Monday, January 15, 2007

सराफ

ग्वाल्हेरमधल्या एका नामांकित सराफाला एकदा चांदीत तोटा आला. ठरल्याप्रमाणे गिऱ्हाईकाला त्याला चांदीचा माल देता येणार नव्हता, त्यामुळे त्याची पत जाण्याची वेळ आली होती. चार दिवसात तेव्हढी चांदी मिळवणे व त्याच्या वस्तू करून देणे जमणार नव्हते. सराफास काही सुचेना. त्याच्या दुकानातील नोकराच्या लक्षात ही गोष्ट आली. त्याने धीर करून मालकास सांगितले "तुम्हाला काळजी लागली आहे हे मला दिसत आहे. मी एक सांगू का? माझ्या माहितीत एक गृहस्थ आहे. तो तुम्हाला पाहिजे असलेली चांदी देईल. पण त्याच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला वागावे लागेल. मालक म्हणाला "असा कोण गृहस्थ आहे की जो मला हवी असलेली चांदी पाहिजे त्या वजनात देऊ शकेल? चल मला दाखव. मी तुझ्याबरोबर येतो.


ठरल्याप्रमाणे नोकराबरोबर तो निघाला. जवळच्या गावच्या वेशीजवळ एक लहान झोपडे होते. तिथे ते गेले. झोपडीभोवती काटेरी कुंपण होते. ते दोघे आत गेले. समोरच एक गृहस्थ डोक्याला फडके गुंडाळून एका कांबळ्यावर बसला होता. नोकराने व सराफाने त्याला हात जोडून वंदन केले. नंतर ते दोघे खाली बसले. त्या गृहस्थाकडे पाहून सराफास शंका वाटू लागली की हा काय मला चांदी देणार? नोकराने सराफाची अडचण त्यास समजावून सांगितली. त्यावर तो गृहस्थ म्हणाला, " मी सांगतो तसे करणार असाल तर मी आपल्याला हवी असलेली चांदी उद्या देतो " सराफाने होकारार्थी मान हालवली.
तो म्हणाला, " आज रात्री तुम्ही कांबळ्यावर झोपा. कुलदैवतेचे स्मरण करा. सकाळी कांबळ्याखाली तुम्हाला हवी असलेली चांदी तुकड्यांच्या स्वरूपात मिळेल. सराफ म्हणाला " चालेल. मी दर महिन्याला एक किलो चांदी परत करीन" "चालेल. जा आता तुम्ही. थांबू नका." गृहस्थ म्हणाला.


त्या गृहस्थाने सांगितल्याप्रमाणे सराफाने केले. दुसऱ्या दिवशी त्याला कांबळ्याखाली साडेचार किलो वजनाचे तुकडे दिसले. त्यातून त्याने आलेली ऑर्डर पूर्ण केली. एका महिन्यानंतर तो एक किलो चांदी घेऊन त्या गृहस्थाकडे गेला. सराफ त्या गृहस्थाच्या झोपडीत शिरणार तोच तो गृहस्थ आतून म्हणाला "तिथेच थांब. आंत येऊ नकोस. मागील दारी एक विहीर आहे. त्यात ती चांदी टाक. मला पोहोचेल." सराफ चांदी घेऊन मागील दारी गेला. विहीर शेवाळ्याने भरली होती. तो एक मिनिट उभा राहिला. मनाचा हिय्या करून त्याने ती चांदी विहिरीत टाकली व निघून गेला. चार महिने त्याने एक किलो प्रमाणे चांदी विहिरीत टाकली. आता फक्त अर्धा किलो पुढील महिन्यासाठी उरली. तो मनाशी म्हणाला," अर्धा किलोच राहिली आहे. नाही दिली तर काय होणार आहे? म्हणून तो पुढील महिन्यात गेलाच नाही.


पण पुढच्या महिन्यात एक दिवस उठून पाहतो तर काय त्याच्या शोकेसमधली एक चांदीचा तांब्या व एक ताम्हण याची राख झाली होती. तो तसाच त्या गृहस्थाकडे गेला. सराफ त्या झोपडीत शिरणार तर आतून आवाज आला. " आत येऊ नकोस. मी तुझा तांब्या व ताम्हण कालच नेले आहे." हे ऐकून सराफ थक्क झाला.


टीपः ही गोष्ट खूप पूर्वी एका आजोबांनी सांगितली आहे. त्यांनी सांगितले की ही एक सत्य घटना आहे. त्या गृहस्थाने सिद्धी प्राप्त करून घेतली होती त्यामुळे त्याला असे करता आले. कुणाला माहीत आहे का की सिद्धी म्हणजे काय? ती कशी प्राप्त होते. त्याचा उपयोग कसा केला जातो. वगैरे.

No comments: