Tuesday, September 05, 2017

अनंत चतुर्दशी

अनंत चतुर्दशी म्हणली की माझ्या डोळ्यासमोर पूर्वीचे दिवस येतात. किती छान मिरवणूक निघायची. पहाटे उजाडायच्या आत मिरवणूक संपत आलेली असायची. आम्ही दोघी बहिणी आणि आई नवीपेठेत राहणाऱ्या
मामाकडे यायचो आणि दुपारी १२ ते १ च्या सुमारास आम्हाला पहिल्या ५ मानाच्या गणपतीचे दर्शन व्हायचे ते अल्का टॉकीजजवळ. गुलाल उधळलेले रस्ते छान दिसायचे. ढोल ताशांचे रिदम हृदयाला भिडायचे. संध्याकाळी ७ नंतर आम्ही तिघी आणि मामी अल्का टॉकीजच्या जवळच्या फूटपाथवर संतरंज्या घालून बसायचो. नंतर साधारण रात्री ९ च्या सुमारास नारायणपेठेत राहणाऱ्या मामाकडे सगळी जनता जमायची.



आमची एक मामे बहीण तिच्या घरातील गणपतीचे विसर्जन करून यायची. सदाशिव पेठेतले मामेभाऊ आणि बहिणी यायच्या. नवी पेठेत राहणारे मामेभाऊ यायचे. मग नारायण पेठेत आमच्या सर्व भावंडांचा आणि त्यांच्या मित्र मैत्रिणींचा एक अड्डा जमायचा. त्या घरी राहणाऱ्या मामाकडे रात्रीचे जेवण व्हायचे. नंतर माझी आई आणि माम्या झोपायच्या आणि आम्हाला बजाऊन सांगायच्या की दगडूशेठ हलवाई आणि मंडईचा गणपती आला की लगेच आम्हाला सांगायला या. नंतर आम्ही मामेबहिणी घोळक्याने एकमेकींच्या हातात हात घालून अल्का टॉकीज ते मंडई पर्यंत चालायचो. मध्येच एका गल्लीत जाऊन भेळ खायचो. मध्यरात्री सुजाता हॉटेल मध्ये जाऊन बटाटावडा खायचो. पिपाण्या वाजवायचो. थोड्याश्या तारवटलेल्या डोळ्यांनीच परत नारायण पेठेतल्या मामाच्या घरी यायचो. आमचे सर्व मामे भाऊ मिरवणूकी सामील झालेले असायचे.ढोल ताशे पण वाजवायचे. पहाटे ३ ते ४ च्या सुमारास श्रीमंत दगडूशेठ हलवाई आणि मंडईचा गणपती मिरवणूकीत विसर्जनासाठी सामील व्हायचे त्या आधी ११ च्या सुमारास लाईटिंगचे गणपती जायला सुरू व्हायचे. काळ्या कुट्ट अंधारात लाईटिंगचे गणपती खूपच देखणे दिसायचे. मोठमोठाल्या मूर्ती ट्रक मध्ये असायच्या. आजुबाजूला मुल., तरूण मंडळी असायची. तर काही जण गणपतीच्या बाजूलाच गणपतीच्या भव्य मूर्तीची काळजी घ्यायला असायचे. एकेक करत ओळीने गणपती मंडईपासून निघालेले असायचे विसर्जनासाठी जायला.



दगडूशेठ हलवाई आणि मंडईचा गणपती पाहण्यासाठी लोक आतुर झालेले असायचे. त्यांच्यापुढे ढोल ताशे तर असायचेच पण लेझीम खेळणारी मुले पण असायची. खूप फटाके वाजायचे. हे २ गणपती पाहण्यासाठी अलोट गर्दी. गर्दीला आवरणासाठी कडक व्यवस्था होती. सर्वजण साखळी पद्धतीने हातात हात घालून गर्दीला आवरायचे. या दोन्ही गणपतींना पाहत बसावे, ही मिरवणूक पुढे सरकूच नये असे वाटायचे. त्यावेळेला प्रत्येक चौकात खूप स्वागत व्हायचे. खूप शिस्त होती त्यावेळेला. ढोल ताशांचे रिदमही अजिबात संपू नये असे वाटायचे.
आम्ही सर्व जण पहाटे हे दोन्ही गणपती पहायला लक्ष्मीरोड वर हजर व्हायचो. गणपतीला डोळे भरून पहायचो. नमस्कार करायचो. हा सर्व सोहळा डोळ्यात साठलेला असायचा मिरवणूकीच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत ! मिरवणूक संपली की थोडे उजाडायला लागायचे. सर्वजण अमृततुल्यचा चहा घ्यायचो. अमृततुल्यच्या टपरीवर आम्ही १५-२० जण! चांगले दोन तीन कप आले घातलेला व चहाचा मसाला घातलेला चहा प्यायचो. चहा पिऊन तारवटलेल्या डोळ्यांना जरा तरतरी यायची. मिरवणूक संपल्यावर कोणीही परस्पर घरी जायचे नाही, कारण मामीने सगळ्यांना बजावून सांगितलेले असायचे की घरी या, अंघोळी करा, पिठलं भात खा, मग घरी जाऊन झोपा हवे तितके.



चहा झाला की परत रमतगमत, हसत, गप्पा मारत मामाच्या घरी परतायचो. त्या दिवशी जेवायला पिठलं भात ठरलेला असायचा. त्याबरोबर कोणतीतरी चटणी लसणाची किंवा ओल्या नारळाची! एकदा आम्ही सर्व पोरांनी सुचवले की हे काय? त्याच त्याच चटण्या काय? जरा कोणतीतरी वेगळी चटणी करा की! कोणती चटणी करणार? ह्याच दोन चटण्या छान लागतात पिठलं भाताबरोबर. पण त्यादिवशी आम्ही आमचा हेका सोडलाच नाही. शेवटी आईने पर्याय काढला. आई म्हणाली आपण कुड्या करायच्या का? माझी मामी म्हणाली काय गो, हा कोणता प्रकार? कधी ऐकला नाही तो! मग आईने सांगितले की तिची आई तिच्या लहानपणी हा प्रकार करायची. मग ठरले. सर्वजण लसूण सोलायला बसले. दोघीजणी नारळ खवायला बसल्या. लसूण खोबरे व हिरव्यागार मिरच्या फोडणीमध्ये परतल्या गेल्या. कढई भरून केल्या. जेवताना पिठलं भातापेक्षा कुड्याच जास्त संपल्या!
त्या दिवसापासून प्रत्येक अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे खरं तर त्याच्या दुसऱ्या दिवशी कारण मिरवणूक दुसऱ्या दिवशी संपते!, हा मेनू कायमचा ठरून गेला.

आमच्या घरचा गणपती 2017

No comments: