Thursday, December 21, 2017

भेटवस्तुंची देवाणघेवाण

भेटवस्तुंची देवाण घेवाण : - किती छान वाटते ना ! :) तर आज आमच्या इंगल्स स्टोअर्स मध्ये सगळ्यांसाठी स्नॅक्स आणि कोल्ड्रींक होते. दोन तीन प्रकारच्या कुकीज, दोन तीन प्रकारची चॉकलेटे, केक, बटाटा चिप्स, इ. इ. होते. तिथे भेटवस्तू पण रॅप करून ठेवल्या होत्या. त्या वस्तू म्हणजे सिक्रेट सांता त्याकरिता आधी आपले नाव यादीत द्यावे लागते. २ वर्षांपूर्वी मला नोव्हेंबर मध्ये नोकरी लागली होती तेव्हा काही माहीती नव्हते. दुसऱ्या वर्षी माहीती झाले होते पण कार्मेन म्हणाली की ती यामध्ये भाग घेत नाही म्हणून मी पण भाग घेतला नव्हता. तर आधी यादीत आपले नाव द्यावे लागते आणि जी भेटवस्तू द्यायची असते ती १० डॉलर्स च्या खाली असता कामा नये. १० डॉलर्स च्या वरती कितीही चालेल. आणि नंतर २ दिवसांनी आपल्याला एक चिठ्ठी उचलायची असते. त्या चिठ्ठीत कोणाला भेटवस्तू तुम्ही देणार आहात त्याचे नाव लिहिलेले असते. पण आपण ज्याच्याकरता भेटवस्तू देणार आहोत ते त्याला कळवून द्यायचे नसते. तर आज काहींना ज्या भेटवस्तू मिळाल्या त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. 


विकीला के कडून भेटवस्तू मिळाली ती म्हणजे कानातले आणि काचेची एक बाहूली. खूप छान होती. पिझ्झा बार मध्ये एक मेक्सिको देशातली मुलगी आहे तिला मोठा मेक अप बॉक्स मिळाला. हा बॉक्स तिला बेकरी मध्ये काम करणाऱ्या मुलीकडून मिळाला. मेक अप बॉक्स मिळाल्यावर ती खूपच खुष झाली होती. ती रोज चेहऱ्याला काय काय लावून येते. काजळ, लाली, डोळे वाढवते. पापणीच्या वर रंग लावते. त्या रंगांमध्ये चमचम पण असते. तिला ते खूप छान दिसते. एकीला प्रोड्युस मधल्या मॅजेजर कडून एक उबदार पांघरूण मिळाले. विकीने एकीला पिझ्झाचे गिफ्ट कार्ड दिले. आता ही झाली सिक्रेट सांता देवाण घेवाण. पण ख्रिसमस च्या निमित्ताने काहीजणी एकमेकींना अश्याच काही भेट वस्तू देतात. त्यात असेच काही उपयुक्त वस्तू असतात आणि काही चॉकलेटेही असतात.



विकीने मला यावर्षी पॉपकार्नची बॅग दिली की जी मायक्रोवेव्ह मध्ये ठेवल्यावर पॉपकॉर्न तयार होतात टणटण उड्या मारत. शिवाय दोन तीन प्रकारची चॉकलेटे आणि कोकोआ मिक्स दिले. तर या ज्या भेटवस्तू देतात ना त्या सजलेल्या पिशव्याच जास्त छान असतात ! मी मागच्याच्या मागच्या वर्षी चॉकलेटे दिले. आणि मागच्या वर्षी लोंबते कानातले दिले. सर्वजणी खूप खुष होत्या. २ वर्षापुर्वीच्या भारतभेटी मध्ये मी तुळशी बागेतून सगळ्यांना कानातले खरेदी केले. सर्वांना आवडले. यावर्षी माझ्या मनात नेकलेस द्यायचे होते पण बाहेर जायला अजिबातच जमले नाही. आता मी पुढील वर्षी छोट्या सजवलेल्या पिशव्यांमधून एक लिपस्टिक, एक नेलपॉलिश व चॉकलेटे देणार आहे.



विकी व कार्मेन ला मी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पण काहीतरी देते. एकदा कार्मेनला चॉकलेटे दिली.एकदा कानातले दिले. विकीला एकदा एक कप केक आणि फुगा दिला. आता यावर्षी मी दोघींना भारतातला गुलमोहोर प्रिंट करून आणि तो फ्रेम मध्ये घालून देणार आहे असा विचार आहे. :)



यावरून मला एक कल्पना सुचली. आपल्याकडे सिक्रेट संक्रांती करता येईल :) तीळगुळाबरोबर भेटवस्तू अर्थात ऑफीस मध्ये. संक्रांतीचे हळदी कुंकू ज्या बायका घरी करतात त्यात ज्या लुटायच्या वस्तू देतात तर काही बायका चिठ्ठ्या ठेवतात आणि मग त्या चिठ्ठीत जी वस्तू येईल ती त्या बाईला मिळते. असे आपल्याकडेही आहेच की !!! :) :)

 

Thursday, December 07, 2017

पोलीसीखाक्या

आमची कार महामार्ग ४० वरून खूप जोरात धावत होती. डीसीवरून निघालो होतो. महामार्ग ९५ हा आम्हाला खूप आवडतो. या रस्त्यावर खूप शिस्तीत वाहतूक चालते. निघायला उशीर झाला होता. थंडीचे दिवस होते त्यामुळे ५ ला निघतानाच अंधार झाला होता. एकापाठोपाठ एक अश्या कार टेकलेल्या होत्या. तरीही कुठेही वाहतुक मुरंबा झाला नाही. सर्वजण ठरवून दिलेल्या वेगानेच जात होते. आमच्या  प्रवासाला ५ तास उलटून गेले होते आणि केव्हा एकदा घरी पोहोचत आहोत असे होऊन गेले होते. विल्मिंग्टनला येण्यासाठी महामार्ग ४० घ्यावा लागतो
आणि त्यावर लागणारी मोठी शहरे ओलांडली की विल्मिंग्टनला जाण्यासाठीचा हा रस्ता एकदम ओसाड होतो. वाहतूक खूपच तुरळक होते.   विल्मिंग्टन -( नॉर्थ कॅरोलायना ) शहरात हा महामार्ग संपतो. तसा तर हा महामार्ग ईस्ट आणि वेस्ट कोस्टला जोडणारा प्रचंड मोठा आहे. नॉर्थ कॅरोलायना मधून सुरूहोतो ते कॅलिफोर्नियात संपतो.
विल्मिंग्टन शहर जिथे आम्ही पूर्वी राहत होतो तिथे समुद्रकिनारे आहेत पण ते इतके काही फेमस नाहीयेत त्यामुळे या शहरी कोणीही येत नाही.
तर रस्त्यावर तुरळक वाहतूक होती. डाव्या बाजूच्या लेनवरून आमची कार जात होती. एकीकडे आमच्या गप्पा चालू होत्या. तेव्हड्यात मला वीज चमकल्यासारखे वाटले. मी म्हणाले पण विनायकला की वीज चमकली. पाऊस येणार की काय? पण वातावरण तर तसे दिसत नाहीये. हे मी म्हणायला आणि विनायकने अतिमंद वेग करत करत कार रस्त्याच्या  डाव्या बाजूला घ्यायला एकच गाठ पडली. विनायक म्हणाला " वीज चमकत नाहीये. मागे बघ. पोलीस आहेत" मि पण मागे वळून पाहिले तर पोलीसची गाडी आमचा पाठलाग करत होती. माझ्या पोटात खूप मोठ्ठा गोळा आला. मी म्हणाले काय झाले? आपले काय चुकले? माझ्या डोळ्यासमोर तर मी व वि कारागृहात आहोत असे चित्र तरळले. :D  विनायक म्हणाला मला पण माहीती नाहीये काय झाले ते. आणि आता तू पोलिसांच्या समोर बडबड करू नकोस. गप्प रहा. :D तसा तर विनायकचा चेहराही पडला होता. आम्हाला पोलीसांनी पकडले असे आमच्या आयुष्यात पहिल्यांदाच घडत होते. विनायकने
कार बाजूला घेउन थांबवली व कारच्या बाहेर आला. मी पण बाहेर येऊका? अश्या प्रश्नार्थक नजरेने सीट बेल्ट काढत होते. पोलीस म्हणाले "नको"   तू जागेवरच बस. कारचे दार लावले. पोलीस आणि विनायक काहीतरी बोलत होते. माझ्या चेहऱ्यावर "काय बोलतायत एवढे? काहीही झालेले नसूदे" असे भाव चेहऱ्यावर होते.  १ ते २ मिनिटांनी विनायक कार मध्ये येऊन बसला. पोलिसांशी विनायकने हस्तादोंलन केलेले दिसले. आणि माझा जीव भांड्यात पडला.

पोसीस लगेचच निघून गेले आणि मी लगेचच विनायकला विचारले "काय रे झाले होते? " विनायक म्हणाला अग काही नाही गं. आपल्या कारचा वेग खूपच वाढला होता. १०० एमपिएचच्या वर गेला होता. पोलिसांनी विचारले की इतक्या वेगात का जात होतात? तर विनायकने त्यांना सांगितले की आम्ही डीसीवरून निघालो आहोत. खूप दमलो आहोत आणि कधी एकदा घरी जाऊन पोहोचतोय असे आम्हाला झाले आहे. आणि रस्ताही रिकामा आहे. त्यावर पोलीस म्हणाला "तुमचा जीव तुम्हाला प्यारा आहे ना? " मग लक्षात ठेवा. ठरवून दिलेली वेगमर्यादा
पाळत जा. इथे ड्रग घेऊन जाणारे आणि दारू पिऊन चालवणारे बरेच जण असतात. तुमच्या कारचा वेग वाढला आणि अचानक एखादी कार तुमच्या मागे येऊन तुमच्याशी स्पर्धा करायला लागली तर तुम्ही तुमच्या वेगाचा ताबा नीट करू शकणार नाही. नीट लक्षात ठेवा. आमचे नशीब आम्हाला सक्त ताकीदच मिळाली. तिकीट दिले नाही. पोलीसांचे म्हणणे खरे होते. बोलताबोलता कारचा वेग इतका वाढला होता ते आमच्या लक्षातच आले नाही.

महामार्गावर जास्तीची लिमिट ७० असते. तुम्ही फार फार तर ८० ने जाऊ शकता. पण १०० च्या
वर वेग गेला? बापरे ! लक्षात ठेवायला पाहिजे.  विनायक उत्तम कारचालक आहे. १७ वर्षात फक्त २ छोटे अपघात झाले आहेत. पण  त्यावरून बरीच माहीती कळाली. पहिल्या अपघाताचा अनुभव दुसऱ्या अपघाताच्या कामी आला. अपघाताचा अनुभव कसा,  कुठे, कधी आणि त्यासाठी काय का
करावे लागते आणि समजते ते पुढील लेखात बघू. :)

Saturday, November 25, 2017

भारतभेट २०१७

जेव्हा सईचे लग्न ठरले त्या दिवसापासून मी आईशी आणि बहिणीशी फोनवर लग्नाविषयीच गप्पा मारत होते. कोणती साडी कोणत्या वेळेला नेसायची, लग्नाची खरेदी झाली का ,, केळवणे कोणाकडे झाली, इ. इ. ते अगदी मी आईच्या घरी येईपर्यंत. आईच्या घरी आलो आणि एकेक दिवस अगदी लागलेले होते. आईकडे सई आणि रंजना आदल्या दिवशीच आल्या होत्या. घरी गेल्यागेल्या गप्पांबरोबर आलं घातलेला चहा रंजनाने केला आणि त्यानंतर मनसोक्त पोहे खाल्ले रंजनाने केलेले आणि गुडुप झोपी गेलो. विनय विदुला आईकडे कधी येऊन पोहोचले कळले देखिल नाही. उठल्यावर अंघोळी उरकून लगेचच जेवायला बसलो. विनयने रंजनाला लग्नाचे केळवण केले होते त्यात आमची पण हजेरी लागली होती. चविष्ट आणि छान जेवण होते. शेवभाजी,,बटाटेवडे, चिरोटे, सोलकढी, पुलाव, इ. इ. अहेराची देवाणघेवाण झाली. त्यात माझाही नंबर लागला आणि विनयने मला घेतलेले ड्रेस चे कापड खूप आवडून गेले.


लगेच दुसऱ्या दिवशी माझ्या अहेराची खरेदी केली. मी आईला आणि रंजनाला साड्या घेतल्या. गलानी दुकानात गेल्यावर साड्या बघत होतो. पहिली जरीची साडी दाखवली तीच खरे तर आवडून गेली होती पण अजून काही साड्यांचे प्रकार दाखवता का ? असे दुकानदाराला सांगितल्यावर त्याने लगेचच वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आणि त्यातले वेगवेगळे रंग दाखवले. पिवळा, निळा, लाल, आकाशी, नारिंगी,,, पण आईच्या साड्यांचे अनेक रंग झाले होते. अबोली रंग झाला नव्हता. माझ्या मनात हाच रंग साडीचा घ्यायचा होता. तो नेमका नव्हता. गडद पोपटी रंग आईच्या साडीचा घेतला त्याला जांभळ्या रंगाचे काठ होते. हा रंग झालेला नव्हता. साडी अप्रतिम होती. नंतर लगेच रंजनाची साडी घेतली. डिझाईनर साड्यांचे बरेच प्रकार पाहिले. आणि त्यात एक सुंदर साडी लगेचच आवडून गेली. साडीचा रंग म्हणजे लाल रंगामध्ये गुलाबी रंगाचे मिश्रण होते. "हिच साडी" मी सई रंजना आणि सुरेशचे एक मत झाले. रंजनाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

तिसऱ्या दिवशी आमच्या तिघींची केशरचना कशी करायची? याची एक ट्रायल घेतली. पार्लरवाली आमची मैत्रिणच असल्याने तिच्या पार्लर मध्ये रिलॅक्स बसलो होतो. एकीकडे गप्पा चालू होत्या. योगिताने पटकन केशरचना केली आणी ती आम्हाला आवडली सुद्धा. मला वाटले होते की अंबाडा घालताना केसांमध्ये एक मोठ्ठा बॉल घालतील आणि त्यावर केस वळवून घेतील. मी आधी साशंक होते. माझे केस सुळसुळीत असल्याने केसात घातलेला बॉल मध्ये वाटेत पडला तर? :D पण तसे काहीही नव्हते त्यामुळे शंकेचे निरसन लगेचच झाले. माझी, रंजनाची व सईची सीमांत पूजनासाठी आणि दुसऱ्या दिवशीचीही केशरचना ठरवली गेली.


२ नोव्हेंबरला घरचे केळवण झाले. मोजून ४ प्रकारच केले. कारण की लग्नघरातले सदस्य केळवणे खाऊन खाऊन थकली होती. गोड म्हणून मोदक केले. आवडीचे म्हणून बटाटेवडे केले. आणि मिसळ, काकडी, टोमॅटो व कांद्याचे काप. योगायोग छान होता. केळवण्याच्याच दिवशी सईचा वाढदिवस होता. त्यामुळे रात्री चॉकलेट केक, सईला आम्ही तिघींनी औक्षण केले. फोटोसेशन झाले. एकेक दिवस बिझी बिझी... नंतर एकापाठोपाठ एकेक म्हणजे रंजनाला केळवणाला आलेला अहेर आणि तिने देण्याकरता आणलेला अहेर बघितला. नंतर एके दिवशी घरच्या शुभ कार्याच्या करंज्या केल्या. करंज्या करताना खूपच हासलो. एके दिवशी ग्रहमख आणि नंतर हॉल मध्ये जेवण , बांगड्या आणि मेंदी करता रंजनाचे घर नुसते भरून गेले होते. दुपारपासून ते रात्री १० पर्यंत मेंदी काढणाऱ्या मुली बसल्या होत्या. एकेकीच्या हातावर मेंदी काढली जात होती. बांगड्या भरल्या जात होत्या. प्रत्येकीचे हात हिरव्या बांगड्यांनी छान सजले होते. रात्री मुगाच्या डाळीची खिचडी झाली. मी २ ओळीचे गाणे म्हणले. " मनभावन के घर जाए गौरी घुंघट में शरमाए गौरी, बंधी रहे ये प्यार की डोरी हमें ना भूलाना" मी रंजना आणि सईच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहायला लागले.


या सर्व दिवसांच्या मध्ये एकदा आईच्या मैत्रिणींनी खूप छान केळवण केले. एका ग्रुपने इडली सांबार, गोडाचा शिरा आणि चटणी, एका ग्रूपने ढोकळा, आप्पे, चटणी, चिरोटे आणि नंतर अमूलचे आईसक्रीम. छान डिझाइन च्या पर्सेस दिल्या. मला हे सर्व अनुभवताना खूपच छान वाटत होते. अशी मजा अमेरिकेत नाही. लग्न झाल्यानंतर एके दिवशी मला भेटायला भाग्यश्री आणि सविता आईकडे आल्या आणि आम्ही नैवेद्यम मध्ये जेवायला गेलो. सविताचे ऑफीस आईच्या घराच्या जवळ होते म्हणून हे शक्य झाले. आम्ही लहानपणच्या मैत्रिणी जवळ जवळ ३५ वर्षांनी भेटलो. इतकी वर्षे मध्ये गेली असे जरासुद्धा जाणवत नव्हते. त्याच निरागस गप्पा होत्या.
श्रुती मंगल कार्यालयात जमले सर्वजण. नंतर योगिताने आमच्या तिघींचा मेक अप केला आणि छान केशरचना केली. आमच्या हातात आमच्या मामे बहिणींनी पोहे दिले, पाणी दिले , चहा दिला. सर्वजणी आमच्या तिघींचे कौतुक करत होत्या. बहिणी बहिणींचे प्रेम असेच असते निरागस. आमच्या वहिन्या पण खूप छान आहेत आमच्यात मिक्स होणाऱ्या. एकाच मांडवात मला समस्त नातेवाईक भेटत होते.


आदल्या दिवशी मुलाकडची मंडळी सोलापूरवरून आली. बस ४० जणांची होती. नवऱ्या मुलाला आणि त्याच्या आईवडिलांना कार मध्ये बसवून घेऊन आले आणि माझ्या बहिणीने त्यांना औक्षण केले. त्यांच्यासाठी गुलाबफुलांच्या पायघड्या सर्व भाचे कंपनीने मिळून तयार केल्या होत्या. पायघड्यावरून सर्व मुलाकडची मंडळी चालत आली. त्यांच्यावर आम्ही सगळ्यांनी फुलांच्या पाकळ्या उधळल्या. स्वागत खूपच छान झाले. सीमांतपूजन झाल्यावर गाण्याचा कार्यक्रम झाला. अर्थात वेळेअभावी तो तासाच्या आतच संपवावा लागला. मोजकीच आणि प्रसंगानुरूप गाणी खूप छान गात होते. धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना, फुलले रे क्षण माझे फुलले रे, तेरे मेरे मिलन की ये रैना, मेरे सपनोंकी रानी कब आयेगी तू,, आणि शेवटचे गाणे होते मेहेंदी लगाके रखना, डोली सजाके रखना,,, यात सई, सुजीत, नवऱ्या मुलीचे व नवऱ्या मुलाचे आईवडील नाचले. अगदी थोडक्यात पण हा गाण्याचा कार्यक्रम खूपच छान झाला. कार्यक्रम संपल्यावर जेवणे. जेवणात कढी, रस्सा, गोडाचा शिरा, पुरी,इ. इ् होते.
सईबरोबर आम्ही दोघी बहिणी पण नटलो. सईचा तसा आग्रह होता. आमचे नवरे म्हणालेच "कोणाचे लग्न आहे ? तुमचे की सईचे? काय एवढ्या नटताय? आम्ही दोघीही काही कमी नाही बोलायला. आम्ही म्हणालो सई बरोबर आम्ही पण लग्न करणार आहोत. मी म्हणाले मांडवात जो कोणी चांगला दिसेल त्याला आम्ही माळ घालू. :D :D. "काय करायचे ते करा" इति आईचे जावई. लग्नाच्या दिवशी लग्नघटिका जवळ जवळ येत होती. आधी सगळे विधी असल्याने ते शांतपणे बघायला मिळाले. एकीकडे नातेवाईकांबरोबर गप्पाटप्पा होत होत्या. सईची आजी खूपच उत्साही होती. तिच्या मैत्रिणी आल्यावर लगेच त्यांच्या घोळक्यात शिरली. ठरवलेल्या मुहूर्तावर "शुभमंगल सावधान" झाले आणि सई सुजीत विवाहबद्ध झाले. फोटोज आणि विडिओज चालूच होते, अगदी आदल्या दिवशी सुरवात झाली ते सई सासरी निघेपर्यंत. आम्ही खूप रडलो. अर्थातच. घरी आल्यावर शांत शांत जाणवत होते. घाईगडबड संपली होती. दुसऱ्या दिवशी रंजना सुरेश सोलापूरला रवाना झाले ते मुलीच्या सासरच्या घरी. तिथे रिसेप्शन आणि पूजा होती.


सई सासरी गेली तशी माझ्याही बॅगांची आवरा आवर सुरू झाली. आईचे घर मी परत निघाल्याने आणि रंजनाचे घर सई सासरी गेल्याने रिकामे होत होते. मि निघायच्या आधी सई - सुजीतही पुण्यावरून ठाण्यास जायला निघाले ते त्यांच्या घरात जाण्यासाठी. नवीन संसार मांडायला सासुसासरे आले होते. सई सुजीत खुप गोड दिसत होते. आम्ही दोघे डोंबिवलीत आलो खरे पण अगदी आदल्या दिवशी रात्री. दुसऱ्या दिवशी सोसायटीची एक महत्त्वाची मिटींगला हजर रहायचे होते. दिवस उजाडला मात्र ! वेळ इतका झरझर सरला की विमानतळावर जाण्यासाठी वेळ येऊन ठेपली. आमच्या सोसायटीत शैलाताई - खाडीलकर आणि सुषमा - नेर्लेकर यांना भेटलो. शैलाताईंनी मला त्यांच्या हाताने विणलेली टोपी आणि मफलर दिला भेट म्हणून. दर भेटीत त्या काही ना काही छान भेटवस्तू देतात. सुषमाने मला एअरटाईट डबे दिले. ओलाची टॅक्सी शैलाताईंनी बुक करून दिली. त्यांना टाटा बाय बाय करत आम्ही टॅक्सीत बसलो ते विमानतळावर जाण्यासाठी. प्रत्येक भारतभेटीमध्ये एखादी मैत्रिण आणि एखादा नातेवाईक यांना भेटणे होते कारण की मी दर भारतभेटीत जास्तीत जास्त वेळ आईबाबांना देते. त्यामुळे आईबाबांना आणि मला खूप समाधान मिळते. मित्रमंडळींच्या यादीत बऱ्याच जणांना भेटलेली आहे. तरी सुद्धा बरेच जण बाकी आहेत. एक विचार घोळतोय. सर्वांना एकत्र मीच बोलावेन.
लवकरात लवकर जमवायला हवे हे खरेच !! :)
पहिले पाऊल टाकिते मी
तुझ्यासवे ते विश्वासाने //१//
दुसरे पाऊल तुझ्यासंगती
तुझ्या नि माझ्या प्रेमाचे //२//
तिसऱ्या पाऊली सांगते तुज मी
वागवीन मी सर्वांनाच आदराने//३//
चवथे पाऊल टाकू दोघे मिळूनी
आप्तस्वकीयांच्या आशीर्वादाने //४//
पाचव्या पाऊली जागतील आशा
पूर्ण करूया मनोरे सुखस्वप्नांचे //५//
सहावे पाऊल असेल तुझे नि माझे
उजळतील दाही दिशा समाधानाने //६//
सातव्या पाऊली वचने देऊन
आपण राहू मैत्र सात जन्मांचे //७//
वरची सात पाऊले मला आपोआप सुचली ती रुखवतात होती.
लग्नमय भारतभेटीची कहाणी समाप्त :) :D
Rohini Gore

Saturday, October 21, 2017

मी अनुभवलेली अमेरिका ...(८)

मुंबईत राहत असताना मी किराणामालाची यादी फोनवरून सांगायचे की २ तासात घरपोच सामान यायचे. तसेच वर्षभराचे तिखट, हळद आणि गोडा मसालाही घरी करण्याची सवय होती. दाणे भाजून त्याचे कूट करण्याची सवय होती. शिवाय  ताजा नारळ खरवडून तो वापरायचीही सवय होती. इथे अगदी याच्या विरूद्ध आहे. किराणामाल म्हणजे तेल, साखर, चहा, डाळी आणि पिठे सर्वच्या सर्व आपण दुकानात जाऊन आणायला लागते. त्याकरता एक दुकान पुरत नाही. ३ ते ४ अमेरिकन स्टोअर्स फिरायला लागतात. डाळी, मसाले, पोहे, रवा आणि इतर याकरता भारतीय दुकानात जावे लागते आणि हे भारतीय दुकान प्रत्येक शहरात जवळ कधीच उपलब्ध नसते. अगदी क्वचित ठिकाणी असते जिथे भारतीयांची लोकसंख्या बरीच आहे ति शहरे. आम्हाला आतापर्यंत जवळच असलेले भारतीय दुकान नशिबी नव्हते. अगदी आता ज्या शहरात राहतो तिथपासून सुद्धा ते १ तासाच्या कार ड्राईव्ह वर आहे. नेहमी लागणारा किराणामाल घाऊक प्रमाणात काही दुकानातून मिळतो जसे की तेल, साखर, दाणे, इ. इ. आणि बाकीचे किरकोळ काही आणायचे झाल्यास इतर काही ग्रोसरी स्टोअर्स असतात तिथे जावे लागते.



आता गोडा मसाला की जो मी वर्षाचा घरी करायचे त्याला पर्याय म्हणून मी काळा मसाला वापरू लागले. दाणे भाजून त्याचे कूट करण्यापेक्षा इथे भाजलेले दाणे मिळतात अर्थात ते खारट असतात. त्याचे कूट बनवायला लागले. घाऊक दुकानातून टुथपेस्ट, कपडे धुण्याकरता लागणारे डिटर्जंट, भांडी घासायला लागणारे लिक्विड, तसेच साबण, पेपर टॉवेल, टिश्यू पेपर इ. इ. घाऊक दुकानात मिळतात आणि ते स्वस्तही असतात. भाज्यांकरताही इथे ३ ते ४ दुकाने हिंडून भाज्या खरेदी करतो. उदा.  हॅरिस्टीटर दुकानात शेपू चांगला मिळायचा.  तसेच चिरलेला  लाल भोपळाही मिळायचा. लोएस फूडच्या दुकानात पिण्याचे पाणी चांगले मिळायचे. इथले फ्रोजन फूड मी कधीच वापरले नाही. मला आवडत नाही. फक्त मटार आणि काही बीन्स आणते.


मुंबईत असताना माझा फ्रीज रिकामाच असायचा. उगीच नावाला २-४ भाज्या असायच्या. दुध खराब होऊ नये म्हणून आणि साय, लोणी असेच असायचे. इथे मिळणारे मीठविरहीत बटर वापरून मी तूप कढवायला लागले.  स्वयंपाक करून जेवलो की उरलेले अन्न मी दुसऱ्या पातेलीत काढून ठेवते. ही सवय मात्र अजून बदललेली नाही. त्यामुळे खरे तर भांडी खूप पडतात. पाणी पिण्याचे ग्लासही मी घासते. भांडी घासायला कमी पडावीत म्हणून काही मैत्रिणी जशीच्या तशी पातेली फ्रीज मध्ये ठेवतात. म्हणजे फ्रीजमध्ये कूकर - कढया - पॅन्स असतात. आम्ही सकाळी वर्षानुवर्षे दुधेच पितो त्यामुळे सकाळची न्याहरी बनवायची सवय नव्हती. अर्थात इथे दुधामध्ये प्रोटीन पावडरी टाकून दुधे पितो. याचा फायदा खूपच झाला. शाकाहारी असल्याने खाण्यापिण्याच्या सवयी अजिबातच बदललेया नाहीत. म्हणजे सगळे अन्न ताजे करून खायचे आणि त्यातूनही पोळी, भाजी, भात, आमटी, पोहे, उपमे, बनवून खाण्याचे बदललेले नाही. इथली सर्व प्रकारच्या उपहारगृहात गेलो आणि चव चाखली. इटालियन, मेक्सिकन, चायनीज, पण तितकी चव  आवडली नाही.  आणि भारतीय
उपहारगृहात सुद्धा मसालेदार चव कधीच नसते. त्यामुळे आवडणारे सर्व चमचमीत पदार्थ घरी
करण्यावाचून गत्यंतर उरले नाही. बटाटेवडे, सामोसे, साबुदाणा खिचडी, साबुदाणे वडे, इडली सांबार, मसाला डोसा, भेळ, रगडा पॅटीस हे सर्व पदार्थ इथे घरी केले तरच खायला मिळतात
अन्यथा नाही. इथे मिळणाऱ्या भाज्या आणि फळे मोठमोठाली असल्याने चवीला अजिबातच चांगली नाहीत.



 शिवाय भारतीय भाज्याही सहज उपलब्ध नसल्याने त्याही खायला मिळाल्या नाहीत. जसे चमचमीत पदार्थही सहज उपलब्ध होत नाही जसे की वडा पाव तसेच गोड पदार्थही सहज उबलब्ध नसतात जसे की आयती पुरणपोळी, बासुंदी, गुलाबजाम, सुरळीच्या वड्या, अळूच्या वड्या इ. इ. फक्त आणिफक्त जिथे भारतीय वस्ती आहे तिथल्या शहरातच भारतीय काही लोकांची दुकाने आणि उपहारगृहे असतात. अमेरिका देश हा भारतापेक्षा
तिप्प्ट मोठा असल्याने आणि काही ठिकाणी भारतीय खूप कमी असल्याने कोणत्याही गोष्टी सहज उपलब्ध होत नाहीत

Friday, October 20, 2017

मी अनुभवलेली अमेरिका ... (7)

मी जेव्हा अमेरिकेत आले तेव्हा आमच्या लग्नाला एक तप पूर्ण झाले होते. काही वर्षे नोकरी केली पण गृहीणी म्हणून माझी खरी ओळख आहे. स्वयंपाक नामक जी चीज असते ती मी इथे अनुभवताना माझी सुरवातीला खूप चिडचिड झाली. इथे आल्यावर इलेक्ट्रीक शेगड्या बघितल्यावर माझे डोकेच फिरले. मला गॅसवर स्वयंपाक करायला खूप आवडतो. दुधं तापवायची सवय होती त्यामुळे मी कॅनमधले दूध आधी पातेल्यात ओतले आणि तापत ठेवले. गार झाल्यावर फ्रीज मध्ये ठेवले. साय विरजण्यासाठी दुपारी दुध बाहेर काढले पण सायीचा थर काही दिसेना. अगदी थोडासा पातळ पापुद्रा पसरला होता दुधावर. ४ पर्सेंट फॅटवाल्या दुधावर कशी काय साय धरणार? मला वारणा आणि गोकुळ दुधाची सवय होती. दाट दूध. चहामध्ये अगदी थोडे घातले तरी पुरते. तिथल्या आणि इथल्या चहाची धुंदी वेगवेगळी. इथल्या चहाची धुंदी मला कधी आलीच नाही. पारंपारिक चहा करण्याची सवय इथे पार मोडून गेली. दुपारी मी चहाच्या ऐवजी कोक प्यायला लागले. सुरवातीला टी-बॅग्ज कापून त्यातली चहाची भुकटी घालून चहा बनवायचे. नंतर एका मैत्रिणीकडून कळाले की मायक्रोवेव्ह मध्ये चहा बनवता येतो. तसे करून बघितले आणि दुध पाणी आणि चहाचे प्रमाण ठरवून ते निश्चित केले आणि पारंपारिक चहा बनवण्याच्या पद्धतीला काट मारून टाकली. एकतर इलेक्ट्रिक शेगड्या पटकन तापत नाहीत. त्यामुळे
चहा बनवताना आच तीव्र ठेवायला लागायची त्यामुळे चहाच्या पातेल्याची बुडे काळी पडायला लागली आणि मग ती घासून घासून कंबरडेमोडायला लागले. जाड साय नाही म्हणजे सायीचे दही नाही, लोणी नाही. घरचे कढवलेले तूपही नाही. ही सर्व कामे इथे आल्यावर बाद झाली. 

सुरवातीला मी दही भारतासारखेच घरी बनवायचे. दही लावण्याकरता विरजण मी प्रविणा कडून आणले होते. प्रविणा माझ्यासारखीच दही-दूध प्रेमी बघून मला खुप आनंद झाला होता. नंतर दह्याचे डबे आणू लागलो. अर्थात घरचे दही ते घरचे दही. भारतात असताना उसने मी कधी घेतले नव्हते कुणाकडून पण अगदी क्वचित वेळ आलीच आणि शेजारणीकडे मागितले तर नेमके ते त्यावेळी तिच्याकडे नसायचेच. इथे आल्यावर प्रविणा माझ्याकडून उसने घ्यायची. कांदा, बटाटा वगैरे. उसने घेणे आणि ते आठवणीने परत करणे हाही प्रकार बाद झाला इथे आल्यावर. उरलेल्या अन्नाचे काय करायचे? इथे कामवाल्या बायका येत नसल्यानेते कधीतरी त्यांना क्वचित देण्याचाही प्रकार घडला नाही. तसे तर लग्न झाल्यावर मुंबई मध्ये आल्यावर आणि दोघंच दोघे असल्यावर
जेव्हढ्याच तेवढे बनवण्याची सवय असल्याने उरलेल्या अन्नाचे काय करायचे याचा फारसा त्रास झाला नाही. आपण बनवलेला पदार्थमैत्रिणीच्या घरी वाडग्यातून नेवून देणे आणि तिच्याकडला वाडग्यातून आलेला पदार्थ आपणही चवीने खाणे हे मात्र मी खूप छान अनुभवले इथे. आमच्या तिघींचा ग्रुप होता. माझ्याकडून काय येतयं याची वाट बघायच्या मैत्रिणी. त्यांच्याकडूनही रसम, सांबारंम, लेमन राईस आणि पुलीहोरा असे वेगवेगळे पदार्थ माहीती झाले. आपल्याकडची साबुदाणा खिचडी, बटाटेवडे यांची चवही त्यांना आवडली. हळूहळू काळ जसा पुढेपुढे सरकत गेला तसतसे सर्वच्या सर्व कामे आपली आपणच करायची सवय लागून गेली.

भारतातल्या सगळ्या सवयी मोडून गेल्या. जसे की....

-दुधासाठी पिशवी दारात अडकवली की त्यात दुधाच्या पिशव्या पडलेल्या असतात.
-दार उघडले की पेपर दारातच असतो.
- केराचा डबा बाहेर ठेवलेला असतो तो कचराही केरवाला घेऊन गेलेला असतो.
-कामवाली बाई आली की धुणे, भांडी, केर, फरशी पुसणे
तीच करते. सर्व प्रकारची दळणे आणून देते.

Tuesday, October 10, 2017

इंगल्स मार्केट ... (६)

२०१४ साली माझा कॉलेजचा पहिला दिवस होता गणेश चतुर्थीच्या दिवशी, आणि नोकरीचा पहिला दिवस होता २०१५ धनत्रयोदशीच्या दिवशी. नोकरीच्या पहिल्याच दिवशी मला चिकन कापायला लागले की जे मी जन्मात पाहिले नव्हते. नोकरीच्या दुसऱ्या दिवशी मला पोर्क पुलींग करायला लागले. ते पाहून मला डचमळायला लागले आणि मी माझ्या सोबत काम करत असलेल्या मैत्रिणींना सांगितले की हे मला जमणार नाही. तसेच हॅम सलाड करायलाही मला जमणार नाही कारण की ते पाहिल्यावर मला पोटात डचमळते आणि उलटी होईल की काय असे वाटते. विकी आणि कार्मेन म्हणाल्या काही हरकत नाही. हे २ पदार्थ आम्ही करू. चिकन कापण्यासाठी ज्या ट्रे मध्ये ते ठेवलेले असते तो ट्रे इतका काही जड असतो की तो काढायला गेले तर तो जागचा हालत देखील नाही. त्यामुळे तो जड ट्रे कार्मेन आणि विकी मला आणून देतात. जश्या त्या मला समजून घेतात तशीच मी पण त्या दोघींना समजून घेते. कार्ट मधून बाकीचे सामान आणायला लागते ते मीआणते. आणि शक्य तितकी मदत करते. आमच्या तिघींच्यातही एक प्रकारचा समजूतदारपणा आहे. आणि आम्ही एकमेकींची काळजीही घेतो.



कामावर गेल्यावर फ्लोअर चेक करून तिथे सँडविचेस आणि सलाड चे डबे ठेवून परत किती शिल्लक आहेत त्याप्रमाणे किती पदार्थ बनवायचे आहेत इथपासून ते मांस ऑर्डर करून, फ्रीजरमधून ब्रेड आणणे, लेबलींग करणे सँडविच सलाड बनवणे इ. इ. सर्व कामे मी शिकले आणि तरबेज झाले. कार्मेन आणि विकी रजेवर असताना सर्व काम मी एकटीने मला दिलेली मदतनीस हिच्या सहाय्याने केली तेव्हा मॅनेजर जेमी माझ्यावर खूप खुष झाली होती असे मला कार्मेन ने सांगितले तेव्हा मला खूप बरे वाटले. खूप कष्ट असलेली ही नोकरी मी पहिल्यांदाच करत आहे आणि मला कष्टाची सवय पण झाली आहे. दमायला खूप होते पण तब्येत ठणठणीत राहते. ८ तास उभे राहून काम करणे आणि फक्त जेवायला टेबल खुर्चीवर बसणे याची सवय झाली आहे. माझे पहिल्यांदा पाय अतोनात दुखायचे तेव्हा कार्मेनने मला सांगितले की तुला तुझे बूट बदलायला हवेत. मला कळेचना की बूट कशाला बदलायचे? ती म्हणाली की तू स्केचर्सचे बूट विकत घे. ते मी विकत घेतले आणि आता मला ८ तास उभे राहून काम करण्याची सवय झाली. नुसते उभे राहणे नाही तर काम करणे आणि ते सुद्धा वेगाने. पटापट हालचाली व्हायला हव्यात. स्टोअर मध्ये चालणेही खूप होते.



आम्हाला जे काही पदार्थ बनवायला लागतात त्याचे सामान आम्ही स्टोअरमधून हिंडूनच आणतो. काही सामान आमच्या बाजूलाच एक कोल्ड रूम आहे तिथे ठेवलेले असते. ज्या पारदर्शक डब्यात आम्ही बनवलेली सँडविचेस आणि सलाड ठेवतो ते डबेही आम्हाला दुसऱ्या एका खोलीतून आणायला लागतात. त्यामुळे चालणे बरेच होते. नुसते चालणे नाही तर हात वर केले जातात. डबे ठेवताना खाली वाकले जाते. फ्रीजर मधून ब्रेड , व्हनिला पुडींग चॉकलेटचे डबे आणताना जड जड उचलून हात आणि खांदे दुखतात आणि हातात ताकद येते. शरीराच्या सर्व प्रकारच्या हालचाली होतात त्यामुळे वेगळा व्यायाम करण्याची गरज नाही. जेव्हा आम्ही चिकन सलाड बनवतो ते बनवताना एक तर आधी चिकन धारदार सुरीने कापावे लागते. मग त्यात कांदे बारीक चिरून घालायचे आणि सेलेरी चिरून घालायची. हे बनवताना मेयोनिज लागते ते १ गॅलन घालावे लागते आणि हे सर्व हाताने कालवायचे. जसे चिखल कालवतोना तसेच. खूप जोर लागतो याला. मेयोनिज इतके काही थंड असते (फ्रीजरमध्ये असल्याने) की हाताला गार चटके बसतात.. हे मी बनवू शकते. बाकी सर्व प्रकारचे सलाड बनवायला मोठमोठाली घमेली लागतात.



डेली-उत्पादन विभागात आम्ही तिघी मिळून खूप प्रकार बनवतो. आम्हाला एका मिनिटाची पण फुरसत मिळत नाही. काम करता करता एकीकडे गप्पा मारतो. मी मांस, चिकन, मासे खात नसल्याने मला तिथले पदार्थ खाता येत नाहीत. पदार्थ बनल्यावर चव घेतात सर्वजणी अर्थात कस्टमरच्या नकळत खायला लागते लपून छपून. मी बिस्किटे आणि फळांच्या फोडी खाते. हे सर्व पदार्थ बनवून आम्ही विक्रीकरता मांडून ठेवतो. ते सर्व इतके आकर्षक दिसतात की माल पटापटा खपतो. काही कस्टमर आम्हाला येऊन सांगतात की तुम्ही खूप छान पदार्थ बनवता आणि बरीच व्हरायटी असते. आम्हाला तुमचे खूप कौतुक वाटते. तसेच स्टोअर मॅनेजरही आमचे कौतुक करतो. आम्ही तिघीही कामावर दांड्या अजिबात मारत नाही. बरे वाटत नसेल तरीही मी कामावर शक्यतोवर जातेच कारण की मी मग कामाचा भार जी कामावर आलेली असेल तिच्यावर पडतो. ही नोकरी लागल्यापासून माझे वजन १० किलो ने कमी झाले त्यामुळे मी खुश आहे.

Monday, October 02, 2017

इंगल्स मार्केट ... (५)

एके दिवशी मी फ्लोअर चेक करत होते त्यादिवशी विकी मला कॅफे मध्ये बसलेली दिसली आणि ती रडत होती. मी मनात म्हणले नक्कीच काहीतरी झालेले आहे. ती आल्यावर मी तिला विचारले काय झाले? तर ती म्हणाली की जेमी डेली मॅनेजरने तिला झापले. मी म्हणाले का? तर म्हणाली जेमिचे असे म्हणणे की "मी (विकी) हॉट बार आणि सब बार ला मदत करत नाही." मी म्हणाले करतेस की तू मदत. आपण सगळ्याजणीच करतो.
डेली सेक्शनला असे आहे की हॉट बार आणि सब बार ला कुणी कस्टमर आले तर Customer Service First तिथे नेमलेल्या बायका असतात पण खूप गर्दी झाली तर आम्ही उत्पादन विभागातल्या, सुशी विभागातल्या बायका त्यांच्या मदतीला जातो. मी विकीला सांगितले रडू नकोस. ती बोलली ते मनावर घेऊ नकोस. बी हॅपी आणि मी तिला हग केले. तसे तिच्या चेहऱ्यावर थोडे हासू उमटले. नंतर २ दिवसांनी माझ्याबरोबर काम करणारी कार्मेन हिने मला सांगितले की विकी जेमिला म्हणाली की रोहिणी तिला मदत करत नाही. तेव्हा जेमी विकिला म्हणाली की रोहिणीला मध्ये आणू नकोस. तेव्हा मी कार्मेन ला सांगितले असे काहीच नाहीये. मी पण हॉट बारला मदत करते. नंतर जेमीने डेली मॅनेजरची जागा सोडली आणि Customer service या पोस्टवर गेली. ती म्हणाली की डेली सेक्शनला खूप कामाचे प्रेशर आहे.नंतर त्या जागी दुसरा डेली मॅनेजर आला. त्याने जेमिकडून ट्रेनिंग घ्यायला सुरवात केली आणि १५ दिवसानंतर कामाचे खूप प्रेशर आहे हे काम आपल्याला जमणार नाही म्हणून सोडून गेला. नंतर आला ऍडम. हा ऍडम मीट केसमध्ये काम करत होता आमच्याच स्टोअरला त्याने हे काम स्वीकारले. त्याने ३ महिने काम केले. काम चांगल्या रितीने सांभाळत होता. आणि नंतर तोही कामाचे प्रेशर खुप आहे. लोक माझे ऐकत नाहीत. मला मॅनेज करणे कठीण जात आहे म्हणून तोही सोडून गेला. आता मॅनेजरची पोस्ट Assistant Manager तेरेसाने घेतली आहे. ती रेसिस्ट आहे.


आम्ही जेव्हा कामावर येतो तेव्हा संगणकावर आल्याची नोंद करतो. शिवाय काम संपवून जातो तेव्हा आणि जेवणाच्या वेळेला जाताना आणि येताना अश्या प्रकारे सर्व प्रकारच्या नोंदी कराव्या लागतात. तिथेच एका चार्टवर कामावर असताना तुमचे वर्तन कश्या प्रकारे असू नये हे लिहिलेले आहे. शिवीगाळ करणे, अश्लील बोलणे-वागणे इ. इ. करू नये. जर का कुणी अश्या प्रकारे वर्तन केले आणि जर का कुणी कुणाची तक्रार केली की लगेचच त्याला/तिला कामावरून काढून टाकले जाते. आमच्या डेली विभागात दोन बायका आहेत त्या सगळ्यांना ऑर्डरी सोडत असतात जणू काही त्याच मॅनेजर आहेत ! हो, असे वाटते काहींना.




हॉट बार - सब बार ला एक आफ्रीकन अमेरिकनची नेमणूक झाली होती. तिच्यावर वर म्हणल्याप्रमाणे मॅनेजर समजून ऑर्डर सोडणारी एक बाई खेकसली. तिला ते सहन झाली नाही आणि तिने डेली मॅनेजर किंवा स्टोअर मॅनेजर कडे तक्रार न करता थेट एचआरडी कडे तक्रार केली. हे तिने उत्तम काम केले. एचआरडी कडून डेली मॅनेजर करवी त्या दोघींना चांगलाच "हग्या दम " मिळाला की "जर पुन्हा असे वर्तन केले तर तुम्हाला कामावरून काढून टाकण्यात येईल" दुसरी जी बाई आहे खेकसणारी तिने एका अमेरिकन बाईला ढकलले आणि हे प्रत्यक्ष डोळ्याने कार्मेन आणि रोझने पाहिले. ती बाई म्हणाली की मी नोकरी सोडते. तर कार्मेन म्हणाली तू कशाला नोकरी सोडतेस. तू तक्रार नोंदव. तुला न्याय मिळेल. अश्या रितीने दोन बायकांनी दोन बायकांविरूद्ध तक्रारी केल्या आणि त्यांना दम भरला की परत जर का असे केलेत तर तुहाला "टाटा बाय बाय" करावे लागेल.


डेली मॅनेजरचा त्या दोघी खेकसणाऱ्या बायका तिच्या मर्जीतल्या आहेत. एके दिवशी असे झाले की मीट केसमध्ये एक अमेरिकन बाई आहे ती आफ्रीकन अमेरिकन बाईला म्हणाली की मी तुला मीट कापून देते. तू तेव्हढे ते रॅप करून घे. माझ्याकडे आज खूप कस्टमर आहेत त्यामुळे मला वेळ नाहीये. तर ती आफ्रीकन अमेरिकन बाई वैतागली जिने तक्रार नोंदवली होती ती ही बाई. तिने मीट केसमधल्या त्या अमेरिकन बाईला तिच्या तोंडावर शिवी दिली. लगेच तिने डेली मॅनेजरला सांगितले आणि डेली मॅनेजरने तिला लगेचच कामावरून काढले.आता हिने तरी शिवीगाळ करावी का? बरे केली तरी शिव्या देण्यापेक्षा एखाद्याला ढकलणे हा जास्त मोठा गुन्हा आहे. डेली मॅनेजरने तिलाही दम भरला असता की एक वेळ सोडून देते. दुसऱ्या वेळी कामावरून काढण्यात येईल. तिला एक चान्स द्यायला हवा होता. बहुतेक डेली मॅनेजरला आफ्रीकन अमेरिकनने एच आरडी कडे तक्रार केल्याबद्दल राग आलेला असावा आणि सहनही झाले नसावे.

Thursday, September 14, 2017

अनामिका ... (१०)


चार दिवस उलटून गेले तरी अजून अमितचा फोन का आला नाही या विचारातच संजली असते. ती विचार करते की इतका लांबचा प्रवास आहे तिकडे पोहोचल्यावर झोपेचं झालेलं खोबरे, दगदग, नंतर आप्गीसला जॉईन होणे यामध्येच त्याचा वेळ जात असणार हे नक्किच ! आपण
 अजून
आठ दिवस तरी त्याच्या फोनची वाट पहायला नको. आपणही आता कामाला लागायला हवे. घरातले पसारे पाहून तिचे तिलाच खूप हासू येते.आणि स्वतःच्याच मनाशी म्हणते आपण नव्हतो तर या बापलेकाने मिळून किती पसारे घालून्न ठेवलेत ! एक गोष्ट जागेवर नाही. संजली हळूहळूपसारा आवरायला घेते खरी पण मन मात्र घडलेल्या प्रसंगातच बुडून गेलेले असते. काय हा योगायोग !



ती स्वतःच्या मनाशीच हसते. तिच्यामुलाच्या ओरडण्यानेच ती भानावर येते. अगं आई मी तुला किती वेळा सांगितले की मला भूक लागली आहे म्हणून पण तुझे क्षच नाहिये.होरे. ओरडू नकोस. स्वयंपाक तयार आहे , जा जेवून घे. "आई वाढ ना ग मला जेवायला" अरे घे ना वाढून तुझे
 तू. मला बरीच कामे आहेत.
आई अशी काय वागते आहे आज, कामे तर हिला नेहमीच असतात. दैनंदिन जीवनक्रमा मध्ये संजली परत खूप बिझी होऊन जाते.



८,१०,१५ ! इतके दिवस उलटूनही अमितचा फोन आलेला नसतो. आता मात्र संजली खूप रडकुंडीला येते. विसरला का अमित आपल्याला? काय गं संजली तू रडतेस? अनिल विचारतो. कुठे काय? मी नाही रडत. आल्यापासून सतत कामाला जुंपली आहे. मी नव्हते तर घराची काय अवस्था होती, किती पसारा घातला होता? काम करता करता संजली कॉटवर बसते आणि तिच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागतात. अनिल तिच्या जवळ येऊन बसतो आणि विचारतो काय झाले तुला संजली? मुंबईवरून आल्यावर किती खुशीत होतीस आणि आता एकदम रडायला लागलीस? खूप दमलीस ना? मी मदत करतो तुला असे म्हणून अनिल संजलीला मदत करायला सुरवात करतो. नको राहू देत. मी आवरते सर्व. तू ऑफीसला जा. अमित म्हणतो, ओके. चल मी निघतो ऑफीसला. आज महत्त्वाची मिटींग आहे. घरी आलो की आपण दोघेच मिळून कुठेतरी बाहेर जेवायला जाऊया. असे म्हणून अनिल संजली ला टाटा करतो. संजलीचा मूड थोडा ठीक होतो.
दुपारची जेवणे आटोपल्यावर संजली वाड्यातल्या झोपाळ्यावर आडवी होते.  जेवणानंतर झोपळ्यावर थोडे आडवे होणे ही तिची नेहमीची सवय असते. संजली आडवी होते आणि तिला थोडी डुलकी लागते. उठते तेव्हा तिचा फोन वाजत असतो. ती घाईघाईने फोन उचलते आणि हॅलो म्हणते तर पलीकडून आवाज येतो हॅलो संजली मी अमित बोलतोय. ओह ! अमित तु बोलतो आहेस. खूप मोठ्या झोपाळ्यावर आडवी पडलेली संजली उठून बसते. किती दिवसांनी फोन? कसा आहेस? वेळेवर पोहोचलास का? आता किती वाजले तिकडे? एक ना हजार प्रश्न. अमित म्हणतो अंग इथे आता पहाटेचे ४ वाजलेत. काय? ती जवळजव्ळ  ओरडतेच. अंग हो मला फोन करायला आताच थोडा वेळ मिळतोय. बरं मी तुला असाच आता या वेळेला फोन करत जाऊ का? तुला कोणती वेळ सोयीची आहे? संजली म्हणते ही वेळ खरी तर मला खूपच सोयीची आहे. पण तुला इतक्या पहाटे उठायला लागेल? तुला खूप त्रास होईल त्याचा. अगं संजली त्रास नाही होणार मला. कामा निमित्ताने मला काहीवेळा रात्रभर जागायला लागते. मी आता ऑफीस मधूनच बोलतोय. तुझा ईमेल आयडी आहे का? तिकडे बोलत जाऊ. मला तुला फोन करायला तसे अवघडच आहे. पण जमेल तसा तुला फोन करत जाईन. पण तुझा ईमेल आयडी असेल तर तिथे बोलू शिवाय फोन वरून बोलायची वेळही ठरवता येईल. संजली सांगते नाही रे. माझा काही ईमेल आयडी वगरे नाही. मला कंप्युटर मधले ओ की ठो कळत नाही. मला फोनची खूप सवय आहे. त्यावरून माझी सगळी कामे होतात आणि बोलणे पण होते. पण मी मैत्रिणींना विचारून तुला मेल पाठवीन. अर्थात तुझा काय आहे ईमेल. पण आता त्या भानगडी नकोत. सध्या तरी आपण फोनवरूनच बोलू. पण ही वेळ मला खूप सोयीची आहे.




बरे अमित, तू सांगितलेस म्हणून मी अनिलला अजून काहीही सांगितले नाहीये की आपण भेटलो म्हणून. अमित म्हणतो होहो नकोस सांगूस इतक्यात. मला पुढच्या भारतभेटीत त्याला सरप्राईज द्यायचे आहे.  अमित म्हणतो. आता काय करतेस? कशी आहेस. तुझाही मुंबई पुणे प्रवास कसा झाला. संजली म्हणते मि मजेत आहे. अरे प्रवासात मला आपल्या टीबद्दलच सारखे आठवत होते. लग्नात आम्ही मैत्रीणींनी खूप मजा केली. मला पण चेंज मिळाला. आता घरी आले आणि परत  कामाला जुंपलेली आहे. खरे तर माझे कशात लक्षच लागत नाहीये. तुझ्याशी खूप बोलावेसे वाटत आहे. अमित म्हणतो तुला आठवत आहे का काही अजून पूर्वीचे. तसे संजली म्हणते की हो काही आठवत आहे. काही नाही. अमित संजलीला विचारतो की माझे कॉलेज संपल्यावर मी तुमच्याकडे पेढे घेऊन आलो होतो ते आठवत आहे का तुला? संजली खुदकन हासते आणि म्हणते हो. चांगलेच आठवत आहे. तु माझी सकाळी सकाळी येऊन झोपमोड केली होतीस. अमित म्हणतो चल आता मी फोन ठेवतो.   

संजली अमितचा फोन नंबर "अनामिका" या नावाने सेव्ह करते. आणि परत झोपाळ्यावर आडवी होते. मागचे दिवस तिला आठवतात आणि त्या दिवसातच ती रमून जाते. संध्याकाळी आवरून भाजी आणते. स्वयंपाक करते. अनिल आल्यावर ती खरे तर दोघेच बाहेर जाणार असतात. अनिल ऑफीस मधून आल्यावर संजलीला बाहेर जाण्याबद्दल विचारतो तर ती म्हणते जाऊ देत. घरीच जेवु. परत कधीतरी जाऊ बाहेर जेवायला.


 क्रमश : ....

Tuesday, September 05, 2017

हवेशीर घर


अपार्टमेंट सी सेव्हन मला पाहताच क्षणी आवडून गेले. एकमात्र तोटा होता की, या घरामध्ये पाऊल ठेवताक्षणीच स्वयंपाकघर होते. या स्वयंपाकघराला एक छोटी खिडकी होती. स्वयंपाक करता करता सहजच खिडकीतून डोकावले जायचे. एखाद्दुसरी बाई स्ट्रोलरमध्ये बाळाला बसवून चालत जाताना दिसायची. स्वयंपाकघराला लागूनच मोठाच्या मोठा हॉल होता. हॉलला आणि स्वयंपाकघराला लागूनच डाव्या बाजूला दोन मोठ्या बेडरूम होत्या. हॉलच्या एका बाजूला काचेची सरकती दारे होती. ही काचेची दारे आणि प्रवेशाचे दार उघडे ठेवले की, हवा खूप खेळती राहायची आणि म्हणूनच आम्ही एक आरामदायी खुर्ची या जागेच्या आणि पर्यायाने खेळत्या हवेच्या मधोमध ठेवली होती. या खुर्चीवर खास हवा खाण्याकरिता म्हणून बसणे व्हायचे.


घराच्या दोन्ही बाजूला मोठाल्या बाल्कन्या होत्या. घराच्या प्रत्येक खोलीत सीलिंग फॅन होते. सीलिंग फॅन आमच्या दोघांसाठी खूप महत्त्वाचे होते. ऐन थंडीत हिटर लावलेला असतानाही डोक्यावर फिरणारा पंखा आम्हाला हवाच असतो आणि म्हणूनच मला हे घर जास्त आवडले होते. घराच्या दोन्ही बाजूला बाल्कन्या आणि खेळती हवा ही तर अजूनच मोठी जमेची बाजू होती. स्वयंपाक करता करता हॉलमध्ये ठेवलेला टीव्ही बघता यायचा. बाल्कनीला लागूनच एक जिना होता. या जिन्यात मी दुपारचा चहा पीत बसायचे. स्वयंपाकघराला लागून जी बेडरूम होती ती पुढे पुढे माझीच होऊन गेली होती. तिथे बसून मी जे काही सुचेल ते लिहायचे. कधीकधी मध्यरात्री उठून या दुसर्‍या बेडरूममध्ये यायचे. लॅपटॉपवर मैत्रिणींशी बोलायचे आणि मग तिथेच झोपून जायचे. या बेडरूमच्या बाहेर अनेक हिरवीगार झाडे होती. पहाटेच्या सुमारास या झाडांवरच्या पक्ष्यांंची किलबिल सुरू व्हायची. खिडकीतून बाहेर पाहिले, तर काही वेळेला आकाशात रंग जमा झालेले असायचे. मग लगेच मी कॅमेरा घेऊन बाल्कनीत उभे राहून सूर्योदय होण्याची वाट पाहत बसायचे.




बाल्कनीत उभे राहिले की, उजव्या बाजूला सूर्योदय दिसायचा, तर डाव्या बाजूला सूर्यास्त. उन्हाळ्यातली वाळवणं मी याच बाल्कनीत वाळवायला ठेवत असे. दुपारच्या वेळी हॉलमधल्या सोफ्यावर बसलेली असताना काही वेळा अंधारून यायचे आणि मुसळधार पावसाला सुरुवात व्हायची. सरकत्या काचेच्या दारातून मुसळधार पावसाला बघत राहायचे मी. या दोन्ही बाल्कन्यांच्या कठड्यावर अनेक पक्षी येऊन बसत. या घरातला हॉल इतका मोठा होता की, रात्रीच्या जेवणानंतर बाहेर जायचा कंटाळा आला की, हॉलमध्येच शतपावली घातली जायची.
या घरातल्या स्वयंपाकघरात सणासुदीच्या दिवशी साग्रसंगीत पदार्थ केले जायचे आणि नैवेद्याचे ताट वाढून मी फोटोकरिता हॉलमध्ये यायचे. हॉलमध्ये असलेल्या आरामदायी खुर्चीवर ताट ठेवून फोटो काढायचे. पदार्थांचे फोटो काढण्याकरिता हा स्पॉट जणू ठरूनच गेला होता. या घरातल्या मास्टर बेडरूमच्या खिडकीतून पौर्णिमेचा चंद्र दिसायचा. चंद्राला बघून आपोआप गाणे गुणगुणले जायचे- ‘ये रात भीगी भीगी, ये मस्त नजारे, उठा धीरे धीरे वो चॉंद प्यारा प्यारा…’
असे हे माझे सुंदर-साजिरे घर माझ्या आठवणींचा ठेवा बनून राहिले आहे…
रोहिणी गोरे
वॉशिंग्टन, युएस

अनंत चतुर्दशी

अनंत चतुर्दशी म्हणली की माझ्या डोळ्यासमोर पूर्वीचे दिवस येतात. किती छान मिरवणूक निघायची. पहाटे उजाडायच्या आत मिरवणूक संपत आलेली असायची. आम्ही दोघी बहिणी आणि आई नवीपेठेत राहणाऱ्या
मामाकडे यायचो आणि दुपारी १२ ते १ च्या सुमारास आम्हाला पहिल्या ५ मानाच्या गणपतीचे दर्शन व्हायचे ते अल्का टॉकीजजवळ. गुलाल उधळलेले रस्ते छान दिसायचे. ढोल ताशांचे रिदम हृदयाला भिडायचे. संध्याकाळी ७ नंतर आम्ही तिघी आणि मामी अल्का टॉकीजच्या जवळच्या फूटपाथवर संतरंज्या घालून बसायचो. नंतर साधारण रात्री ९ च्या सुमारास नारायणपेठेत राहणाऱ्या मामाकडे सगळी जनता जमायची.



आमची एक मामे बहीण तिच्या घरातील गणपतीचे विसर्जन करून यायची. सदाशिव पेठेतले मामेभाऊ आणि बहिणी यायच्या. नवी पेठेत राहणारे मामेभाऊ यायचे. मग नारायण पेठेत आमच्या सर्व भावंडांचा आणि त्यांच्या मित्र मैत्रिणींचा एक अड्डा जमायचा. त्या घरी राहणाऱ्या मामाकडे रात्रीचे जेवण व्हायचे. नंतर माझी आई आणि माम्या झोपायच्या आणि आम्हाला बजाऊन सांगायच्या की दगडूशेठ हलवाई आणि मंडईचा गणपती आला की लगेच आम्हाला सांगायला या. नंतर आम्ही मामेबहिणी घोळक्याने एकमेकींच्या हातात हात घालून अल्का टॉकीज ते मंडई पर्यंत चालायचो. मध्येच एका गल्लीत जाऊन भेळ खायचो. मध्यरात्री सुजाता हॉटेल मध्ये जाऊन बटाटावडा खायचो. पिपाण्या वाजवायचो. थोड्याश्या तारवटलेल्या डोळ्यांनीच परत नारायण पेठेतल्या मामाच्या घरी यायचो. आमचे सर्व मामे भाऊ मिरवणूकी सामील झालेले असायचे.ढोल ताशे पण वाजवायचे. पहाटे ३ ते ४ च्या सुमारास श्रीमंत दगडूशेठ हलवाई आणि मंडईचा गणपती मिरवणूकीत विसर्जनासाठी सामील व्हायचे त्या आधी ११ च्या सुमारास लाईटिंगचे गणपती जायला सुरू व्हायचे. काळ्या कुट्ट अंधारात लाईटिंगचे गणपती खूपच देखणे दिसायचे. मोठमोठाल्या मूर्ती ट्रक मध्ये असायच्या. आजुबाजूला मुल., तरूण मंडळी असायची. तर काही जण गणपतीच्या बाजूलाच गणपतीच्या भव्य मूर्तीची काळजी घ्यायला असायचे. एकेक करत ओळीने गणपती मंडईपासून निघालेले असायचे विसर्जनासाठी जायला.



दगडूशेठ हलवाई आणि मंडईचा गणपती पाहण्यासाठी लोक आतुर झालेले असायचे. त्यांच्यापुढे ढोल ताशे तर असायचेच पण लेझीम खेळणारी मुले पण असायची. खूप फटाके वाजायचे. हे २ गणपती पाहण्यासाठी अलोट गर्दी. गर्दीला आवरणासाठी कडक व्यवस्था होती. सर्वजण साखळी पद्धतीने हातात हात घालून गर्दीला आवरायचे. या दोन्ही गणपतींना पाहत बसावे, ही मिरवणूक पुढे सरकूच नये असे वाटायचे. त्यावेळेला प्रत्येक चौकात खूप स्वागत व्हायचे. खूप शिस्त होती त्यावेळेला. ढोल ताशांचे रिदमही अजिबात संपू नये असे वाटायचे.
आम्ही सर्व जण पहाटे हे दोन्ही गणपती पहायला लक्ष्मीरोड वर हजर व्हायचो. गणपतीला डोळे भरून पहायचो. नमस्कार करायचो. हा सर्व सोहळा डोळ्यात साठलेला असायचा मिरवणूकीच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत ! मिरवणूक संपली की थोडे उजाडायला लागायचे. सर्वजण अमृततुल्यचा चहा घ्यायचो. अमृततुल्यच्या टपरीवर आम्ही १५-२० जण! चांगले दोन तीन कप आले घातलेला व चहाचा मसाला घातलेला चहा प्यायचो. चहा पिऊन तारवटलेल्या डोळ्यांना जरा तरतरी यायची. मिरवणूक संपल्यावर कोणीही परस्पर घरी जायचे नाही, कारण मामीने सगळ्यांना बजावून सांगितलेले असायचे की घरी या, अंघोळी करा, पिठलं भात खा, मग घरी जाऊन झोपा हवे तितके.



चहा झाला की परत रमतगमत, हसत, गप्पा मारत मामाच्या घरी परतायचो. त्या दिवशी जेवायला पिठलं भात ठरलेला असायचा. त्याबरोबर कोणतीतरी चटणी लसणाची किंवा ओल्या नारळाची! एकदा आम्ही सर्व पोरांनी सुचवले की हे काय? त्याच त्याच चटण्या काय? जरा कोणतीतरी वेगळी चटणी करा की! कोणती चटणी करणार? ह्याच दोन चटण्या छान लागतात पिठलं भाताबरोबर. पण त्यादिवशी आम्ही आमचा हेका सोडलाच नाही. शेवटी आईने पर्याय काढला. आई म्हणाली आपण कुड्या करायच्या का? माझी मामी म्हणाली काय गो, हा कोणता प्रकार? कधी ऐकला नाही तो! मग आईने सांगितले की तिची आई तिच्या लहानपणी हा प्रकार करायची. मग ठरले. सर्वजण लसूण सोलायला बसले. दोघीजणी नारळ खवायला बसल्या. लसूण खोबरे व हिरव्यागार मिरच्या फोडणीमध्ये परतल्या गेल्या. कढई भरून केल्या. जेवताना पिठलं भातापेक्षा कुड्याच जास्त संपल्या!
त्या दिवसापासून प्रत्येक अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे खरं तर त्याच्या दुसऱ्या दिवशी कारण मिरवणूक दुसऱ्या दिवशी संपते!, हा मेनू कायमचा ठरून गेला.

आमच्या घरचा गणपती 2017

Monday, August 21, 2017

खग्रास सूर्यग्रहण - एक अविस्मरणीय अनुभव !!







सूर्यग्रहण पहायला मिळेल असे काही आमच्या ध्यानीमनी नव्हते. अमेरिकेतल्या काही राज्यांमधून ते दिसणार होते. मागच्याच आठवड्यात कळाले की Brevard शहरात खग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. Brevard शहर आम्ही राहत असलेल्या Hendersonville शहरापासून साधारण अर्ध्या तासाच्या कार ड्राईव्ह वर आहे जिथे विनायक ऑफीसला जातो. सूर्यग्रहण बघण्याच्या काचा आम्हाला विनायकच्या ऑफीसमधून मिळाणार होत्या. २१ ऑगस्ट २०१७ हा दिवस आमच्या दोघांच्या आयुष्यातील खूप आकर्षक दिवस ठरून गेला. सोमवारची मी रजा टाकली होती आणि विनायक बरोबर सकाळी सर्व तयारीनिशी मीही निघाले. विनायकचे ऑफीस आणि इंगल्स स्टोअर्स हे समोरासमोर आहेत. अगदी समोरासमोर नाही पण ऑफीस मधून २ ते ३ मिनिटे ड्राईव्ह केल्यावर एक मोठा चौक लागतो. हा चौक ओल्यांडल्यावर सरळ गेले की इंगल्स स्टोअर्स लागते जिथे मी काम करते पण मी काम करते ते आम्ही राहत असलेल्या शहरात. आमच्या घरापासून १० मिनिटांच्या अंतरावर. या इंगल्स स्टोअर्सची २०० ग्रोसरी आणि इतर अशी दुकाने आहेत २ ते ३ राज्यांमध्ये मिळून. या स्टोअर्समध्ये स्टरबक्स कॉफी आहे. शिवाय इथला कॅफे इतका काही छान आहे की इथे येऊन कोणीही कितीही वेळ बसावे. काहीही करावे. वाचावे, लेखन करावे, लॅपटॉपवर काम करावे.


खग्रास सूर्यग्रहण बघण्याच्या टप्यात विनायकचे ऑफीस आणि इंगल्स स्टोअर्स असल्यानेच या योग जुळून आला होता. आम्ही सकाळी निघालो ते विनायकने मला आधी इंगल्स मध्ये सोडले आणि तो ऑफीसला गेला. सुमारे १ वाजता मला विनायकने ग्रहण बघण्याच्या काचा आणून दिल्या. त्या आधी मी ९ ते १ कॅफेत बसून होते. ९ ते ११ वहीत बरेच काही लिहिले. ब्लॉगवरचे काही लेख अपूर्ण आहेत ते मला संपवायचे आहेत. लिखाणासाठी जो निवांत वेळ लागतो तो आज मला सूर्यग्रहणाच्या निमित्ताने मिळाला होता. ११ वाजता मी व्हेज सँडविच खाल्ले. combo sub मध्ये सँडविच बरोबर कोक आणि बटाटा चिप्सही मिळतात. जेवण झाल्यावर मी सूर्यग्रहण पहाण्यासाठी इंगल्सच्या पार्कींग लॉट मध्ये एका झाडाखाली येऊन बसले. बरेच जण झाडाखाली अंथरूणे पसरून पहुडली होती. काही जण खुर्च्या आणून त्यावर बसले होते. तर काही जण कार मध्येच कूलींग लावून बसले होते. चित्रपटाची सुरवात झाली. किती छान दिसतोय सूर्य ! मनाशीच बोलले मी ! विस्तीर्ण लांबवर पसरलेले आकाश आणि काचेतून सूर्याचा गोळा एखाद्या श्रिखंडाच्या गोळी सारखा पिवळा दिसत होता. आजुबाजूला काळे निळे, तर काही धुरकट पांढरे ढगही दिसत होते. चंद्राची सूर्यावर सावली पडायला सुरवात झाली. ही चंद्राची काळी चकती हळूहळू पुढे सरकत होती. अधून मधून मी विनायकशी फोनवर बोलत होते. विनायकच्या ऑफिसमधले सर्वजण काम करता करता अधून मधून बाहेर येत होते आणि ग्रहणाला बघत होते. वेदर पार्टली क्लाऊडी
असल्याने काळे निळे ढग ग्रहणावरती येऊन परत बाजूला होत होते, असे दृश्यही बघायला मिळाले. सूर्य तर खूपच देखणा दिसत होता. मी अधून मधून सूर्यग्रहण बघत होते तर अधून मधून झाडाखाली सावलीत बसत होते. असा खेळ दीड तास चालला. २ वाजून ३० मिनिटांनी एक मोठा Climax ्स झाला. Climax तर मध्यंतराच्या आधीच संपला. आता स्टोरीत काही अर्ध उरला नाही म्हणून लोक परतायला लागले. चंद्राने सूर्याला स्पर्श केला तेव्हा दुपारचा १ वाजून ८ मिनिटे झाली होती. चंद्राने मुहूर्त अजिबात चुकवला नाही. स्पर्श करून जेव्हा तो पुढे सरकला तेव्हा तर सफरचंद दाताने तोडून थोडा भाग खाल्यासारखे कसे दिसते तसेच चित्र दिसले. Just like apple product symbol !


 Photo credit - Los Angles Times - from Net
Climax जेव्हा जवळ यायची वेळ आली तेव्हा तर सर्वजण श्वास रोखून सूर्याला आणि त्यावरच्या चंद्राच्या चकतीला पाहत होते. थोडे थोडे करत सूर्य झाकला जात होता. आता अगदी काही क्षणच उरले होते. सरते शेवटी बांगडी फुटलेल्या बारीक काचेचा तुकडा कसा दिसतो तसाच सूर्याचा तुकडा दिसला. आणि नंतर हळूहळू एक टिंब आणि नंतर काही सेंकदातच सूर्य पूर्णपणे झाकला गेला. तेव्हा तर "ये पल तो यही थम जाए तो अच्छा होगा " अशीच माझ्या मनाची अवस्था होऊन गेली. संध्याकाळ नाही तर पूर्णपणे अंधार ! रात्रच जणू ! आकाशात कुणीतरी टॉर्च घेऊन उभे आहे असेच वाटत होते. आता सूर्याकडे काचेशिवाय बघता येत होते. जेव्हा चंद्र उजवीकडून डावीकडे सरकला मात्र !अहाहा ! सर्वांना हिऱ्याच्या अंगठीचे दर्शन झाले. सूर्याची वळ्यासारखी दिसणारी कड आणि मधोमध सूर्याचा तेजस्वी तेजाचा हिऱ्यासारखा चमकणारा खडा ! काय ही निसर्गाची किमया ! देवा तुझी करणी अगाध आहे रे ! खूप गहिवरून आले मला. अश्रू गालावरून ओघळले. आता सूर्याची कोर उजव्या बाजूने दिसायला लागली आणि नंतर वाढत गेली. अडीचला मी परत कॅफेत येऊन बसले आणि हा अवर्णनीय अनुभव वहीत उतरवला. पावणेचारच्या सुमारास मी परत पार्कींग लॉटमध्ये गेले आणि झाडाखाली उभे राऊन सूर्याला परत डोळे भरून पाहून घेतले. आता चंद्राची सावली कमी कमी होत गेली आणि परत सूर्याचा तप्त पिवळा गोळा दिसायला लागला. चारच्या सुमारास कॉफी प्यायली आणि विनायकची वाट पाहत परत कॅफेत येऊन बसले. निसर्गाचे चित्र बदलून रपारप पाऊस पडायला सुरवात झाली. घरी परत येताना वाहतूक मुरंबा ! घरी आलो आणि लगेचच मी हा लेख टंकत आहे. आज मी खूप भारावून गेली आहे !! आता हे भारावलेपण २ दिवस तरी नक्कीच टिकेल. आमच्या दोघांच्या आयुष्यामध्ये सूर्यग्रहणाचा अवर्णनीय सोहळा पहाण्याचा जबरदस्त योग जुळून आला होता तर !!!
Rohini Gore - smruti blog Photo credit - Los Angles Times from Net


Photo Credit - Only in North Carolina Page - Photo taken by Sallie J. Woodring Photography
Downlod from  Internet



Wednesday, June 28, 2017

Dependent visa (5)

सर्टिफिकेट कोर्स मध्ये दोन कोर्सेस होते. पहिला Civil Litigation Track Certificate आणि दुसरा Real Property Track Certificate मी पहिला करायचा ठरवला. यामध्ये प्रत्येकी ६ विषय असतात आणि क्रेडिट
१८ होते. डिप्लोमा कोर्स ला १३ विषय आणि ३९ क्रेडिट होते तर डिग्री कोर्सला २५ विषय आणि ७५ क्रेडिट होते. सर्टिफिकेट कोर्सच्या विषयाला prerequisite नव्हते. डिप्लोमा मध्ये १३ पैकी दोन विषय होते ते म्हणजे गणित आणि इंग्लिश. या दोन्ही विषयाला prerequisite होते. अजून एक विषय होता तो म्हणजे Public Speaking मी जेव्हा फॉल सेमेस्टरला ऍडमिशन घेतली तेव्हा २ विषय घेतले ते म्हणजे Introduction to Paralegal studies आणि Business Law कॉलेजमधधे घेतल्या जाणाऱ्या असाईनमेंट आणि परीक्षा या दर ८ दिवसांनी असायच्या. कधी कधी दर ८ दिवसांनी परीक्षा आणि दर १५ दिवसांनी असाईनमेंट. यामध्ये १०० पैकी ७५ मार्क्स मिळाले की C grade असते. आणि ९० च्या पुढे मार्क मिळाले की A grade असते. या grades असाईनमेंट आणि परीक्षा यात मिळालेल्या मार्कांचे Average असते. डिग्री आणि डिप्लोमाला जे विषय होते ते काही जणांनी प्रत्येक सेमेस्टर ला ५ किंवा काहींनी ३ घेतले होते. मी मात्र दोनच विषय घेतले होते आणि ते पूर्णपणे A grade मध्ये यशस्वी करायचे हे माझ्या आवाक्यातले होते. अर्थात विनायकची मदत मला असाईनमेंट मध्ये खूपच झाली. तसे तर इथले
विद्यार्थी असाईनमेंट ग्रूपने करतात. मी जेव्हा कॉलेज मध्ये जायचे तेव्हा एक चक्कर मी लायब्ररीत मारायचे तेव्हा तिथे काही विद्यार्थी घोळका करून अभ्यास करताना दिसायची. त्यांच्या बाजूला पुस्तके आणि आणि नाकासमोर लॅपटॉप असायचे. लॅपटॉप गुगलींग करण्यासाठी आणि असाइन्मेंट वर्ड फाईल मध्ये टाईप करण्यासाठी. अगदी असेच चित्र आमच्या घरी पण असायचे.





विनायक कामावरून घरी आला की आम्ही दोघे Assignment करण्यासाठी बसायचो. विनायक घरी यायच्या आधी मी असाईनमेंट मधला काही भाग पूर्ण करून Word file टाईप करून ठेवलेला असायचा व काहींसाठी गुगलींग करून ठेवलेले असायचे. गुगलींग मध्ये सापडलेल्या लिंक्स मी ब्राऊज करून वाचून ठेवायचे व त्या ब्राऊज केलेल्या खिडक्या बारीक करून ठेवायचे. जेवणासाठी आणि भांडी घासण्यासाठी अधून मधून ब्रेक घ्यायचो. असाईनमेंट टाईप करून गुगल केलेल्या लिंक्स पण कॉपी पेस्ट करून द्यायच्या असतात. लिंक्स मधला काही भाग कॉपी पेस्ट केला तरी चालतो. नंतर असाईनमेंटची प्रिंट काढायची आणि ती प्राध्यापकांना द्यायची.
आम्हाला जे शिकवणारे प्राध्यापक होते ते सर्व वकील होते. Mr. Currin सरांची एक लॉ फर्म होती तर Mrs. Clarke बाई अधून मधून कोर्टात ज्युरी म्हणून जायच्या. एकादी न्युज अभ्यासा संदर्भात असली तर ती न्युज युट्युबवर बघायला सांगायच्या. विनायक मला म्हणाला " तू चांगला कोर्स निवडला आहेस. तुझ्यामुळे मलाही लॉबद्दल माहीती होत आहे. "






"टॉक टॉक टॉक" असा आवाज आला की समजावे की Clarke बाई आल्या ! खूप उंच टाचेच्या चपला, केस मोकळे, पेहराव नेहमी वन पीस, गळ्यात मोठाल्या माळा, उजव्या हातात घड्याळ, डाव्या हाताने फळ्यावर लिहीणार. १० वाजून १० मिनिटे होत आली तरी सुद्धा अजून Mr. Currin कसे आले नाहीत? आम्ही सर्वजणी माना वेळावून भिंतीवरच्या घड्याळाकडे बघतो न बघतो तोच करीन यांचा वर्गात प्रवेश! सतत हसतमुख, प्लेन शर्ट व नेहमी टाय लावणारच ! शुक्रवारी मात्र Jeans आणि टी शर्ट. दोघांची रोल कॉल घ्यायची पद्धत वेगळी आहे. Mr. currin वही उघडून प्रत्येकाचे नाव वाचणार व आम्ही " here" असे म्हणले की "where" असे म्हणून त्या विद्यार्थ्याकडे बघूनच हजेरी लावणार. मी आधी येस म्हणायचे मग हीयर असे म्हणायला लागले. Mrs Clarke बाईंनी पहिल्यांदाच रोल कॉल घेताना सगळ्यांचे चेहरे पाहून लक्षात ठेवले आणि नंतर प्रत्येक वेळी हजेरी लावताना बारीक डोळे करून पाहणार कोण कोण आलयं ? आणि मग त्यानुसार हजेरी लावणार.
Clarke बाईंची शिकवण्याची पद्धत मला आवडली. धड्यातले मुद्दे फळ्यावर लिहून नंतर प्रत्येक मुद्दा विस्ताराने सांगणार. Mr. Currin फळ्यावर एकही अक्षर लिहिणार नाही. धड्यातली २ - ४ वाक्ये वाचून दाखवणार व आमच्याकडून त्यांना चर्चा अपेक्षित असे. काही Interesting assignments परीक्षा घेण्याची पद्धत आणि एक - दोन लक्षात राहिलेल्या परीक्षा याचे सविस्तर वर्णन पुढील भागात. फॉल सेमेस्टर चांगल्या प्रकाराने ( A grade) यशस्वी झाल्यानंतर मी डिप्लोमा करण्यासाठी रजिस्टर केले.

Friday, June 23, 2017

H 4 Dependent Visa (5)

पॅरालीगलचे शिक्षण प्रत्यक्ष कॉलेजमधे जाऊन घेण्याचा विचार केला तेव्हा परत गुगलशोध घेतला. आम्ही राहतो त्या शहरात कम्युनिटी कॉलेज होते. या कॉलेजचा मुख्य कँपस डाऊनटाऊनला होता. तिथे ये-जा करायला बसही सोयीची होती. नेमके त्याच वेळेला वेदर चॅनल वर कॉलेजची जाहीरात आली ती अशी की फॉल सेमेस्टरला रजिस्टर करा अमुक तारखेच्या आत. या कॉलेजचा नॉर्थ कँपस आमच्या अपार्टमेंटच्या जवळ होता. तिथे जाऊन प्रत्यक्ष कॉलेज पाहिले. हे कॉलेज आम्ही राहत असलेल्या अपार्टमेंटच्या दुसऱ्या चोकात होते पण तरीही चालण्याच्या अंतरावर नव्हते. फॉल सेमेस्टर साठी रजिस्ट्रेशन केले. माझी एक दूरवर राहणारी डॉक्टर मैत्रिण नोषवी हिने मला कॉलेजबद्दल सर्व माहीती सांगितली. मी विचारले होते त्याबद्दल तिला म्हणजे तिने पण माझ्यासारखाच शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला होता. ती पण डिपेंडंट विसावर होती.पॅरालीगलमध्ये ३ कोर्सेस होते. पहिला सर्टिफिकेट कोर्स, दुसरा डिप्लोमा आणि तिसरा डिग्री कोर्स. त्यात मी सर्टिफिकेट कोर्स करायचा ठरवला.
रजिस्ट्रेशन केल्यावर कॉलेजचे पत्र आले ते म्हणजे "तुम्ही दोन्ही प्रकारचे टॅक्सेस भरले आहेत का? आणि तुम्ही किती वर्ष या राज्यात राहत आहात? " या दोन्ही नियमांमध्ये मी बसत होते म्हणून मला इन-स्टेट फी लागू झाली, नाहीतर मला तिपट्ट फी भरावी लागली असती. कॉलेजच्या वेबसाईट वर माहीती वाचली. प्रत्येक विषयाला किती क्रेडीट आहेत ते कळाले. कॉलेजचे वेळापत्रक पाहिले. कोणत्या वर्गात बसायचे तेही पाहिले आणि माझे कॉलेज जीवन सुरू झाले. विनायक मला रोज कॉलेजला न्यायला-आणायला येत होता. आमच्या अपार्टमेंटच्या पुढच्या चौकात विनायकचे ऑफीस होते तर त्यापुढील चौकात माझे कॉलेज होते. कारने अवघी ५ मिनिटे.





ज्या दिवशी कॉलेज सुरू झाले त्यादिवशी गणपती फेस्टिवलचा पहिला दिवस होता. मी घरातल्या घरात गणपतीच्या मूर्तीची पूजा करते आणि मोदकांचा स्वयंपाक करते पण मला काहीही करता आले नाही. आईने मला एक सुपारीत कोरलेला चांदीचा गणपती दिला होता. त्याची गंध, हळद कुंकू, लावून आणि अक्षता वाहून पूजा केली. नैवेद्यासाठी वाटीमध्ये साखर ठेवली. नमस्कार केला आणि कॉलेजला गेले. पहिला दिवस छान होता. वर्गात काही तरूण तरूणी आणि काही मध्यमवयीन माझ्यासारख्या बायकाही होत्या. सर्वांच्याच हातात जाडे पुस्तक होते. तोषवीने सांगितले होते की इथे पुस्तके रेंटने घेतात. म्हणजे रेंटने पुस्तके घ्यायची आणि सेमेस्टर झाली की परत करायची. मी विचारले असता तिने सांगितले होते. कारण कि नेमलेले पुस्तक साधारण २०० डॉलर्स होते. मी तिला म्हणाले की अशी प्रत्येक विषयाची पुस्तके विकत घेतली तर दिवाळेच निघेल. तेव्हा तिने पुस्तके रेंट करतात असे सांगितले होते.




आम्ही विचार केला की आधी कॉलेजच्या लायब्ररीत पुस्तके असतील तर कशाला रेंट करायची. पण तसे नव्हते. लायब्ररीत पुस्तके नव्हती. कॉलेजमध्येही पुस्तके विकत घ्या नाहीतर रेंटने घ्या अशीच पाटी होती. तिथे जाऊन विचारले तर रेंटने घ्यायची पुस्तके पण महाग होती. कॉलेजमधून घरी आल्या आल्या ऍमेझॉनच्या साईट वर पुस्तक रेंट केले. पुस्तक घरी आल्यावर खूप धीर आला. Currin सरांनी पहिल्या दिवशी आम्हाला सर्वांना प्रिंट केलेला कागद दिला. त्यावर सर्व सिलॅबस मधले चॅप्टर, त्याच्या तारखा, त्यावर असाईनमेंटच्या आणि परीक्षेच्या तारखा असे सर्व काही होते. कारभार खूपच पद्दतशीर होता. Currin सर Clarke बाई कसे होते, त्यांची शिकवण्याची पद्दत कशी होती, असाईनमेंट आणि परीक्षा यांचा ताळमेळ कसा साधत होते ते सर्व पूढील लेखात!

Thursday, June 15, 2017

H 4 Dependent visa (4)

आमच्या अपार्टमेंटच्या घरासमोर जे तळे होते तिथे माझ्यासारखीच काहीजण बदकांना ब्रेड खायला देण्यासाठी येत असत. लायब्ररीतले काम सोडून दिल्यानंतर आता पुढे काय? याचे विचारचक्र माझ्या डोक्यात सुरू झाले. क्लेम्सनला असताना चर्चमध्ये काम मिळाले तसे इथेही मिळू शकेल का? किंवा इथे जवळपासच्या चालण्याच्या अंतरावर डे-केअर किती आहेत? हे गुगलशोध करून शोधून काढले. त्यात चालण्याच्या अंतरावर एक डे-केअर आणि एक चर्च सापडले. ही दोन्ही स्थळे मी जेव्हा चालायचे तेव्हा मला माहिती होतीच पण आता नोकरीच्या निमित्ताने तिथे गेले, विचारले की इथे वेकन्सीज आहेत का? माझ्याकडे ग्रीन कार्ड आहे त्यामुळे मी कायद्याने नोकरी करू शकते हे त्यांना सांगितले. शिवाय थोडाफार अनुभव आहे आणि त्या अनुभवांची रेको लेटर्स पण आहेत हेही सांगितले. ही रेको लेटर्स घेऊन ठेव असे माझ्या बरोबर क्लेम्सन मध्ये काम करणाऱ्या रेणुकानेच मला सुचवले होते. चर्चमध्ये आणि डे-केअर मध्ये हे सर्व सांगितल्यानंतर त्यांनी मला अर्ज दिला तो मी तिथल्या तिथे भरून दिला. अर्ज भरून दिल्यानंतर त्यांनी सांगितले की आम्ही तुला कळवू. सध्या तरी आमच्या इथे कोणत्याही व्हेकन्सीज नाहीत. लायब्ररीच्या अनुभवानंतर मी शहाणी झाले होते. कोणत्याही अपेक्षा ठेवायच्या नाहीत आणि मुलाखतीसाठी बोलावणे येईल अशी वाटही बघायची नाही.




एकदा तळ्यावर चक्कर मारत असताना तिथे एक बाई मला दिसली. ती आमच्या अपार्टमेंटच्या जवळच्या घरातून बदकांना ब्रेड घालायला यायची. तिच्या कारचा आकार पण जरा विचित्रच होता. तिने माझी व मी तिची चौकशी केली. ती म्हणाली "मी आधी न्युयॉर्कला रहायचे. पण आता इथे रहायला आले आहे. ती चर्चमध्ये जाते असे सांगितल्यावर मि तिला लगेचच कामाविषयी विचारले.. तर ती म्हणाली की नोकरी नाही पण चर्च मध्ये तू माझ्याबरोबर दर बुधवारी voluntary work करायला येऊ शकतेस. तु बुधवारी ये. तिथले काम बघ. तुला आवडले तर तू माझ्याबरोबर ये. मी तुला दर बुधवारी आणायला व सोडायला येत जाईन. मि इथेच राहते तुझ्या अपार्टमेंटच्या जवळच. मी तिच्याबरोबर बुधवारी गेले . तिथल्या चर्च मध्ये "अन्नवाटप" करतात ते कळाले. गरीबांसाठी चर्चमध्ये दररोज लागणारी ग्रोसरी घेऊन ठेवतात व त्याचे वाटप करतात. चर्चमध्ये एका मोठ्या खोलीत रॅक लावलेले असतात तिथे सर्व प्रकारची ग्रोसरी ठेवलेली असते. मधोमध टेबले असतात. त्या टेबलाभोवती आम्ही ओळीने उभे रहायचो. घरातून येताना कॅरी बॅग्ज आणायला सांगायचे. आपल्या घरी ग्रोसरी आणल्यावर बऱ्याच कॅरी बॅग्ज आमच्याकडे जमा झालेल्या असतात त्या घेऊन जायचे. तिथे गेल्यावर सर्वांनी आणलेल्या कॅरी बॅग्ज चेक करायचो. त्यातल्या खूप फाटलेल्या असतील त्या फेकून द्यायचो. व बाकीच्या चुरगळलेल्या बॅगा हाताने सरळ करून एकावर एक ठेवायचो म्हणजे माणसे ग्रोसरी घ्यायला आली की पटापट त्यांना हवे असलेले सामान भरून द्यायचो. दर बुधवारी सकाळी ९ ते १२ हे काम चालायचे. काही वेळा माणसे उशिराने येत. काही वेळा ९ लाच हजर राहत. दर बुधवारी मी कामाला जायला लागले खरी पण हे काम मला जास्त आवडले नाही. ८ ते १० बुधवारच गेले असेन. नोकरीचा विषय मी माझ्या डोक्यातून पूर्णपणे काढून टाकला.





विचार करता करता सुचले घरबसल्या काही ऑनलाईन शिकता येईल का? म्हणून नेहमीप्रमाणेच गुगलशोध केला तर त्यात मला काही कोर्सेस सापडले. हे कोर्सेस दीड ते दोन,, किंवा काही ३ ते ४ महिन्यांचे होते.
या सर्व कोर्सेस ची फी ८० ते १०० डॉलर्स अशी होती. यातले ३ कोर्सेस मी एकही डॉलर न भरता पूर्ण केले. कसे ते लवकरच लिहिन. या ऑनलाईनच्या कोर्सेस नंतर मात्र ओळीने जे काही घडत गेले ते खूप आनंद देणारे आणि आत्मविश्वास वाढवणारे होते !! माझ्या शिक्षणाचा काळ येऊन ठेपला होता.

Thursday, June 08, 2017

H 4 Dependent Visa (3)

मी घरबसल्या जरी बरेच उद्योग करत होते तरी एक प्रकारचा साचलेपणा आला होता. प्रत्यक्षातले मित्रमंडळ तीन वर्षे झाली तरी भेटले नव्हते आणि पुढे भेटतील याबद्दलही खात्री नव्हती. क्लेम्सनला आल्यावर सुरवातीच्या काळात मी बसने बरीच हिंडले होते. येण्याजाण्यात वेळ जातो. मॉलमध्ये किंवा ग्रोसरी स्टोअर्स मध्ये तिथल्या गोष्टी पाहण्यातही वेळ जातो. त्यामुळे बसने हिंडायचे ठरवले.




आमच्या अपार्टमेंटच्या काही मिनिटांच्या अंतरावर बस येते हे माहीत होते पण तरी ती बस कुठे जाते याचा पत्ता नव्हता आणि नेमका बस-स्टॉप कुठे आहे तेही शोधायचे होते. गुगल शोधामध्ये आम्ही राहत असलेल्या शहरात कोणत्या बसेस धावतात हे शोधले. बसच्या वेबसाईटवर बघितले कोणत्या नंबराच्या बसेस धावतात, त्याचे वेळापत्र काय आहे आणि मुख्य म्हणजे बस थांबे कुठे आणि किती आहेत. शिवाय प्रत्येक रूटचा मॅपही बघितला. या सर्व गोष्टींची एक प्रिंट काढली आणि आमच्या घराजवळचा बस स्टॉप कुठे आहे तेही शोधले. त्यावर किती नंबरची बस थांबते तो आकडाही पाहिला. लायब्ररीत जाण्यासाठी ही बस माझ्यासाठी खूपच सोयीची होती, म्हणजे आमच्या घरापासूनचा बस थांबा आणि लायब्ररीतजवळचा बसथांबा १० मिनिटे चालण्याच्या अंतरावर होता.



लायब्ररीत जायला सुरवात केली. नंतर लायब्ररीपासून दुसरी एक बस होती ती ग्रोसरी स्टोअर्स आणि मॉलला जाणारी होती. त्यामुळे एक दिवसा आड बसने फिरायला लागले. कंटाळा गेला. बसमधली माणसे दिसायची. त्यांचे संभाषण कानावर पडायचे, लायब्ररीत गेल्यावर काही ना काही वाचायचे. या वेगळ्या दिनक्रमा मुळे फ्रेश वाटायला लागले. घरातून निघताना धोपटीत पाणी पिण्याची बाटली, टोपी, एक स्वेटर, छत्री, थोड्या कुकीज अशी सगळी जय्यत तयारी करून निघायचे. कॅमेराही न्यायचे सोबत. लायब्ररीत जाण्यासाठी बसने जाण्यासाठी १५ मिनिटे लागायची.



एकदा लायब्ररीत पुस्तके बदलताना तिथल्या बाईला विचारले की इथे नोकरी मिळू शकेल का? तर ती बाई म्हणाली नोकरी नाही पण voluntary work मिळू शकेल. मग तिने मला एक फॉर्म दिला. तो दुसऱ्या दिवशी भरून दिला. फॉर्म मध्ये कोणकोणते काम आहे याची एक यादी होती. त्यावर मला आवडणाऱ्या कामावर टीक मार्क केले. काही दिवसांनी लायब्ररीतून मला सुसानचा फोन आला कि तुझ्यासाठी एक काम आहे, मला येऊन भेट. मि लगेचच गेले तिला भेटायला, कारण की नुसते फिरण्यापेक्षा कामानिमित्ताने बाहेर पडायला केव्हाही चांगलेच. लायब्ररीच्या तिसऱ्या मजल्यावर सुसानला भेटले. तिने विचारले कि तुला बुक रिपेअरचे काम करायला आवडेल का? या आधी हे काम कधी केले आहेस का? तर मी म्हणाले की हे काम मला नक्किच आवडेल पण या कामाचा मला अनुभव नाही. सुसान म्हणाली काळजी करू नकोस. एलिझाबेथ तुला हे काम व्यवस्थित समजाऊन सांगेल. कोणत्या दिवशी आणि किती तास येशील? हे विचारल्यावर मी तिला आठवड्यातले २ दिवस आणि दुपारचे २ ते ४ येईन असे सांगितले. एलिझाबेथने मला काम समजाऊन सांगितले. मला हे काम खूपच आवडून गेले. काम करता करता तिथे रेडिओ ऐकता यायचा. त्यावरची इंग्लिश गाणी आवडायला लागली होती. काही गाणी तर आर डी बर्मन ने चाली लावल्यासारखीच वाटायची. एकूणच रेडिओवर संगीत कोणत्या का भाषेत असेना मला ऐकायला आवडते.



गाण्याच्या अधून मधून जाहीराती असायच्या त्याही ऐकायला छान वाटायचे. लायब्ररीत काम मिळाल्याने माणसात आल्यासारखे वाटले. व्यवधान असले की माणूस आपोआपच त्या व्यवधानाच्या अवतीभवती फिरत राहतो. बाहेर पडले की घरातल्या कामाचीही आखणी करता येते. नेटवरून मित्रमंडळींशी रांत्रदिवस बोलता बोलता घरातली इतर कामेही असतात याचा विसरच पडला होता जणू. विनायक म्हणायचा जेव्हा पाहावे तेव्हा संगणकाजवळच असतेस. आणि जेव्हा विनायक ऑफीस मधून यायचा तेव्हा तो संगणक घेऊन बसायचा तेव्हा मला राग यायचा.
लायब्ररीतील बरीच पुस्तके रिपेअर केली. साधारण हजार पुस्तके असतील. पण त्यांनी मला चहापाण्यापुरतेही पैसे दिले नाहीत.





अर्थात अपेक्षा नव्हतीच. मी माझा वेळ जाण्यासाठीच हे काम करत होते आणि तेही आवडीने करत होते. तीन वर्षे हे काम केले. अजून दुसऱ्या प्रकारचे काम आहे का? असेही विचारले तर सुसान म्हणाली की दुसऱ्या विभागात मेल लिहून बघते काही काम आहे का ते. पण काम निघाले नाही.







माझ्यासारख्याच अजून काही जणी तिथे कामाला यायच्या. काम झाले की एका फायलीत नाव, किती तास काम केले आणि दिनांक टाकायचा असतो तेव्हा कळाले की
माझ्यासारख्या अजून काही जणी इथे येतात तर !
H4 dependent visa या लेखमालेत अजून २ ते ३ भाग तरी होतीलच तेव्हा येईनच परत काहीतरी घेऊन.

Monday, June 05, 2017

H 4 Dependent Visa (2)

पोस्डॉक पर्व संपले. विनायकला नोकरी लागली.. परत नवीन राज्य आणि शहर. मला माहीती होतेच की आता आपला H 4 visa आहे आणि J 2 visa सारखे वर्क परमिट काढता येणार नाही. साडेतीन वर्षाच्या पोस्डॉक च्या काळात फर्निचर घेतले नव्हते ते घेतले. विनायकचे ऑफीस घराच्या जवळ १० मिनिटांच्या चालत जायच्या अंतरावर असल्याने दुपारी तो घरी जेवायला यायचा त्यामुळे माझा सकाळचा वेळ पोळी भाजी करण्यात जायचा आणि त्यामुळेच मला एकटेपणा आला नाही. मनोगत मराठी संकेतस्थळ नव्यानेच माहीती झाले होते. मनोगताचा खूप मोठा आधार आम्हाला दोघांनाही वाटायचा. त्यावर येणारे लेख, कविता, चर्चा वाचता यायच्या. जेव्हा मनोगताच्या प्रशासकांनी पाककृती विभाग सुरू केला तेव्हापासून माझे रेसिपी लेखन सुरू झाले, म्हणजे साधारण २००५ सालापासून मी लिहायला लागले. रेसिपी लेखनाबरोबरच इतरही लेखन सुरू केले ते म्हणजे भारतातल्या आठवणी, अमेरिकेत येणारे अनुभव, प्रवासवर्णने. जसे सुचेल तस तसे लिहीत गेले. रोजनिशी लिहाविशी वाटली. माझ्या दोन ब्लॉगचा जन्मही याच काळात झाला.





अपार्टमेंटच्या समोर जे तळे होते तिथे जाणे व्हायचे. तळ्यात असणारी बदके, पिले, कासवे यांना नित्यनियमाने ब्रेड खायला घालायला सुरवात केली. त्याचबरोबर फोटोग्राफी सुरू झाली. डिजिटल कॅमेराने एक ना अनेक फोटो काढणे नित्यनियमाचे झाले. फोटोंची संख्या काही हजारात गेली. तळ्यावर रोजच्या रोज जाण्याच्या आधी जो काळ होता तो तर विसरणे शक्यच नाही. इंटरनेटवरून जगातल्या माणसांची घरबसल्या सहज संपर्क साधता येतो हे त्या काळात म्हणजे २००५ च्या सुमारास कळाले. त्या आधी आमच्याकडे संघणक नव्हता तर प्रत्यक्ष भेटणारी व बोलणारी माणसे होती.मनोगत व ऑर्कुट मुळे याहू मेसेंजर वर शंभराने मित्रमंडळी जमली. सकाळी संगणक आम्ही जेव्हा ओपन करायचो तेव्हा याहू निरोपकाच्या खिडक्या आपोआप उघडायच्या. भारतातल्या व युरोपमधल्या मित्रमंडळींचे ऑफलाईन निरोप वाचायचो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत
मित्रमंडळी बोलायला यायची. कॉनफरन्सेस व्हायच्या. . समजा रात्री झोप येत नसेल आणि संगणक उघडला तरीही कोणी ना कोणी बोलायला असायचेच. बोलायचे म्हणजे सुरवातीला आम्ही टाईप करून बोलायचे. नंतर मेसेंजरवरून कॉल करायला लागलो. आवाज ऐकण्यासाठी याहूपेक्षा गुगल टॉक जास्त छान होते. . ही सर्व मित्रमंडळी आमच्या घरातच वावरत आहेत की काय? असे वाटायचे इतके हे इंटरनेटचे माध्यम प्रभावी आहे.
ऑर्कुटवर दोन समुदायात सामील झाले ते म्हणजे H 4 Dependent visa मराठी मंडळ आणि H 4 अमराठी होममेकर्स इन युएस ए. या समुदायात होणाऱ्या पाककृती व निबंध स्पर्थेत भाग घेतला. अमराठी समुदायात झालेल्या एका स्पर्थेत माझी "इडली" विजेती झाली. बाकी काही स्पर्धेत काही पदार्थ उपविजेते झाले. उदा. रंगीत सांजा, भरली तोंडली इ. इ. साधारण ३ वर्षे याहू मेसेंजरवर मित्रमंडळी येत राहिली, बोलत राहिली आणि नंतर पांगत गेली. अदुश्य रूपात भेटले सर्वजण. आवाज फक्त ऐकायचा, फार फार तर काही वेळा विडिओवर एकमेकांना बघायचो.



भारतात बोलणे खुप कमी व्हायचे कारण की भारतात बोलण्यासाठी कॉलींग कार्ड विकत घ्यायला लागायचे. १० डॉलर्सला २० मिनिटे मिळायची सुरवातीला. नंतर नंतर ५ डॉलर्सला ६० मिनिटे मिळायला लागली. कॉलींग कार्डावरून बरेच नंबर फिरवायला लागायचे तेव्हा कुठे फोन लागायचा. इंटरनेटची फेज संपली. एकटेपणा जाणवायला लागला. घरात बसून बसून खूपच कंटाळा यायला लागला.


प्रत्यक्ष माणसे बघण्यासाठी आणि बोलण्यासाठी घराबाहेर पडावेच लागले. H 4 visa ची उर्वरीत कहाणी पुढील भागात.

H4 Dependent visa (1)

१६ मे २००१ साली आम्ही दोघे अमेरिकेत टेक्साज राज्यात आलो. विनायकने भारतातल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि इथे तो Post -doctorate करण्यासाठी J1 visa वर आला व मी J2 Dependant visa वर आले. विनायकचे वय ४० होते आणि माझे ३६. विनायकला ऑरगॅनिक केमिस्ट्री मध्ये  संशोधन करायला खूप आवडते, पण माझे काय? Dependent visa वर अमेरिकेत कायद्यानुसार नोकरी करता येत नाही. काहीजणी बेकायदेशीर  नोकऱ्या करतात पण आम्हाला तसे पटतही नाही आणि कधी केलेही नाही. J 2 visa वर कायद्याने वर्क परमिट काढता येते म्हणून मी व माधवीने १०० डॉलर्स भरून ते काढले. तिला डे केअर मध्ये नोकरी मिळाली आणि मलाही, पण माझ्या हातात तोपर्यंत कार्ड आले नव्हते त्यामुळे मला ती नोकरी करता आली नाही. त्यांना त्वरित कोणीतरी हवे होते. मी व माधवीने मिळून एका वर्षात बरेच काही केले. आमची छान मैत्री झाली. विनायकचा J 1 visa १ वर्षाचा होता म्हणून त्याला तातडीने दुसरी पोस्डॉक बघणे जरूरीचे होते व त्याला ३ युनिव्हरसिटीतून ऑफर आली. त्यापैकी त्याने क्लेम्सन विद्यापीठ निवडले. नवीन राज्य व नवीन शहर असल्याने मला पुन्हा एकदा visa चे नवीन कागदपत्र असल्याने वर्क परमिट काढावे लागले १०० डॉलर्स भरून, पण आम्ही ते काढले कारण की समजा नोकरी लागलीच तर वर्क परमिट नाही असे व्हायला नको.




माधवीला ज्या डेकेअरमध्ये नोकरी लागली ती नंतर तिने सोडली व दुसरीकडे रूजू झाली. मलाही त्याच कंपनीमध्ये नोकरी लागली होति. एक Aptitude test होती ती मी पास झाले आणि मॅनेजरचा घरी फोन आला की तुम्हाला कोणती शिफ्ट पाहिजे तर मी माधवीची शिफ्ट सांगितली ८ ते ४. मी कामावर ८ दिवसांनी रूजू होणार होते पण नंतर परत एक फोन आला की ती कंपनी बंद पडली आहे त्यामुळे मला लागलेली नोकरी करता आली नाही. त्या कंपनीत सीडी ऑरगनाइज करण्याचे काम होते. या सगळ्या गोष्टी १ वर्षाच्या आतल्या आहेत. नंतर केम्सनमध्ये आल्यावर जे वर्क परमिट काढले त्याचा मात्र पुरेपुर फायदा झाला. मला ३ नोकऱ्या लागल्या. पहिली नोकरी एका चर्चमध्ये दर रविवारी सकाळी ८ ते १२ अशी होती. चर्चमध्ये दर रविवारी इथे प्रार्थनेसाठी लोक येतात ते मुलांना घेऊन. पण अगदी छोट्या मुलांना तिथे एका खोलीत सांभाळण्याची सोय केलेली असते. इथे मी व २ युरोपियन बायका मुलांना सांभाळायचो. दुसरी नोकरी लागली ती एका चर्चमध्ये एक बाई इंग्रजीचे क्लास घ्यायची. क्लासमध्ये येणाऱ्या बायका चिनी, जपानी होत्या.. तो क्लास होईपर्यंत २ तास तिथे येणाऱ्या बायकांची मुले सांभाळण्याचे काम आम्ही दोघी म्हणजे मी व श्रीलंकेमधली रेणुका करायचो. पण ही नोकरी जास्त टिकली नाही कारण की मला एका डे केअर मध्ये सोमवार ते शुक्रवार ११ ते ४ अशी नोकरी मिळाली Toddler ग्रूप मध्ये.


मला फक्त शनिवार एकच दिवस मिळायचा घरातली इतर कामे करायला. दर बुधवारी संध्याकाळी ६ ते ८ अशी नोकरी सुरू झाली ती म्हणजे जिथे मी दर रविवारी जायचे तिथल्याच चर्चमध्ये बुधवारी संध्याकाळची प्रार्थना सुरू झाली. म्हणजे बुधवारी मी ४ ला घरी परत आले की रात्रीचा स्वयंपाक करून परत ६ ते ८ चर्चमध्ये जायचे. तिथेही एक युरोपियन बाई माझ्याबरोबर मुले सांभाळायला होती. पोस्डॉकच्या काळात साधारण ३ वर्षात मी दीड वर्ष या ३ नोकऱ्या केल्या. त्यानंतर विनायकचा visa बदलला तो झाला H 1 आणि माझा डिपेंडंट विसा झाला H 4 या visa वर मात्र वर्क परमिट काढता येत नाही. मला इथल्या नोकरीचा अनुभव छान आला.  माझी नोकरी म्हणजे फक्त पॉकेट मनीपुरतीच पण सॅलरी चेक बँकेत भरताना छान वाटायचे. स्वतः च्या कमाईचा एक आत्मविश्वास वाटायचा. Wells Fargo या बँकेचे नाव पूर्वी Wachovia होते.

हा लेख थोडाफार बदल करून मोहिनी घारपुरे- देशमुख हिने संध्यानंद वर्तमानपत्रात (blog) ब्लऍगविश्व या सदरात प्रकाशित केला होता. प्रकाशन वार व दिनांक - मंगळवार - ११ जुलै २०१७.




Wednesday, May 17, 2017

माडीवाले कॉलनी - पुणे (1)

१९६१ साली पूर आला. पुरात जवळजवळ सगळेच वाहून गेल्यानंतर पुढे काय? हा प्रश्न होताच. साने माई यांचा बंगला माडीवाले कॉलनीमध्ये होता. त्या आईला म्हणाल्या  "तू अजिबात काळजी करू नकोस. माझ्याकडे एक खोली रिकामी आहे तिथे तुम्ही रहायला या." पूर आला तेव्हा माझे बाबा विश्रामबागवाड्यात कामावर गेले होते तर आई शिवणाच्या क्लासला गेली होती. माझी आजी (आईची आई) घरी पोळ्या करत होती. तिघेही तीन दिशेला होते. माझे आजोबा त्यावेळी वलसाडला होते काकाकडे. पूर येतोय ही बातमी कळताच बाबा कामावरून घरी आले  तोपर्यंत औंकारेश्वराजवळील नदीचे पाणी वाड्याच्या आतपर्यंत पोहोचत होते. बाबा सांगतात की जवळजवळ कमरेइतक्या पाण्यातून वाट काढून आम्ही कसेबसे बाहेर पडलो. बाबांनी पटापट जे सुचेल तसे आईचे दागिने, थोडीफार घरी असलेले पैसे आणि जे काही सुचेल तसे पटापट पँटच्या खिशात कोंबले आणि आजीला म्हणाले, चला चला लवकर बाहेर पडा. केव्हाही पाण्याची पातळी वाढेल आणि वाडा बुडेल. आजी म्हणाली, एव्हड्या पोळ्या करून घेते. तर बाबा म्हणाले, अहो पोळ्या कसल्या करताय, लवकर उठा आणि माझ्याबरोबर बाहेर पडा. आगाशे वाड्यात आईबाबांचे बिऱ्हाड होते. श्री व सौ आगाशे यांना बातमी कळताच सामान पटापट कुठेतरी उंचावर, गच्चीवर जसे जमेल तसे ठेवले होते आणि तेही बाहेर पडत होते. श्री आगाशे यांचे वडील गच्चीत जाऊन बसले होते. ते म्हणाले मी इथून कुठेही हालणार नाही. माझे काय व्हायचे ते होईल. त्यांना समजावता समजावता नाकी नऊ आले.




आई शिवणाच्या क्लासमध्ये होती. तिलाही बातमी कळली आणि ती आणि तिच्या मैत्रिणी लक्ष्मी रोडकडे जायला निघाल्या. खरे तर बातमी रात्रीच कळाली होती की पानशेतचे धरण फुटले आहे आणि पाण्याचे लोटच्या लोट वहायला लागले आहेत.  बाबा, श्री आगाशे आणि त्यांच्या शेजारचे आदल्या रात्री गप्पा मारताना "काही नाही हो, अफवा असतील, दुसरे काही नाही" अशा भ्रमात ! बाबा सांगतात आम्हाला पूर रात्री  आला असता तर आम्ही दोघेही या जगात नसतो आणि तुम्हा दोघी बहिणींनाही हे जग पाहता आले नसते. सगळेजण सदाशिव पेठेत राहणाऱ्या एका मामाच्या खोलीत येऊन पोहोचले. एका खोलीत १० - १५ माणसे!  आळीपाळीने काही आत आणि काही बाहेर असे करत होती. पूर येऊन गेल्यानंतर किती नासधूस झाली होती हे आईबाबांनी मला फोनवरून सांगितले आहे, त्याचे वर्णन पूढच्या लेखात करीनच. पण माडीवाले कॉलनीमध्ये सौ माई साने व श्री साने यांच्या बंगल्यामधल्या एका खोलीत आईबाबांनी त्यांचा नवा संसार कसा थाटला याचे वर्णन अप्रतीम आहे. मुद्दे लिहून ठेवलेत मी ते नंतर विस्तारीन.


माडीवाले कॉलनीतल्या त्यांच्या दुमजली बंगल्याच्या वर गच्ची होती. त्या गच्चीला लागून एक खोली होती. तिथेच माझा जन्म झाला. माझ्या बहीणीचा जन्म गोखलेनगरचा पण माई माझ्या आईला म्हणतात की अगं रंजना खऱ्या अर्थाने इथलीच ! आईला रंजनाच्या वेळी दिवस गेले व गरोदरपणाच्या ७ व्या महिन्यात तिने व माझ्या बाबांनी श्री व सौ साने यांचा निरोप घेतला ते गोखलेनगरला येण्यासाठी. गोखले नगर ही पूरग्रस्तांची कॉलनी आहे. तिथे माझ्या  आजोबांनी  पूरग्रस्तांच्या यादीमध्ये बाबांचे नाव लिहून जागेसाठी खटपट केली. वलसाडला असताना पुर आल्याची बातमी कळाल्यावर  त्यांनी मन खूप घट्ट केले आणि मनाशी म्हणाले की पुण्यात गेल्यावर  मला दोनापैकी एकच चित्र दिसेल ते म्हणजे की निळू आणि निर्मला जिवंत असतील किंवा नसतील !

क्रमश : ...



Thursday, May 11, 2017

तीर्थस्वरूप दादा


 मी माझ्या आईला नेहमी फोनवरून सांगते की तू तुजे अनुभव लिही. पण ती म्हणते मला काही लिहीता येत नाही. पण ९  मे रोजी पहाटे साधारण ३ ला तिने तिच्या वडिलांबद्दल थोडे लिहिले. सुरवात श्री नृसिंह जयंती च्या दिवशी झाली. मला खूप आनंद झाला आहे. आता ती पूर्वीचे तिचे अनुभव लिहून काढेल आणि फोनवर ते मी उतरवून घेईन आणि माझ्या ब्लॉगवर टंकेन. पूर्वीच्या काळचे अनुभव वाचायला मला खूप छान वाटणार आहे.


 *******

ती. स्व. दादा म्हणजे माझे वडील यांच्याविषयी थोडे विचार मनापासून. तुमचा व माझा तसा काहीही सहवास नाही पण ज्या काही गोष्टी आठवत आहेत त्या मी मनापासून लिहीत आहे. दुसरे म्हणजे मी तुमची सर्वात लहान मुलगी असल्याने तुम्ही खूप मोठे आहात वयाने व मनाने. तुम्ही कडक शिस्तीचे असल्याने व त्या काळच्या विचाराने मी असे ऐकले होते की तुम्ही खूप मुलांना मारलेत पण परिस्थितीच्या मानाने लाड केले असावेत.


मी तुमच्या हातून कधीच मार खाल्ला नाही. नाही म्हणायला एकदा करकरे वाड्यात (पुणे मुक्कामी) मार खाल्ला. साल १९५० साधारण असेल. पण नंतर तुम्हाला खूप वाईट वाटले व मला माझे आवडते दाणे गुळ खावयास दिलेत. नंतर १९५२ साली तुम्ही पनवेलला व मि पुण्यात होते. काही कारणाने ती. स्व. दाजीने (माझा भाऊ) मला पनवेलला पोहोचवले आणि योगायोगाने तुम्ही पण आईला सांगायचात की बाबीला इथे घेऊन ये. मी तिला मारणार नाही किंवा बोलणार पण नाही आणि थोडेच दिवसात रमा एकादशीला १९५२ साली तुम्हाला देवाज्ञा झाली.

माझ्या आईचे वय ८० आहे.

Friday, May 05, 2017

५ मे, २०१७

आजचा दिवस भूतकाळात रमणारा होता. माझ्या बाबांचे मित्र सरपोतदार काका फेसबुकावर आले आहेत. त्यांना मी फोन केला. शिवाय त्यांच्या मुलीशी सविताशी पण आज बोलले. आज माझा मूड गोखले नगर मूड होता. नंतर सुरेखा, जोशी काकू सगळ्यांना फोन लावले आणि बोलले. भाग्यश्रीला ही फोन लावला. जोशी काकू म्हणाल्या की तू भारतात आलीस की तुम्ही सर्व मैत्रिणी आमच्या घरीच जमा, मजा करा आणि खूप गप्पा मारा. त्या इतक्या काही प्रेमाने हे बोलल्या की मनाने मी लगेच गोखले नगरला जाऊन पोहोचले देखील.

गोखले नगरची आठवण येण्याचे अजून एक कारण असे आहे की आम्ही सध्या जिथे राहतो तो डोंगराळ प्रदेश आहे. पुण्यातील गोखले नगरचा भाग ही असाच डोंगराने व्यापलेला आहे. वेताळचा डोंगर, गणेश खिंड, पॅगोडा, हनुमान नगर, पत्रकार नगर, कांचन बन, चतुर्श्रींगी, पुणे विद्यापीठे, कमला नेहरू पार्क हे सर्व एकाच लाईनीत येते. आम्ही सर्व मैत्रीणींचे लहानपण, शाळा कॉलेजमधले दिवस ते अगदी आमच्या सर्वजणींची लग्न होईतोवर
आम्ही गोखले नगरला रहायचो.

आज मी आईशी फोनवर बोलतानाही तिला सांगितले की यावर्षीच्या भारतभेटीत मला गोखले नगर पहायचे आहे.
 आता मला त्याचे खूप वेध  लागलेत की मी सगळ्या मैत्रिणीना भेटून खूप गप्पा मारणार आणि खूप फोटोज घेणार. मुख्य म्हणजे आमच्या जुन्या घरी जाऊन मला माझ्या जाईला बघायचे आहे. जाईच्या फुलांचे आणि झाडाचे फोटोज घ्यायचे आहेत. हे मी जेव्हा प्रत्यक्षात करीनही पण त्याहीपेक्षा आज मी मनानेच तिथे जाऊन पोहोचले आणि सगळ्यांना भेटले आणि त्यामुळेच आज माझा सर्व दिवस भूतकाळात रमला.
 

वर जो फोटो आहे तो आम्ही जिथे राहतो तिथला  आहे.

Thursday, April 20, 2017

र‍ंजनारोहिणीच्या बाहुल्या मंडईत" जातात

बाबा गोष्टी खूप छान रंगवून सांगतात. त्यामुळे बाबा जिथे जातील तिथे सर्व लहान मुले त्यांच्या आजुबाजूला असतात. आजोबा गोष्ट सांगा ना ! असे म्हणल्यावर कोणती गोष्ट सांगु? भुताची, माकडाची की हत्तीची असे विचारतात. आम्हाला लहानपणी बाबा रोज गोष्टी सांगायचे. रोज एक तरी गोष्ट ऐकल्याशिवाय झोपलो नाही आम्ही दोघी बहिणी. त्यातली एक गोष्ट बाबांनी रचून सांगितलेली आहे. आणि तीच गोष्ट आम्हां दोघी बहिणींनाही खूप आवडते. गोष्टीचे नाव आहे " र‍ंजनारोहिणीच्या बाहुल्या मंडईत जातात" :D




तर एकदा काय होते रंजनारोहिणीच्या बाहुल्या मंडईत जायचे ठरवतात. पण कधी जायचे आणि सगळ्यांची नजर चुकवून केव्हा जायचे? तर रंजनाची बाहूली म्हणते की आपण बाबा उठतात दूध आणायला तेव्हा पहाटेच उठून जाऊ. रोहिणीच्या बाहुलीलाही ते पटते. रात्री झोपायच्या आधी त्या दोघींच्या बाहुल्या नट्टा पट्टा करून तयार होतात आणि हळूच रंजनारोहिणीला झोप लागली का ते पाहून दोघींच्या पांघरूणात शिरतात. पहाट होते. बाबा उठतात आणि दार उघडे करून ठेवतात. शर्ट पॅंट घालून दुधाच्या बाटल्या घेऊन निघतात. रोहिणीची बाहूलीचे बारीक लक्ष असते. बाबा उठल्यावर ती हळूच रंजनाच्या बाहूलीला उठवते आणि म्हणते चल. लगेच जाऊया आपण. दार उघडेच आहे. त्या दोघी बाहुल्यांनी नट्टा फट्टा आधीच करून ठेवलेला असतो त्यामुळे वेळ न घालवता २ मोठाल्या पिशव्या घेऊन दरवाजातून हळूच बाहेर पडतात. फाटकाचे दार आवाज येणार नाही याची काळजी घेऊन लावतात आणि रस्यावरून चालायला लागतात. रिक्षाला हात करून थांबवतात. रिक्षावाल्याला सांगतात. आम्हाला मंडईत जायचे आहे. रिक्षावाला त्यांना मंडईत आणून सोडतो तेव्हा उजाडलेले असते. बाजार नुकताच सूरू झालेला असतो. भाज्यांचे गड्डे टोपलीत ठेवून भाजीवाल्या बायकाही आलेल्या असतात. बाहूल्यांना असा काही आनंद होतो. आणि त्या दोघी मिळून बरेच काही घेतात. बोरे, चिंचा आवळे, कोथिंबीर, मिरच्या, भाज्या, फुले. असे करता करता भाज्यांच्या पिशव्याही जड होतात. आणि गर्दीतून वाट काढत काढत त्या चालत येताना बाबांना दिसतात. बाबा विश्रामबागवाड्यात कामावर येताना चितळे बंधूच्या दुकानापाशी या बाहुल्या भांबावलेल्या अवस्थेत उभ्या असलेल्या बाबांना दिसतात. बाबा म्हणतात अरे या तर आपल्या रंज्यारोहिणीच्या बाहूल्या? या इथे कश्या आल्या? मग ते बाहुल्यांपाशी गेले आणि त्यांना रिक्षात बसवून दिले. बाबा म्हणाले आता परत अश्या कुठेही एकट्या जाऊ नका. इथे या गर्दीत तुम्ही चेंगरल्या असता तर? बाहुल्या म्हणाल्या, आम्ही परत असे नाही करणार. पण आम्हाला रंजना रोहिणी ओरडणार नाहीत ना? नाही ओरडणार. मी सांगीन त्यांना ओरडू नका म्हणून.



रिक्षाने रंज्यारोह्याच्या बाहुल्या घरी आल्यावर. फाटकाची कडी हळूच उघडली आणि जड पिशव्या घेऊन आत आल्या. तोपर्यंत रंजारोह्या उठून दात घासत होत्या. दात घासून चहा प्यायला आणि बाहेर येऊन पाहतात तर दोन पिशव्या भाज्यांनी भरलेल्या! अरे कोणी आणल्या या भाज्या? असे म्हणून इकडे तिकडे बघतात तर काय दोघींच्या बाहूल्या एका कोपऱ्यात उभ्या राहून हिरमुसलेल्या ! मग त्यांच्या लक्षात आले आणि बाहुल्यांना विचारले, काय गं तुम्ही आणली ही दोघींनी भाजी? आणि इतका नट्टा फट्टा कधी केलात. मग त्यांनी जे काही केले ते सांगितले आणि त्यांना बाबा मंडईत भेटले आणि त्यांनी आम्हाला रिक्षात बसवून दिले हेही सांगितले. मग त्या दोघी बाहुल्यांना ओरडल्या आणि म्हणाल्या आम्हाला सांगितले असते तर आम्ही घेऊन गेलो असतो तुम्हाला. पण एकट्याने कशाला जायचे? एवढे धाडस का करायचे. बाहुल्या म्हणाल्या आम्ही चुकलो. आम्ही परत असे कधीही करणार नाही. मग आई बाहेर आली म्हणाली जाऊ दे गं. त्या आता परत नाही अश्या वागणार. बघू तरी त्यांनी काय काय आणले आहे ते? बोरे, आवळे, चिंचा, आणि काय काय आई कोथिंबीर आणि भाजी पाहून खुश झाली. आणि रंज्यारोह्या रानमेवा पाहून खुष झाल्या. त्या बाहुल्यांना बोरे चिंचा दिल्या आणि म्हणाल्या पळा आता समोरच्या पारावर बसून खा ! बाहुल्या खुश झाल्या. आणि बाहुल्यांनी धाडस करून मंडईत जाऊन भाजी आणल्याबद्दल रंजनारोहिणीलाही बाहुल्यांचे खूप कौतुक वाटले.


त्या रात्री परत रंजना रोहिणीच्या पांघरूणात बाहुल्या शिरल्या आणि झोपल्या !

गोष्ट संपल्यावर बाबांनी आम्हा दोघी बहिणींना विचारले "कशी वाटली गोष्ट? " आम्ही बाबांना म्हणालो "बाबा आत्तापर्यंतच्या सर्व गोष्टींमध्ये आम्हाला हीच गोष्ट खूप आवडली. :D

Thursday, March 16, 2017

१६ मार्च २०१७

आजचा दिवस खुप बरे वाटले असे आपण म्हणतो ना तसाच आहे अगदी. काल आणि आज प्रचंड थंडी आहे. त्यामुळे काल कामावर जाऊ नये असेच वाटत होते. आज सुट्टी असल्याने आरामात उठले. कालच आजचा विनायक ला द्यायचा डबा तयार केला आणि माझ्यासाठीही पोळीभाजी.


थंडी म्हणजे महाभयंकरच आहे. त्यामुळे अंगदुखी आणि सोबत डोकेदुखीही आहे. आज मी  माझ्या मामेबहिणीशी बोलले. ती म्हणाली आम्ही काही बहिणी तिच्या लग्नात खूप लहान होतो. तिने आठवण सांगितली आणि मलाही ते आठवले आणि इतके काही छान वाटले ना ! ती म्हणाली तुम्ही माझ्या लग्नात रडलात, आणि विचारले तर म्हणालात ती रडली म्हणून मी रडले. आणि लग्नात रडायचे असते म्हणून आम्ही रडलो असे सांगायचात. मलाही ते आठवले आणि इतके हासू फुटले , विचार केला की असे हुकमी रडायला कसे काय आले आपल्याला? मजा असते ना लहांपणची ही.

आज मोनिकाशी फोनवर खूप बोलले. तिनेही तिच्या घरी तिची चुलत बहीण आली होती आणि त्या बहिणीची छोटी मुलेही आली होती. ती सर्व आल्यावर काय काय मजा केली असे तिने सांगितले. आणि तिची मुले कशी गोड आहेत हे वर्णन केले त्यामुळे अगदी तसेच्या तसे चित्र माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले. तिने केलेले वर्णन ऐकून खूपच छान वाटले मला. मग मी पण मी काय काय योजले आणि माझ्या मनात काय काय करायचे आहे भारतभेटीमध्ये ते तिला सांगितले.
 
 
आज एका म्युझिक ग्रुपवर एक थीम होती त्यामध्ये मी जैसे राधाने माला जपी हे गाणे टाकले. गाणे थोडे गाऊन पाहिले. मला हे गाणे पाठ आहे आणि जसेच्या तसे म्हणताही येते. पण म्हणायला तसे अवघड आहे. सराव करायला लागेल. मग मी रिमझिम गिरे सावन गायले आणि रेकॉर्ड केले. युट्युबवर अजून अपलोड करायचे आहे. छान गायले गेले माझ्याकडून. जाणवत आहे अगदी.

 तर आज गाण्यांवरून आठवत गेले आणि मग थोडेसे त्याबद्दल लिहून फेबुवर टाकले. आजचा दिवस खूप वेगळा आणि बरे वाटण्याचा गेला म्हणून मग रोजनिशीत तो लिहिला. आता झोपायला हवे. उद्या कामावर जायचे आहे. :( पण उद्या हवा तशी बरे आहे ते एका अर्थी चांगलेच आहे म्हणायचे. फेबुवर लिहिलेले इथेही रोजनिशीत लिहीत आहे.
 
 
"लालला ललालाला लाललललल लललललाला" हा आलाप आहे "ये दिल और उनकी निगाहोंके साये" या गाणामधला. पूर्वी भारतात असताना आम्ही जेव्हा मोठाच्या मोठा टेप रेकॉर्डर घेतला होता त्याला स्टिरिओ साउंड होते त्याचे वेगळे बॉक्सेस होते. ज्या गाण्यांमध्ये बरीच वाद्ये आहेत अशी गाणी त्यावार जास्त चांगली वाजली जातात. प्रत्येक वाद्यवृंदाचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो. तेव्हा ये दिल और उनकी अगणित वेळा ऐकले आहे.




आयायटीत असताना जेव्हा आम्ही टु इन वन घेतला तेव्हा आम्हाला एक कॅसेट फ्री मिळाली होती ती होती आँधी आणि मौसमची. तेव्हा नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी तुलसी ब्लॉक्स बांधले होते. ब्लॉक्स नवीन असल्याने खोलीत गाण्याचा आवाज घुमायचा. या जागेत आम्ही" इस मोडसे जाते है" हे गाणे अगणित वेळा ऐकले आहे.
अमेरिकेत जेव्हा पहिल्यांदा आलो त्या जागेत टु इन वन घेतला. डॅलसवरून तेव्हा हिंदी गाणी २४ तास रेडिओवर प्रसारित व्हायची. तेव्हा "राधा कैसे न जले" हे गाणे रोज लागायचे. हे गाणे मी अगदी रेडिओला कान देवून ऐकायचे. काही रिकाम्या कॅसेट विकत घेतल्या त्यात एका विद्यार्थ्याने आम्हाला "मनमें नाचे मनकी उमंगे" हे गाणे रेकॉर्ड करून दिले होते. हे गाणे असेच अनेक वेळा ऐकले. या गाण्यात लताचा आवाज इतका काही मधुर आहे की कोणीतरी आपल्या कानात मध ओतत आहे असेच वाटते.



"अब कब आओगे बालमा" हे गाणे क्लेम्सन मध्ये राहत असताना बरेच वेळा ऐकले आहे. पाऊस पडतोय, आकाशातून ढग चालले आहेत आणि हे गाणे असे मिश्रण असायचे बरेच वेळा त्या खोलीत. क्लेम्सन मध्ये असताना डेस्क टॉप घेतला होता आणि त्यावेळी म्युझिक इंडिया ऑनलाईन वर बरीच आणि पाहिजे ती गाणी ऐकता येतात हे नव्यानेच कळाले होते. याच डेस्कटॉपवर "डोला रे डोला रे डोला रे डोला" आणि "होठोमें ऐसी बात" बरेच वेळा ऐकलेले आहे.




विल्मिंगटन मध्ये राहत असताना परत एकदा नव्याने टु इन वन आणला तेव्हा तेरे मेरे सपनेमधली गाणी बरेच वेळा ऐकली होती. काही कॅसेट आम्ही भारतातून येताना आणल्या होत्या तेव्हा त्यातली एक माझी अत्यंत आवडती कॅसेट म्हणजे तेरे मेरे सपने ची.





"देव माझा विठू सावळा" हे गाणे आणि झोपेतून जागे होणे अगदी एकाच वेळेला. पाऊस पडतोय. रेडिओवर भक्तीगीते लागलेली आहेत. उठावे तर लागणारच आहे. शाळा आहे ना !
गाण्यांच्या आठवणींमध्ये मन तरंगत तरंगत कुठच्या कुठे निघून जाते ना !