Wednesday, May 17, 2017

माडीवाले कॉलनी - पुणे (1)

१९६१ साली पूर आला. पुरात जवळजवळ सगळेच वाहून गेल्यानंतर पुढे काय? हा प्रश्न होताच. साने माई यांचा बंगला माडीवाले कॉलनीमध्ये होता. त्या आईला म्हणाल्या  "तू अजिबात काळजी करू नकोस. माझ्याकडे एक खोली रिकामी आहे तिथे तुम्ही रहायला या." पूर आला तेव्हा माझे बाबा विश्रामबागवाड्यात कामावर गेले होते तर आई शिवणाच्या क्लासला गेली होती. माझी आजी (आईची आई) घरी पोळ्या करत होती. तिघेही तीन दिशेला होते. माझे आजोबा त्यावेळी वलसाडला होते काकाकडे. पूर येतोय ही बातमी कळताच बाबा कामावरून घरी आले  तोपर्यंत औंकारेश्वराजवळील नदीचे पाणी वाड्याच्या आतपर्यंत पोहोचत होते. बाबा सांगतात की जवळजवळ कमरेइतक्या पाण्यातून वाट काढून आम्ही कसेबसे बाहेर पडलो. बाबांनी पटापट जे सुचेल तसे आईचे दागिने, थोडीफार घरी असलेले पैसे आणि जे काही सुचेल तसे पटापट पँटच्या खिशात कोंबले आणि आजीला म्हणाले, चला चला लवकर बाहेर पडा. केव्हाही पाण्याची पातळी वाढेल आणि वाडा बुडेल. आजी म्हणाली, एव्हड्या पोळ्या करून घेते. तर बाबा म्हणाले, अहो पोळ्या कसल्या करताय, लवकर उठा आणि माझ्याबरोबर बाहेर पडा. आगाशे वाड्यात आईबाबांचे बिऱ्हाड होते. श्री व सौ आगाशे यांना बातमी कळताच सामान पटापट कुठेतरी उंचावर, गच्चीवर जसे जमेल तसे ठेवले होते आणि तेही बाहेर पडत होते. श्री आगाशे यांचे वडील गच्चीत जाऊन बसले होते. ते म्हणाले मी इथून कुठेही हालणार नाही. माझे काय व्हायचे ते होईल. त्यांना समजावता समजावता नाकी नऊ आले.




आई शिवणाच्या क्लासमध्ये होती. तिलाही बातमी कळली आणि ती आणि तिच्या मैत्रिणी लक्ष्मी रोडकडे जायला निघाल्या. खरे तर बातमी रात्रीच कळाली होती की पानशेतचे धरण फुटले आहे आणि पाण्याचे लोटच्या लोट वहायला लागले आहेत.  बाबा, श्री आगाशे आणि त्यांच्या शेजारचे आदल्या रात्री गप्पा मारताना "काही नाही हो, अफवा असतील, दुसरे काही नाही" अशा भ्रमात ! बाबा सांगतात आम्हाला पूर रात्री  आला असता तर आम्ही दोघेही या जगात नसतो आणि तुम्हा दोघी बहिणींनाही हे जग पाहता आले नसते. सगळेजण सदाशिव पेठेत राहणाऱ्या एका मामाच्या खोलीत येऊन पोहोचले. एका खोलीत १० - १५ माणसे!  आळीपाळीने काही आत आणि काही बाहेर असे करत होती. पूर येऊन गेल्यानंतर किती नासधूस झाली होती हे आईबाबांनी मला फोनवरून सांगितले आहे, त्याचे वर्णन पूढच्या लेखात करीनच. पण माडीवाले कॉलनीमध्ये सौ माई साने व श्री साने यांच्या बंगल्यामधल्या एका खोलीत आईबाबांनी त्यांचा नवा संसार कसा थाटला याचे वर्णन अप्रतीम आहे. मुद्दे लिहून ठेवलेत मी ते नंतर विस्तारीन.


माडीवाले कॉलनीतल्या त्यांच्या दुमजली बंगल्याच्या वर गच्ची होती. त्या गच्चीला लागून एक खोली होती. तिथेच माझा जन्म झाला. माझ्या बहीणीचा जन्म गोखलेनगरचा पण माई माझ्या आईला म्हणतात की अगं रंजना खऱ्या अर्थाने इथलीच ! आईला रंजनाच्या वेळी दिवस गेले व गरोदरपणाच्या ७ व्या महिन्यात तिने व माझ्या बाबांनी श्री व सौ साने यांचा निरोप घेतला ते गोखलेनगरला येण्यासाठी. गोखले नगर ही पूरग्रस्तांची कॉलनी आहे. तिथे माझ्या  आजोबांनी  पूरग्रस्तांच्या यादीमध्ये बाबांचे नाव लिहून जागेसाठी खटपट केली. वलसाडला असताना पुर आल्याची बातमी कळाल्यावर  त्यांनी मन खूप घट्ट केले आणि मनाशी म्हणाले की पुण्यात गेल्यावर  मला दोनापैकी एकच चित्र दिसेल ते म्हणजे की निळू आणि निर्मला जिवंत असतील किंवा नसतील !

क्रमश : ...



3 comments:

Unknown said...

Hi,
last 15 varshamadhe punyat khup badal zalay. mi 2001 madhe mamakade punyat job shodhyala aalo hoto tenva just badal suru zala hota. traffic jam, pollution tenva evade navate. aata pan suttiavr aalo ki pahto punyat saglikade beshist vahtuk, prahand pradushan, sthanik gunthamantrincha vikun yenarya paischa maaj, gundagiri ase prakar pahayala bhetat.


regards.
Bapu.

इंद्रधनु said...

Aapan gokhlenagar la rahayla hota ka? mihi gokhlenagar madhye rahile ahe.

rohinivinayak said...

Are vaa,, chaan ch,, tuze naavv kaay, mala khup utsukata aahe,, maze baalpan aani college nokri sarv gokhale nagar madhye aani nantar lagna jhale