Tuesday, January 30, 2007

चुपके चुपके चल री पुरवैय्या

चुपके चुपके चल री पुरवैय्या
बासुरी बजाय रे रास रचाए रे दैय्या रे
दैय्यागोपीके संग कन्हैय्या
चुपके चुपके चल री पुरवैय्या


एक प्रख्यात वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ परिमल त्रिपाठी एका निसर्गरम्य ठिकाणी वनस्पतीशास्त्राचे संशोधन करायला आलेला असतो. सकाळी न्याहरीच्या वेळी चहा घेऊन येताना तिथल्या गेस्ट हाऊसचा चौकीदार परिमलला विचारतो ," आप घासफुस के डाक्टर है क्या?"

"घासपुसके नही काका कमसे कम फूल पत्ती तो कहो " परिमल.

त्या चौकीदाराला त्याच्या आजारी नातवाला बघण्यासाठी तातडीने जावे लागते तोपर्यंत त्याचा रोल निभावण्याची जबाबदारी खुद्द परिमल आपल्या हाती घेतो. त्याच वेळेस कॉलेजमधल्या काही तरूणी सहलीसाठी तिथे येतात. त्या सर्व डॉ परिमलच्या फॅन असतात, विशेष करून सुलेखा तर त्यांना भेटायला खूपच अधीर झालेली असते. त्या मैत्रिणींपैकी एक जण ओरडून सांगते " सुलेखा डॉ परिमल त्रिपाठी येथे आलेले आहेत!!"

"काय? डॉ परिमल त्रिपाठी!!!" सुलेखा डोळे विस्फारून त्यांच्या खोलीवर लिहिलेली पाटी वाचते. तेवढ्यात चौकीदार उर्फ परिमल त्या मुलींची चौकशी करायला येतो. सुलेखाला संशय येतो. काही वेळाने सर्व मैत्रिणींची नजर चुकवून सुलेखा चौकीदाराकडे येते.

"प्रोफेसर त्रिपाठी सचमूच बुढे है क्या?" सुलेखा.

"हां बूढे है, लेकिन बहूत बूढे नही, लेकीन उनका मुँह थोडा टेढा है. बेचारे को लखवा है ना!! लेकीन प्रोफेसरके बूढे होनेसे आप क्यु निराश हो रही है" परिमल

"नही नही मै तो इसलिए कह रही हुँ की सूना है इतनी कम उम्रमे बॉटनी की तरक्की किसीने भी नही की" सुलेखा

"अरे प्रोफेसर की जवानी भी तो पचास सालकी उम्रमे आती है जब बाल झडने लगते है, दात गिरने लगते है, अकलकी जवानी है न शकल की तो नही ना!! परिमल

दुसऱ्या दिवशी त्या मुलींची निघण्याची वेळ होते आणि त्याच वेळेस खरा चौकीदार येतो आणि परिमलचे नाटक उघडकीला येते. नंतर काही दिवसात परिमल सुलेखाचे लग्न होते. सुलेखाला तिच्या जिज्ज्याजींबद्दल खूप अभिमान असतो. सतत त्यांची तारीफ, जिजाजी ये है!!, जिजाजी वो है!! त्यांची सततची तारीफ परिमलला पहावत नाही आणि तो मनाचा निश्चयच करतो की आपल्या बायकोच्या डोक्यातून तिच्या जिजाजींचे भूत उतरवायचेच.

एके दिवशी तिच्या जिजाजींचा निरोप येतो की त्यांना शुद्ध हिंदी बोलणारा driver पाहिजे. हे ऐकताच परिमल सुलेखासमोर एक प्रस्ताव मांडतो की मी driver बनून पुढे जातो, मग तू सात आठ दिवसांनी ये. तुझ्या जिजाजींना मी अजिबात ओळखू येणार नाही. तिलाही तो प्रस्ताव पटतो पण ती म्हणते "हमारी नयी नयी शादी हुई है. driver बनके जाओगे तो हम मिल भी नही सकेंगे!! मै रहुँगी उपर और तूम रहोगे नीचेवाले गॅरेजमे.

"हम छुपछुपके मिलेंगे, इस तरह छुपछुपके मिलनेमेही बीवीका प्यार बढता है.
डॉ परिमल त्रिपाठी प्यारे मोहन बनून जिजाजींकडे येतो व शुद्ध हिंदी बोलून बोलून त्याला चिडीला आणतो.

परिमल, जिजाजी यांचे संवाद:

"हम भीतर आ सकते है साहेब?" परिमल

"हां हां आओ आओ" जिजाजी

"प्रणाम साहेब मै श्री प्यारे मोहन इलाहाबादी आपका नया वाहनचालक" परिमल
"रास्तेमे कोई कष्ट तो नही हुआ, खाना वाना खाया?" जिजाजी

"भोजन तो हमने लवपथग्रामि स्थलपरही किया है" परिमल

"लवपथग्रामि?" जिजाजी

"हम लवपथग्रामि अग्निपथसेही आए है ना!!" परिमल

" ओ याने की ट्रेन!!" जिजाजी

"हिंदी बोलते समय हम अंग्रेजी शब्दोंका प्रयोग उचित नही समझते " परिमल

" व्हॉट नॉनसेन्स" जिजाजी

"नॉनसेन्स नही, क्या बकवास है. हिंदी बोलते समय अंग्रेजी शब्दोंका प्रयोग अच्छा नही लगता" परिमल

"अंग्रेजी जानते हो?" जिजाजी

"हमे तो ये भाषा बिल्कुलही पसंद नही साहेब, बहुतही अवैग्यानिक भाषा है. सी यु टी कट है तो पी यु टी पुट हो जाता है, डी ओ डु है तो टी ओ टु है, जब डी ओ डु , टी ओ टू तो जी ओ गू क्यु नही होता है साहेब? परिमल

"हा हा ठीक है. नीचे हमारा driver है उसे मिलो

जिजाजींचा जुना वाहनचालक याच्याशी प्यारे मोहन ओळख करून घेतो, गाडी चालवून बघतो.

जिजाजी, प्यारे मोहन, दिदी , जेम्स यांचे संवाद

"इसके डिफरन्शिअलमे लफडा है साहेब" जेम्स

"साहेब आग्या हो तो ब्रेक का निरीक्षण परीक्षण कर लुँ " प्यारे मोहन

"अरे बापरे एक लफडा कहता है, तो एक निरिक्षण परीक्षण कहता है, लगताही नही की एक ही गाडी की बात हो रही है" दिदी

"तुम्हारी तो भाषा ही नष्ट हो गयी है बंबईमे रहकर" जिजाजी (चिडलेला)

"नष्ट नही साहेब भ्रष्ट कहो, भाषा भ्रष्ट हो रही है" प्यारे मोहन

गाडीचे इंजिन तपासून म्हणतो " अब कोई कष्ट नही साहेब. तेलछन्नी जिसे आप ऑईल फिल्टर कहते है जिसका पेच ढिला हो गया था, वो कस दिया है, ध्वनी बंद. मै जरा हस्तप्रक्षालन करके आता हुँ" परिमल
आठ दिवसानंतर सुलेखाची चिठ्ठी येते " की मी येत आहे" सुलेखा आपली बायको येणार व आपल्याला भेटणार हे कळल्यावर प्यारे मोहन खूप खुष होतो आणि स्टेशनवर तिला न्यायला दिदी व प्यारे मोहन जातात. तिला पाहिल्यावर तिची जातीने चोकशी करतो. घरी आल्यावर

प्यारे मोहन, दिदी, सुलेखा, जिजाजींचे संवाद:


"घासफुसके डॉक्टर नही आए?" प्यारे मोहन

" वो पटना गये है आठ दिनके बाद आएंगे" सुलेखा

"सुलेखाजी हमारी पत्नी कैसी है? वो हमे स्मरण करती है?" प्यारे मोहन

"मरण?" दिदी

"मरण नही, स्मरण जिसे हिंदुस्थानीमे याद कहते है" प्यारे मोहन

"वो आपको बहूत याद करती है" सुलेखा

"ए प्यारे मोहन तुने तो कहाँ था की तुम अकेले हो, ये अचानक तेरी बिवी कहाँसे आ गयी?" जिजाजी
"क्या करते साहेब, हम यहा बंबईमे, वो वहा इलाहाबादमे. ये सोचकर मनको शांत कर लेते थे की हम विवाहीत है ही नही. परंतु आज सुलेखाजी आ गयी है तो अचानक मनमे ये विवाहीत होनेकी भावना जागृत हो उठी, कोई हमारी पत्नी की देशसे आया है." प्यारेमोहन

"साहेब वो हमारा थायसिस का क्या हुँआ?" प्यारेमोहन

"थायसिस!! किसका थायसिस?" सुलेखा

"अरे थायसिस नही, साथमे न्युमोनिया भी है. ए प्यारे मोहन अभी अभी सुलेखा आयी है, इस शुभसमय पर ऐसे अशुभ शब्द बोलना ठीक है क्या?" जिजाजी

"यथार्थ साहेब, ऐसे शुभ अवसर पर अशुभ शब्दोंका उच्चार निश्चीत अनुचित है." प्यारे मोहन

इथे खऱ्या अर्थाने चित्रपट संपतो. सुलेखा व प्यारे मोहन मुद्दामून दिदी व जिजाजींना संशय येईल असे वागतात, व एके दिवशी चिठ्ठी लिहून पळून जातात. नंतर आठ दिवसांनी लिटरेचरचा प्रोफेसर कुमार (परिमलचा मित्र) डॉ त्रिपाठी बनून जातो पण उतरतो प्रशांतकडे (परिमलच्या मित्र) खोटं खोटं रागावतो सुलेखा प्यारे मोहन बरोबर गेली, ती आल्याशिवाय येणार नाही.

तिकडे प्रशांतची मेहुणी वसुधाही परिमल त्रिपाठींची फॅन असते. ती कुमारला सतत तिला बॉटनी शिकवण्यासाठी विनवत असते आणि कुमारला बॉटनीतले ओ की ठो येत नसते. असे करता करता कुमारचे नाटकही उघडकीला येते, मग परत एक प्लॅन रचून कुमार व वसुधाचे लग्न लावतात आणि शेवटी सगळ्यांनाच सर्व परिस्थितीचा उलगडा होतो. मंदीरामध्ये कुमार व वसुधाच्या लग्नाच्या वेळी सुलेखा जिजाजींना विचारते," क्यु जिजाजी आप तो सुंकके आदमी पहचान लेते थे ना?

हां बेटा इस समय जुकाम जरा लंबा हो गया था. यकीन मानिये जुकाममे नाक बंद होती है मगर मेरी तो अकलही बंद हो गयी थी. इस उम्रमे तो बेइज्जती होनी थी वो तो हो चुकी, मगर आप जनता जनार्दन है बाहर जाके ये मत कहना की मै उल्लू बन गया!! नमस्ते.


पात्र परिचय:
१) जिजाजी - ओमप्रकाश २) सुलेखा - शर्मिला टागोर ३) दिदी - उषाकिरण ४) कुमार - अमिताभ बच्चन(लिटरेचरचा प्रोफेसर) ५) वसुधा - जया भादुरी ६) प्रशांत - असरनी ७) डॉ. परिमल त्रिपाठी - धर्मेंद्र ८) प्यारे मोहन - धर्मेंद्र ९) खोटा परिमल - अमिताभ १०)पहिला वाहन चालक जेम्स - केष्टो मुखर्जी

Monday, January 15, 2007

बालगोष्टी (१)

कोल्हा-गेंडा-हत्ती

एका रानात एक कोल्हा रहात होता. त्याच रानात एक मोठे तळे होते. रानात झाडे भरपूर होती. कोल्हा रानात मोकळेपणाने फिरत असे. आपणच रानाचे राजे आहोत असे त्याला वाटे. रानातुन फिरत जात असता एकदा गेंड्याने त्याला एक टप्पल मारली.," ए गेंड्या उगीच मला मारु नको हं, माझ्या अंगात किती ताकद आहे हे मी तुला एकदा दाखवीन." गेंडा म्हणाला, " अरे जा रे बेट्या, तुझी शेपुट धरुन तुला काट्यात फेकुन देईन" असे म्हणुन गेंडा खोखो हसला. शेपुट हलवीत कोल्हा पुढे गेल्यावर हत्तीने त्याला एक टप्पल मारली, "ए हत्ती मारु नकोस हं. माझ्या अंगात किती ताकद आहे हे तुला एकदा दाखविन." तर हत्ती म्हणाला, " अरे चिमुरड्या, तुझा कान धरुन देईन तुला भिरकावून. तळ्यात पडशील. चल जा फुट" बरं बरं म्हणुन कोल्हा निघुन गेला.


जांभळीच्या झाडाखाली बसुन कोल्ह्याने विचार केला, तेंव्हा त्याला एक युक्ती सुचली. त्याच दिवशी तो गावात गेला, त्याने एक मोठी जाड दोरी आणली, एका पिशवित भाजक्या शेंगा, खारे दाणे आणले व ती पिशवी व दोरी जांभळीवर एका फांदीला लटकुन ठेवली.


दुसऱ्या दिवशी मोठ्या रुबाबात, गोंडेदार शेपुट हलवित बरोबर मोठी दोरी घेवुन कोल्हा गेंड्याकडे आला व म्हणाला, " गेंड्या ह्या दोरीचे टोक पकडून येथे उभा रहा. मी दुसऱ्या बाजुस जाऊन शिटी मारीन, तेंव्हा तु ही दोरी ओढायला लाग. अरे तुला ओढून तळ्यातच पाडतो." गेंड्याने दोरी शिंगाला बांधली व म्हणाला, 'अरे लेका जा, माहिती आहे तुझी ताकद.". दोरीचे दुसरे टोक धरुन कोल्हा तळ्याच्या दुसऱ्या टोकाला गेला. दुसरे टोक त्याने हत्तीच्या सोंडेत बांधले व म्हणाला , पकड हे टोक. मी तळ्याच्या पलीकडे जातो. मी शिटी वाजवीन मग तु ओढायला लाग. दोरीची दोन्ही टोके दोघांचेकडे देउन कोल्हा जांभळीवरील एका उंच फांदीच्या शेंड्यावर जाउन बसला. तेथुन त्याला हत्ती व गेंडा सहज दिसत होते. खारे दाणे खात त्याने जोराने शिटी मारली, तशी हत्ती व गेंडा दोर ओढू लागले.


गेंड्याने तळ्याच्या काठावर पाय रोवून असा जोराने हिसका दिला की हत्ती कोलमडला व धप्पकन तळ्यात पडला. हत्ती चिडला, त्याने पण तळ्यातुन बाहेर येउन दोन पाय तळ्याच्या काठावर रोवून हिसका दिला, तसे गेंडा धप्पकन तळ्यात पडला. कोल्हा झाडावरुन गम्मत पहात होता, त्याला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. अधुनमधुन तो खारे व भाजके शेंगदाणे खात होता, मधुनच एखादे पिकले जांभुळ खात होता.


आता दोघेही चिडले व जोर लावून दोर ओढू लागले, त्यांच्या पुढे दोरी ती काय टिकणार?, करकर आवाज करीन दोरी तुटली व दोघेही आपटले. हत्ती पडला चिखलात त गेंडा पडला काट्यांत. कोल्हा जांभळीवरुन खाली उतरला व थेट हत्तीकडे गेला, म्हणाला "काय सोंड्या कळली ना माझी ताकद" हत्तीने सोंड हलवून म्हणले आता मी तुला टप्पल मारणार नाही. शेपुट हलवीत कोल्हा गेंड्याकडे गेला व म्हणाला, " काय रे गेंड्या जिरली ना तुझी" गेंडा कुठला बोलतोय, तो पडला होता काट्यांत. कोल्ह्याने गेंड्याच्या अंगातील कांटे काढले. कसाबसा उठत गेंडा कोल्ह्याला म्हणाला "आता मी तुला नाही टप्पल मारणार"
आणि त्यादिवसापासुन कोल्हा शेपटी हलवत रानांत फिरतो, त्याच्या वाटेला आता कोणी जात नाही.

ह्या बालगोष्टी माझ्या वडिलांनी आम्हांला लहानपणी सांगितल्या आहेत व त्यांच्या शब्दात लिहुनही ठेवल्या आहेत, त्या मी मनोगतवर लहान मुलांकरता देत आहे.


रोहिणी

बालगोष्ट (२)

वाघ व त्याची शिकार

एका नदीच्या काठी एक गाव होते. तेथून वर सारे जंगलच जंगल. जंगल डोंगराला लागून होते, व त्यापलीकडे एक गाव. एकदा एका गृहस्थाला डोंगरापलीकडील गावी राहणाऱ्या त्याच्या लेकीकडे जायचे होते. जाताना त्याने खाण्याचा डबा घेतला आणि कोट, पागोटे घालून तो लेकीकडे जाण्यास निघाला. जाताना रस्ता चुकला. चुकीच्या रस्त्याने जाताना त्याला भरपूर झाडे लागली. रस्ता काही केल्या सापडेना. चालून चालून दमला बिचारा. तेव्हढ्यात त्याला एक पाण्याने तुडुंब भरलेली विहीर दिसली. त्याने विहिरीतून पाणी आणले, डबा खाल्ला व झाडाखाली विश्रांती घेण्यासाठी आडवा झाला. थोड्याच वेळात तो घोरू लागला.


त्याच जंगलात एका करवंदीच्या जाळीत एक वाघ झोपला होता. त्याला माणसाचा वास आला. तो उठला आणि त्या घोरणाऱ्या माणसाजवळ आला, मनात म्हणाला 'चला आज चांगली शिकार मिळाली'. 'चांगला माझ्या तावडीत सापडला आहे. उठला की खाऊ त्याला'. . थोड्यावेळाने तो गृहस्थ उठला, त्याने पागोटे बांधले. सहज उजवीकडे पाहिले तर वाघ. आता काय करणार? उठून पळत सुटला. तोच वाघाने त्याच्या अंगावर झेप घेतली. त्यांची कुस्ती सुरू झाली. एकदा वाघ वर तो खाली. एकदा तो वर वाघ खाली. असे करता करता त्याच्या कोटातील तपकिरीची डबी बाहेर पडून तपकीर हवेत उधळली.


तपकीर त्या वाघाच्या नाकात गेली. वाघाला एकसारख्या सटासट शिंका येऊ लागल्या. तो गृहस्थ मध्येच थांबून वाघाला म्हणाला,' अरे मला खातोस ना?'. वाघ म्हणाला, ' अरे थांब रे जरा. मला शिंका येत आहेत'. वाघ सटासट शिंकतोय असे पाहून तो गृहस्थ तेथून पळाला. भरभर चालून डोंगर ओलांडून तो लेकीकडे गेलासुद्धा. वाघाच्या नाकातोंडातून पाणी येत होते. तो शिंकण्याने बेजार झाला होता. इकडे तिकडे पाहतो तो काय? तो गृहस्थ निघून गेला होता. वाघ मनात म्हणाला,' जाऊ दे. उद्या बघू' आणि हळूहळू जाऊन जाळीत झोपला.


हाच वाघ पुढील पानावर...

चकवा

इनामदार खोत. त्यांची कोकणात मोठी वाडी आहे. वाडीच्या मधोमध त्यांचे घर. घर साधे, उतरत्या छपराचे. पुढे अंगण, परसदारी दोन विहीरी. पाणी मुबलक. नारळ, सुपारी, फणस यांचे भरपूर उत्पन्न. वाडीस लागूनच भातशेती. बापू खोतांचा परिवार मोठा. दोन मुलगे, लेकी, जावई, नातवंडे. थोरला मुलगा हाताशी आल्याने कोणतीच काळजी नाही. बापू बोलण्यात अगदी मिठ्ठास. गप्पा, विनोद यात त्यांना भारी रस. पाऊलवाट वाडीमधून गेलेली. तिसऱ्या वाडीपलीकडे अण्णा मास्तरांचे छोटे घर. मास्तरांचा स्वभाव पण बोलका. बापू व अण्णांचे संबंध घरोब्याचे. रोज सायंकाळी खोत मास्तरांकडे जात. गेल्यावर चहापाणी होत असे. इकडच्या तिकडच्या खेतीवाडीच्या गप्पा होत. त्यातून गोष्टी विनोद रंगत. साधारण साडेनऊ-दहाच्या सुमारास खोत घरी परत येत असत. गप्पा मारता मारता फारच उशीर झाला तर बापूंचा मास्तरांकडेच मुक्काम होई. सकाळी उठल्यावर काकू हिरवी मिरची लावून दही पोहे करीत, त्यावर चहा पिऊन बापू निघत.


एकदा बापूंना घरून निघायलाच रात्र झाली. चांदणे होते. वाट तशी पायाखालचीच. बापू निघाले. चालता चालता तीन-चार बिड्या संपल्या. खरतर वीसएक मिनिटांत बापू मास्तरांचे घर गाठत असत. पण आज तास, दीड तास झाला तरी वाट संपेना. पुन्हा तीच झाडे, तीच पाऊलवाट. बापूंना घाम फुटला तरी मास्तरांचे घर येईना. मागे वळावे तर घर दिसेना. बापू थकले. एका माडाच्या बुंध्यापाशी टेकून बसले. शांतपणे विचार केला, एक बिडी ओढली. थकल्यामुळे त्यांना झोप लागली.


पहाटेचे गार वारे सुटले तशी त्यांना जाग आली. तांबडे फुटले होते. पाहतात तर आपल्याच वाडीच्या माडाजवळ आहोत हे त्यांच्या ध्यानात आले. सावकाश बापू घरी आले. कुणाशी काही बोलले नाहीत. बापू मास्तरांच्या घरीच राहिले असे घरच्यांना वाटले. स्नानाचे पाणी तापले होते. बापूंनी अंघोळ केली. त्यांची देवपूजा झाली. नेहमीप्रमाणे दहा वाजता जेवणे झाली, आणि बापू बाहेर पडवीत येऊन बसले. सुपारी कातरून विडा खाल्ला. पाहुणे आले होते, त्यांच्याशी बापू बोलत होते तोच हातात छत्री घेऊन येताना मास्तर दिसले.


मास्तर पडवीत आले, चपला काढल्या, कोट खुंटीवर ठेवला, आणि हासत हासत ते बापूंजवळ येउन बसले. माजघरातून दुधाचे पेले आले. रिकामा पेला लोडाजवळ ठेवून मास्तर म्हणाले, " बापू, बाकी काही म्हणा, काल रात्री तुम्ही खूपच कमाल केलीत. मागच्या आठवणी, विनोद यात पहाट केव्हा झाली हे कळलेच नाही. अहो विड्यांची तीन बंडले आपण संपविलीत आणि तुम्ही गेल्यावर ही म्हणाली ,'' अहो, गप्पा मारायच्या त्याला काही सुमार? पहाटेपर्यंत? हे ऐकत, मास्तरांच्या बोलण्याला दाद देत बापू एकीकडे कपाळावरील घाम पुसत होते.


आदल्या दिवशी चकवा मास्तरांच्या घरी गेला होता. मास्तरांशी गप्पा मारून, बिड्या ओढून, पहाटेस निघून गेला. चकवा ही काय अजब चीज आहे हे बापूंना आज कळाले होते.


लहानपणी वडिलांनी सांगितलेली गोष्ट त्यांच्याच शब्दात. चकवा हे कोकणातील भूत असते.

रोहिणी

सराफ

ग्वाल्हेरमधल्या एका नामांकित सराफाला एकदा चांदीत तोटा आला. ठरल्याप्रमाणे गिऱ्हाईकाला त्याला चांदीचा माल देता येणार नव्हता, त्यामुळे त्याची पत जाण्याची वेळ आली होती. चार दिवसात तेव्हढी चांदी मिळवणे व त्याच्या वस्तू करून देणे जमणार नव्हते. सराफास काही सुचेना. त्याच्या दुकानातील नोकराच्या लक्षात ही गोष्ट आली. त्याने धीर करून मालकास सांगितले "तुम्हाला काळजी लागली आहे हे मला दिसत आहे. मी एक सांगू का? माझ्या माहितीत एक गृहस्थ आहे. तो तुम्हाला पाहिजे असलेली चांदी देईल. पण त्याच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला वागावे लागेल. मालक म्हणाला "असा कोण गृहस्थ आहे की जो मला हवी असलेली चांदी पाहिजे त्या वजनात देऊ शकेल? चल मला दाखव. मी तुझ्याबरोबर येतो.


ठरल्याप्रमाणे नोकराबरोबर तो निघाला. जवळच्या गावच्या वेशीजवळ एक लहान झोपडे होते. तिथे ते गेले. झोपडीभोवती काटेरी कुंपण होते. ते दोघे आत गेले. समोरच एक गृहस्थ डोक्याला फडके गुंडाळून एका कांबळ्यावर बसला होता. नोकराने व सराफाने त्याला हात जोडून वंदन केले. नंतर ते दोघे खाली बसले. त्या गृहस्थाकडे पाहून सराफास शंका वाटू लागली की हा काय मला चांदी देणार? नोकराने सराफाची अडचण त्यास समजावून सांगितली. त्यावर तो गृहस्थ म्हणाला, " मी सांगतो तसे करणार असाल तर मी आपल्याला हवी असलेली चांदी उद्या देतो " सराफाने होकारार्थी मान हालवली.
तो म्हणाला, " आज रात्री तुम्ही कांबळ्यावर झोपा. कुलदैवतेचे स्मरण करा. सकाळी कांबळ्याखाली तुम्हाला हवी असलेली चांदी तुकड्यांच्या स्वरूपात मिळेल. सराफ म्हणाला " चालेल. मी दर महिन्याला एक किलो चांदी परत करीन" "चालेल. जा आता तुम्ही. थांबू नका." गृहस्थ म्हणाला.


त्या गृहस्थाने सांगितल्याप्रमाणे सराफाने केले. दुसऱ्या दिवशी त्याला कांबळ्याखाली साडेचार किलो वजनाचे तुकडे दिसले. त्यातून त्याने आलेली ऑर्डर पूर्ण केली. एका महिन्यानंतर तो एक किलो चांदी घेऊन त्या गृहस्थाकडे गेला. सराफ त्या गृहस्थाच्या झोपडीत शिरणार तोच तो गृहस्थ आतून म्हणाला "तिथेच थांब. आंत येऊ नकोस. मागील दारी एक विहीर आहे. त्यात ती चांदी टाक. मला पोहोचेल." सराफ चांदी घेऊन मागील दारी गेला. विहीर शेवाळ्याने भरली होती. तो एक मिनिट उभा राहिला. मनाचा हिय्या करून त्याने ती चांदी विहिरीत टाकली व निघून गेला. चार महिने त्याने एक किलो प्रमाणे चांदी विहिरीत टाकली. आता फक्त अर्धा किलो पुढील महिन्यासाठी उरली. तो मनाशी म्हणाला," अर्धा किलोच राहिली आहे. नाही दिली तर काय होणार आहे? म्हणून तो पुढील महिन्यात गेलाच नाही.


पण पुढच्या महिन्यात एक दिवस उठून पाहतो तर काय त्याच्या शोकेसमधली एक चांदीचा तांब्या व एक ताम्हण याची राख झाली होती. तो तसाच त्या गृहस्थाकडे गेला. सराफ त्या झोपडीत शिरणार तर आतून आवाज आला. " आत येऊ नकोस. मी तुझा तांब्या व ताम्हण कालच नेले आहे." हे ऐकून सराफ थक्क झाला.


टीपः ही गोष्ट खूप पूर्वी एका आजोबांनी सांगितली आहे. त्यांनी सांगितले की ही एक सत्य घटना आहे. त्या गृहस्थाने सिद्धी प्राप्त करून घेतली होती त्यामुळे त्याला असे करता आले. कुणाला माहीत आहे का की सिद्धी म्हणजे काय? ती कशी प्राप्त होते. त्याचा उपयोग कसा केला जातो. वगैरे.

बालगोष्ट (३)

ढोंगी बगळा

उन्हाळा वाढत चालला होता. नद्या, नाले, ओढे, डोंगरावरून पडणारे ओहोळ कोरडे पडू लागले. रानातील गवत सुकले. पाणथळ जागेच्या आश्रयाने पक्षी घरटी बांधू लागले. एक बगळा झाडाच्या शेंड्यावर बसला होता. सूर्य मावळत होता. बगळ्याची नजर दूरवर असलेल्या एका तळ्याकडे लागली होती. तळ्यात खूप मासे फिरत असलेले त्याला दिसत होते. आपल्याला ते कसे मिळतील या विचारात असता सूर्यास्त झाला. झाडावरच तो झोपी गेला.


सकाळ झाली तशी बगळा उठला. पंख पसरून उडत उडत तो तळ्याकाठी आला. एकेक पाऊल टाकीत तो तळ्यात उतरला. एक पाय उचलून, चोच वर करून त्याने डोळे मिटले व "राम राम" म्हणू लागला. तळ्यात शिरता क्षणी काठावरचे मासे सुळकन तळ्यात गेले. थोड्यावेळाने एक बारीक मासा त्याच्याजवळ आला व धिटाईने त्याला म्हणाला, " अहो बगळेबुवा, तुम्ही आम्हाला खात कसे नाही?" त्यावर बगळा म्हणाला, "अरे, आता मी मासे खाणे सोडून दिले. मी फक्त पाण्यात उभे राहून ध्यान करतो व तोंडाने "राम राम" म्हणतो. बगळा आपल्याला खात नाही असे बघून मासे धीट झाले. ते त्याच्याजवळून पोहू लागले. काही दिवसांनी तो माश्यांना म्हणाला, "तुम्हाला माहीत आहे का? उन्हाळा वाढतो आहे. या तळ्याचे पाणी आटणार, मग तुमचे कसे होणार?" मग आम्ही जायचे कोठे? एक मासा म्हणाला. त्यावर बगळा म्हणाला, " माझे लक्ष आहे. या डोंगरापलीकडे एक मोठे तळे आहे. त्यात खूप पाणी आहे. लाटांवर लाटा उसळत असतात. त्यात मासे आहेत, कासवे आहेत, बेडूक आहेत. पण! "पण म्हणजे?" मासे म्हणाले. "तुम्ही त्या तळ्यात कसे जाणार? मी तुम्हाला तिकडे नेऊ शकेन, पण एका वेळी फक्त चौघांना. याल तुम्ही?" बगळा म्हणाला. "हो हो. आम्ही नक्की येऊ." मासे म्हणाले.

दुसरे दिवशी बगळा तळ्यात उतरला. त्याच्या भोवती मासे जमले. त्याने आपल्या चोचीत चार मासे घेतले व तो आकाशातून उडत उडत जाऊ लागला. गाव ओलांडले, ओढा पार केला व डोंगर माथ्यावर आला. तो हळूहळू खाली उतरू लागला. मासे म्हणाले , "बगळेबुवा, आपले तळे कुठे आहे?" तशी बगळा म्हणाला, "कुठचे तळे, आणी कुठचे पाणी. मी आता तुम्हाला खाणार आहे." असे म्हणून त्याने एकेक मासा खडकावर आपटून खाऊन टाकला. उंच झाडावर बसून फांदीला आपली चोच पुसली व सायंकाळी त्याच झाडावर झोपला. दुसऱ्या दिवशी परत चार मासे खाल्ले. असे बरेच दिवस चालले.



हे सर्व एक खेकडा गवतावर बसून पाहत होता. तिरका तिरका चालत तो त्याच्या जवळ आला व त्याचा पाय पकडून म्हणाला, " बगळेबुवा, मला केंव्हा नेणार मोठ्या तळ्यात?" बगळा मनात म्हणाला, "मी रोज मासे खातो आहे. चला आज खेकडा खाऊ." खेकडा म्हणाला नेणार ना? "चल, आज तुला नेतो." बगळा म्हणाला. खेकडा त्याच्या पायावरून चढत जाऊन त्याच्या पाठीवर बसला. त्याला घेऊन बगळा उडाला व नेहमीप्रमाणे डोंगरावर उतरू लागला. खेकड्याने खाली पाहिले. खेकड्याला त्याचा डाव कळला व म्हणाला, " बगळेबुवा, हा तर डोंगर आहे." त्यावर बगळा हसला व म्हणाला," कुठचे तळे व कुठचे पाणी. आता मी तुला खाणार आहे." खेकडा त्याच्या मानेवर उतरला व म्हणाला, "बऱ्या बोलानं मला माझ्या तळ्यात नेऊन सोड. नाहीतर तुझी मान कापीन." बगळा व खेकड्यामध्ये झटापट सुरू झाली. खेकडा त्याच्या मानेवर बसल्याने त्याला काहीच करता आले नाही. खेकड्याने आपल्या नांग्या त्याच्या मानेत रुतवल्या व त्याची मान कापली. दोघेही डोंगरावर आपटले. खेकडा तिरका तिरका चालत डोंगऱ्याच्या पायथ्याशी आला व रानातून चालत चालत परत आपल्या तळ्याच्या काठापाशी आला व डुबकन पाण्यात उतरला. त्याला पाहून मासे त्याच्या भोवती गोळा झाले. खेकडा माशांना म्हणाला, "अरे, तो बगळा पक्का ढोंगी होता. मी त्याला ठार मारले आहे. कितीही उन्हाळा वाढला तरी या तळ्यातील पाणी आटणार नाही. या तळ्यात भरपूर पाणी आहे."


अशा रितीने बाकीचे मासे त्या तळ्यात पुन्हा आनंदाने नांदू लागले.

कूकी

अहो, ही पाककृती नाही. कूकी म्हणजे कुलुपांचे किस्से.

अगदी पूर्वी दरवाजाला आधी कडी व त्याला कुलुप लावत असत. नंतर दरवाज्यालाच लॅच असलेली दारे निघाली. या दरवाज्यांना बाहेरुन कडी लावुन कुलुप नाही लावले तरी चालते, फक्त दार ओढुन घ्यायचे, पण त्याची चावी मात्र आठवणीने आपल्याकडे असायला हवी नाहीतर पंचाईत.

असेच पंचाईत झालेले एक-दोन किस्से सांगते. iitb ला आम्ही रहात होतो. शेजारीच माझी स्वरदा मैत्रीण रहायची. त्या दिवशी रविवार होता. सकाळी चहा, बाकीचे आवरणे झाल्यावर स्वरदा काय करते, जरा जाउन गप्पा मारु, म्हणुन तिच्या दारावर टकटक केले. ती हातात कुंचा घेउनच अवतारात बाहेर आली,म्हणाली जरा साफसफाई करत आहे. माझ्याशी गप्पा मारतच दरवाज्याजवळ उभी होती. तिच्या घरातील २-४ झुरळे तिने कुंच्याने बाहेर काढली. बाहेरच ती झुरळे इकडेतिकडे फिरत होती. गप्पा मारताना तिचे अगदी बारीक लक्ष होते त्यांच्याकडे, म्हणजे त्यांना तिला परत आत येऊ द्यायचे नव्हते. त्यातले एक हुशार झुरळ तिच्याकडे येत असताना तिला दिसले. तिने त्याला डोळ्यानेच दटावले. ते परत मागे फिरले. ते परत आल्यावर शुक-शुक करत त्याला घालवून देत होती. एकीकडे आमच्या गप्पा रंगात आल्या होत्या. आता तर ते सुसाट धावत सुटले तिच्या घरात यायला. तिने चपळाईने त्याला ए-ए-ए- थांब करत जोरात दार लावुन घेतले. झुरळच ते, ते थोडेच बाहेर थांबणार आहे. ते दरवाज्याच्या फटीतून चपळाईने आत गेले, आणि ती बाहेर राहिली. चावी घरातच राहिली होती. तिचा नवरा लेंग्यावरच चक्कर मारायला बाहेर गेला होता. तो परत आला, तर हा गोंधळ झालेला. दुसरी चावी त्यांनी तिच्या बहिणीकडे ठेवली होती सांताक्रुझला. मग विनायकची पँट घालुन तो दुसरी चावी आणायला गेला.....


iitb ladies hostel ला लग्न करून आलेल्या phd विद्यार्थ्यांकरता रहायला जागा दिली होती. चाळीसारख्या एकाशेजारी एक अशा खोल्या होत्या. त्यातल्या २-२- खोल्या ४-५ जोडप्यांना दिल्या होत्या. त्यातील एक खोली झोपायची आणि एक स्वयंपाकाची केली होती. त्यावेळेला पॅडलॉकची कुलुपे होती. कडी लावल्यावर कुलुप कडीमधे घालुन दाबायचे. 'टक' असा आवाज येतो, म्हणजे कुलुप लागले. कुलुप उघडायलाच फक्त चावी लागते. त्या दिवशी मी व वि बाहेरुन खूप खाउन आलो होतो. भेळपुरी,पाणीपुरी, रगडापॅटीस , त्यामुळे जेवणाची भुक नव्हती. कॉफी पिउन झोपलो. रात्री १२ वाजता खूप भुक लागली, म्हणून स्वयंपाक खोलीचे दार उघडायला गेलो तर लक्षात आले की त्या कुलुपाची चावी त्या खोलीच्या आतच राहिली आहे. नंतर रखवालदाराकडून 'हॅकसॉ' आणुन कुलुप कापले. नंतर कूकर लावुन आमटी भात खाल्ला.
असे चाव्यांचे बरेच किस्से आहेत. सगळे सांगत नाही, नाहीतर म्हणाल काय बोअर मारत आहे ही.


रोहिणी

नाडीवर्क पडदा

साहित्यः पडद्यासाठी गडद रंगीत कापड, पांढऱ्या रंगाची पसरट नाडी, दाभण, पसरट नाडी सुईच्या टोकातून आत जाईल अशी सुई, भरतकाम करताना कापड ताठ रहाण्यासाठी वापरतो तशी लाकडी रिंग.

या पडद्यासाठी पूर्ण गडद व रंगीत रंगाचे कापड निवडणे. असा रंग निवडायचे कारण पांढऱ्या रंगाची नाडी गडद रंगावर उठून दिसते. गडद रंग उदा. हिरवा, निळा शाई रंग, तपकिरी, मरुन(लाल+काळा). मी मरुन रंग निवडला होता.


संपूर्ण पडदाभर छोट्या पाकळ्या-पाकळ्यांचे डिझाइन छापणे. (उदा. जाईच्या फुलांच्या पाकळ्या) पाकळीच्या दोन्ही बाजुने दाभणाने भोके पाडणे. पाकळीच्या एका टोकाकडून वर नाडी घालून दुसऱ्या टोकाकडून ती खाली घालावी. अशा प्रकारे सर्व पाकळ्या नाडीने भराव्यात. डिझाइनमधल्या सर्व पाकळ्यांना जोडणाऱ्या रेषा साखळी पध्दतीने रेशीम दोऱ्याने भराव्यात. नाडीवर्क करताना लाकडी रिंगचा वापर करणे आवश्यक आहे.


सर्व पाकळ्यांच्या चारही बाजुने पाकळीच्या आतच अगदी छोटी पांढऱ्या दोऱ्याने एकेक टीप घालावी, म्हणजे पडदा धुतला तरी पाकळ्या ताठ रहातात. साखळी पध्दतीने भरणाऱ्या रेषांचा रेशीम दोरा पडद्याच्या रंगाच्या विरुध्द घ्यावा, म्हणजे चांगले दिसते. पडद्याचा रंग आणि रेशीम दोऱ्याचा रंग यांची रंगसंगती जुळली पाहिजे. (मरुन रंगाला गडद नारिंगी रंग) पडद्याचा रंग गडद रंगीत असलाच पाहिजे असे नाही. काही पडदे मी फिक्या रंगाचे पण पाहिले आहेत, त्यावर पण पांढरी नाडीवर्क चांगले दिसते. उदा. करडा, अबोली.


विवाहोत्सुक मुलींनी रुखवतात ठेवण्यासाठी हा पडदा करायला हरकत नाही.


रोहिणी