Thursday, May 26, 2011

अनामिका ...(३)

सकाळी उठल्यावर आत्याबाई अंघोळ करून पूजा करतात. तुळशी वृदांवनासमोर दिवा लावून हात जोडून नमस्कार करतात आणि झोपाळ्यावर बसतात. डोक्यात विचारचक्र चालू असते ते म्हणजे आपला भाऊ अमितला त्याच्या घरी का बोलावतो आहे? त्याच्या मनात संजली अमित यांच्या लग्नाविषयीचे तर बेत नसतील? अमित तर संजलीला भेटण्यासाठी नेहमीच संधी शोधत असतो. एकदा नक्की काय ती खात्री करून घेतली पाहिजे. अनिल लग्नाला का नको म्हणत आहे? त्यालाही एकदा खडसावून विचारायला पाहिजे, असे विचारचक्र चालू असतानाच अनिल म्हणतो "अगं आई लक्ष कुठे आहे तुझे? " या वाक्याने आत्याबाई भानावर येतात. अगं आई तुला दोन तीन वेळा सांगितले मी निघतो ऑफीसला, तरी तुझे लक्ष नाही. काय विचार करत होतीस? आत्याबाई यावर म्हणतात " मी काय विचार करणार? माझा विचार आता तू करायला हवास. माझे आता वय होत चालले आहे. सबंध वाड्याचा कारभार आता माह्याने होत नाही. लग्न कर म्हणत्ये तर तू नाही म्हणतोस, कारण तरी कळू दे मला. आत्याबाई बोलत असताना "चल मी ऑफीसमधून आल्यावर बोलतो तुझ्याशी काय ते, आत्ता मी घाईत आहे असे म्हणून अनिल ऑफिसमध्य पोहोचतो.







"मालती अग तुझी बहीण बहीण बरेच दिवसात आली नाही मला भेटायला. गावात आली की येऊन जाते मला भेटण्यासाठी वाड्यावर" मालती वाड्यात खूप वर्षापासून असते. धुणे भांडी, वाड्यातील खोल्यांची साफसफाई, शिवाय अजून आत्याबाईंना स्वयंपाकात मदतही करत असते. "आत्याबाई, मी सांगते तुमचा निरोप तिला. येईल भेटायला तुम्हाला. म्हणत होती तिच्या नात्यात लग्न आहे तर गावात येणार आहे म्हणून. " "मालती मला जरा भाजी चिरून दे बरं. कणीकही भिजवून ठेव. आज मला जरा सोनाराकडे जाय्चे आहे. जेवून लगेचच निघेन म्हणते मी." आत्याबाई मालतीला म्हणतात.







रात्रीची जेवणे उरकल्यावर अनिल आत्याबाईंच्या खोलीत येतो आणि म्हणतो बोल आता काय बोलायचे ते निवांत. आत्याबाई म्हणतात "अरे तु लग्नाला का नको म्हणत आहेस. मुली सांगून येत आहेत. चांगल्या श्रीमंतांच्या मुली सांगून येत आहेत. तू हो म्हणालास की की लगेच पत्रिका मागावून घेते. "अगं आई, सध्या तरी मी लग्नाचा विचार करत नाही. माझ्या स्वतःचा बिझिनेस सुरू करायचा आहे मला. त्याकरता लागणारे भांडवल मी माझ्या पगारातून उभे करणार आहे. अजून दोन तीन वर्षे तरी थांब. मग तुझे सर्व म्हणणे मला मान्य. अगदी तू सांगशील त्या मुलीशी मी लग्न करीन. मी तुझ्या शब्दाबाहेर नाही हे तुलाही माहीत आहे. यावर आत्याबाई निरुत्तर होतात. आपला मुलगा त्याच्या बापासारखा श्रीमंतीत लोळणारा नाही, स्वतःचे काहीतरी करून दाखवण्याची हिम्मत आहे हे आत्याबाईना पक्के ठाऊक असते.








रात्री अंथरूणाव्वर पडल्या पडल्या खरी तर त्यांना लगेच झोप लागते पण आजकाल त्यांच्या मनात सारखे विचार येत असतात ते संपूर्ण वाड्याची देखभाल, गावाकडे असलेली जमीन, वाड्यात डागडुजी करायला झालेली असते, हे सर्व पुढे कोण चालवणार. आता काही आपल्याने जास्त काम होत नाही. शिवाय हा पण एक विचार त्यांच्या मनात खूप डाचत असतो तो विचार म्हणजे संजली अमितचा. काहीही झाले तरी या दोघांचे लग्न होता कामा नये पण त्यासाठी काय करावे, कसे करावे, कुणाच्या मनात काय आहे हे तरी आधी जाणून घ्यायलाच हवे. त्यांच्या भावाने अमितला दोन तीन वेळेला त्याच्या घरी बोलावले आहे, अमित खरेच गेला असेल का त्याच्या घरी? खरे तर हे जाणून घेण्यासाठीच आपण मालतीच्या बहिणीला बोलावून घेतले आहे. तिच्याकडून नीट काय ते कळाले की मगच आपल्याला काहीतरी करता येईल. या सर्व विचारात त्या बऱ्याच वेळ जाग्या राहतात. पहाटे पहाटे त्यांना डोळा लागतो. मालतीची बहीण लक्ष्मी त्यांच्य भावाकडे धुणेभांडी करत असते. आत्याबाईंनीच तिला हे काम मिळवून दिलेले असते.









एका आठवड्यानंतर लक्ष्मी आत्याबाईंकडे येते. आत्याबाई, वळखलं नव्हं मला. मी लक्ष्मी. मालतीने सांगितला मला निरोप आन तशी बी मी येणारच हुती. आत्याबाई म्हणतात अगं न ओळखायला काय झाले तुला? किती महिने झाले आली नाहीस ती. काय विसरलीस का मला? आवं तसं नाय. माजी बी आता काम वाढलीया. वेळच भेटत नाय कसा. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर लक्ष्मी म्हणते "अवं आत्याबाई काय वो संजलीचे लगीन ठरली का? नाय म्हंजी तुमच्या मुलाचा एक मित्र हाय बघा तो आला हुता तुमच्या भावाकडं. दाखवण्याचा कार्यक्रम हुता काय? संजलीची आय वरडत हुतीया तिच्यावर की जरा चांगला ड्रेस घालून ये बाहेर. पोहे बी केले व्हते. मुलगा चांगला हाय. मी बगितला. हुशार बी दिसतो. मी सकाळी कामावर गेलीया तवा मला माहीत पडलं"







लक्ष्मीच्या तोंडातून अमितचे कौतुक ऐकल्यावर मात्र त्या खूप संतापाने लाल होतात आणि लक्ष्मीच्या अंगावर ओरडतात, अगं काय बोलत आहेस तुझे तुला तरी कळत आहे का? माझा भाऊ ही बातमी मला सांगणार नाही का? "आवं आत्याबाई रागावू नका मला जे वाटलं ते मी बोलले बगा. चला निघू का उशीर होतोय मला" आत्याबाई तिच्या देखत कसाबसा राग आवरतात. तिला खायला प्यायला देतात आणि म्हणतात येत जा अशीच अधून मधून. ती गेल्यावर मात्र त्यांचा ताबा सुटतो आणि खूप बोलायला सुरवात करतात मला ही बातमी का नाही सांगितली, काहीही झाले तरी हे लग्न होता कामा नये, अमितने आपला डाव गुपचुप साधला, असे काही काही बोलत असताना चक्कर येवून त्या धाडकन जमिनीवर कोसळतात. विष्णु, सखाराम, मालती सर्व धावत येतात. कुणी आत्याबाईंच्या तोंडावर पाणी मारतात, कुणी डॉक्टरांना फोन करतात तर कुणी त्यांच्या मुलाला फोन करतात. आत्याबाईंना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले जाते. त्यांचा रक्तदाब वाढून त्यांना हार्ट ऍटॅक आलेला असतो.

क्रमशः

Monday, May 23, 2011

एका तळ्यात होती बदके पिले सुरेख
















आज बरेच महिन्यांनी बदक पिल्ले दिसली. बदक पिल्लांना ब्रेड खायला घालताना खूप छान वाटते. तळ्यावर गेले की लगेच तुरुतुरू धावत येतात. अजिबात भीत नाहीत.

Thursday, May 19, 2011

Tuesday, May 17, 2011

Monday, May 16, 2011

पक्षी









सीगल्स पक्षी, कबुतर असे वेगवेगळे पक्षी आहेत. त्यात मला कारवर बसलेला सीगल खूप आवडला.

अनामिका...(२)

दिवसामागुनी दिवस चालले ऋतुमागुनी ऋतू असे चक्र चालू असते. आत्याबाईंकडे सर्वांचे येणे जाणे अधुनमधून चालूच असते. संजलीचा विचार अमित डोक्यातून तात्पुरता काढून टाकतो. कॉलेजचे शेवटचे वर्ष असल्याने तो पूर्णपणे अभ्यासावर लक्ष केंद्रीत करतो कारण की त्याला अतिशय उत्तम गुणांनी पदवीधर व्हायचे असते. चांगल्या पगाराची नोकरी नाहीतर मास्टर्स करायचे असते. संजलीचे वडील आपल्याला घरी बोलावत आहेत तर एकदा गेले पाहिजे आणि आपला संजलीशी लग्न करण्याचा विचारही त्यांना बोलून दाखवला पाहिजे पण ते कसे शक्य होईल तर नोकरी लागल्यावरच आणि त्या आधी संजलीच्या मनात काय आहे हे पण जाणून घ्यायला हवे. पण ही संजली मला एकटी भेटायला पाहिजे आणि तेही इतके सहजासहजी शक्य होईल असे वाटत नाही.






संजलीचे ज्युनिअर कॉलेज संपून ती मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला असतो. तिला भाषेमध्ये खूप रस असतो त्यामुळे ती आर्टस ला गेलेली असते. नवीन कॉलेज नवीन मैत्रिणी त्यामुळे ती एका वेगळ्याच विश्वात असते. अभ्यासाबरोबर थोडे नटणे मुरडणे, सारखे आरशासमोर उभे राहणे, मैत्रिणींबरोबर हॉटेलमध्ये जाणे असे सर्व चालू असते. संजलीचे आईवडीलही तिच्या सगळ्या हौशी पुरवत असतात. आणि त्यांनी नाही तरी का म्हणायचे? एकुलती एक असते शिवाय हेच तर वय आहे हौसमौज करायचे. निरनिराळ्या फॅशनचे चुडीदार तर तिला खूप छान दिसतात. त्यावर मॅचिंग गळ्यातले कानातले सेटस घेणे पर्सेस हे सर्व तिच्या कपाटाच्या कप्यात तिने खूप आवडीने ठेवलेले असते. हौस करताना अभ्यासातले तिचे लक्ष जरा सुद्धा ढळलेले नसते.







आत्याबाईंच्या मुलाची बँकेतली नोकरी व्यवस्थित चालू असते. त्याला मित्रपरिवार खूप असल्याने कोणताही छोटा कार्यक्रम असला तरी ते सर्व मित्र मिळून जात असतात, मग ती एखादी सहल असो, एकत्र मिळून केलेले हॉटेलिंग असो नाहीतर कुणाचा लग्नसमारंभ असो. त्यात अमितही असायचा. त्यादिवशी दुपारी संजलीचे वडील काही कारणानिमित्ताने आत्याबाईंकडे आलेले असतात. जेवणे होऊन थोडी विश्रांतीही होते. तिचे वडील आत्याबाईंना म्हणतात मला आता निघायला पाहिजे. घर लांब आहे. "अरे जाशील रे. थोड्यावेळाने मी चहा टाकते तो घेऊन जा" आत्याबाई म्हणतात. आत्याबाईंचा चहा होतो. चहा पिताना त्यांच्या भावाजवळ त्यांच्या मुलाचा लग्नाचा विचार बोलून दाखवतात. आता मला अनिलचे लग्न करायला हवे. मुली बऱ्याच सांगून येत आहेत. घरात कशाला काही कमी नाही. त्याला बँकेत चांगली नोकरीही आहे मग कशाला लग्न लांबवायचे. पण हा मुलगा " मला आत्ता लग्न करायचे नाही"असे म्हणतो आहे. "अगं करील तो लग्न. सगळे मुले मुली लग्नाला आधी नको असेच म्हणतात" संजलीचे वडील म्हणतात. चहा पाणी आटोपल्यावर आत्याबाईंचा भाऊ जायला निघतो तेवढ्यात अमित व काही मित्र येतात. अनिल व सर्व मिळून त्यांच्या एका मैत्रिणीच्या लग्नाला जाणार असतात. लग्न दुसऱ्यादिवशी असले तरी अहेराकरता काय घ्यायचे, कोणत्या दुकानातून खरेदी करायची आणि त्यानिमित्ताने थोड्या गप्पा टप्पा व थोडी भटकंती असा कार्यक्रम असतो. परत एकदा "या की आमच्या घरी. आताच येताय का मी घरीच निघालो आहे" असे आत्याबाईंचा भाऊ अमितला म्हणतो.




नको आता नको परत कधीतरी. तुम्ही तुमचा सविस्तर पत्ता देऊन ठेवा मला. अमित त्याची छोटी डायरी पुढे करतो. त्यावर पत्ता लिहिल्यावर म्हणतो इथे राहता तुम्ही? मग हा एरिया तर मला चांगलाच माहीत आहे. इथे माझी मावसबहीण राहते. तिच्याकडे आलो की तुमच्याकडे नक्की येईन मी. हे सर्व संभाषण आत्याबाईंच्या कानावर पडते.





काही महिन्यानंतर असाच एक योगायोग जुळून येतो. अमित चांगल्या मार्कांनी पदवीधर होतो व त्याचे पेढे देण्याकरता तो त्याच्या मावसबहिणीच्या घरी येतो. तिथून थोड्या अंतरावर आत्याबाईंच्या भावाचे घर असते. त्याची बहीण नोकरी करत असते म्हणून तो रविवारी जातो. रविवारी सकाळी सकाळी लवकरच बाहेर पडतो. मावसबहिणीकडून निघून तो आत्याबाईंच्या भावाच्या घरी साधारण १० ते १०.३० च्या सुमारास येतो. घरावर टकटक करतो. संजलीचे वडिल दार उघडतात. "अरे तू होय! ये ये. बस. बरका हो अमित आलय." संजलीची आई बाहेर येते. अमित वडिलांच्या हातावर पेढ्याची पूडी ठेवतो आणि सांगतो मी पदवीधर झालो. नमस्कार करतो. " हो का? अरे वा वा! दोघेही त्याचे आदरातिथ्य छान करतात. संजलीची आई चहा घेऊन येते. चहा पिताना एकीकडे संजंली कुठे दिसते का? अशी नजर फिरवतो. कुठे गेली असेल संजली? असे मनातल्या मनात म्हणतो. एकीकडे चहा व टी. व्ही. चालू असतो. संजलीची आई म्हणते तुम्ही बोलत बसा. मी पोहे करत आणि संजलीला उठवते. आज रविवार ना त्यामुळे आमच्या बाईसाहेब जास्तीत जास्त किती झोपता येईल असे बघत असतात. यावर सर्व हसतात. अमित मनातल्या म्हणतो, "अरे बापरे! इतक्या उशीराने उठते ही! खूपच लाडावलेली दिसत्ये." असे म्हणून गालातल्या गालात हसतो.







आई संजलीला उठवायला जाते. अगं संजली उठे आता, जेवायची वेळ होत आली आणि उठल्या उठल्या पटकन बाहेर येऊ नकोस. ब्रश कर, चहा घे. अंघोळ करून जरा बऱ्यापैकी पंजाबी सूट घालून बाहेर ये. संजलीला अजूनही झोपायचे असते. "हो ना गं आई, उठते मी आणि बाहेर का नको येऊ?" संजली म्हणते. अगं अमित आला आहे. त्याच्यासमोर अवतारात नको येऊस. "मग आला तर आला तो काय मला नवीन आहे का? " असे म्हणून संजली जरा रागानेच उठते आणि आवरून बाहेरच्या खोलीत येते. बाहेर आल्यावर संजलीची आई पण सर्वांना पोहे घेऊन येते. हा घे पेढा. असे म्हणून संजलीचे वडील संजलीच्या हातावर पेढा ठेवतात आणि सांगतात की अमित चांगल्या मार्कांनी पदवीधर झाला आहे. पेढे घेऊन आला आहे आपल्या घरी. संजली त्याचे अभिनंदन करते. पोहे खात असताना संजलीची मैत्रिण येते व म्हणते " चल ना आज आपण तुळशीबागेत जाऊ, येशील माझ्याबरोबर? " संजली म्हणते "हो येईन की! मला तर तुळशीबागेत जायला खूप आवडते. मला पण परवा घेतलेल्या ड्रेसवर मॅचिंग दुपट्टा घ्यायचा आहे" संजलीच्या मैत्रिणीला आई पोहे देते व थोड्याच वेळात वेगळा ड्रेस घालून ती तिच्या मैत्रिणीबरोबर बाहेर पडते व अमितला बाय करते. नंतर थोड्यावेळात अमितही निघतो.





अमित घरी येतो पण त्याचा मूड काही ठीक नसतो. ही संजली म्हणजे ना! आपण सकाळी का गेलो तर संजली भेटेल म्हणून. त्यातून ही बया उशीराने उठलेली आणि नंतर मैत्रिणीबरोबर जायला एका पायावर तयार. मी आलोय त्याची जरासुद्धा दखल हिने घेतली नाही. कॉलेजचे वारे लागलेले दिसत आहे. अर्थात ती निघाली तेव्हा माझ्याकडे बघून बाय करून हासली मात्र खूप छान! हसल्यावर तर ही खूपच छान दिसते! मास्टर्स करून चांगली नोकरी लागली की नाहीतर त्याही आधी जर नोकरीची चांगली ऑफर आली की आपण रीतसर मागणीच घालू संजलीला याबद्दल शंका नाही.


क्रमश:

Saturday, May 14, 2011

१४ मे २०११

आज कधी नव्हे ते farmers market ला जाण्याचा मुहूर्त लागला. शनिवारी सकाळी उठून कुठे बाहेर जाणे म्हणजे कंटाळवाणेच. आता हळूहळू उन्हाळा जाणवू लागला आहे. आज हवा अजिबात चांगली नव्हती.




तर त्या मार्केटला गेलो तर ते विशेष काही चांगले वाटले नाही. आम्ही दोघेही भाजीप्रिय , वाटले होते ताज्या भाज्या मिळतील. काही होत्या तिथे भाज्या पण खूप थोड्या. जास्त करून तिथे बागेत लावण्याकरता रोपटी खूप होती. एका स्टॉलवर स्ट्रॉबेरी, ब्ल्युबेरी व रासबेरी दिसली. छान टवटवीत दिसत होती. घरी आल्यावर खाल्ली व खूप ताजेतवाने वाटले. बरेच दिवसानंतर मी त्याचे सॅलड डेकोरेशनही केले.






आजकाल आम्हाला मेक्सिकन फूड आवडायला लागले आहे. आज तिथे जाण्याचा वार होता व तिथून एका तलावावर जाणार होतो पण गेलो नाही. हवा अजिबात चांगली नव्हती. गरम आणि दमट हवा एकत्रित म्हणजे अजिबात चांगली नाही. घरी आलो आणि आपलीमराठीवर एक चित्रपट पाहिला. गाभ्रीचा पाऊस. अतिशय छान चित्रपट. मराठीत इतका चांगला चित्रपट पहायला मिळत नाही इतका सुंदर. खेडेगाव, शेती, पाऊस येत नाही म्हणून पीक नाही. हे सर्व वातावरण अतिशय चांगले उभे केले आहे. एक चांगला चित्रपट पहायला मिळाला याचा आनंद झाला.





फार्मर्स मार्केटला पण जी फळे घेतली ती मस्त होती चवीला त्यामुळेही दिवस छान गेला. पण का कोण जाणे दुपारचे मेक्सिकन जेवणाची जास्त मजा नाही आली, नाहीतर मी तर खूप कौतुक करत असते खूप छान वाटले, जेवण छान होते असे कौतुक चालू असते माझे. शनिवार हा ग्रोसरीवार असतो पण तिथेही गेलो नाही. नाही म्हणायला रात्रीची मिक्स भाजी व पोळी छान झाली. ही मिक्स भाजी रेसिपी लिहिणार आहे लवकरच. स्ट्रॉबेरी, ब्ल्युबेरी व रासबेरीचे नैसर्गिक रंग मनात भरून राहिले आहेत. ते तुम्हाला उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म या माझ्या ब्लॉगवर पहायला मिळतील.

Thursday, May 12, 2011

अरुणोदय





उठ मुला उठ मुला बघ हा अरूणोदय झाला
नवरंगी किरणांनी भुषविली ब्घ ही अवनी


मोदभर रानभरे मंद सुगंधा ते विखरे
शितल हा वात पाहा आळस हरण्या येत अहा

किलबिलती बागडती वृक्षावरती पक्षी किती
रव करिती भृंगतती पुष्पांचा मकरंद पिती

फुलांवरी फळांवरी पतंग मोदे मजा करी
झटकन बसे झटकन उठे उंच भराऱ्या घेत सुटे

आनंदे नभ कोंदे हरूनी आळसा तरतरी दे
पूर्वेला रवि आला मुला उठाया कथित तुला

कविः बालकवी ठोमरे

Monday, May 09, 2011

दिनांक ९ मे २०११

आज सकाळी उठल्यावर आज लायब्ररीत जायचे ठरवले होते. आजकाल मी आठवड्यातून २ ते ३ वेळा लायब्ररीत जाते. खरे तर रोजच्या रोज जायचेच मनात आहे पण ते शक्य होतेच असे नाही कारण हवा नेहमी बदलती असते. कधी थंडी तर कधी पाऊस नाहीतर रणरणते उन.



अर्थात नोकरी असली की कोणतेही हवामान असो जावेच लागते. मी लायब्ररीत voluntary work करायला जाते त्यामुळे बंधन नाही. काही वेळा काम न करता असेच काही वाचत बसते. आईला साधारण एक दिवसा आड फोन असतोच. आज आईला फोन केला आणि एक वाईट बातमी कळाली. पूर्वी आमच्या शेजारी एक कुटुंब राहत होते. एक आजी होती. तिला ३ मुले व २ मुली. सर्वात मोठा मुलगा त्याला आम्ही काका म्हणायचो व त्याच्या बायकोला मामी. तर ही मामी गेल्याची बातमी मला आईने दिली आणि मला खूपच वाईट वाटले. माझ्या लहानपणी बघितलेली ही मामी मला खूपच आवडायची. ती पावडर कुंकू करताना नेहमी आधी विको टरमरीक लावायची. गंध मरून रंगाचे आणि खूप बारीक.



तिला काकू अशी हाक आम्ही कधी मारली नाही इतकी ती गोड होती. गालावर नेहमी हासली की खळ्या पडणार. मी ८ वी किंवा ९ वीत असेन. ही मामी मला नेहमी "तेरे मेरे सपने" मधली गाणी म्हणायला सांगायची. तिला पहिला मुलगा झाला. तिची सासू म्हणजे आमची मानलेली आजी तिला त्रास द्यायची. मग ती आमच्याकडे येवून माझ्या आईकडे मन मोकळे करायची. दुसरी मुलगी झाली तेव्हा आम्ही दवाखान्यात गेलो होतो तिला पहायला. आम्ही मामीला विचारले की मुलीचे नाव काय ठेवणार आहेस तर म्हणाली तुम्हीच सुचवा काहीतरी. म अक्षरावरून ठेवा. कारण की पहिला मुलगा मंदार म्हणून मुलीचे नाव म अक्षरावरून. आम्हा दोघी बहिणींना मंजिरी हे नाव खूप आवडायचे. अजूनही आवडते. मामीला हे नाव सुचवले व तिने मुलीचे नाव मंजिरीच ठेवले. वर्णाने सावळी, बोलके डोळे, बांध्याने मजबूत, खूप छान छान साड्या नेसायची. माहेरची खूप श्रीमंत तरी श्रीमंतीचा अजिबात गर्व नाही. संसाराला खूप चांगली. नीटनेटकी, घर अत्यंत सुरेख ठेवणारी. तिचे ठाण्याच्या घरी आम्ही एकदा गेलो होतो. तिने खूप छान आदरातिथ्य केले. तिचा व आमचा सहवास खूप कमी होता. कारण की ती दुसरी मुलगी झाल्यावर दुसऱ्या गावी निघून गेली बदलीवर.



आज ही बातमी ऐकली आणि खूप रडू आले. तिचे व्यक्तिमत्व मला खूपच आवडायचे. आज सबंध दिवस तिच्याच आठवणीत गेला. तिच्याबद्दल मी ज्या काही चार ओळी लिहिल्या आहेत ती एक प्रकारची माझ्यातर्फे तिला श्रद्धांजली आहे. देव तिच्या आत्म्याला शांती देवो हीच प्रार्थना. मामी माझ्या कायम आठवणीत राहिली आहे आणि राहील.

Sunday, May 08, 2011

दिनांक ८ मे २०११







दर रविवारचा सूर्यास्त आम्ही सहसा सोडत नाही. मी नेहमी म्हणते की आता बास करते सूर्यास्ताचे फोटो काढणे पण काही वेळा खूप वेगळा अस्त पाहण्यात आला की मोह होतोच. आमच्या शहरात एक नदी आहे त्यावर एक लाकडी पूल आहे तिथे चालायला छान वाटते. जाऊन येऊन एक दीड मैल चालणे होते. बरीच मंडळी मुलाबाळांसह इथे चालायला येतात. शिवाय इथे एक आयस्क्रीमचे दुकानही आहे. या पूलावर अधून मधून बसायला लाकडी ठोकळे केले आहेत. इथे चालणे तर होतेच शिवाय सूर्यास्तही पाहायला मिळतो.





ही नदी डाऊनटाऊनला आहे त्यामुळे इथे थोडी रेस्टॉरंट आहेत. इथल्या एका उपहारगृहाच्या पुढे एक फुलांचा वेल आहे. ही फुले मला नेहमी प्राजक्ताच्या फुलांची आठवण करून देतात. अगदी तशीच दिसतात. या फुलांच्या मध्ये फक्त नारिंगी रंग नाही. आज मला या लाकडी पूलावर लव्हेंडर रंगाची खूप नाजूक फुले दिसली. खूप छान होती. या सर्वांचे फोटो काढले की आपल्याकडे किती छान छान फोटोंचा साठा आहे असे वाटते. अशी सगळी स्मृतीतली फुले नंतर पाहताना मन प्रसन्न होते.





निघण्याच्या आधी आज मी बरेच दिवसांनी फोडणीचे चुरमुरे केले होते. ते खाल्यावर पण तोंडाला छान चव आली. ते खाऊन निघालो नदीवर जाण्यासाठी. आज सकाळी खरे तर काहीच करू नये असे वाटत होते कारण की आदल्या दिवशी रात्री झोपायला थोडा उशीर झाला होता. आपलीमराठीवर उशीराने एक चित्रपट पहायला सुरवात केली. पहिल्यांदा हा चित्रपट छान वाटला. नंतर महाबोअर झाला. पूर्ण नाही पाहिला. चित्रपटाला नीट पकड घेत नव्हती. चित्रपटाचे नाव यंदा कर्तव्य आहे. त्यापेक्षा मला तो पुणे मुंबई पुणे खूपच आवडला होता. पूर्णपणे संवादावर आधारित चित्रपट, शिवाय पुण्याचे शुटिंग पाहताना खूप छान वाटत होते. मी तो अजून एकदा तरी नक्कीच पाहणार आहे. आज संध्याकाळी आपली मराठीवर एका डॉक्टरने दिलेली माहिती पाहिली. प्रशांत दामले प्रश्न विचारत होते. खूप उपयुक्त माहिती होती रक्तदाब, मधूमेह व ऱ्ह्दयविकारावर.




नदीवरून आलो आणि मसालेभात केला भाज्या घालून कारण की काल थायीमधला फ्राईड राईसची चव रेंगाळत होती म्हणून परत मसालेभात केला. आज खरे तर कंटाळा आला होता रोजनिशी लिहायचा. साफसफाईची कामे करून व चालून खूप दमायला झाले होते पण लिहूच म्हणून लिहिली. संध्याकाळी बीचवर जायचे मनात होते पण बेत पालटला, कारण की चालणे झाले नसते.

Tuesday, May 03, 2011

डेंटनचे दिवस...(२)

सत्या दुसऱ्या शहरात गेल्यावर मी व प्रविणाच होतो. आम्ही दोघी दुपारच्या एकमेकींकडे जाऊन गप्पा मारायचो. गप्पांमध्ये चहा असायचा व बरोबर बटाटा चिप्स. काही वेळेला आम्ही जिन्यात बसून गप्पा मारायचो. त्या अपार्टमेंटमध्ये बाहेरून जिने होते. ती माझ्याकडे बरेच वेळा कांदा, बटाटा वगैरे उसने मागायची. आम्ही दोघींनी असेच काही चमचमीत बनवले तर ते एकमेकींकडे द्यायचो. वेगवेगळ्या पदार्थांचे व वेगळी चव असलेले पदार्थ आम्हाला दोघींना खूप आवडायचे. त्यावेळेला मी कोबीची भजी खूप वेळा करायचे.





थोडे दिवसांनी आम्हाला कविता नावाची तेलगू मैत्रिण मिळाली. ती खूप अबोल होती. तिचे मित्रमंडळी म्हणजे टी. व्ही व कॉंप्युटर होते. तिला बाकीच्या जगाशी काही घेणेदेणे नसायचे. तिच्या घरी गेले की मात्र चांगले बोलायची पण लक्ष मात्र पूर्ण टी. ही बघण्यात असायचे. नंतर नंतर आमाच्या तिघींचे खाण्याचे पदार्थ द्यायला घ्यायला सुरवात झाली. कविता रेसिपी वाचून पदार्थ बनवायची. तिच्या हातची पदार्थांची चव खूप छान होती. नंतर काही दिवसांनी आम्हाला माधवी नावाची तेलगू मैत्रिण मिळाली. तिची व माझी दोस्ती जास्त जमली कारण की तिला व मला बडबड करायला खूप आवडायचे. दिवसातून खूप वेळेला आम्ही फोनवरून बोलायचो. बोलण्याचा विषय अमेरिका किती बोअर आहे आणि भारत किती चांगला आहे हाच असायचा. असे बोलले की आम्हाला खूप बरे वाटायचे. बोलण्यातून 'बोअर' हा शब्द आला की आम्ही खूप हसायचो व म्हणायचो की बोअर शब्द आपण किती वेळा वापरतो ना!



मी तिला विचारले की तू तुझा वेळ कसा घालवतेस तर तिने सांगितले की मी सर्व आवरून व स्वयंपाक करून ९ वाजता संगणकावर बसते याहूवर चॅटिंग करायला ती १२ ला उठते. त्यावेळी तिचे भारतातले मित्रमैत्रिणी यायचे. नंतर ३ ते ५ ती तिच्या अमेरिकेतल्या बहिणींशी चॅटिंग करायची. तिच्या नवऱ्याला चॅटिंग केलेले अजिबात आवडायचे नाही. मी पण तिला माझे रुटीन सांगितले की सकाळी रेडिओवर गाणी ऐकता ऐकता स्वयंपाक. विनायक घरी आला की जेवण व थोडी डुलकी काढून कोक पिऊन ग्रंथालयात व येताना विनायकच्या लॅबमध्ये जाऊन दोघे परत येतो. नंतर काहीतरी खायला करून परत विनायक लॅबमध्ये गेला की रेडिओ ऐकता ऐकता पत्रे लिहिणे


मी भारतातल्या मैत्रिणींना, सासूसासरे, आईबाबा, बहीण यांना पत्र लिहीते हे ऐकून तिला खूप छान वाटले. माझी पत्र लिहिण्याची कल्पना तिला आवडली व तिने पण काही पत्र लिहीली. विद्यापीठातच एक छोटे पोस्ट ऑफीस होते. मला ते खूप आवडायचे. आमची पत्रे लिहून तयार झाली की एकमेकींना फोन करून पोस्ट ऑफीसमध्ये यायचो पत्र टाकायला. मी वाढदिवसाची ग्रीटींगही पोस्टाने पाठवते हे ऐकून पण तिला छान वाटले. या पत्र टाकण्याच्या निमित्ताने आम्ही दोघी भेटायचो, बोलायचो. दुपारचे जेवण झाले की आम्ही यायचो पोस्ट ऑफीसमध्ये. नंतर चालत कधी ती माझ्याकडे यायची किंवा मी तिच्याकडे जायची. आमच्या घराशेजारी मॅकडोनल्ट होते. तिथे आम्ही व्हेज बर्गर खायचो. तिच्या घरी गेलो की ती कॉफी करायची व एकीकडे चिप्स आणि रेडिओवर गाणी ऐकायचो. गप्पा तर कायम असायच्याच आमच्या. तिलाही रेडिओवर गाणी ऐकायला आवडायची. तिला पदार्थ बनवून खाण्यात रस नव्हता. प्रविणाने एकदा बुंदी लाडू बनवले व मला दिले व कविताला दिले. आम्हाला दोघींनाही ते खूप आवडले म्हणून एकदा आम्ही तिघींनी मिळून आमच्या तीन फॅमिलीज करता बुंदी लाडू बनवले होते. प्रविणाला माझे समोसे खूप आवडायचे. एकदा कविताने व्हेज मँच्युरियन केले. नंतर तिला रेसिपी विचारून आम्ही दोघींनी पण बनवले.


काही दिवसांनी एक छोटे बांगला देशी शॉप सुरू झाले. तेथून आम्ही चित्रपटांच्या कॅसेट आणायचो. जी कॅसेट आणेल तिने ती सर्वांना द्यायची व मग नंतर परत करायची. त्यात एकदा मी 'कैरी' सिनेमाची कॅसेट आणली होती. प्रविणाला 'कैरी' खूप आवडला. एकदा कविताने 'लगान' चित्रपटाची कॅसेट आणली होती. तेव्हा लगान नवीन होता त्यामुळे ती कॅसेट दुसऱ्या दिवशी लगेच परत करायची होती म्हणून मग आम्ही सर्वांनी मिळून 'लगान' चित्रपट कविताच्या घरी पाहिला. तिघींच्याही घरी वेगवेगळी जेवणे झाली. नंतर मी सगळ्यांना जेवायला बोलावले व मराठमोळा स्वयंपाक केला व सांगितले आज अबिबात भात खायचा नाही, पोळ्या खा!



मी एकदा प्रविणाला विचारले की तुम्ही जेवणात भातच भात कसा काय खाता? तर तिने सांगितले की भाताबरोबर आम्ही रसम, सांबार, दोन भाज्या असे सर्व काही करतो व प्रत्येकाबरोबर भात खातो, व सर्वात शेवटी दही भात खातो. खरा तर मला भात जास्त आवडत नाही पण एकदा तिने सांगितलेल्या पद्धतीने सर्व काही केले आणि चक्क मी भरपूर भात खाल्ला. भाजीबरोबर भात खायला पण छान लागतो!

Sunday, May 01, 2011

Art Photography