Monday, July 28, 2025

2025

 मुंबई विमानतळावर उतरलो आणि रपारप पावसाला सुरवात झाली. पावसाने आमचे खूप छान स्वागत केले. केके च्या कारमध्ये स्थानापन्न झालो. वाहनचालक छोटा पोरगा होता. कार छान चालवत होता. कारच्या पुढच्या काचेवर पाऊस अधुन मधून थैमान घालत होता. घाटातही पाण्याचे मोठाले ओहोळ रस्त्यावरून वाहत होते. कार धावत असताना लगतच्या कड्यावरून छोटे छोटे धबधबे पहाताना खूप मजा येत होती. चहापाणी घेण्याकरता कार थांबली. पटकन खाली उतरून भिजतच फूड मॉलमध्ये गेलो. पोरट्याला म्हणालो तूही आमच्या बरोबर चहा घे. मी गरम गरम वडा पाव खाल्ला. सोबत तिखट चटणी होतीच. त्यावर आलं व चहाचा मसाला घातलेला चहा प्यायल्यावर बरे वाटले. कार चालवताना वाहनचालकाने गाणी लावली होती. अर्थात ती नवीनच होती. मनाला भिडत नव्हती. मी म्हणाले जरा जुनी गाणी लाव ना! तर त्याने त्याचा फोन माझ्या हातात दिला आणि म्हणाला तुम्हीच लावा. मग मी किशोर कुमारची गाणी लावली. त्यामुळे प्रवासात आणखी मजा आली. ओ मेरे दिल के चैन,, हम दोनो दो प्रेमी दुनिया छोड चले,, नंतर काही लता मंगेशकरची लावली. आम्ही आईच्या घरी पोहोचलो तेव्हा झुंजुमुंजू झालं होतं. पाऊस पडतच होता. आभाळ ढगाने भरलेले होते. आईच्या दाराची बेल वाजवली. आईला उठायला व चालत यायला वेळ लागतो हे माहीत होते. दार उघडल्यावर आई म्हणाली मी वाटच बघत होते. मला रात्रभर झोप नाही. आईकडे मावशी चहा करायला येतात. त्या यायच्या होत्या. गेल्या गेल्या मी चहाचे आधण गॅसवर ठेवले व आम्ही तिघांनी मिळून सकाळचा पहिला चहा घेतला. आई म्हणाली लगेच अंघोळी उरकून घ्या आणि मी गीझर ऑन केला. घरातून निघाल्यापासून प्रवासाला २४ तासाहून अधिक तास उलटून गेले होते. गरम गरम पाण्याने अंघोळ केल्याने तात्पुरते का होईना ताजेतवाने वाटले. - rohinigore

उत्साही व आनंदी आईला नव्वदावं लागलं जुलै मधे

आमच्या डोंबिवलीतल्या घराचा ताबा घेण्यासाठी आम्हाला पुण्यावरून दोन वेळा जा-ये करायला लागली. पावसाळा असल्याने छान वाटत होते. डोंबिवलीत आम्ही अर्चनाच्या घरी राहिलो होतो. काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी फोटो काढण्याकरता फडके रोडवरच्या स्टुडिओ वर गेलो तर ते बंद होते. इथेच आम्ही १९९९ साली पासपोर्ट काढण्यासाठी फोटो काढले होते ते आठवले. दुसरा स्टुडिओ शोधायचा होता पण त्या आधी छत्री विकत घेतली. विचारत होतो फोटोसाठी काही दुकानात. एकाने सांगितले की अमूक ठिकाणी जा. तिथे चालत जायला लांब होते म्हणून मग विचार केला की आधी बॅंकेत जाऊ. तिथे जात असताना यु टर्न घ्यायचा होता म्हणून रिक्शा पुढे गेली तर मला एक डाव्या बाजूला स्टुडिओ दिसला. तिथेच रिक्शा थांबवली. फोटो काढले व इतर काही कामे करून आमचा फ्लॅट बघायला गेलो. सर्व काही चालण्याच्या अंतरात होते. पाऊस झिमझिमत होता. काही कामे उरकून पुण्यास परतलो. नंतर परत एकदा डोंबिवली. यावेळेला विनु अलिबाग वरून आला व मी पुण्याहून आले. मी ७ सीटर्सच्या गाडीतून उतरले आणि अर्चनाकडे जाण्यासाठी मला टिळक पुतळ्याजवळ लगेचच रिक्शा मिळाली. विनू दुपारीच अर्चनाकडे पोहोचला होता. तो बाहेर गेला होता व अर्चना व तिची फॅमिली पण बाहेर गेली होती. तिने तसे फोनवर मला सांगितले होते. तिच्या घराची किल्ली शेजारी सुप्रिया घैसास यांच्याकडे होती. अर्चनाच्या घरी पोहोचले व किल्ली घेतली. सुप्रिया ताईनी मला लगेच तिच्या घराचे दार उघडून दिले व गरमागरम चहा दिला व सांगितले अर्चनाने पोळी भाजी केली आहे तुम्हाला ताट वाढून देऊ का? तर मी म्हणाले नको, मधेवाटेत मी वडा पाव व चहा घेतला आहे त्यामुळे मला भूक नाहीये. विनू बाहेरून आला की आम्ही जेवू. अर्चना, तिचा नवरा व मुलगा एका वाढदिवसाच्या पार्टीला गेली होती. त्यांना उशीर होणार होता.


अर्चना व तिच्या शेजारचे खूप छान आहेत. खेळीमेळीचे वातावरण आहे. पटकन उठून कुणीही कुणाकडे जाते. एकमेकांना वाडग्यातून पदार्थ देतात. चहाला बोलावतात. आषाढी एकादशी निमित्ताने अर्चनाने बरेच काही केले होते. न्याहरीला साबुदाण्याची खिचडी, दुपारच्या जेवणाला भगर, दाण्याची आमटी, रताळ्याचा शिरा. सुप्रिया घैसास यांच्याकडे आम्हाला चौघांना बोलावले. त्यांनी त्यांच्या कुलदेवताची पूजा केली होती. त्यानिमित्ताने आम्हाला चौघांना प्रसाद, दक्षिणा व एकेक फळ असे दिले. हळदी कुंकू लावले. नमस्कार केला. असे काही अमेरिकेत होत नाही त्यामुळे छानच वाटले. सुप्रिया माझ्याच वयाची आहे. ती पण आम्हाला काका काकूच म्हणते. ४ दिवसात अर्चनाकडे बरीच खादाडी केली. न्याहरीला एकदा फोडणीचे पोहे, तर एकदा दडपे पोहे तर एकदा मिक्स डाळींचा डोसा. दडपे पोह्यांची रेसिपी वेगळी आहे. तसे एकदा करून पहाणार आहे. सुप्रियाने पण एकदा दडपे पोहे दिले. अर्चना कोपऱ्यावरच्या भाजीवाल्याकडून भाजी घेते व त्याला जीपे करते. एकदा रिक्शावाल्याला पण तिने जीपे केले. भाजी एकदम स्वच्छ आणि ताजी होती. अर्चनाला म्हणाले मी तुला भाजी निवडून देते. विळीवर बसून मी कित्येक वर्षांनी नारळाच्या वाट्या खरवडून दिल्या. इतके काही छान वाटले ना ! अर्चना म्हणाली मला अशी कोणी तयारी करून दिली तर मी बऱ्याच जणांचा स्वयंपाक करेन ! तिने एकदा तव्यावर ब्रेडचे स्लाईज भाजून आत बटाट्याची भाजी घालून खरपूस सॅंडविच केले होते. छान लागली चव ! तिच्याकडे गोठ्यातले दूध येते घरपोच ! तिची एक मैत्रीणि साड्या व पंजाबी सूटचा सेट असे विकते. तिला पाठवत असते नवीन स्टॉक आला की. तिच्या फोनवरचे सूट पाहिले आणि मला आवडले म्हणून मला एक व तिला एक असा सेट विकत घेतला. तिचा टेलर आहे त्याने मला एका दिवसात पंजाबी ड्रेस शिवून दिला. घरी येवून. मी अर्चनाचा एक ड्रेस घातला तो मला फिटींगला एकदम छान झाला. तोच ड्रेस मापाला दिला. तिचा चिंतामणी रंगाचा ड्रेस तर मला खूपच आवडला.


पाऊस धो धो पडत होता. मधूनच विश्रांतीही घेत होता. अर्चना पहाटे ५ ला उठून पोळीभाजीचा डबा करते. तिचा नवरा व मुलगा ७ ते साडेसात पर्यंत बाहेर कामावर जायला बाहेर पडतात. नंतर अर्चना एका शाळेत कामला जाते. ती गेल्यावर आम्ही आमच्य अंघोळी पांघोळी उरकायचो. कपडे वॉशिंग मशिनला लावून नंतर मी जसे जमेल तसे कपडे वाळत घालायचे. आम्ही एका रात्री सर्वांना घेऊन उपाहारगृहात जेवणासाठी घेऊन गेलो. निवांत बसून जेवायला खूप छान वाटत होते. २ घास जास्तीचे गेले. बरोबर कुणी असले की जेवायलाही हुरूप येतो. शेवटी एकदाचे आमच्या फ्लॅटचे रजिस्ट्रेशन व अग्रीमेंट झाले आणि हुश्श केले. घराची किल्ली बिल्डरने आम्हाला सुपूर्त केली. नंतर आम्ही डोंबिवलीतल्या गणपती मंदीरात गेलो. सर्व देवतांना नमस्कार केला. निगुडकर मामींना भेटलो. त्यांना पेढे दिले. व अजून काहींना पेढे दिले. पुराणिक काकुंकडे कामानिमित्ताने २/४ वेळेला जाणे झाले. ते दोघे नवरा-बायको खूप थकलेले दिसतात. कुंदा आत्या व जहागिरदार वहिनींकडे भेटायला गेलो. कामानिमित्त रस्त्याने फिरताना सर्व मागच्या आठवणी जाग्या होत होत्या. डोंबिवलीच्या फ्लॅटमध्ये आम्ही पूर्वी १० वर्षे राहिलो होतो. या जागेतच अर्चना आमच्याकडे शिकायला येत होती आणि आमच्या घरातलीच होऊन गेली. ती आमच्या डोंबिवलीच्या घराचे सर्व काही बघते. लाईट बिलही भरते. प्रत्येक भारतभेटी मध्ये तिने मला माझ्या आवडीचे पदार्थ खाऊ घातले आहेत.


विनु अलिबागला त्याच्या आत्येभावाकडे आणि त्याच्या मैत्रिणीकडे ४ दिवस गेला होता. सुषमा, श्री व सौ रेखा परचुरे यांनी विनुचे छान आदरातिथ्य केले. सुषमाने अलिबागमधली सर्व देवळे व अजून बरेच काही दाखवले. सुषमाने मला फोन वरून सांगितले की ती दोघे रेवदंड्याला कशी अडकली होती. बेसूमार पाऊस, लाईटही गेलेले. चिखल, आणि मी फोन करत्ये करत्ये अजून कोणी उचलत का नाहीये. सर्व ठीक आहे ना? या काळजीत होते. दोघेही फोन घरीच ठेऊन गेले तर कोण उचलेल फोन? हाहाहा. सुषमा तू मला आग्रह करत होतीस पण आता पुढच्या वेळी मी व विनु तुझ्या घरी रहायला येऊ. मला पण आता अलिबाग पहावेसे वाटत आहे आणि अर्थात तुलाही भेटावेसे नक्किच वाटत आहे !


बुकींग, फोनाफोनी, मेसेजेस याकरता whatsApp चा उपयोग झाला. रंजनाने आईकडे वायफाय लावले आहे त्यामुळे आम्हाला घरात असताना उपयोग झाला. बाहेर पडल्यावर साधाच छोटु मोबाईल (पूर्वीचा) असतो तसा वापरत होतो बोलण्याकरता. २०२१ सालीच असा साधा फोन घेतला आहे. भारतात आलो की चार्जिंग करतो व अर्चना आमच्या मोबुवर पैसे भरते आणि फोन चालू होतो. एक कागदपत्र मिळवण्याकरता मी फोनवर सर्व माहिती भरली पण एका गोष्टीसाठी अडत होते म्हणून आम्ही दोघे नयनाकडे गेलो. तिथेही जी गोष्ट अडत होती ती भरण्याकरता खूप वेळ लागला. नयना, अवधूत व वर्षा गोरे यांच्य मदतीने अडकलेली गोष्ट सुटली आणि खूप हायसे वाटले. देवच पावला म्हणायचा. या गोष्टीसाठी आम्हाला ४ तास लागले. rohinigore



No comments: