Thursday, May 26, 2011

अनामिका ...(३)

सकाळी उठल्यावर आत्याबाई अंघोळ करून पूजा करतात. तुळशी वृदांवनासमोर दिवा लावून हात जोडून नमस्कार करतात आणि झोपाळ्यावर बसतात. डोक्यात विचारचक्र चालू असते ते म्हणजे आपला भाऊ अमितला त्याच्या घरी का बोलावतो आहे? त्याच्या मनात संजली अमित यांच्या लग्नाविषयीचे तर बेत नसतील? अमित तर संजलीला भेटण्यासाठी नेहमीच संधी शोधत असतो. एकदा नक्की काय ती खात्री करून घेतली पाहिजे. अनिल लग्नाला का नको म्हणत आहे? त्यालाही एकदा खडसावून विचारायला पाहिजे, असे विचारचक्र चालू असतानाच अनिल म्हणतो "अगं आई लक्ष कुठे आहे तुझे? " या वाक्याने आत्याबाई भानावर येतात. अगं आई तुला दोन तीन वेळा सांगितले मी निघतो ऑफीसला, तरी तुझे लक्ष नाही. काय विचार करत होतीस? आत्याबाई यावर म्हणतात " मी काय विचार करणार? माझा विचार आता तू करायला हवास. माझे आता वय होत चालले आहे. सबंध वाड्याचा कारभार आता माह्याने होत नाही. लग्न कर म्हणत्ये तर तू नाही म्हणतोस, कारण तरी कळू दे मला. आत्याबाई बोलत असताना "चल मी ऑफीसमधून आल्यावर बोलतो तुझ्याशी काय ते, आत्ता मी घाईत आहे असे म्हणून अनिल ऑफिसमध्य पोहोचतो.







"मालती अग तुझी बहीण बहीण बरेच दिवसात आली नाही मला भेटायला. गावात आली की येऊन जाते मला भेटण्यासाठी वाड्यावर" मालती वाड्यात खूप वर्षापासून असते. धुणे भांडी, वाड्यातील खोल्यांची साफसफाई, शिवाय अजून आत्याबाईंना स्वयंपाकात मदतही करत असते. "आत्याबाई, मी सांगते तुमचा निरोप तिला. येईल भेटायला तुम्हाला. म्हणत होती तिच्या नात्यात लग्न आहे तर गावात येणार आहे म्हणून. " "मालती मला जरा भाजी चिरून दे बरं. कणीकही भिजवून ठेव. आज मला जरा सोनाराकडे जाय्चे आहे. जेवून लगेचच निघेन म्हणते मी." आत्याबाई मालतीला म्हणतात.







रात्रीची जेवणे उरकल्यावर अनिल आत्याबाईंच्या खोलीत येतो आणि म्हणतो बोल आता काय बोलायचे ते निवांत. आत्याबाई म्हणतात "अरे तु लग्नाला का नको म्हणत आहेस. मुली सांगून येत आहेत. चांगल्या श्रीमंतांच्या मुली सांगून येत आहेत. तू हो म्हणालास की की लगेच पत्रिका मागावून घेते. "अगं आई, सध्या तरी मी लग्नाचा विचार करत नाही. माझ्या स्वतःचा बिझिनेस सुरू करायचा आहे मला. त्याकरता लागणारे भांडवल मी माझ्या पगारातून उभे करणार आहे. अजून दोन तीन वर्षे तरी थांब. मग तुझे सर्व म्हणणे मला मान्य. अगदी तू सांगशील त्या मुलीशी मी लग्न करीन. मी तुझ्या शब्दाबाहेर नाही हे तुलाही माहीत आहे. यावर आत्याबाई निरुत्तर होतात. आपला मुलगा त्याच्या बापासारखा श्रीमंतीत लोळणारा नाही, स्वतःचे काहीतरी करून दाखवण्याची हिम्मत आहे हे आत्याबाईना पक्के ठाऊक असते.








रात्री अंथरूणाव्वर पडल्या पडल्या खरी तर त्यांना लगेच झोप लागते पण आजकाल त्यांच्या मनात सारखे विचार येत असतात ते संपूर्ण वाड्याची देखभाल, गावाकडे असलेली जमीन, वाड्यात डागडुजी करायला झालेली असते, हे सर्व पुढे कोण चालवणार. आता काही आपल्याने जास्त काम होत नाही. शिवाय हा पण एक विचार त्यांच्या मनात खूप डाचत असतो तो विचार म्हणजे संजली अमितचा. काहीही झाले तरी या दोघांचे लग्न होता कामा नये पण त्यासाठी काय करावे, कसे करावे, कुणाच्या मनात काय आहे हे तरी आधी जाणून घ्यायलाच हवे. त्यांच्या भावाने अमितला दोन तीन वेळेला त्याच्या घरी बोलावले आहे, अमित खरेच गेला असेल का त्याच्या घरी? खरे तर हे जाणून घेण्यासाठीच आपण मालतीच्या बहिणीला बोलावून घेतले आहे. तिच्याकडून नीट काय ते कळाले की मगच आपल्याला काहीतरी करता येईल. या सर्व विचारात त्या बऱ्याच वेळ जाग्या राहतात. पहाटे पहाटे त्यांना डोळा लागतो. मालतीची बहीण लक्ष्मी त्यांच्य भावाकडे धुणेभांडी करत असते. आत्याबाईंनीच तिला हे काम मिळवून दिलेले असते.









एका आठवड्यानंतर लक्ष्मी आत्याबाईंकडे येते. आत्याबाई, वळखलं नव्हं मला. मी लक्ष्मी. मालतीने सांगितला मला निरोप आन तशी बी मी येणारच हुती. आत्याबाई म्हणतात अगं न ओळखायला काय झाले तुला? किती महिने झाले आली नाहीस ती. काय विसरलीस का मला? आवं तसं नाय. माजी बी आता काम वाढलीया. वेळच भेटत नाय कसा. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर लक्ष्मी म्हणते "अवं आत्याबाई काय वो संजलीचे लगीन ठरली का? नाय म्हंजी तुमच्या मुलाचा एक मित्र हाय बघा तो आला हुता तुमच्या भावाकडं. दाखवण्याचा कार्यक्रम हुता काय? संजलीची आय वरडत हुतीया तिच्यावर की जरा चांगला ड्रेस घालून ये बाहेर. पोहे बी केले व्हते. मुलगा चांगला हाय. मी बगितला. हुशार बी दिसतो. मी सकाळी कामावर गेलीया तवा मला माहीत पडलं"







लक्ष्मीच्या तोंडातून अमितचे कौतुक ऐकल्यावर मात्र त्या खूप संतापाने लाल होतात आणि लक्ष्मीच्या अंगावर ओरडतात, अगं काय बोलत आहेस तुझे तुला तरी कळत आहे का? माझा भाऊ ही बातमी मला सांगणार नाही का? "आवं आत्याबाई रागावू नका मला जे वाटलं ते मी बोलले बगा. चला निघू का उशीर होतोय मला" आत्याबाई तिच्या देखत कसाबसा राग आवरतात. तिला खायला प्यायला देतात आणि म्हणतात येत जा अशीच अधून मधून. ती गेल्यावर मात्र त्यांचा ताबा सुटतो आणि खूप बोलायला सुरवात करतात मला ही बातमी का नाही सांगितली, काहीही झाले तरी हे लग्न होता कामा नये, अमितने आपला डाव गुपचुप साधला, असे काही काही बोलत असताना चक्कर येवून त्या धाडकन जमिनीवर कोसळतात. विष्णु, सखाराम, मालती सर्व धावत येतात. कुणी आत्याबाईंच्या तोंडावर पाणी मारतात, कुणी डॉक्टरांना फोन करतात तर कुणी त्यांच्या मुलाला फोन करतात. आत्याबाईंना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले जाते. त्यांचा रक्तदाब वाढून त्यांना हार्ट ऍटॅक आलेला असतो.

क्रमशः

6 comments:

Anonymous said...

Rohini Tai, masta lihila ahe ha bhaag. Lakshmi che dialogues, bhaasha agdi perfect ahet! Majhya dolyasamor amcha ghari kaamala yenyarya mavshich alya. :)

Pan aatyabainna tumhi ekdum heart attack dilat, hey ekdum unexpected turn hota. Goshta masta raangli ahe.

Ata pudhe kaay honar? :)

rohinivinayak said...

Anonymous, Thank you so much for your best comment! tumche naav kalale tar mala khup aanand hoil. katha tumhi khup interest gheoon vachat aahat yacha mala khup aanand hoat aahe :) aani utsah vadhla aahe. konitari vachat aahe aani shivay comment lihit aahe mhatlyavar malahi aata katha lihinyat ras vatu lagla aahe. first attempt aahe na tuamule. anyways thank you!! aatyabaiina heart attack dene pudhil goshttisathi aavashyak hote. pan tya marnar nahit. hi goshtta aata yapudhe ekdam turn gheiil aani nantar parat ek turning point yeil.:) hahaha.

दिप्ती जोशी said...

Chaan katha, aavadali

rohinivinayak said...

Dipti, Thank you! :)

POLKA DOTS said...

hi rohini

nice...looking forward for the next part...

rohinivinayak said...

Hii, Will write next part ASAP. :) thanks a lott :)