Monday, January 15, 2007

चकवा

इनामदार खोत. त्यांची कोकणात मोठी वाडी आहे. वाडीच्या मधोमध त्यांचे घर. घर साधे, उतरत्या छपराचे. पुढे अंगण, परसदारी दोन विहीरी. पाणी मुबलक. नारळ, सुपारी, फणस यांचे भरपूर उत्पन्न. वाडीस लागूनच भातशेती. बापू खोतांचा परिवार मोठा. दोन मुलगे, लेकी, जावई, नातवंडे. थोरला मुलगा हाताशी आल्याने कोणतीच काळजी नाही. बापू बोलण्यात अगदी मिठ्ठास. गप्पा, विनोद यात त्यांना भारी रस. पाऊलवाट वाडीमधून गेलेली. तिसऱ्या वाडीपलीकडे अण्णा मास्तरांचे छोटे घर. मास्तरांचा स्वभाव पण बोलका. बापू व अण्णांचे संबंध घरोब्याचे. रोज सायंकाळी खोत मास्तरांकडे जात. गेल्यावर चहापाणी होत असे. इकडच्या तिकडच्या खेतीवाडीच्या गप्पा होत. त्यातून गोष्टी विनोद रंगत. साधारण साडेनऊ-दहाच्या सुमारास खोत घरी परत येत असत. गप्पा मारता मारता फारच उशीर झाला तर बापूंचा मास्तरांकडेच मुक्काम होई. सकाळी उठल्यावर काकू हिरवी मिरची लावून दही पोहे करीत, त्यावर चहा पिऊन बापू निघत.


एकदा बापूंना घरून निघायलाच रात्र झाली. चांदणे होते. वाट तशी पायाखालचीच. बापू निघाले. चालता चालता तीन-चार बिड्या संपल्या. खरतर वीसएक मिनिटांत बापू मास्तरांचे घर गाठत असत. पण आज तास, दीड तास झाला तरी वाट संपेना. पुन्हा तीच झाडे, तीच पाऊलवाट. बापूंना घाम फुटला तरी मास्तरांचे घर येईना. मागे वळावे तर घर दिसेना. बापू थकले. एका माडाच्या बुंध्यापाशी टेकून बसले. शांतपणे विचार केला, एक बिडी ओढली. थकल्यामुळे त्यांना झोप लागली.


पहाटेचे गार वारे सुटले तशी त्यांना जाग आली. तांबडे फुटले होते. पाहतात तर आपल्याच वाडीच्या माडाजवळ आहोत हे त्यांच्या ध्यानात आले. सावकाश बापू घरी आले. कुणाशी काही बोलले नाहीत. बापू मास्तरांच्या घरीच राहिले असे घरच्यांना वाटले. स्नानाचे पाणी तापले होते. बापूंनी अंघोळ केली. त्यांची देवपूजा झाली. नेहमीप्रमाणे दहा वाजता जेवणे झाली, आणि बापू बाहेर पडवीत येऊन बसले. सुपारी कातरून विडा खाल्ला. पाहुणे आले होते, त्यांच्याशी बापू बोलत होते तोच हातात छत्री घेऊन येताना मास्तर दिसले.


मास्तर पडवीत आले, चपला काढल्या, कोट खुंटीवर ठेवला, आणि हासत हासत ते बापूंजवळ येउन बसले. माजघरातून दुधाचे पेले आले. रिकामा पेला लोडाजवळ ठेवून मास्तर म्हणाले, " बापू, बाकी काही म्हणा, काल रात्री तुम्ही खूपच कमाल केलीत. मागच्या आठवणी, विनोद यात पहाट केव्हा झाली हे कळलेच नाही. अहो विड्यांची तीन बंडले आपण संपविलीत आणि तुम्ही गेल्यावर ही म्हणाली ,'' अहो, गप्पा मारायच्या त्याला काही सुमार? पहाटेपर्यंत? हे ऐकत, मास्तरांच्या बोलण्याला दाद देत बापू एकीकडे कपाळावरील घाम पुसत होते.


आदल्या दिवशी चकवा मास्तरांच्या घरी गेला होता. मास्तरांशी गप्पा मारून, बिड्या ओढून, पहाटेस निघून गेला. चकवा ही काय अजब चीज आहे हे बापूंना आज कळाले होते.


लहानपणी वडिलांनी सांगितलेली गोष्ट त्यांच्याच शब्दात. चकवा हे कोकणातील भूत असते.

रोहिणी

2 comments:

Anonymous said...

गोष्ट वाचून बरं वाटलं.भुता खेतांच्या,देवचार मुंज्याच्या गोष्टी ऐकून व वाचून आमच्या लहानपणाच्या आठवणी येतात.
श्रीकृष्ण सामंत
(कृष्ण उवाच)

rohinivinayak said...

Thanks for your compliment!!