Friday, March 26, 2010

पत्र

तुम्हाला पत्र लिहायला आवडते का? मला तर खूप आवडते! पत्र लिहिताना मला जास्तीत जास्त सुवाच्य अक्षर काढायला आवडते. अगदी सुरवातीला लहान असताना मी पत्र लिहिले ते पोस्टकार्डावर. मला आठवत आहे त्यावर आधी मी पट्टीने रेघा मारून घेतल्या होत्या व पत्र लिहिले होते. त्या छोट्या पत्रात मी एक वेगळा परिच्छेद पण केला होता. पोस्टकार्ड व इनलँड मध्ये मला पोस्टकार्ड जास्त आवडते. थोडक्यात काही सांगायचे असेल, खुशाली कळवायची असेल आणि वरचेवर पत्र पाठवायची असतील तर पोस्टकार्ड उत्तम!




आमच्या घरात सगळ्यांनाच पत्र लिहायची आवड आहे. पूर्वी आईबाबा त्यांच्या भावडांना व भाचवंडांना पत्रे लिहीत असत. आम्हा दोघी बहिणींना कळायला लागल्यापासून आम्हालाही पत्र लिहायची उत्सुकता वाटू लागली. आईला सांगायचो आम्हाला पण पत्र लिहायचे आहे. आई तशी सविस्तर पत्रे लिहायची त्यामुळे तिला नेहमी इनलँड पत्रे लागत. निळ्या रंगाची होती ही पत्रं. त्यात आई आम्हाला दोघींना चार ओळी लिहिण्यासाठी जागा सोडायची. मग आम्ही दोघी बहिणी आईला विचारायचो काय लिहू गं पत्रात? आई म्हणायची काहीही लिहा, तुम्हाला जे वाटेल ते, मनात येईल ते. मग आम्ही दोघी बहिणी मिळून ठरवायचो काय काय लिहायचे ते. आही आईचे पत्र वाचायचो तिने कसे लिहिले आहे ते बघायचो. आईची पत्राची सुरवात नेहमी पत्र लिहिण्यास कारण की ------- जे निमित्त असेल त्याने सुरवात करायची. आम्ही लिहायचो पत्र लिहिण्यास कारण की "असच" किंवा पत्र लिहिण्यास कारण की "उगीचच" आता खूप हसू येते. नंतर कळायला लागले की पत्राची सुरवात अगदी याच वाक्याने झाली पाहिजे असे नाही.




पत्राच्या शेवटी ताजाकलम पण क्वचित लिहावा लागतो. पत्र लिहून झाले आणि काही सांगायचे राहून गेले असेल तर पत्राच्या खाली ता. क. यामध्ये जे राहून गेले असेल ते लिहायचे. या ताज्या कलमाने आम्ही सगळ्या भावंडांनी खूप धमाल केली होती एका पत्रात. सर्वात मोठ्या मामेबहिणीचे लग्न ठरले तिला अभिनंदनाचे पत्र लिहिले आम्ही सर्वांनी मिळून. त्यात बरेच ताजाकलम लिहिले गेले. ते अनुक्रमे असे होते. ता. क. "एं कसा गं दिसतो तुझा 'न' (नवरा) , ता. क. "भुरकून पी" , ता. क. "दिल्या घरी तू सुखी रहा" (नवऱ्याचे नाव दिलीप) , ता.क. " हा ताजा कलम पत्रातच दडला आहे शोधून काढ" हे ताजेकलम इतके लिहिले ना आम्ही नुसती धमाल. शेवटी अगदी छोटी रिकामी जागा दिसली तरी गिचमिडीत नवीन सुचलेले ताजाकलम घुसवायचो.



लग्नानंतर मी दर महिन्यात आईबाबा व सासुसासरे यांना पोस्टकार्ड टाकत असे. एकदा माझा भाऊ म्हणाला "काय गं तू पत्र लिहितेस की रेसीपीज, प्रत्येक पत्रात जो पदार्थ करून पाहिला त्याची रेसीपी. जरा दुसरे पण लिही की काहीतरी" जेव्हा आमचे लग्न झाले तेव्हा विनायकचा मित्र म्हणाला की वसतीगृहाच्या खोल्या दिल्या गेल्या की लगेच पत्राने कळवतो तुला मग या तुम्ही इथे. लवकरच मिळाल्या. त्याचे पत्र आले आणि आम्ही लगेच निघण्याच्या तयारीला लागतो. आता मजा वाटते. आजच्या काळात टकाटका मोबाईल वाजले असते ना! पत्राची भानगडच नाही.



लग्नानंतर आयायटीत रहायला गेलो आणि आईबाबांना व सासुसासऱ्यांना मी पत्रातून आमच्या लग्नानंतरच्या दिवसांची पत्रे लिहू लागले. आईबाबांची पण सविस्तर पत्रे मला येत असत. आयायटी वसतिगृहात सर्वात खालच्या मजल्यावर एक बोर्ड होता नोटीसबोर्डसारखा. त्यामध्ये खोल्या क्रमांक लिहिले होते त्या कप्यात पोस्टमन पत्रे टाकून जात. माझ्या सारख्या चकरा खाली पत्र आले का ते पहायला. आता रोज कसे काय पत्र येईल ना! पण जेव्हा आमच्या खोल्या क्रमांकाच्या कप्यात पत्र दिसे तेव्हा मला खूप आनंद होई. आईबाबांच्या पत्राचे तर मी पारायण करायचे.




अमेरिकेत आल्यावर सुरवातीला वेळ जाता जात नव्हता. असाच एक दिवस खूप कंटाळा आला. मनात खूप साठले होते. कुणालातरी सांगावेसे वाटत होते. तो दिवस आठवत आहे मला अजूनही. त्यादिवशी आभाळ भरून आले होते. कंठ दाटून आला होता. थोड्याच वेळात मुसळधार पावसाला सुरवात झाली आणि एकदम मूड आला. आईला पत्र लिहायला घेतले आणि मनातले सर्व उतरवले गेले कागदावर. त्या पत्राचेही असेच पारायण केले. खूप आनंद झाला होता मला. आईने माझे पत्र वाचले की तिलाही किती आनंद होईल या विचाराने खूप सुखावले. पत्राची सुरवात केली. आत्ता या ठीकाणी खूप मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाकडे बघतच तुला पत्र लिहीत आहे........




आयायटीतली माझी मैत्रिण जेव्हा अमेरिकेला गेली तेव्हा तिचे मला पत्र आले होते. तेव्हा मला खूप आनंद झाला होता. मी पण तिला तिच्या पत्यावर सविस्तर पत्र लिहिले. पत्ता पण दोन तीन वेळा चेक केला बरोबर लिहाला आहे ना! तेव्हा किती वेगळेपणा वाटला होता या अमेरिकेच्या पत्राबाबत. अशी ४-५ पत्रे आम्ही एकेमेकींना पाठवली होती. आत्ताचा काळ असता तर ती अमेरिकेत पोहोचण्या आही मीच तिला ईपत्र पाठवले असते पोहोचली का व्यवस्थित?




पूर्वीचा पत्र लिहिण्याचा काळ खूप छान होता. पत्रामध्ये आपण बरेच काही लिहू शकतो. पत्र वाचले की तो किंवा ती एकमेकांना भेटल्यासारखे वाटतात. आपलेपणा वाटतो. हे सर्व ज्यांनी पत्रलेखन केले असेल त्यांनाच कळेल. मी अगदी आत्ता आत्तापर्यंत पत्र पाठवत होते. अमेरिकेतल्या सुरवातीच्या काळात काही पत्रे मलाही आलेली आहेत. काळ इतका काही बदलला आहे की पत्राचा जमाना मागे पडला आहे म्हणण्यापेक्षा पूर्णपणे बंद झाला आहे. पत्राची जागा ईपत्राने घेतली आहे असे जरी म्हणले तरी कोण कुणाला ईपत्रातून सविस्तर लिहित असेल? कोणीच नाही. लिहिले तरी जरूरीपेक्षा जास्त शब्द नसतीलच.


परत पत्रलेखनाला सुरवात करावी काय? असा विचार चालू आहे. हाहाहा! किती हास्यास्पद विधान आहे ना!

 










 

Thursday, March 11, 2010

किसीके जाने के बाद करे फिर उसकी याद...

बसथांब्यावर येताच त्याचे हृदय जास्त वेगाने धडधडायला लागते, कारण "ती" येणार असते. स्वतःशी स्मितहास्य करत तो घड्याळाकडे बघतो, तेव्हढ्यात "ती" येते. उंच टाचेच्या चपला घालून व लांबसडक शेपटा हलवत. बसथांब्यावर त्याच्या शेजारीच उभी राहते. आपले घड्याळ बंद तर नाही ना! याची खात्री करून घेण्यासाठी घड्याळ कानाजवळ नेते व आश्चर्यचकीत मुद्रा करून त्याला विचारते "किती वाजले? "



हा प्रश्न विचारताच तो भांबावून जातो आणि आपल्याच तंद्रीत विचार करायला लागतो. बस येते. बसमध्ये चढताच तिला सांगतो ९.१५ आपल्या प्रश्नाचे इतक्या वेळाने उत्तर आलेले पाहून ती मनातल्या मनात हसते. दुसऱ्या दिवशी पण ती अशीच लगबगीने बसथांब्यावर येते. तिथे तो तिची वाट पाहत उभाच असतो. बस येताच दोघे चढतात बसमध्ये. अरे वा! आजचा दिवस तर खूपच छान आहे! असे हावभाव त्याच्या चेहऱ्यावर उमटतात. कारण की आज अगदी तिच्याजवळ उभे रहायची संधी मिळते. मनातल्या मनात सुखावतो. तितक्यात बसमध्ये दोन जागा रिकाम्या होतात. ती लगेच जाऊन खिडकीजवळील जागेवर बसते. त्याला पण तिच्या शेजारीच बसायचे असते, पण तेवढ्यात "ती" जागा दुसराच कुणीतरी घेतो. आता बसमध्ये इतकी गर्दी झालेली असते की त्या गर्दीतून त्याला फक्त तिच्या कानाजवळील केसाची बट व तिच्या हातातील पुस्तकच दिसत असते.



तिसऱ्या दिवशी त्याचा धीर चेपतो. तिला पाहिल्यावर आपणहून तिला "हाय! " करतो. ती पण लगेचच गोड हासून "हाय! " करते. हे असे रोजच चालू असते. एकदा त्याच्या मनात विचार येतो ही कोणत्या ऑफीसमध्ये काम करते हे तरी पाहू. तिचा बसथांबा येताच तोही उतरून तिच्या पाठोपाठ चालायला लागतो. तिला संशय येतो. ती मागे वळून पाहते. लगेच शिताफीने तो एकदम बूट पॉलीश करायला उभा राहतो. एके दिवशी तिचे घर पहायला म्हणून तिचा पाठलाग करतो. त्या दिवशी मात्र तो फसतो, कारण रस्त्यावर कोणीच नसते जेणेकरून पटकन दुसरीकडे मोर्चा वळवून मी त्या गावचाच नाही हे त्याला दाखवता येत नाही.



एके दिवशी ती त्याच्या ऑफीसमध्ये येते. त्याला वाटते की ही आता आपल्या बॉसकडे आपली तक्रार करणार. सारखे तिला विनवतो "मै ऐसावैसा आदमी नही हुँ । मै बहूत शरीफ आदमी हूँ । यकीन नही होता तो मेरा कॅरेक्टर सर्टीफिकेट एख लिजिए " एवढे बोलूनही ती त्याला न जुमानताच त्याच्या साहेबाच्या खोलीमध्ये शिरते. थोड्याच वेळात ऑफिसमधला शिपाई त्याला निरोप सांगतो "तुम्हाला साहेबांनी आत बोलावले आहे" चेहरा पाडून, नाकाला बोट लावून बावळट चेहऱ्याचा अमोल पालेकर उर्फ अरूण त्याच्या साहेबाच्या खोलीमध्ये शिरताच त्याला एक सुखद धक्का बसतो. त्याचा साहेब विद्या सिन्हा उर्फ प्रभा हिच्याशी ओळख करून देतो आणि सांगतो की कामाच्या काही कागदपत्रांबद्दल यांच्याशी बोला. अरूण अतिशय आत्मविश्वासाने तिच्याशी त्या संदर्भात बोलतो. इथे सुरवात होते "छोटीसी बात.. "



आपल्याला आवडलेल्या मुलीशी आपण व्यवस्थित बोलू शकतो व तिचे आपल्याविषयी कोणतेही वाईट मत नाही या गोष्टीने तो खूपच आनंदीत होतो व पुढची स्वप्नं पहायला लागतो. पण म्हणतात ना स्वप्ने पाहणे ठीक आहे पण ती प्रत्यक्षात उतरायला हवीत ना! जरा इकडे तिकडे पाहा बरे! तुमच्या आजूबाजूला अनेक स्पर्धक आहेत. त्यातील एक स्पर्धक म्हणजे असरानी उर्फ नागेश.



नागेश हा आत्मविश्वासमें "ज्यादा" असलेला तरूण प्रभाच्या ऑफीसमध्ये असतो. त्याला शतरंज व टेनिसमध्ये स्वारस्य असते. आत्मविश्वासमें "कम" असलेला अरून आपल्या प्रतिस्पर्धी नागेशवर कशी मात करतो ते या चित्रपटात दाखवले आहे. सुरवातीला अरूण प्रभाला उपहारगृहामध्ये भेटायला बोलावतो तर तिथे नेमका नागेश!! जरूरीपेक्षा जास्त "वटवट" करून बाजी मारून जातो. बसथांब्यावर बससाठी ताठकळत उभ्या असलेल्या प्रभाला नागेश स्कूटरवर आपल्या मागे बसवून ऑफीसमध्ये जातो. आपण पण प्रभाला आपल्या स्कूटरवर आपल्या मागे बसवून घेऊन जाऊ या कल्पनेने तो उत्साहात एक दुचाकी खरेदी करतो. खरे तर त्याला नागेश सारखीच स्कूटर खरेदी करायची असते पण गॅरेजमधले "चालू" लोग बिघडलेली मोटरसायकल अरूणच्या गळ्यात मारतात. स्वप्नाळू अरूण मोटरसायकल घेऊन येतो व प्रभाला म्हणतो बस मागे. पण हाय रे देवा!!! तिला घेऊन जाताना ती मध्येच बंद पडते. असे एक ना अनेक प्रयत्न!!! कोणत्याच प्रयत्नांना यश येत नाही जेणेकरून प्रभाचे मन अरूणवर जडेल. शेवटी वैतागून भविष्य, साधूमहाराज, मात्रिंकाकडून गंडा बांधून घेणे असे प्रयत्न सुरू होतात. शेवटी एकाला यश मिळते. डॉ नगेंद्रनाथ ज्युलिअस... उर्फ अशोक कुमार. खंडाळ्याला अरूणची "प्रेममें कामयाँब होने की शिक्षा शुरू होती है...




अरुणशी प्राथमिक ओळख व त्याची समस्या डॉ नगेंद्रनाथ ज्युलिअस समजावून घेतात. त्याची ओळख होताक्षणी दोन तीन धडे समजावतो. पहिला धडा " पहिले काम सारखा सारखा खाजवणे बंद कर. " धडा दुसरा " दुसऱ्याशी हातमिळवणी करताना जबरदस्त आत्मविश्वास दाखवून हातात हात घट्ट पकडून, नजरेला नजर मिळवून संवाद साध. और सबक तिसरा " सांगितलेली गोष्ट कळली नाही तर उगाच मान डोलावून कळली असे सांगू नकोस" इकडे अरूणचे प्रशिक्षण चालू असताना तिकडे मात्र प्रभाची अवस्था खूपच वाईट झालेली असते. " न जाने क्युँ होता है ये जिंदगीके साथ, अचानक ये मन किसीके जानेके बाद करे फिर उसकी याद..... अशी होते.



आणि एके दिवशी.....


केसांना शँपू केलेला, गॉगल लावलेला, कोट घातलेला अरूण जबरदस्त आत्मविश्वासाने प्रभाच्या समोर येऊन उभा राहतो. अगदी त्याच वेळेला नागेश स्कूटर घेऊन प्रभाला न्यायला येतो. हा सीन खूप छान आहे. तेवढ्यात बस येते. नागेशला नाईलाजाने पुढे जाऊन उभे रहायला लागते. अरूण प्रभाच्या गप्पा होतात. कुठे गेला होतास इतके दिवस? असाच गेलो होतो कुठेतरी. तू कशी आहेस? तिकडे नागेशची चुळबुळ सुरू होते. काय करत्ये ही प्रभा. लवकर का येत नाहीये. तेवढ्यात अरूण स्कूटरवर त्याच्या मागे येऊन बसतो. नागेशचा तीळपापड. अरूणच्या जीवनात एक जबरदस्त "घुमाव" आल्याने चित्रपटातले आधीचे "सीन" असे पूर्णपणे उलटतात पहा. जसे की...



नागेशशी टेबल टेनीस खेळताना अरूण खेळायला यायलाच उशीर करतो. आल्यावर खेळायला सुरवात करणार तोच.. "एक मिनिट हं असे म्हणून अरूण स्वतःच्या बुटांच्या नाड्या नीट बांधतो. दुसऱ्यांना... "एक मिनिट हं असे म्हणून टेबलवर नसलेली धूळ साफ करतो. तिसऱ्यांना सुरवात करणार तोच... "एक मिनिट हं असे म्हणून नागेशला हातात बॅट कशी धरायची हे समजाऊन सांगतो. असे करून नागेशचा धीर पूर्णपणे खचवून टाकतो.



बुद्धीबळ खेळताना सुरवातीच्या एक दोन चाली नंतर एका प्रसिद्ध बुद्धीबळ पटूच्या पूढील सर्व चाली सांगून "आता काय खेळण्यात मजाच नाही. तू जिंकलास, मी हारलो. असे सागून नागेशला चिडीला आणतो.



अरूण नागेश व प्रभाला दूरध्वनीवरून जेवणाचे आमंत्रण देऊन स्वतः मात्र प्रभाला साडी खरेदीला घेऊन जातो व उशीराने ठरलेल्या उपहारगृहात येतो. नागेश रागाने लालबुंद!!



आता अरूण त्याच्या शिक्षणातला शेवटचा गिरवलेला धड्याची ट्रायल घेणार असतो "ड्रॉईंग रूमसे लेके बेडरून तक " पण ती काही त्याला जमत नाही. खरे तर त्या धड्याची जरूरीच नसते, कारण प्रभाचे अरूणवर मनापासून प्रेम असते. ती त्याला म्हणते "एवढं सगळं करण्याची काय गरज होती, मला सांगितलं असतस तर"



पण खर सांगू का प्रभा "माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तू माझ्याशी लग्न करशील का" हे विचारण्याची माझी हिंमतच झाली नाही. अशा प्रकारे अरूणप्रभाची प्रेमकथा सुफळ संपूर्ण!!


पात्र परिचय रसग्रहणामध्ये आला आहेच. गीतकार - योगेश, संगीतकार - सलील चोधरी