Sunday, March 29, 2020

बैठे खेळ

लहानपणी बरेच बैठे खेळ आपण सर्वजण खेळायचो. जसे की पत्ते, कॅरम, बुद्धीबळ, सापशिडी, सागरगोटे, भातुकली. खास करून दिवाळीच्या आणि मे महिन्याच्या सुट्टीत असे बैठे खेळ हमखास रंगायचे. त्यातला एक खेळ आम्ही आत्येमामे बहिणी मिळून खेळायचो. खूपच मजा यायची या खेळात.

आम्ही लहानपणी आत्यमामेबहिणी मिळून एक खेळ खेळायचो. नावगावफळफूल. यामध्ये सर्वांनि एक कागद घ्यायचा तो आडवा धरायचा. एकाने एक शब्द द्यायचा आणि त्या शब्दापासून सुरू होणारे सर्व काही लिहायचे. भराभर आठवून लिहायचे. आणि ज्याचे आधी लिहून होईल त्याने स्टॉप असे म्हणायचे. नंतर प्रयेकाने वाचून दाखवायचे जसे की नाव काय? तर प्रत्येकाने जे नाव लिहिले असेल ते वाचायचे, नंतर गाव काय तर प्रत्येकाने गावाचे नाव लिहिलेले वाचून दाखवायचे. ज्यांचे नाव किंवा गाव कॉमन येईल त्यांनी ५ मार्क घ्यायचे, ज्यांचे गाव किंवा दुसरे काही सर्वांच्या पेक्षा निराळे येईल त्या त्या सर्वांनी १० मार्क घ्यायचे. ज्यांना नाव गाव यापैकी काहीही आलेले नसेल, फक्त एकालाच आलेले असेल त्यांनी १५ मार्क घ्यायचे. कॉमन येऊ शकते, सर्वांपेक्षा वेगळे येऊ शकते. कोणाला येत नाही आणि फक्त एकालाच येते असे क्वचितच होते. त्यामुळे १५ मार्क क्वचितच मिळतात. अशी एकेक अक्षरे घ्यायची आणि हा खेळ खेळायचा. प्रत्येक अक्षराच्या वेळी मिळालेले मार्क एका पानावर एकाने लिहायचे. मेंबर लोकांची लिस्ट करायची आणि त्यावर प्रत्येकाचे मार्क लिहायचे. नंतर सर्व मेंबर्सच्या मार्कांची प्रत्येकाची वेगळी बेरीज करायची. ज्याची जास्त बेरीज येईल त्याचा पहिला नंबर. सर्व मेंमर्सच्या मार्कांची बेरीज करून त्याप्रमाणे कमी जास्त मार्कांना पहिला, दुसरा, तिसरा असे नंबर द्यायचे. 

आता हा खेळ कसा खेळायचा? पहिले अक्षर क
नाव - कालिंदी
गाव - कोरेगाव
फळ - केळे
फूल - केवडा
आडनाव - काळे
रंग - काळा
वस्तू - कपाट
रास - कर्क
पदार्थ - कैरीची चटणी
सिनेमाचे नाव - काला पानी
नट-नटीचे नाव - कामिनी कौशल
दुसऱ्याने दुसरे अक्षर द्यायचे. कागद आडवा धरायचा आणि त्यावर नाव गाव फळ फूल ... ,,,, असे आडवे लिहून अक्षराप्रमाणे त्या रकान्याखाली
लिहायचे. मुख्य म्हणजे भरभर लिहायचे हे महत्त्वाचे आहे. म्हणजे काहीचे पुर्ण लिहूनही होत नाही. काहीचे अर्धे होते, अर्थात पूर्ण रकाने भरभर
लिहूनच स्टॉप म्हणायचे आहे. नो चिटींग. खूपच मजा येते या खेळात. खेळून बघा. वर जे रकाने दिले आहेत जसे की नाव गाव, ... इ. इ.त्यातही अजून भर घालता येईल.Rohini Gore


दुसरा खेळ म्हणजे स्मरणशक्ति. यामध्येही खूप मजा यायची. भातुकली मध्ये आम्ही पोहे, दाणे, गुळ, साखर, कोको, बोर्नव्हिटा घायचो.
खेळायचा कंटाळा आला की चट्टामट्टा. आणि एक दुसरा खेळ खेळायचो ते म्हणजे जगप्रवास. घराच्या पायरींवर बसायचे. एकाने ड्राइवर व्हायचे. मागच्या पायरीवर दुसऱ्यांनी बसायचे. आणि ड्रायव्हिंगची ऍक्शन करायची. अधुनमधून ड्रायव्हर बदलायचा. या मध्ये पण आम्ही खाण्याचे सर्व घ्यायचो. रस्त्याचे वळण आले की सर्वांनी एका बाजूला कलायचे. लहानपणीचा काळ सुखाचा म्हणतात ते काही उगाच नाही !

Sunday, March 22, 2020

२२ मार्च २०२०

आजची रोजनिशी लिहायची म्हणजे मला कालची भर घालायला लागेल. कालचा दिवस पुर्णपणे कामाचाच होता. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कामेच कामे. शुक्रवारी रात्रीच शनिवारच्या दुपारच्या जेवणाचा स्वयंपाक करून ठेवला होता. उठल्यावर एके ठिकाणी एक काम होते म्हणून गेलो. कारमध्ये बसलो आणि जिपीएस साथ देईना म्हणजे ते बंद पडले होते. मी कागदावर मार्गक्रमणा लिहून घेतली होती तरीही आम्ही जिपिएस लावतो कारण काही वेळा गुगल मॅप्स नीट रस्ता दाखवत नाहीत. कार मधून बाहेर पडले आणि घरी जाऊन जुने
जिपीएस आणले. त्यावर पण पत्ता नीट उमटेना.


शेवटी कार सुरू केली आणि निघालो. बोटाने टाईप करण्याऐवजी त्यावर नखाने टाईप करायला लागले तेव्हा कुठे पत्ता उमटला. खरे तर दोनच रस्ते आहेत पण गुगल मॅप ने एकदा डावी एकदा
उजवी असे करत रस्ता सांगितला होता. जिथे जायचे होते ते काम उरकल्यावर घरी येऊन आधी जेवलो. मग मी द. मा. मिरासदारांचे "जावईबापुंच्या गोष्टी" हे पुस्तक वाचले. खूप धमाल विनोदी पुस्तक आहे. दुपारचा चहा घेतला आणि इंडियन ग्रोसरी उरकून आलो. सध्या कोरोनामुळे अत्यावश्यक सेवा उपलब्द
असल्या तरी त्याचे टाअमिंग कमी केले आहे. गोसरी आणल्यानंतर धुणे धूवून आणले. यावेळी नेहमीचे कपडे तर होतेच, शिवाय दुलया आणि बेडशीटे पण होती. मला लॉड्रीमध्ये सोडून विनायक घरी आला.

धुणे धुतल्यावर परत विनायक कार घेऊन आला आणि दोन जड पिशव्या  उचलून (सर्व धुण्याच्या) कार मध्ये टाकून घरी आलो. घरी आल्यावर खूप भूक लागली होती पण काही करून
 खाण्याचे बळ नव्हते.  

एक पोळी उरली होती तीच तूप साखर लावून खाल्ली. कालच्या दिवशी ईटली मध्ये ८०० माणसे कोरोनात वारली. न्युयॉर्क मध्येही बरीच वारली आणि काही दवाखान्यात दाखल झाली आहेत. भारतात आज रविवारी कोणीही बाहेर न पडण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले होते आणि त्याला प्रदिसादही मिळाला. कोणी कोणी टाळ्या वाजवून तर कोणी शंख फूंकून तर कोणी थाळ्या वाजवून सर्वजण घराच्या गॅलरीत येत होते त्याचे विडिओज पाहिले. मला तर ही एक प्रकारची प्रार्थनाच वाटली. कालची उसळ जास्त केल्याने आज जेवणाला
फक्त पोळ्या केल्या. जेवणानंतर युट्युबवर एक कोरिअन ऑस्कर विनर चित्रपट पाहिला. चित्रपट खूपच छान आहे. कोणत्यातरी नवीन विश्वात गेल्यासारखे वाटते. सिनेमा संपल्यानंतर मन सून्न होऊन जाते. आज दुपारी खूप दिवसांनी साबुदाणा खिचडी करून खाल्ली.


आता रात्री नेहमीप्रमाणेच आज रात्रीचा आणि उद्या दुपाररचा स्वयंपाक करून झोपणार. आज मी एका वहीत एक मेन्यू लिहून ठेवला आहे. हा जेवणाचा मेन्यू मी गुढीपाडव्यासाठी करणार आहे. नेहमीपेक्षा वेगळे काहीतरी करणार आहे. जेणेकरून हा दिवस लक्षात राहील.


Thursday, March 12, 2020

१२ मार्च २०२०

आजची रोजनिशी लिहायची म्हणजे मला कालच्या दिवसाचीही भर घालावी लागेल. काल सकाळी विनायक ऑफीसच्या कामानिमित्ताने न्युयॉर्कला जाण्यासाठी घराबाहेर पडला आणि माझा एकटीचा दिवस सुरू झाला. एकटीने काय काय करायचे याची रूपरेषा मनात आखून ठेवली होतीच. चहा आणि न्याहरी झाल्यावर स्मार्ट टिव्हीवर क्रॉमकास्ट च्या मदतीने युट्युबवरचा परिचय सिनेमा पहायला सुरवात केली. अधून मधून ब्रेक घेत होते. सिनेमाची प्रिंट अजिबातच चांगली नव्हती त्यामुळे बंद केला. नंतर नेहमीप्रमाणेच एफबी वर चकरा मारल्या. युट्युबवर वर चक्कर मारली. गुगलींग केले. जेवणासाठी भाजणीचे थालिपीठ करून खाल्ले. मग थोडी पडले. नंतर घरातली साफसफाई केली. दुपारचा चहा झाल्यावर मनसोक्त साबुदाणे वडे खाल्ले. टाईमपास साठी एक दोन मालिका पाहिल्या. नंतर २ मैत्रिणींशी फोनवर मनसोक्त गप्पा मारल्या. विनायकशी २ वेळा फोनवर बोलणे झाले.



संध्याकाळी नेटफ्लिक्सवर डोक्याला अजिबात ताप न होणारा सिनेमा लावून बसले. तो सिनेमा म्हणजे अमर अकबर अँथनी. अधून मधून ब्रेक घेत होते. रात्रीच्या जेवणासाठी काय करायचे तेही ठरवले होते. नंतर माझ्या एका जिवलग मैत्रिणीशी (मोनिकाशी) खूप मनसोक्त बोलले. तीही बोलली. रात्रीच्या जेवणात शेवयाची खीर केली आणि सोबत पोळी खाल्ली. झोपण्याच्या आधी परत विनायक ला फोन केला. त्याचाही दिवस कामा मध्ये खूप हेक्टिक गेला होता. होटेल मधून बाहेर पडून त्याने फूटपाथ वरून पाऊण तास चालून आला. तो म्हणाला इथे मुंबईत फिरल्यासारखेच वाटत आहे. बरेच लोक फूटपाथ वरून चालताना दिसतात. त्याला फोन वरून माझा दिवस कसा गेला ते सांगितले.



प्रिय मैत्रिण शुभदाला विडिओ कॉल केला व तिचे घर बघितले. मला खूप आवडले तिचे घर. तिने पोहे केले होते सकाळच्या न्याहरीसाठी. तिच्याशी बोलते मी बरेच वेळा फोन करून पण आज मात्र न बोलता तिचे घर बघितले आणि नंतर तिला बाय केले. रात्रीचे ११ वाजले आणि खऱ्या अर्थाने माझा दिवस सुरू झाला. ऑनलाईन अंताक्षरी मध्ये मनसोक्त खेळले दिड दोन तास. आज मोहिनीने अंताक्षरीची थीमही छान दिली. होती. शब्दभेंड्या आधीची थीम थोडा बदल करून दिली होती. अंताक्षरी खेळताना मध्ये भांडी घासण्यासाठी ब्रेक घेतला. अंताक्षरीमुळे कालचा आणि आजचा दिवस कायम लक्षात राहील माझ्या. धन्यवाद मोहिनी !



शब्दभेंड्या आणि मुखडा अंतरा या दोन्हीही थीमा मी पूर्वी ऑर्कुटवर एका ग्रुप मध्ये टाकली होती त्याची आज खूप आठवण येत होती. आणि या ग्रुप मध्ये दर बुधवारी याहू मेसेंजर वर अंताक्षरी खेळायचो तेही आठवत होते. अंताक्षरीमुळे मित्रमंडळ तयार होते हे मी अनुभवलयं. पूर्वी मनोगत या मराठी संकेत स्थळावर सुद्धा मी अंताक्षरी टाकली होती. ती तर खूपच रंगली होती. पण आम्ही त्यामध्ये लिहून गाणी टाकायचो. अमेरिकेतले झोपायचे तेव्हा भारतातले मनोगती भेंड्या खेळायचे आणि भारतातले मनोगती झोपले की अमेरिकेतले खेळायचे. तसेच ऑस्ट्रेलिया, जर्मनी आणि इंग्लंड मधलेही असायचे.अंताक्षरी खेळून झाल्यावर झोप येईना म्हणून परत गुगलींग केले. परत झोपायचा प्रयत्न केला. सरतेशेवटी मला पहाटे ३ ला झोप लागली. उठायला ८ वाजले. पण आज आराम होता. आजच्या जेवणाच्या २ पोळ्या आदल्या दिवशी रात्रीच लाटून ठेवल्या आहेत. घट्ट झणझणीत पिठले आणि पोळी होती दुपारच्या जेवणाला.



उठल्यावर चहा, न्याहरी झाल्यावर परत थोडी अंताक्षरी खेळले. आज संध्याकाळी आदल्या दिवशी उरलेल्या साबुदाणा वड्यासाठी तयार करून ठेवलेल्या मिश्रणाचे थालिपीठ करून खाल्ले. दुपारी नेहमीच्या २ मराठी मालिका बघून थोडी गादीवर आडवी झाले. दुपारनंतर मात्र मला खूपच कंटाळा आला. केव्हा एकदा विनायक घरी येतो असे झाले होते.  विनायक घरी आल्यावर जसे ऑफीस मधून घरी आल्यावर रूटीन असते त्याप्रमाणे चहा, थोडे काहीतरी खायला केले. आणि नंतर जेवण करून झोप. हे दोन दिवस लक्षात राहावेत आणि नंतर कधी वाचताना मग छान वाटते म्ह्णून रोजनिशीत लिहिले इतकेच.

Saturday, March 07, 2020

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने......८ मार्च २०२०

आई कुठे काय करते? तस म्हणायला गेले तर घरी राहून आई बरेच काय काय करते. फक्त ती ते सर्व घरी राहून करते त्यामुळे ते आपल्याला जाणवत नाही. नोकरी करणारी आई घरातली कामे पटापट आवरून बाहेर नोकरीवर जाते आणि आल्यावर पण घरातली कामे करताना दिसते. तर नोकरी करणारी आई हा वेगळा विषय झाला. घरातली आई फक्त झोपा काढत नाही तर बरीच कामेही करते. माझी आई आणि सासुबाई मला नेहमी म्हणतात की "ह्यांनी" मला नोकरी करू दिली नाही. मी आईला म्हणते की हो बरोबर आहे तुझे म्हणणे. पण तू घरात होतीस त्यामुळे आमच्या सहवासात जास्त राहिलीस. नोकरी केली असतीस तर तुझा आम्हाला सहवास कितीसा मिळाला असता?



पूर्वीच्या बायका घर, संसार आणि मुले यातच असायच्या. घरी असणाऱ्या प्रत्येक आईने बरेच काही केले आहे. त्यामुळे तिचा आदर करा.अजूनही काही आया घरच सांभाळताना दिसतात. पण त्या बरेच काही करत असतात. आता मी माझ्या आईबद्दल लिहिते. आईचा दिवस पहाटे ५ वाजताच सुरू व्हायचा. आम्ही घरात ५ जणे होतो. आईबाबा, मी , रंजना, आणि आमचे आजोबा. आमच्या सकाळच्या शाळा असायच्या त्यावेळे पासून नंतर आम्ही कॉलेज आणि नोकरीवर जाण्यापर्यंत आईने कुटुंबासाठी खूप काही केले. आमच्या दोघींची लग्ने छान करून दिली. लग्नानंतर वर्षभराचे सण आनंदाने केले. शिवाय रंजनाचे बाळंतपण केले. सकाळचा आलं घालून केलेला चहा ती आम्हां सर्वांचाच करायची. नंतर एकेकाचे स्टोव्ह वर पाणी तापवत ठेवायची. सर्वात आधी २ स्टोव्ह होते. एक वाजणारा आणि दुसरा वातीचा. नंतर गॅस आणि शेगड्या जरी आल्या तरी पाणी तापवणे स्टोव्हवरतीच असायचे. थंडीच्या दिवसात आम्हाला दात घासून चुळ भरण्यासाठी पण तापवलेले पाणी द्यायची. थंडीच्या दिवसात कधी सुंठ घालून तर कधी आलं घालून चहा करायची. पावसाळ्यात गवती चहा ठरलेला असायचा. पावसाळ्यात काढा करायला ती कधी चुकली नाही. गरम गरम काढा घेतल्यावर आमचे सर्दी पडसे दूर दूर पळायचे.



कोणाचे डोके ठणकत असेल तर कपाळावर सुंठीचा लेप लावायची. खोकला झाला तर हळद-गूळ-सुंठ-साजूक तूप एकत्र करून गोळ्या तयार असायच्या. आम्ही सर्व सकाळी मऊ भात खाऊन जायचो. मऊ भातावर घरचे लोणकढे तूप आणि त्यावर घरी बनवलेले मेतकूट असायचे. शिवाय प्रत्येकाला दूध प्यायला लावायची. मऊ भात खाल्य्याने आम्हाला जेवणापर्यंत कधी कळकळायचे नाही. पोट शांत असायचे. पित्त व्हायचे नाही. शाळा कॉलेजातून घरी आलो की रोजच्या रोज पोहे उपमे करायची. आम्हालाही सणसणून भूक लागलेली असायची. रात्री जेवणात मुगाच्या डाळीची खिचडी किंवा गरम गरम आमटी भात.



दुपारची शाळा कॉलेज असेल तर जेवणात तव्यावरून पानात रोज गरम पोळी असायची. आमचे सर्वांचे करून ती सकाळी बरोबर ८ वाजता अंघोळ पूजा केरवारे करून शिकवण्या घेण्यासाठी बसायची. ८ ते १० शिकवण्या घ्यायची. पहिली ते सातवी सर्व विषय शिकवायची. शिकवण्या होत आल्या की आम्हाला साडेदहाला जेवायला वाढायची. शिकवणीला बसायच्या आधी ती स्वयंपाकाची पूर्वतयारी करून ठेवायची. भाजी चिरून ठेवायची, कणीक भिजवून व कूकरही लावायची. आमच्या जेवणानंतर १ ते दीड पर्यंत बाबा घरी जेवायला यायचे. मग ती दोघे एकत्र जेवायला बसायचे. मग थोडी विश्रांती घेऊन परत उठायची ते ३ ते ५ शिकवणी घ्यायची. नंतर आमच्या मधवेळेचे खाणे, आणि मग रात्रीचा स्वयंपाक. बाबांचे ऑफीस २ शिफ्ट मध्ये होते. ते सकाळी ७ ला निघायचे आणि १ वाजता दुपारी घरी जेवायला यायचे. नंतर परत ३ ला जायचे ते ६ ला यायचे. ६ ला आल्यावर मधवेळचे खाणे खाऊन ते शिकवणी घ्यायला बसायचे. ६ ते ९ शिकवण्या झाल्या की आम्ही सगळेच एकत्र रात्रीचे जेवायला बसायचो.





ही झाली दैनंदिनीची कामे. एप्रिल मे महिन्यात शिकवण्या बंद असायच्या. या दोन महिन्यात ती आमच्या दोघींचे ड्रेस घरी शिवायची. लहानपणी फ्रॉक, कॉलेजमध्ये गेल्यावर सलवार, चुणीदार, त्यावरचे टॉप. सर्व प्रकारच्या फॅशनचे फ्रॉक आणि चुडीदार तिने शिवलेले आहेत. उडत्या बाह्या, फुग्याच्या बाह्या, कोपऱ्यापर्यंतच्या बाह्या, चौकोनी, पंचकोनी, व्ही गळे असायचे. आजोबांच्या बंड्याही ती घरीच शिवायची. माझे आजोबा जेव्हा नोकरी करायचे तेव्हा आणि आम्ही दोघी नोकरीवर लागलो तेव्हाही आईचा डबा खूप छान असायचा. पोळी भाजी, चटणी, एका पोळीला तूप साखर लावलेली असायची. आणि मुख्य म्हणजे एका बाटलीत ती ताक भरून द्यायची. मे महिन्याच्या सुट्टीत आम्हाला कूकर लावायला सांगायची. दुपारचा चहा करायला सांगायची. आई पोळ्या करायची आणि आमच्या दोघींसाठी २-२ लाटायलाही द्यायची. अशा प्रकारे तिने आम्हाला कामाच्या सवयी लावल्या. नोकरी करत असताना वर खर्चालाही पैसे द्यायची. शाळा कॉलेज मध्ये असतानाही तिने वरखर्चासाठी पैसे दिले आहेत.



आजीच्या (आईची आई) चोळ्याही शिवायची. आईचे ब्लाऊज तिचे तीच शिवायची. आम्ही टेलरकडे कधीच गेलो नाही. म्हणजे शिलायची कितीतरी पैसे आईने वाचवले आहेत. फ्रॉक शिवल्यावर उरलेल्या कापडातून तिने अगणित बाळंतविडे शिवलेले आहेत. बाळंतविड्याचे पैसेही तिने वाचवले आहेत. पैसे वाचवले काय नि कमावले काय सारखेच ना ? पैसे वाचवून व शिकवण्याचे पैसे मिळवून तिथे संसाराला खूप हातभार लावलेला आहे.
आईने कधीही लोणी व तूप विकत आणले नाही. दूधदुभतं तर तिने इतके काही जपले आहे की दूधापासून होणारे सर्व प्रकार करायची. अदमुरं दही, सायीचे दही, ताक, लोणी, तूप हे सर्व तिने निगुतीने केले आहे. घरी कोणताही कार्यक्रम असो तिने जास्तीचे लागणारे दही, लोणी तूप कधीच विकत आणले नाही. दूध जास्तीचे घ्यायची म्हणजे मग त्यात सर्व काही व्हायचे. आमच्या लग्नकार्यात पण तिने कधी तूप विकत आणले नाही. आमच्या घरी तिनी त्रिकाळ शिकवण्या असायच्या. आईचे पहिली ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी आणि बाबांचे ८वी ते १०वी पर्यंततचे सर्व विद्यार्थी मिळून सर्वांचे वार्षिक परीक्षेनंतर छोटे स्नेहसंमेलन करायची. या संमेलनात असणारे सर्व पदार्थ आई घरी करायची. यामध्ये बटाटेवडे तिखटामिठीच्या पुऱ्या, गोडाचा शिरा, इडली सांबार असे पदार्थ असायचे. सर्व विद्यार्थी नटून थटून आमच्या घरी यायचे. प्रत्येक जण काही ना काही करून दाखवायचे. कुणी गाणे म्हणायचे तर कुणी नाच करायचे, तर कुणी नकला करून दाखवायचे.


आई खूप धार्मिक आहे. श्रावणात ती संध्याकाळी वडे घारगे करायची. ब्राह्मण जेवायला घालाची. जिवतीची पूजा करून आम्हाला दोघींना पुरणाचा दिवा करून ओवाळायची. कोजागिरी पौर्णिमेलाही ती आम्हां दोघी बहिणींना ओवाळायची. दोघींना पांढरे कानातले गळ्यातले किंवा फ्रॉक, सलवार कुडता घ्यायची. आजोबा जेव्हा गेले तेव्हा तिने १३ दिवसात गरूड अख्यान ठेवले होते. ३० तीने सवाष्णी घातल्या होत्या. गणेश याग केला होता. दिवाळी झाल्यावर ती नातेवाईकांचे ग्रुप करून दही मिसळ करायची. सोबत उरलेले फराळाचे असायचे. प्रत्येक सणाच्या दिवशी कामवाली बाईला जेवायला बोलवायची आणि शिवाय ताट भरून तिच्या घरी द्यायची. कलई वाली ठरलेली होती. शिवाय फणी, सुई ती एका म्हातारी बाई कडून विकत घेत असे. बोहारीण पण ठरलेली होती. तिच्याकडून तर तिने चहाच्या कपबशांचे सेट घेतले आहेत. ते कधीच तिने विकत नाही घेतले. चिनीमातीच्या खोलगट डीशा, बरण्या, तिने बोहारणीकडूनच विकत घेतल्या आहेत. कल्हई करणाऱ्या बाईच्या मुलांना आण कामवाली बाईच्या मुलांना शिकवले आहे. त्यांच्याकडून तिने कधीच पैसे घेतले नाहीत. काहीजणांकडून शिकवणीचे पैसे त्यांना परवडत नाही म्हणून हप्त्याहप्त्याने घेतले आहेत. माझ्या आईला माणसे जोडण्याचा छंद आहे. ती कोणालाही
दुखवत नाही. अन्याय पण सहन करत नाही. स्वयंपाक करताना आधी काय करायचे आणि नंतर काय करायचे की वेळ वाचतो ते शिकवले. आहे. गजानन महाराजांच्या पोथीची अगणित पारायणे केली आहेत. दसऱ्याला आमच्या घरी संध्याकाळी विद्यार्थी आपट्याची पाने द्यायला अजूनही येतात. शिवाय संक्रांतीलाही ती भरपूर तीळगूळ करते. कारण संध्याकाळी तिचे व बाबांचे विद्द्यार्थी तीळगूळ घेऊन आशीर्वाद घेण्यासाठी येतात.




दरवर्षी आई आमच्या अंगणात भोंडला करायची. दोन गोल व्हायचे ऐलमा पैलमा म्हणायला. एक गोल आतला छोट्या मुलींचा, दुसरा गोल बाहेरचा. आम्ही बहिणी आणि आमच्या मैत्रिणींचा. चैत्रातल्या हळदीकुंकवाला १०० एक बायका असायच्या. सर्व नातेवाईक, आमच्या मैत्रिणी, आईच्या मैत्रिणी मिळून सर्वजणी यायच्या. त्यांना अनुक्रमे आधी हळदी कुंकू, नंतर काकडीच्या जाड चकत्या, नंतर बत्तासे असायचे. नंतर स्टीलच्या वाटीतून आंबेडाळ आणि नंतर गारेगार कैरीचे पन्हे. ते झाले की आई प्रत्येकीची हरबऱ्याने ओटी भरायची. नंतर मोगऱ्याचा गजरा द्यायची. चैत्रातल्या हळदीकुंकवाप्रमाणेच संक्रांतीचे हळदी कुंकू पण खुप दणक्यात व्हायचे. कैरीचे लोणचे ५ किलो कैरीचे घालायची. तसेच कैरीचे पन्हे पण बरणीतून घालून ठेवायची. येताजाता पन्हे प्यायचो आम्ही. पन्ह्यात पण साखरेचे वेगळे, गुळाचे वेगळे करायची. हिवाळ्यात तर खुपच प्रकार करायची. १०० लिंबे आणायची. त्यात लिंबाचे सरबत बाटल्यातून भरून ठेवायची. लिंबाचे गोड लोणचे, तिखट लोणचे, लिंबे पिळून खाऱ्यातल्या मिरच्या, करायची. शिवाय आवळ्याचे लोणचे, मुरंबे, गुळांबेही करायची. कोकमचे सरबत करायचीच. शिवाय छुंदा करायची. इतके प्रकार करायची ना की आम्ही बाहेरचे कोणतेही काहीही विकत आणले नाही कधीही. उन्हाळ्यात सर्व प्रकारची वाळवणं करायची ते सुद्धा मोठाले डबे भरभरून. त्यात बटाट्याचे पापड, पोह्याचे पापड, कुरडया, साबुदाण्याच्या चकल्या, चिकवड्या, १० किलोचा बटाट्याचा कीस, मिरगुंड, उडुदाचे पापड, एक ना अनेक पदार्थ करायची. त्यामुळे आम्हा दोघी बहिणींना सर्व प्रकारच्या चवा माहिती झाल्या.



आईने ४० बायकांना शिवण शिकवले आहे. आईने आमच्या दोघींचेच फक्त केले असे नाही तर तिच्या सर्व भाचवंडांचे केले. अगदी त्यांचे लग्न ठरल्यापासून केळवणे, त्यांच्या मुलांना घरचे बाळंतविडे केले. आजोबांची सर्व भाचवंडे. बाबांची सर्व भाचवंडे यांचेही केले. आईचा हात अगदी सढळ आहे. आईने आम्हां दोघी बहिणींना चांगले वळण लावले. शिवाय चांगले संस्कारही केले. त्यामुळेच आम्ही दोघी बहिणी आमच्या संसारात यशस्वी झालो आहोत. आईचे सासरे म्हणजे जणू तिचे वडीलच होते. आईने सासऱ्यांचे मनापासून केले. दीराचे केले. बाबांचीही ती आईच बनली. बाबांनीही तिला मनापासून साथ दिली. कधीही कोणत्या गोष्टीत अडवणूक केली नाही. संसारत आलेल्या अडचणींवर आईने मात केली. आईचा चेहरा सतत हासतमुख असतो. नीटनेटकी अजूनही राहते. (वय वर्ष ८४) घरही नीटनेटके ठेवते. बाबा वय वर्ष ८८ यांचा उत्साहही वाढवते. अशा माझ्या आईला सलाम !



प्रतिकूल परिस्थिती मध्ये झगडून वर येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला माझा सलाम ! अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या , नोकरी करून घरही तितकेच छान रितीने सांभाळणाऱ्या सर्व स्त्रियांना सलाम ! आणि हो, ज्या पुरूषांनी स्त्रीचा मान राखला, तिचा आदर केला, मग ती बायको असो , आई / बहीण असो किंवा ऑफीसमध्ये काम करणारी स्त्री कर्मचारी असो अशा पुरूष वर्गालाही सलाम. स्त्रीही स्त्रीचीच कधीही शत्रू होता कामा नये. @ Rohini Gore ,,सर्व महिलांना महिला दिनाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा ! स्त्रीशक्ती वाढवत रहा. Wishing All International Women's Day !!





Wednesday, March 04, 2020

आहार,व्यायाम, वजनातील घट आणि वाढ - स्वानुभव (2)

मी माझा फक्त अनुभव लिहीत आहे. वजन कमी करण्यासाठी मुद्दामहून मी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. माझे वजन मुळातच जास्त नव्हते. ते व्यायामामुळे वाढले. अर्थात नंतर जे १५ किलोने वाढले ते जास्तच आहे उंचीला अनुसरून. आम्हाला दोघांना चालायला खूप आवडते. माझ्या वजनात वाढ कशी होत गेली आणि ते घटले कसे याचे निरिक्षण केले आणि तेच मी इथे शेअर करत आहे इतकेच. उपदेशाचे डोस अजिबातच नाहीत. मला इंगल्स मध्ये नोकरी लागली ती डेली सेक्शनला उत्पादन विभागात. ही नोकरी प्रचंड अंगमेहनतीची आहे. एक तर ८ तास उभे राहून ही नोकरी होती. उभे राहून ८ तासात मी माझ्या सहकारी मैत्रिणीबरोबर काही ना काही बनवत होते. हाताची प्रचंड प्रमाणात हालचाल होत होती. शिवाय जे काही बनवायचे असेल त्याचे जिन्नस आणण्याकरताही स्टोअर्स मध्ये फेऱ्या होत होत्या. खाली वाकणे, हात वर करणे, ढवळणे, कापणे, चिरणे अशा हाताच्या बऱ्याच हालचाली होत होत्या. जेवायच्या सुट्टीमध्ये अर्धा तास बसणे आणि नंतर १० मिनिटांच्या ब्रेक साठी बसणे इतकीच विश्रांती मिळत होती. ही नोकरी करून मी सव्वा मैल चालत घरी जात होते. घर पण दुसऱ्या मजल्यावर होते. या चालण्यामध्येही रस्ते उंचसखल होते. चालताना मध्ये वाटेत मी एका कट्यावर बसायचे. आणि घर आले की जेव्हा मी जिन्यात बसायचे तेव्हा मला इतका दम लागलेला असायचा की माझ्या हृदयाचे ठोके मला ऐकायला यायचे. श्वासही खूप खोलवर मोकळा यायचा. मनात मी म्हणायचे पण की हा खरा व्यायाम.




अर्थात हे चालणे आठवड्यातून २ वेळा म्हणजे अडीच मैल होत होते. शनिवार रविवार मला विनायक कारने सोडायचा आणि आणायचा. या चालण्यामुळे मला पायांना खूप व्यायाम झाला. नोकरीत ८ तास उभे असल्याने पायांना तितका व्यायाम होत नव्हता. पण हाताना भरपूर व्यायाम. या नोकरीमुळे आणि चालण्यामुळे माझे पोट आत गेले आणि चपळता वाढली. उत्साह वाढला. अर्थात दमणूक प्रचंड होत होती. माझे २ वर्षात वजनही घटले. वजन घटले आणि ताकदही वाढली. नुसते वजन घटून उपयोगी नाही. ताकदही टिकली पाहिजे. वजन कमी आणि चेहरा ओढग्रस्त असेही उपयोगाचे नाही. माझे वजन हळूहळू करत ६० वरून ५५ वर आले. शिवाय खांद्यावरची आणि कमरेवची हाडेही दिसायला लागली.




नोकरीच्या या ४ वर्षात माझा व्यायाम बंद झाला. आठवड्यातून १ वेळा जेमतेम व्हायचा. तसा तर व्यायाम गेले काही वर्षे कमी कमी होत गेला. रोजच्या रोज न होता आठवड्यातून २ ते ३ वेळा होतो. आता तर आठवड्यातून १ वेळाच होतो. मला हल्ली व्यायामाचा खूप कंटाळा येतो. चालण्याचा कंटाळा मात्र येत नाही. पहिला जो व्यायाम करायचे तोही कमी होत गेला. म्हणजे १२ सूर्यनमस्कारा ऐवजी आता मी ८ सूर्यनमस्कार घालते तेही २ - २ करत घालते. चाराच्या ऐवजी २ जोर २ बैठका आणि आसने करत नाही. आसनांच्या ऐवजी मी पिटीचे प्रकार करते. हात वर हात खाली. सर्व अँगलने हात फिरवते. सर्व अँगलने मानही फिरवते. उभे राहून हात जमिनीवर टेकण्याचा प्रयत्न करते. मांडी घालून हाताची घडी मागे घालून डोके जमिनीवर टेकण्याचा प्रयत्न करते. १९८८ ते २०१२ पर्यंत रोजच्या रोज चालणे होत होते. तेही आता होत नाही. चालणे आठवड्यातून १ वेळाच होते.



निरिक्षणामध्ये असे लक्षात आले की व्यायामापेक्षा चालण्याने वजन कमी होते. चालणे म्हणजे आठवड्यातून १ मैल किमान २ वेळा. असेही लक्षात आले की चालण्याने सर्वांगाला व्यायाम होतो पण पायांना जास्त होतो म्हणून मग हाताचे व्यायाम करायचे. वजने उचलणे किंवा जोर मारणे. सूर्यनमस्कारानेही सर्वांगाला व्यायाम होतो. मुख्य म्हणजे चपळता वाढते. या नोकरीमुळे असे कळाले की शरीराची जास्तीत जास्त हालचाल व्हायला पाहिजे.आहाराबद्दल लिहीन पुढील लेखात.@Rohini Gore
क्रमश : ....

Tuesday, March 03, 2020

आहार,व्यायाम, वजनातील घट आणि वाढ - स्वानुभव (1)

मला गोड पदार्थ अजिबात आवडत नाही आणि मला भातही आवडत नाही. शिवाय मी एका वेळेला खूप खाऊ शकत नाही. कदाचित यामुळेच माझे वजन नेहमी आटोक्यात राहत असावे असे मला वाटते. लग्ना आधी माझे वजन ४५ किलो होते. माझी उंची ५ म्हणजे माझे वजन ५० ते ५५ असायला पाहिजे. लग्नानंतर मी व्यायाम सुरू केला आणि माझे वजन वाढायला लागले. मी १२ सूर्यनमस्कार घालत होते. एका दमात १२ सूर्यनमस्कार घालायचे. नंतर ते साधारण 25 पर्यंत गेले. पण २५ सूर्यनमस्काराने मला खूप दमायला व्हायचे. याउलट १२ नमस्काराने छान वाटायचे. माझे वजन ४५ वरून ५० पर्यंत गेले. मला खूप आनंद झाला. त्यानंतर मी १२ सूर्यनमस्कार, 8 जोर आणि 8 बैठका घालायला लागले. त्याचबरोबर काही आसने करत होते. ८ जोर आणि ८ बैठकाने खूप जडत्व आले. मग मी माझा व्यायाम सेट केला. तो म्हणजे १२ सूर्यनमस्कार, ४ जोर आणि ४ बैठका. आणि काही आसने.


सूर्यनमस्काराने आणि आसने केल्याने अंग खूप लवचिक बनते. जोर बैठका घातल्याने स्नायुंना बळकटी येते.
अर्थात लग्नानंतरच मी व्यायाम करायला लागले. विनायक मला म्हणाला की सूर्यनमस्कार हा व्यायाम बायकांसाठी चांगला आहे. पहिल्या दिवशी सूर्यनमस्कार घातले. दुसऱ्या दिवशीही घातले. नंतर खांदे मान दुखायला लागली. विनायक म्हणाला की तसेच रेटून तिसऱ्या आणि ४ थ्या दिवशी व्यायाम कर. तसे केल्याने अंगदुखी थांबली आणि मला खूप छान वाटायला लागले आणि रोजच्या रोज नमस्कार घालायला लागले. चपळता वाढली. उत्साह वाढला. आयायटी पवई मध्ये भाजी आणण्याकरता खूप चालावे लागते. त्यामुळे चालणेही आठवड्यातून एकदा अंदाजे २ मैल व्हायला लागले. नंतर मी शिवणाचा क्लास जॉईन केला तो जाऊन येऊन २ मैल होता. आठवड्यातून १ वेळा २ मैल चालणे सुरू झाले. भाजी घाटकोपरवरून बसने जाऊन आणायला लागले.विनायकचे वजन त्याच्या ५ फूट ११ इंच उंचीनुसार ७२ किलो पाहिजे. तसे ते होते. शिवाय खाणे म्हणजे डब्यातले. त्यातल्या पोळ्या म्हणजे दिव्यच असायच्या. आणि भाजीही पातळ असायची. त्याचे केमिस्ट्री डिपार्टमेंट ३ ऱ्या मजल्यावर होते. त्यामुळे चालत जाऊन शिवाय जिनेही चढणे उतरणे व्हायचे. याशिवाय त्याचा जोर बैठकांचा वेगळा व्यायाम्ही असायचा.



लग्नानंतर आमचा आहार असा काहीसा होता. विब्स ब्रेड स्लाईस भाजून त्यावर अमुल बटर पसरवून ते स्लाईस ४ ते ५ खायचो. त्यावर दुधाची कॉफी. दुपारी जेवणाला पोळी भाजी, कोशिंबीर, आमटी भात, ताक , संध्याकाळच्या खाण्याला पोहे उपमे आणि रात्री मुगाच्या डाळीची खिचडी किंवा आमटी भात. लग्नानंतर विनायकचे वजन ७२ चे ८० किलो झाले आणि माझे ४५ चे ५० किलो झाले. विनायकला मी सल्ला दिला की तू नुसते जोर बैठकांचा व्यायाम करू नकोस. जोडीला सूर्यनमस्कारही घाल. डोंबिवलीला आल्यावर आमच्या दोघांचा व्यायामाचा पॅटर्न एकच झाला तो म्हणजे आधी सूर्यनमस्कार, नंतर जोर बैठका आणि नंतर काही आसने. मी काही वर्षे नोकरी केली आणि माझे वजन ५० चे ५४ झाले. नोकरी करताना आपण चहा खूप पितो. म्हणजे जितका चहा पितो तितकी साखर तुमच्या पोटात जाते. शिवाय सटर फटर खाणे होते. मित्रमैत्रिणींबरोबर होटेल मध्ये खाणे होते. माझा अनुभव म्हणजे नोकरी करताना वजन वाढते आणि घरी बसल्यावर कमी होते. विनायकला हिंदुस्ताने लिव्हर मध्ये नोकरी लागली आणि त्याचे जेवण तिथेच व्हायला लागले. तो म्हणाला की लोकल ट्रेन मध्ये जाताना गाडी पकडण्यासाठी दोन्ही हात मोकळे असलेले चांगले म्हणून मला डबा धरण्याचे लोढणे नको.



विनायकने डोंबिवलीवरून अंधेरीला ट्रेन आणि बसने १० वर्षे नोकरी केली. घरचे जेवण रात्रीचेच असायचे त्यामुळे मी रात्री पोळी भाजी भात आमटी असे सर्व करायला लागले. विनायकचे वजन ८० वरून ८५ वर गेले. वजन वाढण्याचे मुख्य कारण कॅंटीन मधले जेवण. शिवाय चहाबरोबर बिस्किटेही असायची. धकाधकीच्या जीवनातही विनायक रोजच्या रोज व्यायाम करायचा. कधी पहाटे उठून तर कधी रात्री जेवणानंतर तासाभराने. व्यायाम एक व्यसन आहे ते कधीही सुटत नाही. अंधेरीत रहायला आल्यावर दुपारचे जेवण व्हायला लागले. विनायक दुपारी जेवायला घरी यायचा त्यामुळे परत पोळी भाजी भात आमटी कोशिंबीर, ताक असे व्हायला लागले. अंधेरीत आल्यावर उपहारगृहामध्ये इडली, डोसे खायला लागलो. अंधेरीत आल्यावर माझे वजन ५४ चे ५८ झाले.
अमेरिकेत आल्यावर युनिव्हरसिटी परिसरात आमचे दोघांचेही चालणे खूपच वाढले. सुरवातीला इतर खाणेही वाढले होते. आईस्क्रीम, बटाटा चिप्स आणि कोक भरपूर खाल्ले. आणि एका पॉईंटला आम्ही हे खाणे पूर्णपणे थांबवले. विल्मिंग्टनला आल्यावर माझे वजन ६० किलोपर्यंत झाले. विल्मिंग्टन मध्ये रहायला आल्यावर आम्ही वजनाचा काटा आणला.



व्यायामातही चालण्याने वजन घटते. चालणे म्हणजे किमान १ मैल आठवड्यातून २ ते ३ वेळेला. आणि नुसते चालून उपयोगी नाही. सूर्यनमस्कार, जोर बैठकाही हव्यात नाहीतर स्नायुंची ताकद निघून जाते. विल्मिंग्टन मध्ये असताना मी रोजच्या रोज १ मैल चालायचे. बाकीचा व्यायाम रोजच्या रोज व्हायचा नाही. तो आठवड्यातून २ वेळा व्हायला लागला. विनायक शनिवार रविवार मध्ये एक दिवस २ मैल चालायचा. एके दिवशी माझे चालणे थांबले. रोजच्या रोज मैलोंमैल चालण्याने खांदे आणि पाठ खूप दुखायला लागली. नंतर मी एका स्टॉप साईन पर्यंत रोजच्या रोज चालायचे ठरवले.


माझे खरे वजन घटले ते हँडरसनविलला आल्यावर इंगल्सच्या नोकरीमुळे. कसे ते पुढील लेखात.@Rohini Gore
क्रमश : ...