Thursday, January 07, 2010

मी अनुभवलेली अमेरिका (२)

अमेरिकेत पहिल्यांदा आलो ते पोस्ट डॉक (Post Doctorate) करण्यासाठी. भारतीय अमेरिकेत वेगवेगळ्या निमित्ताने येतात. विद्यार्थी MS करायला. ते झाले की काहीजण पीएचडी करतात म्हणजे नोकरी मिळाली नाही तर देश न सोडता पीएचडी करतात. नंतर काही जण लग्नही जमवतात. काही जण एच १ व्हीसा घेऊन नोकरीवर येतात. अमेरिकेत 80 ते 85 टक्के (अंदाजे) लोक हे सॉफ्टवेअर क्षेत्रातले असतात. गुजराथी मोटेल बिझिनेस साठी इथे येतात तर काही जण फिरतीवर येतात नोकरीवरच त्यांचे हे फिरतीचे पोस्टींग असते बिझीनेस मिळवण्यासाठी. जे पुरूष इथे येतात त्यांच्या बायका dependent visa वर इथे येतात. काही dependent visa वर work permit काढून नोकरी करता येते तर काही वर नाही. मग अशा वेळेला आम्ही बायका काही ना काही मार्ग काढतो. प्रत्येकीचा मार्ग वेगळा. काही जणी शिक्षण घेतात, काही जणी त्यांच्या मुलांचे संगोपन करतात, तर काही जणी कोणत्याही प्रकारचे वर्क परमीट नसताना काम करतात, तर काही जणी voluntary work करतात.



तर ही पोस्ट डॉक कम्युनिटी खूप लहान असते. पोस्ट डॉक (post doctorate) ही degree नसते जशी पीएचडी असते तशी. ही एक प्रकारची कमी पगाराची नोकरीच असते. Post Doc means Research Experience in Foreign Countries यामध्ये paper publications असतात. Universtiy Campus खूप चांगले असते. पोस्ट डॉक करण्यासाठी अमेरिकेत भारतीयांसारखे चिनी, ब्लॅक, अमेरिकन्स, श्रीलंकन्स, बांगला देशीज, पाकिस्तानीज असे सर्व प्रकारचे लोक असतात. युनिव्हरसिटीमध्ये शिक्षणाचे वातावरण असते त्यामुळे सर्वजण एकमेकांशी मिसळून वागतात. पोस्ट डॉक करण्यासाठी तेलुगू लोक जास्त पाहिले. मराठी खूप कमी येतात. त्यामुळे आम्हाला आत्तापर्यंत एक-दोन असेच मराठी मुले भेटली. मराठी कुटुंब असूनपर्यंत भेटलेले नाही. आमचे भारतातील २-३ मित्र इथे पोस्ट डॉक साठी आलेले आहेत ते सोडून मराठी नवीन कुटुंब अजून तरी प्रत्यक्षात भेटली नाहीत.



आम्ही पहिल्यांदा ज्या युनिव्हरसिटीमध्ये आलो ते टेक्साज राज्यामध्ये. तिथे प्रचंड उन्हाळा असतो. तिथे ३-४ तेलुगू कुटुंबे होती. आम्ही सर्व जणी मिळून फिरायला जायचो, लायब्ररीत जायचो, एकमेकींकडे सहज म्हणून गप्पा मारायला जायचो. मी या सर्वांना मराठी पदार्थ खाऊ घातले आहेत आणि त्यांना ते आवडलेही आहेत. इथे आम्ही सर्व जणी चालत जायचो गोसरीला शुक्रवार संध्याकाळी पंजाबी ड्रेस घालून. इथल्या उन्हाळ्यात पंजाबी डेस घालता येतो इतका प्रचंड उन्हाळा असतो. १ वर्षानंतर दुसऱ्या राज्यात आलो तिथे आम्हाला २-३ कुटुंबे मिळाली. पाकिस्तानी, नॉर्थ इंडियन, श्रीलंकन. यातले काही पीएचडी करणारे होते. इथे ग्रोसरी स्टोअर्स लांब होते. पण बस सेवा छान होती. बसमध्ये जास्त करून भारतीय विद्यार्थी असायचे त्यामुळे मुंबईत प्रवास केल्यासारखेच वाटायचे. मी या बसमधून भरपूर हिंडलेली आहे. सुरवातीला ओळखी पटकन होत नाहीत अशा वेळेला मला एकटेपणा कधी आला नाही. बसमधून जायचे. प्रत्येक स्टोअर्स बघून यायचे काय काय आहे ते. असे केले की वेळही चांगला जातो, भटकंती होते आणि आपण कुणावर अवलंबून नाही. एकटे कुठेही फिरू शकतो हे पण महत्त्वाचे आहेच. कारण की अमेरिकेत public transport म्हणजे आनंदी आनंदच आहे. तुम्हाला कार येत नसेल तर घरी अडकून पडायला होते. पुण्यात कसे प्रत्येकाच्या बुडाखाली गाडी असते, इथेही तसेच आहे. पण भारतात रिक्षा टॅक्सी सेवा किती छान आहे. इथे आल्यावर मला हे खूप जाणवले. तिथे मला रिक्षातून हिंडायची खूप सवय होती. हात केला की रिक्षा हजर. मुंबईत तर काय कुठूनही कुठेही तुम्ही एकटे जाऊ शकता. कोणाचीही गरज भासत नाही. दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची पाळी तर भारतात कधीच येत नाही. काही मोठ्या शहरात आहेत बस सेवा व ट्रेन्स पण मी अनुभवलेले नाही. काही दिवसानी जेव्हा आम्ही कार घेतली तेव्हा आम्ही दोन विद्यार्थीनींना गोसरीकरता बरोबर घेऊन जायचो.



इथली ग्रोसरी स्टोअर्स इतकी मोठी असतात की सुरवातीला आपल्या रोजच्या लागणाऱ्या वस्तू किंवा खाण्याचे पदार्थ शोधायलाच वेळ लागतो. नंतर सवयीने "टकाटक" कार्ट मध्ये टाकायचे. मुंबईमध्ये मी रहायचे तेव्हा आमच्या घरासमोरच एक स्नॅकबार होता तिथले मला बटाटेवडे, इडली, डोसे खायची खूप सवय झाली होती. इथे आल्यावर इतके हाल झाले ना! खूपच जाणवले मला ते! इथे काहीही मिळत नाही असे. पुण्यामध्ये आपण किती भटकतो आणि चरत असतो. अगदी गावाबाहेर घर असेल तर भाजी आणायला मंडईत आले तरी घरी जाताना फरसाण, ढोकळे, चितळ्यांच्या बाकरवड्या काही ना काही घेऊन जातोच ना. मला आठवतयं पार्ल्याला मी रिक्षेतून जायचे. आधी लायब्ररीत पुस्तके बदलणे, मग भाजी, बरोबर काही ना काही घ्यायचे खादाडीसाठी. घरी आल्यावर जे काही आणले असेल ते खाऊन चहा प्यायचा व मग स्वयंपाकाला लागायचे. इथे आल्यावर खूप जाणवले, आता सवय झाली. ही सवय इथे कशी बदलते पहा. समजा इंडियन स्टोअर्स जवळ नसेल तर अमेरिकन स्टोअर्समधून आयस्क्रीम, कुकीज, कोक व बटाटा चिप्स खूप खाल्ले जातात. इथे तर काय आयस्क्रीमच्या बादल्याच मिळतात. बटाटा चिप्स तर तुम्ही एकदा खायला बसलात ना तर खातच बसतो माणुस! रोज दुपारी चहा ऐवजी कोक ढोसायची खूप सवय लागून गेली होती. वजन खूप वाढले. एक दिवस असा आला की आता हे सर्व थांबवायलाच पाहिजे. आता आम्ही वरील कोणतेही पदार्थ आणत नाहीत, मग खाणे तर राहिले खूप दूर!!


...... पुढील भाग घेऊन येतेच ......

No comments: