Friday, December 25, 2009

गोंधळात गोंधळ

सकाळी मित्रमैत्रिणींचा निरोप घेऊन आम्ही निघालो डॅलस विमानतळावर. आमचे दोन मित्र आम्हाला विमानतळावर सोडणार होते. सामान बरेच असल्याने दोन कार कराव्या लागल्या. अर्धा संसार ups तर्फे पाठवला व अर्धा आमच्या चार बॅगांमधे.



निघण्याच्या वेळी रविने जाळ्यावर विमान कोणत्या गेटवरून सुटणार आहे ते बघून त्याने तसे श्रीनिवासला सांगितले. श्रीनिवास अवाजवी आत्मविश्वासात म्हणाला," हो हो. मला माहित आहे सर्व. मी आत्तापर्यंत बऱ्याच जणांना विमानतळावर सोडले आहे."



आमच्या कार निघाल्या. एका कारमधे मी व श्रीनिवास व दुसऱ्या कारमधे रवि व विनायक. विमान दुपारी साडेबाराचे होते म्हणून २ तास आधी निघालो. एक तास जाण्यामधे व एक तास सामानाची क्ष किरण तपासणी याकरता. श्रीनिवास व मी ११ ला विमानतळावर पोहोचलो व रवि-विनायकची वाट पाहू लागलो. साडेअकरा व्हायला आले तरी ह्यांचा पत्ता नव्हता. श्रीनिवास ३-४ वेळा शोधायला गेला त्यांना. तसे रवि-विनायक पण वेळेवर पोहोचले होते विमानतळावर, ते पण आम्हाला शोधत होते. शोधता शोधता भेटले एकमेकांना त्या अवाढव्य विमानतळावर. कोणाकडेही जागोजागी भटकणारे दूरध्वनीयंत्र नव्हते .



गंमत काय झाली होती की रवि ज्या गेटवरून विमान सुटणार त्या गेटवर उभे होते. श्रीनिवास व मी चुकीच्या गेटवर उभे होतो. श्रीनिवासच्या अवाजवी आत्मविश्वासामुळे सगळा गोंधळ उडाला होता.



आम्ही दोघे काउंटरवर गेलो तेव्हा तेथील बाई म्हणाली, " आता १२ वाजले आहेत. तुमच्या सामानाची क्ष किरण तपासणी होईपर्यंत एक तास जाईल. तुमचे विमान चुकले आहे. पण मी तुमच्याकरता एक काम करू शकते. जास्तीचे पैसे न घेता तुम्हाला शिकागोतर्फे ग्रीनवीलचे बुकींग करून देते." आता परत सगळा उलटा प्रवास करण्यापेक्षा वेळ जास्त लागला तरी चालेल म्हणून आम्ही लांबचा पल्ला पत्करून जाण्याचा निर्णय घेतला.



श्रीनिवास रविला टाटा बाय बाय केले आणि परत काउंटरपाशी येऊन उभे राहिलो सामानाची क्ष किरण तपासणी करायला. एक गोंधळ संपल्यावर दुसरा गोंधळ सुरू झाला. त्यावेळी ११ सप्टेंबरच्या अमेरिकेवरील अतिरेकी हल्यामुळे एकूणच विमानतळावरची तपासणी व्यवस्था खूपच कडक झाली होती. चार बॅगांमधला भरलेला संसार उलथापालथा केला गेला.



आमचे विमान उड्डाण असे काहीसे होते. ३ ते ५ डॅलस-शिकागो, शिकागोला ३ तासांच्या अवधीनंतर ८ ते १० शिकागो ते ग्रीनवील असे दुसरे उड्डाण. विमानतळावरील धावपळ संपल्यावर आम्ही थोडे खाऊन घेतले आणि प्राध्यापकांना दूरध्वनी करून आन्सरिंग मशीनवर निरोप ठेवला की " आमचे विमान चुकले आहे, त्यामुळे दुपारी ३ च्या ऐवजी रात्री ११ च्या सुमारास आम्ही ग्रीनवीलला पोहोचत आहोत." आणि डॅलस-शिकागो विमानात प्रवेश केला.



शिकागो विमानतळावर पहिल्याप्रथमच आम्हाला अमेरिकेतील विविध माणसांची गर्दी दिसली. आता विमानतळावर तीन तास थांबावे लागणार होते. मला गर्दी पाहून खूप आनंद झाला. त्या गजबजलेल्या विमानतळावर तीन तास कसे गेले ते कळलेच नाही. विनायकला सामानापाशी बसवून मी मनसोक्त हिंडून घेतले विमानतळावर. सरकती पायवाट व सरकते जीने यावरून फिरले. प्रत्येक विमान आले की गर्दीचा लोंढा इकडून तिकडे जात होता. बरीच विमाने जमिनीवरून आकाशाकडे व आकाशातून जमिनीकडे झेपावताना पाहिली. काचेच्या तावदानातून विमानतळाच्या बाहेरील दृश्य सहज दिसत होते की जेथून विमाने प्रत्यक्षात उडतात. बरीच वर्दळ असते तिथे. वर्दळीचे निरिक्षण करताना लक्षात आले की तेथील कर्मचारी खूपच व्यग्र असतात.



विमानतळावर फिरताना एका गेटवर एकीचे विमान अगदी थोडक्याकरता चुकले, तिने तिथल्या माणसाला खूप विनवले, पण तो म्हणाला, आता विमानाचा विमानतळावरचा संपर्क तुटला आहे. मी काहीही करू शकत नाही. दुसरीकडे सर्व प्रवासी विमानात बसले होते पण विमानचालक गायब होता, शेवटी माईकवरून त्याचे नाव २-३ वेळा पुकारण्यात आले.



इकडे तिकडे फिरल्यावर बरीच भूक लागली म्हणून विमानतळावरच्या उपहारगृहात शिरलो. तिथे एक मद्रासी दिसला. त्याला पाहिल्यावर असे वाटले की आत्ता इथे गरम गरम इडली सांबार मिळाले तर किती छान होईल! उपहारगृहात पण विमानचालक त्यांच्या गणवेशात बसून त्यांचे जेवण घेत गप्पा मारताना दिसले.



फ्राईड राईस खाऊन घेतल्यावर परत एकदा प्राध्यापकांना दूरध्वनी करून आन्सरिंग मशीनवर निरोप ठेवला की " आम्ही शिकागोवरून निघालो आहोत, दोन तासात पोहोचू" ८ ला निघणारे विमान ९ वाजता गेटवर लागले. विमानात बसल्यावर पण विमान लवकर उडेना. विमानातील छोट्या खिडकीतून बाहेर पाहिले तर एकापाठोपाठ एक अशी विमाने लागली होती. धावपट्टीवरून हळूहळू विमान सरकत होते. विमानांचा वाहतुक मुरंबा झालेला पाहून खूप आश्चर्य वाटले. पाऊस व जोराचा वारा असल्याने विमाने उड्डाणाकरता हळूहळू सोडली जात होती. डेंटनच्या घरातील साफसफाई करण्याने व सामानाची बांधाबांध करण्याने आधीच जीव मेटाकुटीला आला होता, त्यातून हा दीर्घकाळ प्रवास!! पण काय करता?



शेवटी एकदा पंखातील सर्व बळ एकवटून घेतली उडी आकाशात आमच्या विमानाने. थोड्याचवेळात हवाईसुंदरीने शीतपेय आणून दिले, त्यामुळे थोडे बरे वाटले. खिडकीतून खाली पाहिले तर एकदम नयनरम्य दृश्य दृष्टीस पडले. आकाशात जणू काही पिवळ्या रंगांच्या माळा पसरल्या आहेत. हवामान चांगले नसल्याने विमानाचा वेग कमी होता. रात्री सुमारे १२ ला आम्ही ग्रीनवील साऊथ कॅरोलिना विमानतळावर पोहोचलो. सरकत्या जिन्यावरून खाली उतरताच प्राध्यापकांना हस्तांदोलन केले. आमची छायाचित्रे त्यांना आधीच पाठवल्याने आम्हाला त्यांनी लगेचच ओळखले.



तिकडे प्राध्यापकांचाही थोडा गोंधळ उडाला होता. आन्सरिंग मशीनवर ठेवलेले ४-५ निरोप न ऐकताच ते आम्हाला दुपारी ३ ला ग्रीनवील विमानतळावर न्यायला आले होते. घरी परत गेल्यावर निरोप ऐकले व रात्री परत १२ ला आम्हाला घ्यायला आले. डेंटन ते ग्रीनवील साधारण १००० मैलाचा प्रवास. तीन तासाची थेट फ्लाईट बुक केली होती. पण या गोंधळामुळे सकाळी ९ वाजता निघून तब्बल १५ तासांनी ग्रीनवीलला पोहोचलो.



ग्रीनवील ते क्लेम्सनचा तासभराचा प्रवास रात्री दिसणाऱ्या घनदाट झाडांनी सुखावून गेला. विनायक प्राध्यापकांशी बोलत होता. मी मात्र डोळे मिटून दिवसभर झालेल्या गोंधळाची उजळणी करत होते.

हे आमचे अमेरिकेतील येथे आल्यापासून वर्षाच्या आतले पहिले स्थलांतर. दुसऱ्या स्थलांतरात A to Z सर्व सामान ups तर्फे पाठवले. फक्त आमचे पिटुकले दूरदर्शन यंत्र व संगणक आमच्याबरोबरच आमच्या कारमधे. अर्थात दुसरे स्थलांतर कारने जाण्याच्या टप्यात होते.

Wednesday, December 23, 2009

दूध

दूध अशी हाक आली की आम्ही स्टीलचे/हिंडालियमचे पातेले विसळून टेबलावर उपडे करून ठेवायचो कारण की आम्हाला तसे तांब्यांनी सांगून ठेवलेले होते की मी बऱ्याच ठिकाणी दूध घालतो, मला अजिबात वेळ नसतो, पातेले तयार ठेवलेत तर मला पटकन दूध घालून दुसरीकडे जाता येईल. त्यांचा एक टेंपो होता त्यामध्ये ३-४ मोठाले कॅन असायचे. कॅनमध्ये ३-४ मापे असायची. प्रत्येकाच्या घरी ४ मापे, ६ मापे असे ठरलेले दूध ते घालत असत. जेव्हा जास्तीचे दूध हवे असेल तर सांगायचे आधी ८ दिवस सांगून ठेवत जा. सणासुदीचे दिवस असतील तर, किंवा कुणी पाहुणेरावळे आलेले असतील तर, किंवा घरी लहान मूल आलेले असेल तर दूध जास्त लागते. थंडी असो, पाऊस असो, नियमितपणे दूध घालणे आणि ते सुद्धा घरोघरी जाऊन हे काही सोपे काम नाही. दूध नासले की कॅलेंडरवर टीक मार्क करायचो आम्ही. कमीचे, जास्तीचे दूध, दूध ज्यादिवशी आले नाही, अशा सर्व नोंदी कॅलेंडरवर असायच्या. दूध एकदम चांगले दाट असायचे. श्री तांबे अजूनही आमच्या आईच्या घरी दूध घालतात, आता ते पिशवीतून येते.



श्री. तांबे यांच्या आधी खूप पूर्वी आईकडे सरकारी दूध घेत असत. हे सरकारी दूध एका चौकोनी लाकडी टपरीमध्ये येत असे. त्यांच्या एक लिटरच्या काचेच्या बाटल्या खूप जाडजूड असायच्या. त्यावर चांदीसारखी दिसणारी टोपी होती. चांदीसारख्या दिसणाऱ्या कागदावर थोडे पट्टे, काहींवर निळे, तर काहींवर हिरवे, लाल. निळ्या रंगाचे पट्टे म्हणजे म्हशीचे दूध आणि हिरव्या किंवा लाल रंगाचे पट्टे असतील तर ते गायीचे दूध असे काहीतरी होते. हे दूध आणायला पहाटे पहाटे जायला लागायचे. सरकारी दूधाची गाडी यायची. त्यातून बाटल्या खाली उतरवल्या जायच्या आणि मग त्याचे वाटप व्हायचे. रिकाम्या बाटल्या देवून भरलेल्या बाटल्या द्यायच्या. बाटल्यांचे दूध घरी आले की ते पातेल्यात काढून तापवायचे व रिकाम्या बाटल्या धुतल्या जायच्या दुसऱ्या दिवशी नेण्याकरता. पहाटे ४ ला चौकोनी टपरीसमोर रांग लावावी लागत असे. वेळेवर गेले नाही तर दूध संपायचे. सरकाअरी दूध घेणाऱ्यांकरता एक कार्ड असे ते दाखवायचे व दूध घ्यायचे. पहाटे दूध आणण्याचे काम माझे आजोबा नाहीतर बाबा करत असत. उन्हाळ्यात पहाटे उठायला काही वाटायचे नाही. उलट गार हवेत छान वाटायचे. आम्ही दोघी बहिणी बाबांबरोबर जायचो कधीकधी दूध आणायला. थंडीपावसात जायला थोडे कठीण असे. त्यावेळेला पुण्यात कडाक्याची थंडी पडायची. पहाटे पहाटे दूध आणण्याकरता बाबांनी दार उघडले की इतके काही थंडगार वारे आत यायचे की आम्ही दोघी बहिणी लगेच ओरडायचो बाबांवर " बाबा दार लावून घ्या ना पटकन, खूप थंडी वाजत आहे" आई बजावायची "अंधार आहे, जाताना बाहेरचा दिवा आठवणीने लावून जा. बाबांचे मित्र दूध आणायला यायचे. तिथे कधीकधी निरोपांची देवाणघेवाण होत असे. "आज आमची सौ येणार आहे बरंका वहिनींना भेटायला. त्यांना आठवणीने निरोप द्या."




लग्न झाल्यावर सासरी आमच्याकडे कॅनचेच दूध होते. दूध घालायला घरी आले की लगेच मनीमाऊ यायची दूध प्यायला. दूध गॅसवर तापवायला ठेवायच्या आधी ही मनीमाऊ इतकी काही भंडावून सोडायची की तिला पहिले बशीत ओतून द्यायचे दूध मग गॅसवर तापवत ठेवायचे. नंतर चितळ्यांचे दूध सुरू केले. जेंव्हा मुंबईत आलो तेव्हा घरी येऊन नाही कुणी दूध घातले. घरी येऊन दूध घालायची फॅशन फक्त पुण्याचीच असावी. मुंबईत जिथे आम्ही राहत होतो तिथे खालीच एक डेअरी होती. तिथे पातेले घेऊन जायचे. हे पातेल्यातले दूध घरी घेऊन जाताना श्वास रोखून जावे लागत असे कारण की पातेल्यातले दूध हेंदकाळून खाली सांडायची भीती. हे दूध इतके काही "महापातळ" होते की काय बिशाद चहाचा रंग बदलेल. नंतर जरा थोड्या लांब असणाऱ्या डेअरीतून चांगल्या प्रतीचे दूध आणायला लागलो. हे दूध तो डेअरीवाला आम्हाला एका पातळ प्लॅस्टीकच्या पिशवीतून देत असे. त्यावर एक छोटा दोरा बांधून. अलगद पिशवीत भाजीच्या सर्वात वर ठेवायचे मी हे दूध. हे दूध पातेल्यात ओतताना पण एक कसरतच असे. एक तर आधी त्या पिशवीला निरगाठ असायची. डाव्या हाताने पिशवी धरायची व उजव्या हाताने ती गाठ सोडवायची. गाठ सोडवायची म्हणजे ब्लेड घेऊन ती अचुक कापायची. कापली की प्लॅस्टीकची पातळ पिशवी पूर्णपणे उघडायची त्यामुळे अगदी काळजीपूर्वक हे दूध पातेल्यात ओतावे लागायचे. त्याकरता मी एक युक्ती काढली. ही पिशवी पातेल्यातच ठेवायची व वरून कापायची निरगाठीच्या खालूनच म्हणजे दूध पातेल्यात आणि मग प्लॅस्टीकची पिशवी काढायची. थोडे दिवसांनी पिशवीतले दूध सर्रास येऊ लागले. आधी महानंदा आले, नंतर वारणा व गोकुळ.



इथे अमेरिकेत आल्यावर अगदी पहिल्यांदा सवयीने कॅनमधले दूध मी पातेल्यात घेऊन तापवायचे. पण इथे कुठची साय, नि कुठचे लोणी, नि कुठचे तूप! जरूरीपुरते दूध काढा, तापवा अगर तापवू नका, तसेच प्या. खरे तर दूध म्हणजे चहा आलाच. चांगला चहा हा पूर्णपणे दूधावर अवलंबून असतो. अगदी थोड्या दुधाने चहाचा रंग बदलायला पाहिजे. चहा म्हणजे कसा अमृततुल्य चहा लवकरच घेऊन येते!!

Monday, December 21, 2009

पक्षी

















यातील काही पक्षी ब्रेड खाताना तो हवेतच झेलून खातात. परत बागडत एक फेरी मारून येतात. पाण्यात एक डुबकी मारतात. परत पंख हालवत येतात ब्रेड खायला. खूप मजा येते यांना ब्रेड देताना.

Monday, December 14, 2009

मी जरा फ्रेश होऊन येते !

तीन चार महिने झाले की माझी चुळबुळ सुरू व्हायची. चार महिने म्हणजे खूप झाले. विनुला सांगायचे मी जाऊन येते रे पुण्याला. खरे तर मुंबईवरून पुण्याला जाणे म्हणजे काही खूप लांब जाणे नाही, अगदी सकाळी जाऊन संध्याकाळी परत येण्याइतपत जवळ आहे. ही चार पाच दिवसांची ट्रीप म्हणजे जाताना जितका उत्साह तितकाच किंवा त्याहूनही अधिक उत्साह मला येताना असायचा. खूप फ्रेश होऊन यायचे मी. बॅग पण छोटी सुटसुटीत असायची. ही छोटी बॅग भरताना पण मला भारी उत्साह असायचा. जाता येताना डेक्कन एक्सप्रेस ठरलेली असायची. रेल्वेमध्ये ही एक छान सोय असते. बायकांचा एक वेगळा डबा असतो. आपण एकटे जरी असलो तरी इतर बायकांच्या गप्पा आपल्या कानावर पडतात. ऐकून करमणूक होते आणि प्रवासही छान होतो.



पंजाबी ड्रेस घालून, गळ्यात एक पर्स लटकवून व बॅग घेऊन मी डेक्कनमध्ये प्रवेश करायचे. गाडी सुटताक्षणी कानातले गळ्यातले सेट घेऊन विक्रेते यायचे. हा एक छान टाईमपास असतो. तीन चार चौकोनी बॉक्स असायचे ते सर्व बायकांमध्ये फिरायचे इकडून तिकडे. हे बघण्यात पण छान वेळ जातो. खिडकीत जागाही कदाचित मिळायची थोड्यावेळाने. कर्जत आले की बटाटेवडे खाणे हे ठरलेले. खिडकीतल्या बायकांना विनंती करून बाकीच्या "ए माझ्यासाठी घे गं पटकन" अशा सांगायच्या. मग खिडकीतून हळूच बटाटेवडे घेऊन ते बायकांकडे द्यायचे व पैसे बटाटेवडेवाल्याकडे. सगळ्यांचे मग बटाटेवडे व त्यावर कॉफी चहा वगैरे सुरू व्हायचे.



सर्व बायका थोड्या स्थिरस्थावर होऊन मग "तुम्ही कुठे निघालात? " "कोणत्या स्टेशनवर उतरणार? शिवाजी नगर की स्टेशन? " "मुंबईत कुठे राहता? " अशा थोड्या गप्पा टप्पा सूरू व्हायच्या. नंतर घाटातले सृष्टीसौंदर्य पाहण्यात खूप मजा यायची. घाट पाहता पाहता मनातच "हं आता तासाभरात येईलच शिवाजी नगर" कधी एकदा पुणं येतयं आणि मी आईकडे जाते असे होऊन जायचे मला. शिवाजी नगरला उतरायचे मी. स्टेशन येताक्षणी अगदी लगेचच उतरायचे. भराभर जिना चढून पूल ओलांडून पलिकडच्या पायऱ्या पण अगदी पटापट उतरायचे. मला अजिबात धीर नावाचा प्रकार नाही. असे भराभर चालून गेले की मग शिवाजी नगरला पटकन रिक्षा मिळते नाहीतर नंतर थोडे कठीण होऊन बसते.



रिक्षात बसल्यावर पण किती ही रहदारी! केव्हा येणार घर! असे मनातल्या मनात पुटपुटायचे. आईच्या घरासमोर रिक्षा थांबली रे थांबली की हातातले पैसे देऊन धावतच बॅग टाकून आईला आवाज द्यायचे आले गं मी! आई पण लगेच म्हणायची आलीस का! आम्ही वाटच बघतोय! चल लगेच हात पाय तोंड धूऊन घे. जेवायलाच बसू या. मी आमटी गरम करत ठेवते. का आधी चहा ठेऊ? " नको चहा नको. माझे खाणेपिणे झाले आहे मधेवाटेत" इति मी. जेवायलाच बसूया लगेच. मला खूप भूक लागली आहे. जेवत जेवता "आई तुझ्या हातचं जेवायला किती चांगलं वाटतं गं!! एकीकडे गप्पा सूरू व्हायच्या लगेच आमच्या. जेवल्यावर रंजनाला फोन. ती पण लगेच ऑफीस सुटल्यावर घरी यायची आणि सई पण माझी भाची! मग आमच्या तिघींची जी टकळी चालू व्हायची ती अगदी मी निघेपर्यंत! बडबड करून डोके दुखायला लागायचे. रात्री झोपताना पण "आता झोपू या हं १२ वाजून गेलेत, सकाळी उठवत नाही मग" आई म्हणायची. ५ ते १० मिनिटेच शांत जात असतील. परत कुणाला तरी काहीतरी आठवायचे की परत वटवट सूरू.



आईकडे गेल्यावर एक दिवस चतुर्श्रुंगी व कमलानेहरू पार्क हे कार्यक्रम ठरलेले. चतुर्श्रुंगीला देवीचे दर्शन घेतल्यावर पुढे एक गणपतीचे देऊळ आहे तिथेही जायचो. या दोन ठिकाणी जाऊन आले की मन प्रसन्न व्हायचे. कमला नेहरू पार्कला तर खूपच मजा यायची. सई जायची घसरगुंडी खेळायला. बाबा पार्कला एक चक्कर मारून यायचे व येताना सईला परत घेऊन यायचे. तोपर्यंत आम्ही तिघी म्हणजे आई, मी व रंजन माझी बहीण हिरवळीवर बसून निवांत गप्पा मारत बसायचो. तिथे आमच्या ओळखीचा एक भेळपुरीवाला व पाणीपुरीवाला होता. तिथे मनसोक्त खादाडी करायचो. भेळपुरी, पाणीपुरी, दहीबटाटापुरी व रगडा पॅटीस. जाताना व येताना आईबाबा व सईला रिक्षेत बसवून द्यायचो. त्यामुळे आम्हा दोघी बहिणींच्या वेगळ्या गप्पा व्हायच्या. रिक्षेत बसल्यावर आई बजावायची. लवकर या बरं का! आम्ही दोघी "हो गं आई. " आम्ही दोघी मुद्दामुनच रमत गमत यायचो कारण की तोच वेळ आमच्या दोघींच्या गप्पांसाठी असायचा! या दोन कार्यक्रमांच्या आधी १-२ दिवस मी सासरी जाऊन यायचे. तिथे माझी जाऊ वसुधा व पुतणी सायली माझी वाटच पाहात असायच्या कारण की आमच्या तिघींचाही कार्यक्रम ठरलेला असायचा तो म्हणजे तुळशीबाग व पुष्करिणी भेळ!!



मुंबईला परत निघायच्या दिवशी मी थोडे लवकर जेवायचे. नंतर एक छोटी डुलकी काढून साबणाने स्वच्छ तोंड धूउन पावडर कुंकू लावायचे. तोपर्यंत आईचा चहा व्हायचा. चहा घेऊन आजीआजोबांच्या फोटोला व आईबाबांना नमस्कार करून निघायचे. निघताना आई हळदी कुंकू लावायची. सोबत डिंकाचे लाडू, साजूक तूप, थालिपीठाची भाजणी काही ना काही द्यायचीच!! मुंबईला निघताना मी एकदम फ्रेश असायचे. बहीण भाची किंवा कधी कधी आईबाबा मला सोडायला यायचे पुणे स्टेशनवर. पुणे स्टेशनला बसायला जागा मिळायची. गाडी सुटल्यावर रंजना सई किंवा आईबाबा जे कोणी सोडायला येणार असेल त्यांना हात हालवून टाटा करत रहायचे मी खिडकीतून ते दिसेनासे होईपर्यंत!


गाडी सुरू होऊन प्लॅटफॉर्म सोडायची. आता मात्र थोडे अश्रू वाहायचे डोळ्यातून. थोड्यावेळाने चहा यायचा. चाय चाय ! गरम चाय! कितने को दिया?..... गाडीनेही भरपूर वेग घेतलेला असायचा.

Friday, December 11, 2009

टंकलेखन (३)

तक्ते बनवताना सर्व गोष्टींचा अंदाज आधीच घ्यावा लागतो. त्यात रकाने किती आहेत, प्रत्येक रकान्यात मजकूर किती आहे, आकडेवारी किती आहे. शिवाय डाव्या व उजव्या बाजूने कितीवर मार्जिन सेट करायचे. तक्त्याच्या खाली जो कोणी सही करणार आहे त्याचे नाव व पद. सही करण्याकरता सोडलेली जागा, शिवाय तक्त्यावरचे शीर्षक. प्रत्येक गोष्टीचे मोजमाप, अंदाज घेणे, शिवाय तक्ता कशा प्रकारे सुबक दिसेल हे पण विचारात घ्यावे लागते. तक्त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे टॅब लावणे. किती अंतरावर किती टॅब लावायचे आणि टॅब लावताना विचारात घ्यावे लागते ते म्हणजे दोन टॅबमधले अंतर. उदाहरण घ्यायचे झाले तर पहिला रकाना no. of items तर याचे आधी स्ट्रोक मोजायचे, दोन शब्दांच्या मधली जागा मोजायची, शिवाय अलीकडे व पलीकडे एकेक मोकळी जागा आणि दोन रकान्यांमधल्या रेषा मोजायच्या. आता no. of items मध्ये १२ स्ट्रोक आहेत दोन शब्दांच्या मधल्या मोकळ्या जागा धरून. शिवाय अलीकडे व पलीकडे एकेक आणि दोन रेषा म्हणजे १२ + ४ = १६ म्हणजे पहिला टॅब १६ अंकावर लावायला लागेल याप्रमाणे सर्व टॅब लावून घ्यायचे. टॅब लावायची एक की असते कळफलकावर ती दाबायची प्रत्येक टॅब लावल्यावर म्हणजे मग ते लागतात. हे टॅब नेमलेल्या ठिकाणी लागलेले आहेत का नाही ते कळफलकाच्या सर्वात वरची पट्टी असते स्पेसबारसारखी दिसणारी ती दाबली की कळते. सर्व तक्ता कळफलकाच्या साहाय्याने बनवता येतो. उभ्या रेषेसाठी एक युक्ती आहे. कॅरेज वर कागद लावलेला असतो त्यावर एक पट्टी असते तिथे एक छोटे भोक असते तिथे बॉलपेन घालायचे व रोलर फिरवायचा की त्या रकान्यासाठी उभी रेष मारली जाते. अशाच बाकीच्या उभ्या रेषा मारून घ्यायच्या. तक्ते बनवून झाले की सर्व लावलेले टॅब मोकळे करायचे. याकरताही एक की असते. स्पेसबार सारखी दिसणारी पट्टी दाबायची की ज्या ठिकाणी टॅब लावलेले आहेत तिथे जाता येते. त्या त्या ठिकाणी जाऊन टॅब मोकळे करण्याची की दाबायची की ते मोकळे होतात.



टंकलेखन मशीनमध्ये रिबीन बसवण्यासाठी ती नीट बघून बसवायला लागते कारण की रिबीन अर्धी लाल व अर्धी काळी असते. उलटी बसली तर लाल अक्षरे उमटतील. कार्बन पेपर दोन कागदांमध्ये घालताना तो सुद्धा नीट घालावा लागतो. तोही उलटा नजरचुकीने बसवला जाऊ शकतो. दोन कागदांमध्ये कार्बन पेपर नीट खोचला गेला आहे ना हे बघावे लागते. आता टंकताना ज्या चुका होतात त्या चुका खोडणे पण त्रासदायक आहे. चुका टाळण्यासाठी टंकलेखन वेगाबरोबर कमालीची अचूकता असणे फायद्याचे ठरते. एखादे अक्षर चुकीचे टंकले गेले तर ते एकतर खोडरबराने खोडायचे नाही तर व्हाईटफ्ल्युएडने. खोडरबराने खोडायचे असेल तर मुख्य कागदाच्या मागे जिथे खोडायचे असेल तिथे एक जाड कागद ठेवायचा व खोडायचे कारण की कार्बन पेपर लावलेला असल्याने खोडताना सर्व प्रतींवर खोडले जाते व बाकीच्या प्रतींची वाट लागते. सर्व काळे होऊन जाते. व्हाईट फ्ल्युएडने खोडायचे असल्यास ते आधी पातळ करून घ्यायचे व अलगद नेमक्या चुकलेल्या जागी नेलपॉलिश लावतो त्याप्रमाणे लावायचे. ते लावल्यावर थोडी फुंकर मारायची की मग ते वाळते आणि मग बरोबर शब्द अगदी त्याच जागेवर परत टंकायचा. हे खूपच कटकटीचे व त्रासदायक असते. शिवाय बाकीच्या कार्बन लावलेल्या कागदांवरही असेच नेमके व अचूक करायचे.

http://www.youtube.com/watch?v=CIBnKb-L-D8&feature=related इथे टंकलेखन प्रात्यक्षिक पहा.

सुधारित टंकलेखन पुढील भागात पाहू.

क्रमश:...

Thursday, December 10, 2009

चिटुकली पिटुकली









आमच्या अपार्टमेंटच्या समोर एक तळे आहे तिथे हे पक्षी येतात. बदकांबरोबर त्यांनाही ब्रेड देते मी. पण हे पक्षी बदकांना काही खाऊ देत नाहीत. नुसते टणाटण उड्या मारत असतात. किलकिलाट तर फारच. ब्रेडचा तुकडा फेकला की लगेच उडी मारून हवेतच झेलतात. त्यांचे मी नामकरण केले आहे. चिंटुलं पिटुकलं, गोटुलं, छोटुलं .....

Friday, December 04, 2009

गीतसंगीतांचे ऋणानुबंध

भावगीते भक्तीगीते लागली की मला नेहमी शाळेची आठवण होते. सकाळी साडेसातची शाळा त्यामुळे सहाला उठून गाणी ऐकत ऐकतच आम्ही आमचे सर्व आवरायचो. सव्वासातची बस असायची. माझ्या आईबाबांना गाण्याची आवड असल्याने आमच्याकडे सतत रेडिओ लावलेला असायचा. मराठी गाण्यांचा कार्यक्रम आपली आवड, विविध भारतीवर छायागीत, बेलाके फूल हे तर अगदी आठवणीतले. गाण्यांची आवड असलेले सर्वच गाणी ऐकतात. रेडिओ, दूरदर्शन, किंवा गाण्यांच्या कार्यक्रमातून विविध गाण्यांची ओळख होते. त्यातली काही गाणी आवडली की आपण तीच तीच ऐकतो आणि अशातूनच काही गाण्यांच्या आठवणी पण कायमच्या जोडल्या जातात. काही वेळेला गाणे आधी ऐकले जाते व ते गाणे आवडले म्हणून तो चित्रपट आपण पाहतो तर काही वेळेला एखादा चित्रपट पाहिला तर त्यातले गाणे आपल्या मनात कायम घर करून राहते.



कौसल्येचा राम बाई, रूप पाहता लोचनी, पूर्व दिशेला अरूण रथावर, उठी उठी गोपाळा ही गाणी सकाळी रेडिओवर लागायची आणि थंडी पावसाळ्यात दुलईतून उठणे जीवावर यायचे. असे वाटायचे ही गाणी ऐकत असेच झोपावे, नको ती शाळा! माझे बाबा सुधीर फडक्यांचे खूप चाहते आहेत. "सासुऱ्यास चालली लाडकी शकुंतला" व "शेवटी करिता नम्र प्रणाम बोलले इतुके मज श्रीराम" ही दोन्ही गाणी ऐकली की मला माझ्या बाबांची आठवण येते. ही गाणी बाबा इतके काही छान म्हणतात कि हुबेहूब सुधीर फडके! पूर्वी सार्वजनिक सत्यनारायणाच्या पूजेमध्ये लाऊडस्पीकरवर गाणी मोठमोठ्यांदा वाजवली जायची त्यातले हे एक गाणे. पुणे सातारा रोडवर मी नोकरी निमित्ताने जायचे तेव्हा सकाळी सकाळी हे गाणे मी बरेच वेळा ऐकलेले आहे. " जब हम जवाँ होंगे जाने कहाँ होंगे.. " हे गाणे त्यावेळी मला खूप आवडायचे व मनातल्या मनात गुणगुणायचे. हे गाणे आधी ऐकले व नंतर बेताब पाहिला. मला वाटते की या चित्रपटात गायक शब्बीरकुमार, सनी देओल व अमृतासिंग हे सगळे नवीनच होते. गणपती आणि "होठोमें ऐसी बातमें... " ही जोडी ठरलेली. पूर्वी पुण्यात आम्ही गणपती उत्सवात गणपती पहायला जायचो तेव्हा बाबू गेनू चोकात जो गणपती असायचा त्यावर हे गाणे लायटिंगवर असायचे. त्या फिरत्या लायटिंगवर अगदी तल्लीन होऊन जायचो. कितीही वेळा पाहिले तरी समाधान व्हायचे नाही.




"आखोही आखोमें इशारा हो गया.... " व हम किसीसे कम मधली दहा मिनिटांची मेलडी म्हणजे आमचे कॉलेजचे गॅदरिंग. आमच्या वर्गात एक मुलगा किशोरकुमार फॅन होता आणि आवाजही अगदी सेम किशोरकुमार. त्याचे दुसरे विशेष असे की तो मुलगा व मुलगी दोन्ही आवाजात गाणे गायचा. आँखोही आँखोमें इशारा... हेही असेच दोन्ही आवाजात गायले होते आणि "मै हँ झूम झूम झुमरू बनके.... " हे गाणे आवाजांच्या कसरतीसह म्हणले होते. हम किसीसे कम नही च्या मेलडीवर तिघांनी डान्स केला होता टायकोट घालून. त्यातल्या मुलीला आम्ही नंतर काजलकिरण म्हणायचो. नंतर बरेच दिवस आमच्या मैत्रिणींमध्ये हीच चर्चा की आँखोही आँखोमें कसे काय दोन्ही आवाजात गायले असेल गाणे??




" राधा कैसे न जले... " हे लगानमधले गाणे अगदी न चुकता रोज अमेरिकेतल्या रेडिओवर लागायचे. डॅलसवरून २४ तास हिंदी गाणी प्रसारित व्हायची. एक दिवस लागले नाही तरी चुकल्यासारखे वाटायचे. यामध्ये आशाचा आवाज खूपच मधूर आहे. सकाळी उठून रेडिओ ऑन . घरातली कामे करता करता कान मात्र राधा कैसे न जले कडे. आता युट्युबचा जमाना आला आहे. पूर्वी बरेच वेळा ऐकलेली गाणी युट्युबवर पाहिली आणि एक वेगळाच आनंद देवून गेली. त्यातले "निगाहे मिलाने को जी... " हे गाणे पूर्वी बरेच वेळा ऐकले होते पण ते जेव्हा युट्युबवर पाहिले तेव्हापासून मी या गाण्याच्या प्रेमातच पडले आहे. इतके सुंदर चित्रिकरण आहे. नूतनचे बोलके डोळे, निरागस चेहरा त्यावरील गाण्यांच्या ओळीप्रमाणे केलेले हावभाव. हे सर्व पाहिले की त्या गाण्यामध्ये अगदी तल्लीन व्हायला होते.




आजकालच्या नेटच्या जमान्यात पूर्वीचे ऋणानुबंध संपल्यासारखे वाटतात. रेडिओच्या माध्यमातून गाणी ऐकणे. tape recorder जरी असला तरी आपल्याला पाहिजे असलेली गाणी शोधणे, त्याकरता कॅसेट विकत घेणे. एखादे आवडीचे गाणे एखाद्या कॅसेटमध्ये असले तरी ती पूर्ण कॅसेट विकत घेणे किंवा two-in-one मध्ये रेडिओवर आवडीचे गीत लागले की ते आपल्या कॅसेटमध्ये साठवून घेण्यासाठी अगदी लगच्यालगेच हातातले काम टाकून, play +record एकाच वेळी ऑन करणे. टेपचे ट्युनिंग सेट केलेलेच असायचे. अर्थात अनेक आवडीची गाणी आपण घरबसल्या कितीही वेळा आणि कोणत्याही वेळेला ऐकूबघू शकतो हे मात्र मान्य करायलाच हवे.



रेडिओवरून टेपवर आवडती गाणी साठवून घेताना काहीवेळा ते नीट घेता आले नाही तर खूप चिडचिड व्हायची. एकदा कुणीतरी टेपचा आवाज बंद करून ठेवला होता, एकदा टेप संपली होती आणि एकदा घाई गडबडीत पलंगावरून उठले गाणे टेप करायला तर पायच मुरगळला. अश्या आठवणी आहेत. मी माझ्या आवडत्या गाण्यांच्या २ कॅसेट तयार केल्या होत्या. त्यातली एक अजूनही माझ्याकडे आहे आणि एक हरवली. त्यावेळची मजा काही औरच होती. रेडिओवरचे पुढचे गाणे कोणते लागणार हे माहित नसल्यामुळेच जास्त रेडिओ ऐकला जातो. आणि मुख्य म्हणजे गाणी ऐकता ऐकता बाकीची कामे पण होतात. शिवाय गाण्याच्या अधूनमधून जे निवेदन करतात ना ते पण छान असते त्यामुळे गाण्याची एक वातावरणनिर्मिती होते.