Wednesday, August 08, 2007

माझी आई (3rd online competition on H4 marathi mulinche mandal)

मी अमेरिकेत राहून आईला मिस करते म्हणजे मी गप्पांना मिस करते. आई ही माझी सर्वात पहिली मैत्रिण. तिच्याजवळ मी मनातले सर्व काही बोलते. काही काही वेळा तर मी मनातल्या मनात आईशी गप्पा मारते. माझ्या फोनची आतुरतेने वाट पहाणारा तिचा चेहरा मला दिसतो आणि दर आठवड्याच्या बुधवारी आईशी फोनवर बोलणार म्हणजेच भेटणार या आनंदात मी असते.

मी माझ्या आईच्या हातचे खाणे मिस करते असे आता मी म्हणणार नाही कारण तेवढी लहान मी नाही. याउलट आपण भारतात गेल्यावर आपण तिला आपल्या हातचे काय काय खायला घालू अशी यादी मी बनवत असते. माझी आई कशी आहे याबद्दल सांगायचे झाले तर पहिले म्हणजे ती सतत हसतमुख आहे, अन्नपूर्णा आहे. शिवाय एक उत्तम नियोजक व व्यवस्थापक आहे. म्हणजे अगदी लहानात लहान कार्यक्रम असला ना (उदा. हळदी कुंकू) तरी तो खूप साग्रसंगीत करते. तिने मनात ठरवल्यापेक्षाही तो कार्यक्रम काकणभर जास्त चांगला होतो.

आम्ही दोघी बहिणी जेव्हा वयात आलो तेव्हा तिने आम्हाला सांगितले की तुम्ही आता लहान नाही. तुम्ही मोठ्या होत आहात. या वयातच तुमचे व्यक्तिमत्त्व घडणार आहे, तेव्हा त्याकडे लक्ष द्या. एकदा हे वय निघून गेले की ते परत येणार नाही, आणि नंतर विचार करून त्याचा काहीही उपयोग नाही.

माझ्या आईचा अजून एक गुण म्हणजे ती खूप हौशी आहे. नागपंचमीचा सण आला की तुळशीबागेत जाऊन आम्हाला कानातले गळ्यातले आणणार. आणि नागपंचमीच्या आदल्या रात्री आमच्या हातावर मेंदी लावणार. प्रत्येक सण उत्साहाने व आनंदाने साजरे करणार. आमच्या दोघी बहिणींच्या वाढदिवसाच्या दिवशी आमच्या आवडीचे पदार्थ करणार. ती उत्तम पंजाबी सूट शिवते, त्यामुळे आम्ही कॉलेजमधे असताना सर्व प्रकारच्या फॅशनचे पंजाबी सूट घातले आहेत. नुसते आमच्या दोघींचेच हौशीने करणार नाही तर तिच्या सर्व भाचवंडांचे, त्यांच्या नातवंडाचे करणार. माझी एक मावसबहीण आहे ती आमच्या घरी आली की नेहमी म्हणते की आता माझ्या मुलांचा " लाड एरिया" सुरू झाला.

अमेरिकेवरून फोन करताना आता सवयीने तिलाही माहित झाले आहे की ठराविक मिनीटांचे कॉलिंग कार्ड असते आणि मिनिटं संपली की आपोआप फोन कट होतो, तरीसुद्धा मी तिला सांगते "हं आई, कार्ड संपत आले बरं का, आपोआप फोन कट होईल" तेव्हा ती म्हणते " हो हो अच्छा बाय बाय करून ठेवू या. किती पटकन वेळ जातो ना!"

लग्नाअधी मी नोकरी करायचे तेव्हा डबा पण साग्रसंगीत. एका पोळीमधे तूपसाखर, एका पोळीमध्ये लोणचे/चटणी, भाजी आणि एका बाटलीत ताक. हे ताक मी खूपच मिस करत आहे. पुढील भारतभेटीमध्ये भरपूर ताक पिऊन घेणार आहे.

आता आई खूप थकली आहे, पण उत्साह किती!! मी आईला नेहमी म्हणते की तुझा निम्मा उत्साह पण आमच्या दोघींच्यात नाही. तिने केलेले संस्कार आम्हां दोघी बहिणींना शेवटपर्यंत उपयोगी पडतील यात वाद नाही. तिची अजून एक शिकवण म्हणजे ती म्हणते तुम्ही बाकी काहीही सहन करा पण अन्याय सहन करू नका. यशाने हुरळून जाऊ नका व दु:खात खचू नका. अशा या प्रेमस्वरूप व वात्सल्यसिंधु आईला माझा साष्टांग दंडवत.

आज ती ७३ वर्षाची आहे. तिच्या पुढील आयुष्यात तिला उत्तम आरोग्य लाभो अशी देवाजवळ प्रार्थना करून मी माझे लिखाण थांबवते.

आईवर लता मंगेशकर यांनी एक खूप सुंदर गाणे गायले आहे ते खाली दिलेल्या दुव्यावर जरूर ऐका. गाणे असे आहे "प्रेमसवरूप आई वात्सल्यसिंधू आई, बोलावू तुज आता मी कोणत्या उपायी"

http://www.musicindiaonline.com/music/marathi/s/artist.653/



रोहिणी गोरे

Wednesday, August 01, 2007

मैत्री (2nd online competition on H4 marathi mulinche mandal)

२५ जुलै रोजी रात्री झोपायच्या आधी ऑर्कुटवर अदितीने एच ४ वर स्पर्धेचा विषय घोषित केलेला धागा वाचला आणि मन भूतकाळात गेले. मैत्रिणींच्या आठवणींनी मन तरंगायला लागले आणि मैत्रीबद्दल काय लिहावे याबद्दल डोक्यात विचारांची गर्दी उसळली आणि त्यातच मला झोप लागली.

दुसऱ्या दिवशी उठल्यावर कामे करता करता मैत्रिबद्दलच्या लिखाणाचा एक आराखडा तयार झाला आणि तोच मी तुमच्यापुढे सादर करत आहे. माझ्या मते मैत्री म्हणजे गप्पा मरताना मिळालेला निखळ आनंद, एकमेकांना वाटणारा आधार, मनातल्या गोष्टी बोलून दाखवण्याचे एक स्थान, काही गोष्टी एकत्र करताना घालवलेला वेळ. मात्र यासाठी एकमेकांचे विचारप्रवाह जुळायला हवेत.

आपला जन्म म्हणजे एक मैत्रिचा प्रवास आहे असे मला वाटते. या मैत्रिच्या प्रवासात प्रत्येक टप्प्यावर आपल्याला विविध प्रकारचे मित्रमंडळ भेटत रहाते ते अगदी जीवनाच्या अंतापर्यंत. अशा या प्रवासात जीवाला जीव देणारी मैत्रिण काही कारणाने एकदम पाठ फिरवते तेव्हा अतोनात वाईट वाटते किंवा एखादी लहानपणची मैत्रिण लग्नानंतर एकदम आपल्या समोर येऊन उभी रहाते आणि विचारते, "अगं तू इथे कशी काय?" तेव्हा वाटते आपण स्वप्न तर बघत नाही ना!! तर मंडळी आपल्या या मित्रमैत्रिणींमध्ये काही मित्रमैत्रिणींच्या आठवणी मनात कायम घर करून रहातात आणि त्या नुसत्या आठवल्या ना, तरी सुद्धा छान वाटते.

आता ही शैलाच पहा ना!! गोल चेहऱ्याची व पांढऱ्या शुभ्र दातांची, दोन वेण्या रिबीनीने शेवटपर्यंत नेऊन परत वर्पर्यंत बांधणारी. तिचे कुंकू नेहमी कपाळाच्या मध्यावर व काळ्या रंगाचे व दुपट्टा उपरण्यासारखा घेत असे. ही हसतमुख चेहऱ्याची शैला अजुनही माझ्या डोळ्यासमोर जशीच्या तशी आहे. सर्व प्रकारची कलाकुसर अवगत असलेल्या भैरवीला तर मी कधीच विसरू शकत नाही. मी तिला कधी रिकामी बसलेली पाहिली नाही. आशा व सुषमा या दोघीजणी इतक्या काही प्रेमळ आहेत ना की अजूनही मी त्यांच्याकडे चार दिवस मोकळेपणाने राहू शकते.

अमेरिकेत पाऊल टाकल्यावर भेटलेली माधवी. तास न तास दूरध्वनीवर मारलेल्या गप्पा, आम्ही दोघींनी मिळून निसर्गाची काढलेली छायाचित्रे, एकमेकींच्या घरी जाऊन वेगवेगळे पदार्थ बनवून ते रेडिओ ऐकता ऐकता खाणे, हे मी कसे काय विसरू शकेन? याहू निरोपकावर भेटलेली इंग्लंडमधली श्रावणी तर खूपच लाघवी. मी सकाळी उठून संगणक सुरू करताच यायची आणि म्हणायची "सुप्रभात रोहिणी, चहा झाला का?" आणि मग मी पण लगेच "चहाच घेत आहे. तुझे झाले का जेवण? आज काय बेत होता?" आणि मग गप्पा मारता मारता अधुनमधून इतर कामे असा माझा दिवस सुरू व्हायचा.

मित्रत्त्वाच्या नात्याबद्दल लिहिता लिहिता मी स्पर्धेतल्या शब्दांची मर्यादा ओलांडली तर नाही ना?!! मोजक्या मित्रांच्या गोड आठवणी सांगायच्या राहूनच गेल्या की!!

रोहिणी गोरे