावर जसे ए टु झेड अक्षरे असतात. त्याप्रमाणे इतर अनेक प्रकारची चिन्हे असतात जसे की स्वल्पविराम, पूर्णविराम, उद्गारवाचक, प्रश्नार्थक चिन्हे व इतरही दुसऱ्या काही कीज जसे की स्पेसबार, टॅब लावण्याची की, टॅब मोकळे करण्याची की कॅपलॉक वगैरे. टंकलेखन मशीनच्या वरील भागात अक्षरे प्रत्यक्ष कागदावर उमटवले जाणारे छोटे छाप अर्धवर्तुळाकार दिसणाऱ्या चापाच्या टोकाला बसवलेले असतात. त्यावर सर्व इंग्रजी अक्षरे कोरलेली असतात. टंकलेखन मशीनवर असणाऱ्या विविध कीज (बटणांवर) दाब देऊन ही अक्षरे रोलर वर जाऊन रिबीनीवर आदळतात आणि कोऱ्या कागदावर अक्षरे उमटतात. टेपरेकॉर्डरमध्ये ज्या कॅसेट असतात त्याप्रमाणे रिबीनीचे रीळ जोडण्याकरता टंकलेखनाच्या मशीनवर डाव्या व उजव्या बाजूला दोन स्तंभ असतात. त्या स्तंभावर पत्र्याच्या दोन चकत्या असतात तिथे रिबीन लावून घ्यायची. ही रिबीन त्या चकत्यांमध्ये रिळाप्रमाणे गुंडाळली जाते. रोलरच्या उजवीकडे एक स्टीलचा छोटा नॉब असतो तो पुढे ओढला की रोलरमधून कागद घालण्याकरता थोडी मोकळी जागा होते, त्यातून कागद घालायचा. कागदाचे वरचे टोक त्यात घातले की पुढे आणलेला नॉब मागे करायचा व रोलरच्या साहाय्याने फिरवून कागद गुंडाळून मशीनच्या वर येतो म्हणजेच तो रिबीनीच्या व रोलरच्या मध्ये येतो. तिथे एक स्टीलची बारीक पट्टी असते ती त्या कागदावर आणायची. परत रोलरच्या उजव्या बाजूला असलेला नॉब पुढे आणायचा. आता कागदाचा पुढे आलेला भाग व कागदाचा शेवटचा भाग एकावर एक हाताने जुळवून घ्यायचा आणि परत तो नॉब मागे करायचा. आता तुमचा कागद टंकलेखन मशीनवर सरळ व घट्ट बसला आहे असे समजावे.



हा कागद लावताना रोलरला लागूनच कॅरेज असते व त्यावर एक मोजपट्टी असते तिथे शून्यावर किंवा मोजपट्टी नसेल तर एक छोटी रेष रंगवलेली असते तिथे कागदाची डावी कड येईल असा कागद लावायचा. कॅरेजच्या डावीकडे एक हँडल असते ते ओळ पुढे जाण्यासाठी वापरतात. दोन ओळींमध्ये किती अंतर हवे यासाठी पण एक स्पेस मार्जिन असते, ते सेट केले की त्याप्रमाणे पुढच्या ओळीवर जाता येते. याला कॅरेज रिटर्न म्हणतात. स्पेसबार वापरून कागद पुढे जातो. ही स्पेसबारची पट्टी कळफलकावर खाली असते. रोलरला लावलेला कागद डावीकडून उजवीकडे जाण्यासाठी किंवा लावलेले टॅब योजलेल्या ठिकाणी बरोबर जाऊन पोहचतात की नाही किंवा लावलेले टॅब सर्व मोकळे झाले आहेत का हे पाहण्यासाठी स्पेसबार सारखीच एक पट्टी कळफलकाच्या वर असते. कॅरेजवर मार्जिन लावण्यासाठी दोन बाजूला दोन छोटे नॉब असतात. कागदावर मार्जिन सेट करण्यासाठी कागदाच्या डाव्या बाजूच्या सुरवातीपासून १० मोकळ्या जागा मोजायच्या आणि कॅरेजवरचा डावा नॉब त्या सेट केलेल्या मार्जिनावर आणायचा. असेच उजव्या बाजूने पण मार्जिन सेट करायचे. आता या सेट केलेल्या मार्जिनामध्येच तुम्ही जे टंकणार आहात ते टंकले जाईल. कळफलकाच्या साहाय्याने टंकीत करताना दोन शब्दांमध्ये किती मोकळी जागा सोडायची किंवा वाक्यानंतर किती मोकळी जागा सोडायची यासाठी स्पेसबारचा वापर केला जातो. साधारण दोन शब्दांमध्ये एक मोकळी जागा व एका वाक्यानंतर दोन मोकळ्या जागा सोडण्याची पद्धत आहे. हा स्पेसबार दाबताना उजव्या हाताचा अंगठा वापरला जातो. स्पेसबारप्रमाणे एक मोकळी जागा मागे न्यायची असल्यास बॅकस्पेस या बटणाचा वापर केला जातो. त्याकरता डाव्या हाताचा अंगठा वापरतात. कागदावरच्या डावीकडून उजवीकडे सर्व मोकळ्या जागा मोजायच्या असतील तर स्पेसबार वर दाब देण्याकरता मधले बोट वापरले जाते.



टंकलेखनाच्या मशीनवर तुम्ही कागद लावलेला आहे. मार्जिन सेट झालेले आहे. आता सुरवात करा तुमच्या टंकलेखनाला! टंकताना कळफलकाच्या साहाय्याने एकेक अक्षरे कागदावर उमटवली जातात. मजकूर टंकित करताना "कागदाची उजवी बाजू आता संपत आली आहे. दुसऱ्या ओळीवर जा" असा संदेश देणारी "टिंग" अशी एक बेल वाजते. कारण आपण टंकित करताना कागदाकडे किंवा कळफलकाकडे पाहात नाही आहोत. तुमची नजर टेबलावर असलेल्या कागदाकडे आहे की ज्यावर लिहिलेले तुम्ही टंकत करत आहात. आता ही "टिंग" बेल वाजली की कागदाकडे पाहायचे किती जागा शिल्लक आहे त्याप्रमाणे अंदाज घेऊन टंकून मग दुसऱ्या ओळीवर जायचे. आता ही "टिंग" बेल वाजल्यावर टंकता टंकता पुढे येणारा शब्द तिथे बसेल का? किंवा अर्धा बसवून पुढील शब्द खाली घेऊ का? किंवा ती जागा तशीच रिकामी सोडू? हे सर्व तुमचे तुम्हाला ठरवावे लागते. शेवटी टंकीत केलेले पत्र सुबक दिसायला हवे ना!



कॅरेजवर अजून एक पट्टी असते ती उभी करून ठेवायची. त्यावर तुमचा रिकामा कागद असेल. जसजसे तुम्ही टंकाल तसतसा हा रिकामा कागद खाली सरकेल. याचा उपयोग अशा करता होतो की आता कागद संपत आलेला आहे. मजकूर अजूनही शिल्लक असेल तर तो आता दुसऱ्या पानावर घ्यायला हवा. आता हा कागद टंकलेखन मशीनवरून काढा आणि पाहा कागदावरचा मजकूर कसा दिसतो ते!


तक्ते कसे बनवायचे व अजून काही गोष्टी पुढच्या भागात पाहू.

..... क्रमशः

Sunday, November 22, 2009

टंकलेखन (१)

ए, एस, डी, एफ, जी, एफ (स्पेसबार) सेमीकोलन, एल, के, जे, एच, जे या अक्षरांनी सुरवात होते टंकलेखनाच्या धड्यांची. ही अक्षरे म्हणजे कळफलकाचा गाभा म्हणले तरी चालेल. सर्वात मुख्य म्हणजे कळफलकाकडे न पाहता या अक्षरांचा सराव करावा लागतो. डाव्या हाताची चार बोटे ए, एस, डी, एफ करता व उजव्या हाताची चार बोटे एल, के, जे, एच करता. डाव्या हाताची चार व उजव्या हाताची चार बोटे वापरून म्हणजे कळफलकावरील बटणांवर जोर देऊन टंकले ही अक्षरे कोऱ्या कागदावर उमटतात. एका कागदावर ही अक्षरे मोठ्या अक्षरात टंकीत केलेली असतात तो कागद घ्यायचा तो टंकलेखन मशीनच्या डाव्या बाजूला आपल्या नजरेला सहज दिसेल असा ठेवायचा व सराव करायचा. पानेच्या पाने टंकीत करायची. प्रत्येक बोटाला जे अक्षर ठरवून दिलेले आहे त्याप्रमाणे टंकायचे की मग ती अक्षरे आपल्या डोक्यामध्ये पक्की बसतात. टंकलेखनाचा संबंध बरीच वर्षे आला नाही तरीही तुमच्या पुढ्यात टंकलेखन मशीन आले की आपोआप कळफलकाकडे न बघता ही अक्षरे आपण टंकीत करू शकतो. याच पद्धतीने हा लेख मी संघणकाच्या कळफलकाकडे न बघता डावीकडे असलेल्या माझ्या वहीत लिहून ठेवलेल्या लेखाकडे बघून टंकत आहे.


दुसरा धडा म्हणजे ए, एस, डी, एफ च्या वरची अक्षरे आहेत त्यांचा. या अक्षरांचाही असाच पानेच्या पाने टंकीत करून सराव करायचा. तिसरा धडा म्हणजे तीन, चार, सहा अक्षरी शब्द की ज्या शब्दांची अक्षरे कळफलकाच्या वरच्या व खालच्या ओळीत असतील असे सर्व शब्द, किंवा ज्या शब्दांची अक्षरे फक्त डाव्या बोटांमध्ये येतील किंवा फक्त उजव्या बोटांमध्ये येतील असे शब्द. असे बरेच शब्द टंकीत करून करून पूर्ण कळफलक आपल्या डोक्यात बसतो. अक्षरे, शब्द, वाक्ये, परिच्छेद टंकीत करायचे. या सर्वांचा पानेच्या पाने टंकीत करून सराव करायचा.


एकूणच टंकलेखनाचा हा सराव म्हणजे अक्षरे, शब्द, वाक्ये व परिच्छेद टंकीत करताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे कळफलकाकडे बघायचे नाही, जसे की सायकल शिकताना सायकलकडे न बघता समोर रस्त्याकडे बघायचे व सायकल चालवायची अगदी तसेच हे तंत्र आहे की जे आत्मसात केल्यावर आयुष्यात कधीही विसरत नाही. टंकलेखन ही एक कला आहे. सराव करताना चुका होतात, कळफलकाकडे पाहिले जाते. सराव झाला की मग टंकलेखन वेग. या टंकलेखन वेगाला खूप महत्त्व आहे. तुम्ही दणादणा वेगाने टंकत आहात आणि त्यात जर असंख्य चुका निघाल्या तर त्या टंकलेखन वेगाला काहीही अर्थ नाही. वेग कमी असला तरी चालेल पण जे टंकीत केले आहे ते बिनचूक असायला हवे.


जेव्हा टंकलेखन वेगाची परीक्षा घेतली जाते तेव्हा अमुक शब्द अमुक एका वेळात टंकीत केले गेले पाहिजेत. जेवढे शब्द टंकीत होतील ते सर्व मोजतात एक दोन असे करत त्यात स्पेस बार व दोन शब्दांमध्ये किंवा वाक्यांमध्ये रिकामी सोडलेली जागाही मोजली जाते. त्याचे एक गणित आहे. हे सर्व पूर्ण पान टंकीत कसे करायचे याबद्दल झाले. टंकलेखनामध्ये तुम्हाला तक्ते पण टंकीत करायचे असतात की ज्यामध्ये उभे आडवे रकाने आहेत. लाख कोटी असे आकडेही आहेत. तसेच त्यात मजकूरही टंकीत करायचा आहे. तक्त्याला शीर्षक आहे, तेही कागदाच्या मधोमध यायला हवे. या सर्वांचा तुम्हाला एक अंदाज घ्यावा लागतो. कागदावर तो तक्ता उभा बसेल की आडवा, किंवा कसा चांगला दिसेल याचा अंदाज घ्यायला लागतो. प्रत्येकाचे मोजमाप घ्यावे लागते. तक्ता जर खूप मोठा असेल तर तो नेहमीच्या कागदावर न बसवता फूलस्केप कागदावर बसवावा लागतो. कागदाच्या वरून किती जागा सोडायची, शीर्षक लाल अक्षरात हवे की नको हे विचारात घ्यावे लागते. रकाने असतील तर टॅब लावावे लागतात. हे सर्व अचूक, खाडाखोड न करता, देखणे दिसेल याकडेही लक्ष द्यावे लागते. तक्ते बनवण्याचा पण बराच सराव करायला लागतो.


संपूर्ण कळफलक शिकायला सहा महिने लागतात. त्यानंतर क्लासला जायचे ते वेग कमावण्यासाठी. एकेक दोन दोन तास वेगवेगळी इंग्रजी मासिके घेऊन त्यातला मजकूर टंकीत करून सराव करायचा. नंतर वाचून त्यातल्या चुका काढायच्या.

टंकलेखनाचा भरपूर सराव, त्याचा वेग, त्यातील अचूकपणा हे सर्व आत्मसात झाले आणि तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये कामाला लागतात की तुम्हाला एकच पत्र नाही तर बरीच पत्रे, तक्ते व इतरही बरेच काही टंकीत करावे लागते. यात बिनचूक व देखण्या पत्राची विशेष दखल घेतली जाते. पूर्वी कंपनीमध्ये एखादे पत्र टंकीत करायचे झाल्यास त्याच्या दोन प्रती काढल्या जायच्या. एक म्हणजे मुख्य पत्र की जे दुसऱ्या कंपनीत पाठवायचे असते आणि त्या पत्राची कार्बन प्रत की जी कचेरीत ठेवली जाते. किंवा त्याच्या अजूनही काही प्रती कार्बन पेपर लावून काढल्या जायच्या की जी पत्रे कंपनीतच कोणा वरिष्ठ अधिकाऱ्याला किंवा दुसऱ्या कंपनीतल्या एखाद्या महत्त्वाच्या माणसाला पाठवण्यासाठी. ही कचेरीतली पत्रे दोन चार प्रकाराने टंकीत केली जायची. पहिले म्हणजे लिहून दिलेली पत्रे, त्यात अक्षर बरे असेल तर ठीक नाहीतर ते लावता लावता खूप किचकट वाटायचे. दुसरे म्हणजे डिक्टेशन देऊन, किंवा काही वेळेला थेट तोंडी सांगतील त्याप्रमाणे लगेचच तो मजकूर टंकीत करायचा, किंवा ठराविक साचेबद्ध पत्रे टंकीत केली जायची.

दुसऱ्या भागामध्ये प्रत्यक्ष टंकलेखन कसे होते ते पाहू.

..... क्रमशः