Wednesday, September 19, 2018

दीड दिवसाचा गणपती

मी सासरमाहेरची कोब्रा असल्याने सासूआईकडे दीड दिवसाचा गणपती ! सगळे सणवार कसे अगदी सुटसुटीत. घोळ घालणे घाटे आणि गोरे यांना अजिबात सहन होत नाही.  तर आम्ही दोघे लग्नानंतर पवईला राहत होतो आणि गणपतीला घरी पुण्याला जायला आम्ही दोघेही उत्सुक असायचो.





गणपतीच्या आदल्या दिवशी डेक्कनएक्सप्रेसने रिझर्वेशन न करताच जायचो. एक छोटी सुटकेस असायची.  गाडीला खूप गर्दी असायची.उभ्यानेच प्रवास करायचो. घरी आलो की गरमागरम चहा सासूबाई करायच्या. मग कामाला सुरवात. आमच्या घरी आम्ही दोघे, सासुसासरे, दोन दीर एक जाऊ आणि चुलत सासुसासरे , चुलत दीर आणि नणंद असायची. गणपतीच्या दिवशी विनुचा मित्र हरिश हा ब्राह्मण म्हणून जेवायला असायचा. सासूबाई त्यांच्या दीरांना विचारायच्या, " काय हो भाऊजी किती नारळ लागतील आपल्याला" ते म्हणायचे कमीत कमी
१० ते १२ लागतील. मग घेऊन याल का मंडईतून. लगेच भाऊजींची स्वारी मंडईत जायला निघायची. नारळ घरी आले की सर्व जण नारळ खवायला बसायचे. शेजारणींकडून २ विळ्या आणि घरातली एक असायची. नारळ खवून झाले की सासूबाई मोदकांचे नारळ तयार करून ठेवायच्या. मंडई जवळच असल्याने बाकीचे  सर्व आणायला विनू आणि काका जायचे सकाळी उठून. चुलत सासूबाई आणि चुलत नणंद आवरून यायच्या. आधी सगळा स्वयंपाक करून नंतर सासूबाई मोदकांसाठी उकड करायला घ्यायच्या. मोदक वळण्यामध्ये गोऱ्यांच्या घरात माझी कॉलर एकदम ताठ असायची कारण आईकडे गणपतीत आम्ही दोघी बहिणी आईला मोदक वळायला मदत करायचो. तसे मला बऱ्यापैकी वळायला जमायचे. माझ्या सख्या सासूबाई, जाऊ,  चुलत सासूबाई आणि नणंद अगदी मैत्रिणीसारख्या. आम्ही सगळ्या जमलो की एकमेकींकडे पाहून हासायला सुरवात.  मोदकांवरून तर हासणे खूपच व्हायचे. चुलत सासूबाई म्हणायच्या "ए रोहिणी कडे बघून सगळ्यांनी मोदक वळा हं" आमचे नाही बुवा चांगले होत. लगेच फिदीफिदी हासणे सुरू व्हायचे.

सासूबाईंनी उकड काढून दिली की मी ती मळून घ्यायचे आणि सर्व मोदक वळायला सुरवात करायचे. एकेकाने मोदक करून ठेवले की हासायला सुरवात. मोदकांची नाके बघण्यासारखी. एका मोदकाचे नाक जाडजूड तर एकाचे फेंदारलेले तर एकाचे बसके. एकाचे खूपच सरळ तर एकाचे खूप उंच ! काही मोदक खाली बसलेले तर काही मोदकांना कळ्यांचा पत्ताच नाही. ए, चला हं पटपट आवरा बरं !  सासूबाई ओरडायच्या. मग चांगले चांगले मोदक बघून त्या आधी त्या उकडायच्या नैवेद्यासाठी. सगळे मोदक उकडून झाले की सर्व जेवायला बसत. मग सासरे , चुलत सासरे, विनू, दोघे दीर यांच्या मोदकांवर कॉमेंटी सुरू व्हायच्या. हा मोदक कुणी केला गं ? अशी विचारणा व्हायची. मग " मी नाही बाई " अशी सारवासारवी. काही मोदक हसरे तर काही मोदकांची पारी इतकी  पारदर्शक की पारीतून सारण दिसायचे. काही मोदक फूटून सारण बाहेर यायचे. मग विचारणा व्हायची असे कसे झाले मोदक? सासूबाई म्हणायच्या काही नाही हो. खा. चांगले आहेत ते. काही मोदक हासलेत. असे म्हणले की आम्ही पण " हासरे मोदक ??" म्हणून हासायचो.  काही वेळेला आमची नजरानजर झाली तरी हासायचो. हासायला काही कारणच नसायचे. चुलत सासूबाई म्हणायच्या. ए बास हं आता.



ए हा कोणी केला गं मोदक? किती पॅचेस लावलेत? मोदक करताना तुटला की आम्ही उकडीचे पारीला पॅच करून लावायचो. हा मोदक आहे की लाडु? काही मोदकांच्या कळ्या खूप बाहेर आलेल्या. गणपतीच्या दिवशी हासतखेळत मोदक करायचो आम्ही सर्व जण. मोदक करता करता तयार झालेला  मोदक हातावर ठेऊन विचारायचो. हा बघं गं कसा झालाय? छान आहे की !
नको जाऊ देत. आपण लाटूनच करू ना. ते चांगले होतात बघ. चुलत सासूबाई पोलपाटावर उकडीचा गोळा थोडा लाटायच्या आणि मग त्याला कळ्यांचा आकार द्यायचा. मग थोडे फार लाटून थोडेफार हाताने वळून वेगवेगळ्या आकाराचे मोदक तयार व्हायचे. आणि आम्ही सर्वजणी पोट धरधरून हासायचो. जेवताना बाकीचे पण सर्व मुद्दामूनच हा कोणी केला मोदक? की परत हशा पिकायचा.  असा हा  सासरच्या गणपतीचा दिवस हासण्यामुळे खूपच लक्षात राहिला आहे.



3 comments:

मिलिंद कोलटकर said...

व्वा! मजा आली नेहेमीप्रमाणेच!! हसत-खेळत मोदक. अरे, पण खरे गणपती दीड दिवसाचेच तर असतात... https://www.facebook.com/groups/122520035011725/permalink/299226130674447/ विनोद गवंडी म्हणतात: ...व्यासांनी महाभारत लिहायला सुरुवात केली आणि त्यासाठी श्रीगणेश त्यांचा लेखनिक होता. हे महाभारत लिहिताना लिहिण्याच्या श्रमाने गणेशाच्या अंगातले पाणी कमी झाले, त्वचा कोरडी पडली आणि गणरायाच्या अंगाचा असह्य दाह व्हायला लागला. महर्षी व्यासांनी यावर उपाय म्हणून ताबडतोब गणेशाच्या शरीरावर मातीच्या चिखलाचा लेप लावला आणि त्यावर थंड पाण्याचा शिडकावा केला. गणेशाचा ज्वर कमी झाला आणि शरीरातील पाण्याचा अभाव कमी झाला. हे सर्व घडलं ते भाद्रपदातल्या चतुर्थीला. चतुर्थीच्या दिवशी दिवसभर असा लेप लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी पंचमीला गणपतीचा ताप व्यवस्थित उतरला. तेव्हा व्यासांनी तो चिखलाचा लेप काढून विसर्जित केला. यामुळेच चतुर्थीला पार्थिव गणपतीचं पूजन आणि पंचमीला विसर्जन अशी प्रथा रुढ झाली. अशी जन्मकथा आहे या उत्सवाची आणि पार्थिव गणेश पूजनाची !!

rohinivinayak said...

oh barr,, mhanje khara deed divsachach asto ka? hausekhatar 7 divas kinva 10 divasacha basvayla lagle ka? pratisadabaddal anek dhanyawaad ! karan koknastha madhe deed divas aani deshasthan madhe gauri ganpati visarjan aani kahi jananakade 10 divas asto, anant chaturdashi paryant, mag anant chaturdashi aste ti mag kaay asete?

मिलिंद कोलटकर said...

धन्यवाद! आम्ही को ल टकर पडलो मधले... दोन्ही कडचे मोदक खाणारे! :-)गवंडी (बाकी) म्हणतात त्याप्रमाणे -- गणपती दीड दिवसांचा का असतो ? उत्तर दडलंय या पुराणकथेत...तुम्हांला माहित आहे का ही कथा?

बऱ्याच घरी दीड दिवसांचा गणपती असतो. कुणाला असंही वाटतं की लोकांकडे काय देवाला द्यायला पण वेळ नाही म्हणून त जमेेल तसे ५,७,८,९,१० आणि ११ दिवस गणपती न बसवता लगेच दुसऱ्या दिवशी त्याचं विसर्जन करतात....

भाद्रपदातल्या गणेश चतुर्थीच्या गणपती पूजेला पार्थिव गणेश पूजन असं नाव आहे. चतुर्थीला गणपतीचं आवाहन आणि पंचमीला विसर्जन अशी मूळ संकल्पना आहे. कालांतराने मात्र आपल्या आवडत्या गणरायाला चार दिवस आग्रहाने घरी ठेवून घ्यायचं म्हणून अनंतचतुर्दशीपर्यंतच्या उत्सवाला सुरवात झाली असावी.

मूळ संकल्पनेप्रमाणे खरंतर आपण आपल्या हाताने मातीचा चिखल करून त्यामध्ये मूर्ती बनवायला हवी, पूजा करताना त्या मूर्तीत प्राण ओतायला हवेत आणि दुसऱ्या दिवशी पुनरागमनायच म्हणून विसर्जन करायला हवे. पण असं का करायचं? हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही बोभाटाकरांसाठी सांगणार आहोत मातीच्या मूर्तीमागे लपलेली एक कथा आणि त्यात दडलेलं एक अदृश्य शास्त्र ! -- बाकी ते सारे को०क०दे० गमत्तीत. :] आपला मतलब प्रसादाशी... काय मग यावेळेस केले होते की नाही मोदक? प्रतिसादाबद्दल मनोमन धन्यवाद. आपण खरंच उत्तम लिहीता. असेल लिहित्या रहा!