Wednesday, March 05, 2025

india trip 2024

यावर्षी आम्ही पहिल्यांदाच एअर इंडियाने प्रवास करणार होतो. ऑनलाईन कायक वेबसाईटवर तिकिटे शोधत होतो. त्या साईटने आम्हाला दुसऱ्या इंडियन इगल नावाच्या साईटवर नेले.  फ्लाईट बुक केली. या बुकींगचा पण खूप त्रास असतो ! शोधात कोणत्या विमानाने जायचे हे चाचपडावे लागते. जाताना येताना किती थांबे आहेत. थेट फ्लाईट असेल तर ती कोणती चांगली आहे हे सर्व पहावे लागते. अमेरिकेत आल्यापासून थेट फ्लाईट आमच्या नशिबी नव्हती. प्रवास खूपच कंटाळवाणा असायचा. इथल्या घरातून निघाल्यापासून ते भारतातल्या डोंबिवलीच्या घरात किंवा पुण्याच्या माहेरच्या/सासरच्या घरात पोहोचेपर्यंत  कमीतकमी २४ तास किंवा त्याहूनही अधिक तास लागतातच. २ थांबे असायचे ते म्हणजे अमेरिकेतला एक आणि युरोपमधला एक असे. न्युजर्सीमध्ये आलो तेव्हा २०२१ साली युनायटेड कंपनीची थेट फ्लाईट खूप सुखावून गेली होती. नेवार्क - मुंबई. अर्थात नंतर पुण्याला जाण्यासाठी ४ तास द्यावे लागले. ही फ्लाईट आता बंद केली आहे. १९२२ साली याच कंपनीची व्हाया झुरिच ते मुंबई अशी फ्लाईट होती आणि येताना व्हाया इंग्लड होती. यावर्षीच्या गुगल शोधात ही एक फ्लाईट होती पण येताना २ किंवा ३ थांबे दाखवत होते. एअर इंडियाची थेट फ्लाईट न्युयॉर्क वरून दाखवत होते पण तिथे उबरने पोहोचायला दीड तास लागत होता. नेवार्क वरून एक बघितली ती होती व्हाया दिल्ली - मुंब ई आणि नंतर केके ट्रॅव्हल टॅक्सीने ४ तासाचा पुण्याचा प्रवास. येताना मात्र मुंबई ते नेवार्क अशी थेट फ्लाईट होती. जाताना नेवार्क-दिल्ली (१३ तास)-दिल्ली ला २ तास थांबून दिल्ली मुंबई प्रवास २ तास आणि नंतर मुंबई पुणे टक्सीचा ४ तासांचा प्रवास होता. शिवाय दिल्लीला आम्हाला आमच्या चेक-इन बॅगा काढून परत सेक्युरिटीतून जावे लागणार होते. दिल्लीला ५२ अंश सेल्सिअस तापमान दाखवत होते. 


बुकींग करताना माझे नाव टंकीत करताना चूक झाली. मग परत इंडियन ईगल्स वेबसाईटवर चॅटिंग केले. तिथे २-३ वेगवेगळे सा ऊथ इंडियन बोलायला आले आणि त्यांनी सांगितले की नाव चुकले असेल तर ४०० डॉलर्स जास्तीचे भरावे लागतील. परत दुसऱ्या/तिसऱ्यांदा मी बोलले. त्यातला एक चांगला निघाला. त्याचे नाव सुहास. तो म्हणाला तुमच्या पासपोर्ट मधल्या तुमचे नाव लिहिलेल्या पानाचा फोटो काढून तो मला ईमेल करा. तसे मी केले. आणि त्याचा विनायकला फोन पण आला. या माणसाने आम्हाला खरोखरची मदत केली. चुकीच्या नाव बदलून त्याने काही डॉलर्स घेतले पण ते खरेखुरे होते. तो म्हणाला आम्हाला ही सर्व माहिती एअर इंडियाला कळवावी लागते. ते होइपर्यंत जीवात जीव नव्हता. गुगल शोधात तिकिटावर नाव चुकीचे असेल तर काय होउ शक्ते तेही वाचले. पण तरीही आयत्या वेळेला गोंधळ नको म्हणून आम्ही सुहासवर विश्वास ठेवला आणि आमचे काम थोडे उशिरा का होईना झाले. त्यात अजून एक छोटा गोंधळ आहे. तो म्हणजे माझे आधीचे तिकीट रद्द करून त्याच फ्लाईटचे परत बुकींग करायचे होते. तसे केले. आमची आता ईतिकिटे २ झाली होती. एक माझे नाव आणि दुसरे विनायकचे नाव. पण हरकत नाही. गोंधळ निकालात निघाला होता. आता एअर इंडियाची फ्लाईट कशी असते ते मी काही मैत्रिणींना विचारून घेतले. त्या म्हणाल्या जी स्क्रीन चालत नाही. सीटचे पट्टेही कधी लागत नाही तर कधी सीटचे हॅंडल तुटलेले असते. जेवण चांगले असते. गरम असते. इत्यादी इत्यादी. ही माहीती मिळून सुद्धा माझे मन शांत झाले नाही. मी युट्युबवर शोधले. तर तिथेही अजिबातच चांगला नाहीये एअर इंडियाचा प्रवास असे कळाले.

 

ठरल्यादिवशी प्रवास सुरू झाला. उबरचे बुकींग आधीच करून ठेवले होते. घरातली साफसफाई, पॅकींग, असे बरेच काही करून प्रवासाच्या आधीच दमलेले असताना प्रवासाला सुरवात होते. विमानात बसल्यावर हायसे वाटते. खुर्चीवर बसून सगळ्या अंगालाच रग लागते. अर्थात आम्ही अधुन मधून विमानात उभे रहातो. काहीजण असे करताना दिसतात. मात्र काही एकदा का खुर्चीत बसले की स्क्रीन चालू करून कानात बटणे अडकवून समोर जे दिसेल त्याचा आनंद घेतात किंवा खुर्ची थोडी मागे करून निवांत पहूडतात. आमच्या दोघांची ईतिकिटे वेगवेगळी असल्याने आमच्या सीटा पण एक मागे व एक पुढे होत्या. अर्थात सीटांचे बुकींग केले असते तर असे झाले नसते. आम्ही आमच्या सीटांवर बसलो. विनायकच्या शेजारी विनायक सारखाच एक उंच माणूस बसला होता. माझ्या शेजारी एक बाई बसली होती. आमच्या पुढच्या सीटांमधे एक रिकामी होती आणि उंच माणसाला पाय मोकळे करून बसायला ती छानच होती कारण की त्याही पुढे मोकळी जागा होती. तो माणूस म्हणाला काही हरकत नाही. मी बसेन पुढे. आमच्या शेजारच्या रांगेतल्या कडेच्या सीटवर एक बाई एका मुलीला घेऊन बसली होती. तिच्याकडे मूल असल्याने भरपूर सामान होते. त्या सामानातले काही ना काही सारखे पडत होते.  त्या बाईने आम्हाला विनंती केली की मी विनायकच्या सीटवर बसू का? म्हणजे मला मुलीला सांभाळायला बरे पडेल. आम्ही हो सांगितले. माझ्या शेजारची जी बाई होती ती त्या मुलीच्या आईच्या सीटवर बसली. विनायक माझ्या शेजारी बसला. विनायकची व त्या उंच माणसाची सीट जवळ जवळ रिकामी झाल्याने त्या बाईला एका सीटवर बसता आले व तिच्या शेजारी तिची मुलगी. सगळ्यांनीच समंजसपणा दाखवल्याने सर्वांनाच त्याचा फायदा झाला. सर्वांनी एकमेकांचे आभार मानले. ती छोटी मुलगी जी मागे बसली होती ती सीटवरून मला हात लावायची व मी मागे बघायचे. तिच्याशी खेळण्यात सर्वांचाच इतका छान वेळ गेला की दिल्लीपर्यंतचा १३ तासांचा प्रवास हा हा म्हणता सरला. आमच्या सीटच्या पुढ्यात असलेला स्क्रीन चालत नव्हता. सर्व विमानातच एखाद्याच्याच पुढ्यातले स्क्रीन चालत नव्हते. विमानातले जेवण आम्हाला दोघांना अजिबातच आवडले नाही. पनीरची भाजी होती. जेवण खूपच कमी होते. मी नेहमीच छोट्या अथवा लांबच्या प्रवासाला पोळी भाजी करून घेते त्यामुळे पोळी भाजीचा एक रोल मी विमानात बसण्या आधीच खाल्ला होता. विमान दुपारच्या १२ ला सुटणार होते. असा दुपारचा अति लांब पल्याचा प्रवास आम्ही पहिल्यांदाच करत होतो.

 

दिल्लीत उतरलो तेव्हा तापमान ४५ अंश सेल्सिअस होते. आम्हाला आमच्या बॅगा काढून परत त्या दुसऱ्या बेल्ट वर ठेवायच्या होत्या. तसे आम्हाला माहीती होतेच. मधला वेळ साधारण ३ तासांचा होता. या तीन तासात आमच्या बॅगा काढून सेक्युरिटी चेकींग मधल्या रांगेत उभे राहून परत बॅगा दुसरीकडे टाकायच्या होत्या. एकूणच सर्व प्रवासांचे सामान अति म्हणजे अतीच होते ! बेल्टच्या बाजूला विमानतळावरची माणसे मदतीकरता असतात. ते विचारत होते काही मदत पाहिजे का म्हणून. आम्ही नाही सांगितले. पूर्ण  बेल्टच्या सभोवताली आमची बॅग शोधण्यासाठी फिरत होतो. एकीकडे घड्याळाचा काटा पुढे पुढे सरकत होता. तिथल्या एका माणसाला सांगितले की आमच्या २ बॅगा आहेत. एक बॅग आम्हाला मिळाली आहे. बॅगेवरच्या स्टीकर मधला नंबर त्याने बघितला आणि सांगितले की मॅडम तुम्ही इथेच उभे रहा. मी तुम्हाला बॅग शोधून देतो.

आमच्या दोन्ही बॅगा आम्हाला मिळाल्या आणि आम्ही त्या दिल्ली मुंब ई प्रवासासाठीच्या बेल्टवर ढकलल्या. तिथली बाई निवांत गप्पा मारत होती. रांग खूपच मोठी होती. तिथले मदतनीस छान काम करत होते. कुणाची फ़्लाईट आधी आहे का ? विचारत होते. आम्ही सेक्युरिटीतून बाहेर पडलो आणि गेटवर येऊन थांबलो. नंतरच्या विमानात जेवण चांगले होते. २ तासांच्या प्रवासानंतर आम्ही मुंब ई विमानतळावर पोहोचलो. दुपारचे ४ वाजले होते. काहीतरी चुकल्यासारखे वाटले. कारण की आम्ही नेहमी रात्री उशिरा किंवा पहाटेच्या अंधारात पोहोचतो. विमानतळावर टळटळीत उन होते. केके ट्रॅव्हलची कार आली आहे का नाही ते बघण्यासाठी विनायक इकडे तिकडे पहात होता. त्याला केकेचा ड्राईव्हर दिसला आणि परत मी जिथे उभी होते तिथे आला. मी सामानापाशी उभी होते. डॉलर्सचे रूपये रूपांतरीत करून घेतले. प्रचंड गरम होत होते. अमेरिकेतली थंडी संपत आली होती. मला वाटले की गरम हवेत जरा बरे वाटेल. मला इथली प्रचंड थंडी अजिबात आवडत नाही. कडेकोट बंदोबस्तात घरीच रहावे लागते. डिप्रेशन येते. हवा जरा बरी वाटली तर बाहेर जाते फिरायला, पण इतके होत नाही. केके टॅक्सीत बसलो. टॅक्सी आमच्यापुरतीच बुक केली होती यावेळी. कारण शेअरिंग मध्ये दुसऱ्यांचे विमान वेळेत आले नाही तर वाट पहावी लागते. मुं ब ई पुणे मधल्या फूड मॉलवर थांबलो. विनायक म्हणाला तुला वडा पाव खायचा आहे का? हो चालेल. मग त्याने त्याच्याकरता इडली सांबार व माझ्याकरता वडा पाव ची ऑर्डर दिली. वडा पाव खाताना आत्मा तृप्त होत होता. त्यावर मसाला चहा प्यायलो. हा मसाला चहा जेमतेम ४ घोट असतो इतका तो कप छोटा असतो. चहा प्यायल्याने चांगलीच तरतरी आली. वडा पावची चव जिभेवर चांगलीच रेंगाळली.


 

आईकडे गेल्यावर रंजनाने आम्हा दोघांना चहा करून दिला व जेवणही तिने करून आणले होते ते जेवलो. मी आईला म्हणाले आता खरीखुरी आज्जी दिसायला लागली तर विनायक म्हणाला आज्जी काय ! पणजी. ते खरेच होते. आमची वये आज्जीची झाली आहेत ते मी पार विसरून गेले होते. आई खूपच थकलेली वाटत होती. रंजना ३ आठवड्यांच्या सहलीला जाणार होती. त्या आधी बारश्यालाही जाणार होती. कामवाल्या मावशींचे मोतिबिंदुचे ऑपरेशन होते त्यामुळे त्याही येणार नव्हत्या. हे सर्व मला आधीच माहीती असल्याने पूर्ण कल्पना होती.  जरूरीचे फोन नंबर्स रंजनाकडून घेऊन ठेवले होते. आम्ही आल्यानंतर मावशी २ दिवसांनी रजेवर गेल्या. बदली बाई का नाही आली ते समजले नाही. अर्थात मनाची पूर्णपणे तयारी करून ठेवली होती. मी, विनु व आई, आमच्या तिघांचे रहाटगाडगे सुरू झाले. आईने मला कणेरी कशी करायची ते सांगून ठेवले होते. मी आईला म्हणाले की कणेरी रोजच घेते. सकाळी मी पोहे उपमे असे करीन. आईला बरेच वाटले. मला सकाळी खायची सवय नाहीये. मी व विनु दुधातून प्रोटीन पावडर मिक्स करून घेतो. प्रोटीन पावडचा डबा आम्ही सोबत आणला होता. मला तिकडचे दूध चालत नाही. विनायक अल्मोंड दूध पितो. त्यामुळे विनायक गरम पाण्यातून प्रोटीन पावडर घेत होता. मी व आई पोहे उपमे सकाळच्या नाश्त्याला खात होतो. विनायक सकाळचा केर काढत होता. मी दोन्ही वेळचा स्वयंपाक करून रात्री एकदाच सर्व भांडी घासत होते.

 

दर २ दिवसांनी मी फरशी पुसून घेत होते. आईच्या कडचे वॉशिंग मशीन आहे त्याची नळी नळाला कशी लावायची ते मावशींकडून समजून घेतले होते. रंजनाने सर्वच्या सर्व सामान भरून ठेवले होते. कोणत्या डब्यात काय आहे ते आधी बघितले. थोड्याफार भाज्याही होत्या. दोन चार दिवसांनी भाज्या, फळे, लाल तिखट, गोडा मसाला, हळद, मोहरी, हिंग आणले.विनायकचे जेवण म्हणजे फक्त आमटी भात, भाजी, कोशिंबीर व सोबत दही ताक इतकेच आहे. नंतर एखादे फळ असते. आमच्या दोघींच्या पोळ्या करत होते. आईच्या इथली दुकाने माहीत झाल्याने संध्याकाळी मी काही ना काही तोंडात टाकायला आणायचे. आईला एक दोन वेळाच खालच्या बाकावर बसायला नेले होते. तिला आता खाली उतरून बाकावर बसण्याइतका उत्साह आणि उमेद राहिली नाहीये. एकटीने कुठेच जाता येत नाही.


No comments: