Monday, January 25, 2021

भारतभेट २०१९

 यावर्षीची भारतभेट लांबली. काही कारणांमुळे आधीचे तिकिट रद्द करावे लागले आणि मग नंतर जायचे ते गणपतीच्या दिवसात जाऊ असे ठरवले आणि गेलो. पुण्यातले गणपती बघून कितीतरी वर्षे लोटली होती. पण गणपती बघणे झाले नाही. आईने ठरवले होते की तिची एक मैत्रिण आणि आम्ही दोघी एक रिक्षा करायची व गणपती बघायचे. ही भारतभेट खूपच वेगळी होती. आईच्या घरी जी बाई आहे ती आईकडे सर्वच्या सर्व कामे करते. अगदी स्वयंपाकापासून ते लादी पुसणे, कपड्याच्या घड्या घालणे इथपर्यंत. पण या मावशी त्यांच्या गावी गेल्या होत्या. त्यांना पण काही कारणा निमित्ताने जावेच लागले. त्यामुळे मला सर्वच्या सर्व कामे धुणे भांड्यांपासून करावी लागली. एक समाधान होते की मला माझ्या हातचे आईबाबांना जेवण मिळाले. सकाळचा चहा आलं घातलेला आईबाबांना आवडत होता. बाबांना माझ्या हातचे आमटी भात, पिठले खूपच आवडून गेले त्यामुळे मलाही खूप आनंद झाला. आईला मी साबुदाणे वडे गरम गरम करून घातले. पोहे उपमेही करून घातले. शिवाय मी भाजी आणायला जायचे तिथे एक दुकान होते तिथला वडा पाव तर खूपच चविष्ट होता. हा वडा पाव मी २ ते ३ वेळा आणला. 

 

नंतर ८ दिवसांनी मावशी आल्या पण झाले काय की तोपर्यंत गणपती करता लोकं फिरायला बाहेर पडतात आणि खूपच गर्दी होते त्यामुळे आमचे गणपती बघायचे राहून गेले. गणपतीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही जाणार होतो. मावशी आल्यावर त्यांनी सीताफळ बासुंदी बाहेरून आणली व पुऱ्या  गरम करून मला वाढल्या. माझी एक वहिनी होती तिच्याकडे मी व आई सवाषण म्हणून गेलो हा दिवस तर खूपच छान गेला. मी व आईने पैठणी साड्या नेसल्या. रिक्शाने गेलो वहिनीकडे. तिने व तिच्या सुनेने आमचे स्वागत केले आणि वहिनी म्हणाल्या मी आता चहा ठेवत नाही, तुम्ही लगेचच जेवायला बसा. आम्ही दोघी आयते जेवायला बसलो. तिने व तिच्या सुनेने खूप आग्रहाने वाढले. वहिनीने आम्हाला गरम पुरणाच्या पोळ्या वाढल्या व त्यावर भरपूर साजूक तूपही वाढले. एकीकडे तिच्या सुनेने आम्हाला घोसावळ्याची भजीही गरम गरम वाढली. बटाट्याची भाजी, नारळाची चटणी. काकडीची कोशिंबीर असा खूप साग्रसंगीत स्वयंपाक केला होता. मला तर असे  आयते आणि चविष्ट जेवायला खूपच छान वाटत होते.

 

नंतर तिने आमच्या दोघींची ओटी भरली. पाकिटातून पैसे दिले. आणि आम्ही सगळेच थोडे आडवे झालो. उठल्यावर चहा घेतला. तिचे घर बघितले. दुमजजली घर खूपच छान सजवले होते. ते बघून खूप बरे वाटले .
नंतर तिच्या मुलाने आमच्याकरता उबर टक्सी बोलावली, आम्ही पूर्वी राहत होतो ते शेजारचे भालेराव काका त्यांच्या घरी पण जाऊन आलो. वहिनीच्या आणि त्यांच्या
 घरातल्या गणपतीचे छान दर्शन झाले. 

 

आईच्या घरी ढेकूण झाले होते म्हणून आम्ही माझ्या बहिणीकडे गेलो होतो २ दिवस राहयला त्यामुळे तिच्या गणपतीचे पण छान दर्शन झाले. आम्ही तिघींनी मिळून गणपतीचा नैवेद्द केला. मी माझी बहिण व भाची मिळून तुळशीबागेत खरेदी करायला गेलो. तिथे मी माझ्या करता गाउन घेतले. आणि मी जिथे काम करते त्या मैत्रिणींकरता पर्सेस घेतल्या. शिवाय एक खोटे मंगळसूत्र घेतले. शनिपाराशी रस प्यायलो. यावेळेला पुण्यावरून थेट विमानतळावर गेलो. तिथे गेल्यावर कळाले की फ्लाईट कॅन्सल झाली आहे. मग आम्ही पूर्ण रात्र विमानतळावर
काढली. 

झोपेच चांगलच खोबरं झालं त्यात आधीचा प्रवास पुणे ते विमानतळ त्यामुळेही पाठ खूप दुखायला लागली. यावेळेला
 भारतावरून
परत अमेरिकेत येताना खूपच त्रास सहन करावा लागला. गणपती बघायला मिळतील ते पण बघणे झाले नाही.

 

माझ्या मामे वहिनीने आम्हाला दोघांना जेवायला बोलावले. तिने पाव भाजी, फ्रुट कस्टर्ड, आणि सफरचंदाचे मिल्क
 शेक केले होते. खूपच चविष्ट बेत होता. रात्रभर विमानतळावर काढायला लागल्यामुळे अधून मधून मी व विनायक इकडे तिकडे चकरा मारत होतो. तिथले फूड स्टॉल छांनच होते. काहीतरी खावेसे वाटत होते. पण खाल्ले नाही. कारण आम्ही ५ वाजता पुण्यावरून निघालो आणि रात्री ९ ला
विमानतळावर पोहोचल्यावर पोळी भाजी खाल्ली होती त्यामुळे भूक नव्हती आणि विमानात बसल्यावर पण लगेच खायला देतात त्यामुळे पण खाल्ले नाही. पहाटेचा चहा विमानतळावर घेतला. विमानतळावर गर्दी नव्हती त्यामुळे आम्ही चक्क खाली झोपलो होतो. वरच्या बॅगेतले टॉवेल खाली अंथरले आणि त्यावर आडवे झालो. झोप कुठची लागायला? पण निदान पाठ तरी जमिमीवर टेकली जात होती. कँसल झालेली फ्लाईट शेवटी पहाटे ६ ला लागली. 


रात्रभर मुंबईच्या विमानतळावर काढली त्यामुळे सुरक्षित वाटत होते.

 

 २०१९ च्या भारतभेटी मध्ये जे ठरवले होते ते झाले नाही. पण जे झाले ते चांगले झाले यात समाधान नक्कीच आहे. 

 
 

 

Tuesday, January 12, 2021

१२ जानेवारी २०२१

 आजचा दिवस वेगळाच होता. नव्या वर्षातले हे माझे पहिलेच रोजनिशीतले पान ! आजकाल रोजनिशी लिहिली जात नाही. विल्मिंग्टनला असताना काही ना काही वेगळे घडायचे आणि ते लिहिले जायचे. तर आजचा दिवस आनंद देणारा होता.  व्हॉटस ऍप वर एक युट्युबची लिंक मला माझ्या मैत्रिणीने  फॉरवर्ड केली ती होती दोन बहिणींची वय वर्षे ८८ आणि ८६ मोठ्या बहिणीने छोट्या बहिणीला वड्या कश्या
बनवायच्या ते शिकविले. वड्या होत्या सफरचंदाच्या आणि त्यामध्ये घातला होता ओला नारळ.
या वड्या मी त्यांच्या पद्धतीनुसार करून पाहिल्या. चव छान लागते. सफरचंदाचा स्वाद छान लागतो. आज कराओकी ट्रॅकवर कही दूर जब दिन ढल जाए हे गाणे रेकॉर्ड केले. तेही मनासारखे झाले. हे गाणे मला खूपच आवडते. यात फिलोसॉफी सांगितली आहे आणि कवीची कल्पना तर खूपच छान आहे.


आज बरेच दिवसांनी साबुदाणे वडे केले. काल मी माझ्या आईबाबांची एक आठवण लिहिली ब्लॉगवर. त्या आठवणीमध्ये मी आजही आहे. आईला फोन करते तेव्हा गप्पांच्या ओघात काही वेळेला तिच्या तरूणपणातल्या आठवणी सांगते. मग मी पटपट वहीत लिहून घेते आणि ब्लॉगवर टंकते.

 

 
 

 

Monday, January 11, 2021

माडीवाले कॉलनी - पुणे (२)

 आईबाबांचे लग्न १९५७ साली झाले. त्यानंतर त्यांचा संसार पुण्यातील आगाशे वाड्यात सुरू झाला. आगाश्यांच्या वाड्यात लग्ना आधी बाबा, काका आणि मामा (म्हणजे माझे आजोबा) रहायचे.  बाबा, काका आणि मामा १९५१ साली आगाशे वाड्यात राहायला आले. तिथे ते वाड्यातल्या माडीवर राहायचे. आगाशे काका भुताच्या गोष्टी सांगत असत. १९५१ ते १९५७ सालापर्यंत बाबांनी इंग्रजी आणि गणित मुलांना फुकट शिकवले. जेव्हा बाबांचे लग्न झाले तेव्हा त्या घरात पहिल्यांदाच बाईमाणूस आले.


बाबांची आई त्यांचा लहानपणीच देवाघरी गेली. आणि बाबांची बहिण वयाच्या १५ व्या वर्षी देवाघरी गेली. तिला टायफॉइड झाला होता आणि नंतर तो उलटला आणि त्यातच ती गेली. जेव्हा आईचा बघण्याचा कार्यक्रम झाला तेव्हा मामा (आजोबा) म्हणाले की निळू हीच मुलगी तुझी बायको होईल. मामांना आईमध्ये त्यांची मुलगी दिसली. माझ्या आत्याचे टोपण नाव "बेबी" होते. आईचे लग्न झाले तेव्हा आई फक्त २० वर्षाची होती. आगाशे यांच्या आईला माझ्या आईचे खूप कौतुक होते. १९६१ साली पूर आला आणि आगाशे वाड्यात पाणीच पाणी झाले होते. आई बाबा
वेगवेगळ्या दिशेला होते. काका आणि आजोबा वलसाडला होते. 

माडीवाले कॉलनी मध्ये साने माई यांचा दुमजली बंगला होता. या सानेमाई आईला ओळखत. ही ओळख म्हणजे अशी की आईची पनवेलची एक मैत्रीण मालू ही लग्न होऊन माडीवाले कॉलनीत राहायला आली होती. आणि आई पण लग्न होऊन पुण्याला आली आणि परत या दोघी मैत्रीणींची भेट झाली. मालूमावशी आईपेक्षा वयाने मोठी होती आणि तिला आईचे खूप कौतुक होते असे आई सांगते.


सानेमाई आईला म्हणाल्या की बाबी तु काही काळजी करू नकोस. मी तुला आमच्या गच्चीला लागून जी खोली आहे ती देते. आणि माईंनी आईकरता आंबेमोहोर तांदुळही घेऊन ठेवले होते. आईचे लग्नातले दागिने बाबांनी माईच्या कडे ठेवायला दिले होते. माडीवाले कॉलनीमध्ये माई साने यांच्या बंगल्यात वर गच्चीला लागून जी खोली होती ती बऱ्यापैकी मोठी होती. गच्चीमध्ये त्यांनी एक छोटी बाथरून बांधून दिली होती. या घरात आईबाबा, मामा (आजोबा) आईची आई ( आजी)  असे राहत होते. मामा वलसाडहून जेव्हा आले तेव्हा त्यांनी बाबांना सांगितले की मी आता इथेच कायमचा तुझ्याकडे राहणार आहे. माईंनी आईला एक मोठे पिंप पाणी भरून ठेवण्याकरता दिले. शिवाय पिण्याचे पाणी पिण्याकरता एक मोठा हंडा दिला. बाबा व आई दोघे मिळून वरच्या मजल्यावरून खाली एक हौद होता तिथून पाणी भरायचे. हौदाच्या शेजारीच पाण्याचा नळ होता. आईकडे जी बाई धुणे भांड्याला यायची ती याच नळावर धुणे भांडी करायची. त्याकाळी ती ५ रूपये घ्यायची या कामाचे ! आणि आईबाबा ज्या खोलीत राहायचे त्या खोलीचे भाडे होते रूपये १८ !  १९६१ ते १९६५ पर्यंत आईबाबा व आजोबा इथे राहिले.

आईबाबा पहाटे ४ ला उठायचे ते आधी पाणी भरायचे व नंतर तळ्यातल्या गणपतीला जायचे. तिथून पर्वतीला जायचे. तिकडून आले की आई सर्वॉचा चहा  करायची  व नंतर बाबा सायकलने विश्रामबाग वाड्यात कामाला जायचे. जेवायला घरी येऊन थोडी विश्रांती घेऊन परत कामावर जायचे. ज्या खोलीत हे सर्वजण राहत होते. तिथेच छोटे स्वयंपाकघर केले होते. म्हणजे आडोशाला पडदा लावला होता. आई व आजी स्वयंपाकघरात झोपायच्या. आणि बाकीच्या खोलीत दोन पलंग होते त्यावर मामा व बाबा झोपायचे. अंघोळी गच्चीत बांधलेल्या बाथरूम मध्ये होत असत. उन्हाळ्यात आई आणि आजी गच्चीमध्ये भरपूर वाळवणे करायच्या. स्वयंपाकघरात दोन प्रकारचे स्टोव्ह होते, एक वाजणारा आणि दुसरा वातीचा (न वाजणारा) स्वयंपाकघरात लाकडाच्या दोन छोट्या मांडण्या होत्या पातेली कढई ठेवण्याकरता. स्वयंपाक खाली बसूनच केला जाई. गच्चीचा उपयोग छान होत होता.
 
 
 सानेमाईंच्या इथे राहत असतानाच आईने शिवणाचा क्लास केला व शिवाय एसटीसी पण केले. आई म्हणाली आजी (आईची आई) होती म्हणून मला घरचे काही बघायला लागत नव्हते. आजी सर्व करायची.  माझे आजोबा, आम्ही त्यांना मामा म्हणायचो. दुपारचे जेवण झाल्यावर ते ग्रंथालयात जाऊन वाचत बसायचे ते संध्याकाळी घरी यायचे. 
या खोलीतच आईबाबा शिकवण्या घेत.  काही घरी जाऊन घेत. प्रभात रोड व भांडारकर रोडवर दोन घरी आईबाबा
मुलांना शिकवायला जात असत.
 
 
 जेव्हा आईला दिवस गेले तेव्हा साने माईना खूप आनंद झाला. आईला त्यांनी वर्षभराचे लोणचे घालून दिले.
माईंनी आणि आजीने आईचे सर्व डोहाळे पुरवले. आई सांगते आईला खूप कडक डोहाळे लागले होते. आईची सर्व प्रकारची डोहाळेजेवणे झाली. फक्त एक चांदण्यातले डोहाळेजेवण राहिले होते. मालू मावशी म्हणाली की गच्चीत चांदण्यातले  डोहाळेजेवण करू. आईला सांगितले की तू फक्त तळण कर बाकी इतर स्वयंपाक सर्व आम्ही करू. मग मालूमावशी (आईची मैत्रीण) तिचे यजमान व दोन मुली, सानेकाका आणि माई, आजी आजोबा, आईबाबा असे सर्व चांदण्यातल्या डोहाळेजेवणाला हजर होते. 
 
माझा  जन्म इथलाच सानेमाईंच्या बंगल्यातला. लक्ष्मीरोडवरच्या ताराबाई लिमये यांच्या दवाखान्यात माझा जन्म झाला. साने माईंना एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगी डॉक्टर होती. आणि त्यांचा मुलगा आणि सून फलणटला राहत असत. माईंंनी माझ्या आईवर मुलीप्रमाणे प्रेम केले. मी आईला ६ वर्षांनी झाले. साने माईंना खूप आनंद झाला. त्यांनि माझे बारसे खूप थाटामाटात साजरे केले. जिलबी करायला आचारी बोलावला होता. स्वयंपाकाला बाई बोलावली होती. पण ती बाई यायच्या आतच त्यांनीच बरासचा स्वयंपाक केला होता. 
 
साने माई आईला म्हणाल्या की तुझ्या नातेवाईकांना बोलाव.  शिवाय तुझ्या शिवणाच्या क्लासच्या मैत्रिणींनाही निमंत्रण दे. आई सांगते की  माईंचे आणि माझे मागच्या जन्मीचे नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असणार, नाहीतर इतके कोणीही कोणासाठी करत नाही.
 
 
 माझे आजोबा मला दुपट्यात घेऊन गच्चीत सतरंजी टाकून खेळवत बसायचे. जेव्हा मी बसायला लागले तेव्हा आईकडे मुले शिकायला यायची त्यांच्यातच मी बसायचे. स्वयंपाकघराला जो पडदा होता तो मी माझ्याभोवती गुंडाळून घ्यायचे व पेन्सिली खायचे.


आम्ही पूरग्रस्त म्हणून मामांनी एक फॉर्म आणून भरला होता. ती जागा केव्हा मिळेल या चौकशीसाठी त्यांनि अनेक फेऱ्या मारल्या. शेवटी गोखलेनगरला भाड्याची जागा मिळाली. आईने जेव्हा माडीवाले कॉलनी सोडली तेव्हा आई रंजनाच्या वेळेस (म्हणजेच माझ्या बहिणीच्या वेळेस) गरोदर होती. निघण्याच्या वेळी मालूमावशीने (आईच्या मैत्रिणीने) माझे आवरले. मी पावणे दोन वर्षाची होते. मालूमावशीने माझ्या छोट्या केसाची एक शेंडी बांधली. माझे तोंड धुतले. किंचित पावडर लावून ओल्या गंधाचा एक ठिपका कपाळावर लावला. मला फ्रॉक घातला. दूध प्यायला दिले.
 
 
 आम्ही जेव्हा गोखले नगरला राहयला गेलो तेव्हा तिथे अजिबात वस्ती नव्हती.गोखले नगरला आम्ही स्थिरस्थावर झालो तेव्हा सानेमाई आईबाबांकडे येवून गेल्या आणि खूप रडल्या. आईला म्हणाल्या इतकी काय घाई होती जाण्याची ? इथे खूप विरळ वस्ती आहे. आमच्या इथेच राहिली असतीस तर काय बिघडले असते? गरोदर होतीस तर दुसरे बाळंतपणआमच्या घरीच करून जायचेस. तर माझे आजोबा म्हणाले अहो तुम्ही आम्हाला त्यावेळेला जागा दिलीत तेव्हा आम्हाला किती हायसे वाटले ते शब्दात सांगता येणार नाही. आम्ही पूरग्रस्त त्यामुळे लगेचच हालचाल करायला हवीच होती. नंबर लावून खोल्या तयार होत्या आणि चाळीतल्या दोन खोल्या मिळाल्या त्या लगेच घ्यायला हव्या होत्या म्हणून आम्ही तातडीने इथे आलो.


गोखलेनगरच्या जागेत जेव्हा आईबाबा रहायला आले तेव्हा आईला ७ वा महिना चालू होता. फेब्रुवारी महिन्यात माझी बहिण जन्माला आली. तिच्या जन्माच्या वेळेसच बाबांनी जाईचा वेल लावला. जाई आणि माझी बहीण एकाच वयाच्या ! 

Sunday, January 03, 2021

गाता रहे मेरा दिल !!

गाणं आवडत नाही, गायला किंवा ऐकायला आवडत नाही, असा विरळाच ! मला मात्र गाणं ऐकायला खूप आवडतं, नुस्त आवडत नाही तर गायला देखील आवडतं. माझ्या जोडीदारालाही आवडते गाणे आणि मुख्य म्हणजे आमच्या जोडीची एकत्रित आवड म्हणजे सिनेसंगीत. आता फरक इतकाच आहे की त्याला जुनी आणि संथ गतीची गाणी आवडतात आणि मला धडाकेबाज गाणी, म्हणजे असे की गाणं ऐकताना माझ्यात उत्साहाचा झरा वाहायला लागतो. गाणं धडकत फडकत कोणतेही असो, मला ते आवडतं. गाण्याच्या ओळीत किती सुंदर अर्थ दडलेले आहेत याच्याकडे माझे लक्ष जात नाही. याच्या उलट वि चे लक्ष गाण्याच्या बोलांमध्ये जास्त असते. आणि याचा परिणाम असा झाला की सुंदर सुंदर अर्थपूर्ण बोल असलेली गाणीच आता मला पटकन आठवतात. आठवणारच ना ! तीच तीच गाणीवि ने लावली की कान जातातच गाण्याकडे. पण तरीही मला माझी गाणी अत्यंत प्रिय आहेत. काही वेळा तर माझी गाणी मी एकटी असतानालावली तर मला त्यावर गिरक्या घेऊन घेऊन नाचावेसेही वाटते. तर अशी ही गाणी बजावणी प्रत्येकाच्या आयुष्यात थोडीफार का होईना डोकावतातच!
 
 
फ्लॅश बॅक मध्ये जाते आता. जावेच लागेल. दारावरची बेल वाजली आणि हा पहिला प्रश्न विचारला गेला विनायक गोरे आहेत का? . दारात २ मुले होती.हो आहेत ना ! मी म्हणाले. आम्ही जेवायला बसलो होतो दुपारचे. जेवण झाल्यावर लगेच या, अमुक अमुक ठिकाणी तुम्हाला यावे लागेल असे त्या मुलांनी सांगितले. ईमर्जन्सी आली होती. आयाटीमध्ये अंताक्षरी चालू होती आणि त्यांना गाणी माहित असलेला चांगला जेयुडीजीई हवा होता. विनायकला पकडूनच नेले त्यांनी. विनायक घरी आल्यावर त्याला विचारले कशी झाली अंताक्षरी ! तो म्हणाला एवढी खास नव्हती, म्हणजे आमच्या वेळेला जी मजा आली होती, तो जो काही अटीतटीचा सामना झाला होता त्याची मजा औरच होती. विनायकने गाजलेली आठवण मला सांगितली. रेगे आणि गोरे विरूद्ध दोन मुली अंताक्षरी मध्ये गात होत्या. रेगे आणि गोरे खूप जुनी म्हणजे १९४०-१९५० सालातली फेमस गाणी न गाता वेगळीच गाणी गात होते. तिथे जमलेले सर्व "हे गाणे कोणते बुवा? " अशा आश्चर्यचकित मुद्रेने एकमेकांकडे पाहत होते. काही जण म्हणाले तुम्ही खोटी गाणी गात आहात. रेगे म्हणाला माझ्याकडे कॅसेटच्या थप्प्या आहेत. चला रूमवरऐकवतो गाणी ! प्रेक्षकातून आवाज आला. नको रे ! इथे ऐकतो तीच पुरे आहेत. " एक करेला तो दूसरा नीम" असेही अभिप्राय येत होते. वि च्या मित्राने त्याला नंतर सांगितले. म्हणजे असे की या दोघांना आवाज नाहीत ! गाणी मात्र शेकड्याने माहीती. आणि यांच्या विरूद्ध ज्या मुली होत्या त्या १९७०-८० सालातली फेमस गाणी गात होत्या. पुराने आणि नये नगमे असा अटीतटीचा सामना झाला होता. रेगे आणि गोरे यांनी नेमकेएक गाणे नवीन गायले आणि तिथेच एका मार्कासाठी त्यांचा पहिला नंबर चुकला.
 
 
फेमस गाणी न गायल्याने हे दोघे मित्र गाणं मध्येच सोडून द्यायचे आणि वेगळे अक्षर येईल असे बघायचे. म्हणजे विरूद्ध पार्टीची दिशाभूल करायचे म्हणजे असे की गाणं कोणत्या अक्षराने संपणार हे साधारण कळते ना, आणि त्या अक्षराचे गाणे आठवून ठेवतो गाणारा. मग त्याही मुली असेच मध्येच गाणे सोडून विरूद्ध पार्टीअवर जरा अवघड अक्षर येईल असे पाहायच्या. प्रत्येकाचीच गाण्याच्या आवडीची सुरवात होते ती रेडिओवरून ऐकलेल्या गाण्यांमधूनच. नंतर ती आवड वाढते ती दूरदर्शन मधल्या चित्रहार, रंगोली या कार्यक्रमातून, आणि गाण्यांच्या अनेकानेक स्पर्धेमधून, मग ती स्पर्धा मराठीतून असो अथवा हिंदीमधून. गाण्यांच्या आवडीच्या
कॅसेट ऐकणे किंवा सीड्या ऐकणे यापेक्षाही युट्युबवर हवी ती आणि हवी तितकी गाणी ऐकली, पाहिली. गाणी ऐकता ऐकता आणि पाहता पाहता आम्ही दोघं गाण्यांच्या महासागरात डुंबून गेलो. फेसबुकावर दोन गाण्यांचे ग्रूप्स आहेत त्यामध्ये आम्ही रोजच्या रोज युट्युबाच्या लिंका त्या ग्रुप्सच्या थीमनुसार टाकू लागलो. हा सिलसिला जवळजवळ ७ ते ८ वर्षे चालू होता. 
 
गीतसंगीत या ग्रूपवर तर आम्ही काही ठराविक लोकं थीमआली रे आली की पटापट त्यानुसार गाणी टाकायला लागलो. अर्थात आपण टाकलेले गाणे हे थीमनुसार अगदी चपखल बसले पाहिले आणि इतरांपेक्षा खूप वेगळेही झाले पाहिजे हा अट्टाहास सुरू झाला.रोजच्या रोज थीमा असायच्या या दोन ग्रुप्सवर ! एक ग्रुप आहे "संगीत के सितारे" आणि दुसरा "गीतसंगीत" काही वेळा थीम टाकल्या टाकल्याडोळ्यासमोर लगेचच गाणे तरळून जायचे आणि लिंक पोस्ट केली की नेमके आपण निवडलेले गाणे कुणी दुसरेच टाकून गेलेले असायचे म्हणजे परत दुसरे गाणे शोधणे आलेच. काही वेळेलानिवडलेल्या गाण्यापेक्षाही खूप चांगले गाणे निवडण्याची खटपट चालू व्हायची. काही वेळेला थीम मध्ये बसणारी ३ ते ४ गाणी डोक्यात असायची आणि कोणते टाकावे बरे? असे म्हणून उगाचच वेळ वाया जायचा आणि ती ठरवलेली गाणी पण काही वेळा इतरांनी टाकलेली असायची. नंतर ठरवले की चांगले गाणे सुचले की लगेच टाकून मोकळे व्हायचे. पण जेव्हा आपण ठरवलेल्या इतर गाण्यांपैकी एखादे गाणे कोणी टाकले तर खूपच हिट ! होऊन जायचे, म्हणजे बरेच लाईक मिळायचे.
 
 
किती विविध प्रकारच्या थीमा ! कधी गाण्यामध्ये विशिष्ट प्रकारचे शब्द हवेत, तर कधी गाण्यात हिरो- हिरोईनचे प्रतिबिंब पाण्यात किंवा आरश्यात दिसले पाहिजे, तरकधी कृष्ण धवल तर कधी गाण्यात नाच पाहिजेत. एक थीम लक्षात राहिलेली ती म्हणजे एका गाण्यात हिरोईनने कमीतकमी ३ ते ४ वेळेला तरी साडी किंवा ड्रेस बदललेले पाहिजेत. मी आधी संगीत के सितारे या ग्रुपमध्ये नव्हते. मला आठवतयं मी केव्हा जॉईन झाले ते ! एक थीम
होती चोरी चोरी चुपके चुपके आणि अजून एक शब्द होता जोडीचा यापैकी २ तरी शब्द आले पाहिजेत. मी गाणे टाकले होते चोरी चोरी चुपके चुपके पलकोंके पीछेसे चुपके कह कयी सारी बतियाँ, अखियाँ हो अखियाँ....हे आपकी कसम मधले गाणे. गीताकार, संगीतकार, गायक, गायिका, द्वंद्व गीते, विरहगीते, लोरीगीते, बिदाई गीते, एक ना अनेक थीमा. आणि म्हणूनच सतत युट्युबवर गाणी बघितली जायची. जशी गाणी बघितली तशी मी गायली देखील अनेक गाणी. गुगल वर गाण्याचे बोल शोधायचे आणि गाणी म्हणायचीती रेकॉर्ड करायची असा उद्योग सूरू केला होता मी. ऑर्कुटच्या जमान्यात याहूवरची अंताक्षरी लक्षात राहिलेली. अर्थात त्यात थीमा नव्हत्या.
एका ग्रूपवर एकीने याहू मेसेंजरवर अमेरिकेतल्या प्रत्येकाच्या झोननुसार एक वेळ ठरवली होती आणि वारही ठरवला होता. त्यात गाणी गायली गेली. आणि आता मोहिनी अंताक्षरीवर गात आहे. गात आहे म्हणण्यापेक्षा गुणगुणणे हे म्हणणे जास्त योग्य होईल. मी गाणे अजिबात शिकलेली नाहीये पण पूर्वी बरीच गाणी पाठ होती. चालीतही म्हणता यायची. अजूनही चालीत गाणी म्हणता येतात पण गाणी पाठ नाहीत.
 
 
बरेच वेळा असे ठरवते की गाणी पाठ करून ती वरचेवर घरात गात राहायची. ओरिजिनल गाणे ऐकून तसेच्या तसे होत आहे का तेही बघायचे पण असे नुसते ठरवलेच जाते. २ कडव्यांची गाणी पाठ व्हायला हारकत नाही. मनावर घेतले पाहिजे. मी माझ्या आनंदाकरता गाते आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते गाता रहे मेरा दिल !!!
बरेच दिवसात गाण्यावर अजून एखादा लेख लिहावा असे मनात होते पण ते एका गोष्टीमुळे शक्य झाले. व्हॉटस ऍप ग्रुपवर मी एक स्पर्धा दुसऱ्या क्रमांकावर जिंकलेआणि या छोट्या आनंदात मला हा लेख लिहावासा वाटला. मोहिनी अंताक्षरी हा एक ग्रुप आहे. तिथे मोहिनी रोजच्या रोज वेगळ्या थिम्स देते,, मी पण काही थीमा तिला सुचवते. आपल्या वेळेनुसार आठवड्यातून किमान २ दिवस काही मिनिटे द्यावीत अशी तिच्य इच्छा आहे.आणि ती मला वाटते रास्त आहे. मोहिनी भारतीय वेळेनुसार सकाळी थीमजाहीर करते आणि भारतीय वेळेनुसार रात्री ११ ला अंताक्षरी बंद होते. जो तो आपापल्या वेळेनुसार या मोहिनी अंताक्षरीच्या कट्यावर येतो
थोडे विसावतो आणि गातो.
 
मी दुसऱ्या क्रमांकावर जिंकलेली थीम अशी होती की त्यात लाजणं मुरडणं सौंदर्याचे वर्णन, ज्या गाण्यात येईल ती गाणी किंवा नटी पडद्यावर साजश्रुंगार करताना दिसते अशी गाणी, अथवा गाण्यात एखाद्या अलंकाराचे नाव येईल अशी गाणी गायची होती.गाण्याचा २/४ ओळीचा मुखडाच गायचा होता. १ मिनिटापेक्षा कमी वेळात होणारा. भारतीय वेळेनुसार मोहिनीने सकाळी ७ ते १२ अशी स्पर्धेची वेळ ठेवली होती आणि ही स्पर्धा सरप्राईज होती. तशी तिने थोडी कल्पना दिली होती ३१ डिसेंअरला की उद्या मी एक सरप्राईज घेऊन येणार आहे आणि त्याकरता आम्ही सर्व उत्कुक होतो. जेव्हा स्पर्धा घोषित केली तेव्हा अमेरिकेत ९.३० वाजले होते. मला स्पर्धेची थीम खूपच आवडली
आणि मी एकेक करत ऑडिओ टाकत राहिले. १२ वाजता झोपून गेले. मला अजून स्पर्धेच्या वेळेनुसार अडीच तास शिल्लक होता पणझोपेच खोबरे होईल म्हणून झोपले आणि १ जानेवारी २०२१ ला सकाळी मला एक सुखद धक्का बसला.