Sunday, March 29, 2020

बैठे खेळ

लहानपणी बरेच बैठे खेळ आपण सर्वजण खेळायचो. जसे की पत्ते, कॅरम, बुद्धीबळ, सापशिडी, सागरगोटे, भातुकली. खास करून दिवाळीच्या आणि मे महिन्याच्या सुट्टीत असे बैठे खेळ हमखास रंगायचे. त्यातला एक खेळ आम्ही आत्येमामे बहिणी मिळून खेळायचो. खूपच मजा यायची या खेळात.

आम्ही लहानपणी आत्यमामेबहिणी मिळून एक खेळ खेळायचो. नावगावफळफूल. यामध्ये सर्वांनि एक कागद घ्यायचा तो आडवा धरायचा. एकाने एक शब्द द्यायचा आणि त्या शब्दापासून सुरू होणारे सर्व काही लिहायचे. भराभर आठवून लिहायचे. आणि ज्याचे आधी लिहून होईल त्याने स्टॉप असे म्हणायचे. नंतर प्रयेकाने वाचून दाखवायचे जसे की नाव काय? तर प्रत्येकाने जे नाव लिहिले असेल ते वाचायचे, नंतर गाव काय तर प्रत्येकाने गावाचे नाव लिहिलेले वाचून दाखवायचे. ज्यांचे नाव किंवा गाव कॉमन येईल त्यांनी ५ मार्क घ्यायचे, ज्यांचे गाव किंवा दुसरे काही सर्वांच्या पेक्षा निराळे येईल त्या त्या सर्वांनी १० मार्क घ्यायचे. ज्यांना नाव गाव यापैकी काहीही आलेले नसेल, फक्त एकालाच आलेले असेल त्यांनी १५ मार्क घ्यायचे. कॉमन येऊ शकते, सर्वांपेक्षा वेगळे येऊ शकते. कोणाला येत नाही आणि फक्त एकालाच येते असे क्वचितच होते. त्यामुळे १५ मार्क क्वचितच मिळतात. अशी एकेक अक्षरे घ्यायची आणि हा खेळ खेळायचा. प्रत्येक अक्षराच्या वेळी मिळालेले मार्क एका पानावर एकाने लिहायचे. मेंबर लोकांची लिस्ट करायची आणि त्यावर प्रत्येकाचे मार्क लिहायचे. नंतर सर्व मेंबर्सच्या मार्कांची प्रत्येकाची वेगळी बेरीज करायची. ज्याची जास्त बेरीज येईल त्याचा पहिला नंबर. सर्व मेंमर्सच्या मार्कांची बेरीज करून त्याप्रमाणे कमी जास्त मार्कांना पहिला, दुसरा, तिसरा असे नंबर द्यायचे. 

आता हा खेळ कसा खेळायचा? पहिले अक्षर क
नाव - कालिंदी
गाव - कोरेगाव
फळ - केळे
फूल - केवडा
आडनाव - काळे
रंग - काळा
वस्तू - कपाट
रास - कर्क
पदार्थ - कैरीची चटणी
सिनेमाचे नाव - काला पानी
नट-नटीचे नाव - कामिनी कौशल
दुसऱ्याने दुसरे अक्षर द्यायचे. कागद आडवा धरायचा आणि त्यावर नाव गाव फळ फूल ... ,,,, असे आडवे लिहून अक्षराप्रमाणे त्या रकान्याखाली
लिहायचे. मुख्य म्हणजे भरभर लिहायचे हे महत्त्वाचे आहे. म्हणजे काहीचे पुर्ण लिहूनही होत नाही. काहीचे अर्धे होते, अर्थात पूर्ण रकाने भरभर
लिहूनच स्टॉप म्हणायचे आहे. नो चिटींग. खूपच मजा येते या खेळात. खेळून बघा. वर जे रकाने दिले आहेत जसे की नाव गाव, ... इ. इ.त्यातही अजून भर घालता येईल.Rohini Gore


दुसरा खेळ म्हणजे स्मरणशक्ति. यामध्येही खूप मजा यायची. भातुकली मध्ये आम्ही पोहे, दाणे, गुळ, साखर, कोको, बोर्नव्हिटा घायचो.
खेळायचा कंटाळा आला की चट्टामट्टा. आणि एक दुसरा खेळ खेळायचो ते म्हणजे जगप्रवास. घराच्या पायरींवर बसायचे. एकाने ड्राइवर व्हायचे. मागच्या पायरीवर दुसऱ्यांनी बसायचे. आणि ड्रायव्हिंगची ऍक्शन करायची. अधुनमधून ड्रायव्हर बदलायचा. या मध्ये पण आम्ही खाण्याचे सर्व घ्यायचो. रस्त्याचे वळण आले की सर्वांनी एका बाजूला कलायचे. लहानपणीचा काळ सुखाचा म्हणतात ते काही उगाच नाही !

No comments: