Saturday, July 21, 2018

आज इथं तर उद्या तिथं ... (९)

"आज इथं तर उद्या तिथं" या लेखमालेत ८ भाग लिहून झाले आहेत. स्थलांतरे अनुक्रमे माझे लग्न झाल्यावर पहिल्यांदा आयायटी पवई, नंतर त्याच आवारात तुलसी ब्लॉक्स मध्ये दुसरे आणि नंतर अनुक्रमे डोंबिवली, अंधेरी, डेंटन - टेक्साज, इथेही तीन वेळा, क्लेम्सन - साऊथ कॅरोलायना, इथेही ४ वेळा आणि नंतर नॉर्थ कॅरोलायना राज्यामधल्या विल्मिंग्टन शहरात. प्रत्येक वेळी स्थलांतराचा अनुभव वेगळा होता. आठवणीही छान होत्या. प्रत्येक स्थलांतराचा प्रकार वेगळा होता. यात ट्रक, विमान, कार अशी वाहने होती. सामान जास्तीचे नव्हतेच मुळी. प्रत्येक वेळी बॉक्सेस आणि बॅगांमध्ये सामान भरायचे आणि निघायचे. रिकाम्या घराकडे बघवायचे नाही. अर्थात घर एकदा का सोडले की मग तिथल्या आठवणींची पुंजी घेऊन नव्या वाटेवर जायला सज्ज असायचो. नवीन घरात परत सामानाची बोचकी उलगडून संसार मांडायला सुरवात करायचो. डोंबिवलीच्या १० वर्षाच्या कालावधी नंतर आता परत विल्मिंग्टनच्या १० वर्षाचा कालावधी संपवून आम्ही परत नव्या शहरी आणि नव्या घरात रहायला जाणार होतो.



विल्मिंग्टन मध्ये रहायला आल्यावर जरूरीपुरते सर्व फर्निचर आम्ही घेतले होते. त्या आधी आमच्याकडे आमचे असे फर्निचर नव्हते आणि त्यामुळेच स्थलांतरे थोडी सोपी होती. अर्थात फर्निचर जरी नसले तरी इतर सामान असतेच. भांडीकुंडी, कपडे, अंथरूणे - पांघरुणे पुस्तके आणि इतर सटर फटर असे कितीतरी. फर्निचर असल्याने यावेळी आम्ही मुव्हर्स आणि पॅकर्सना बोलावले होते. अर्थात बाकीचे सामान मी खोक्यात भरून ठेवलेच होते. त्यामुळे मुव्हर्सना फक्त खोकी आणि इतर फर्निचर उचलायचे होते. लाकडी जड जड फर्निचर तेच उचलू जाणोत बाबा ! काय ताकत असते या लोकांमध्ये. आणि सामान हालवताना किती घामाघूम झाले होते ते ! २ तासात फटाफट सामान खालच्या ट्रकमध्ये भरले त्यांनी ! आयताकृती कॉफी टेबल, ६ जणांचे डायनिंग टेबल आणि त्याच्या खुर्च्या, मोठा सोफा, मोठा बेड, टीव्ही, कपड्यांची २ मोठी कपाटे, आणि एक छोटे कपाट,एक खुर्ची असे सर्व जड जड सामान होते.



सकाळी ११ वाजता २ माणसे आली. आम्ही सामान बांधून तयारच होतो. आम्हाला हँडरसनविलला पोहोचायला रात्र होणार होती ते माहीत होते त्यामुळे मी याच राहत्या घरात पोळी भाजी करून घेतली होती. अंघोळी पांघोळी उरकून न्याहरी पण केली होती. आणि हो नेहमीप्रमाणेच जरूरीच्या सर्व सामानाच्या २ ते ३ बॅगा, लॅपटॉप, प्रिंटर, फोन आम्ही आमच्या कारमधून नेणार होतो. २ वाजता आमचा सामानाचा ट्रक निघाला. निघताना आमचे सामान आम्हाला तुम्ही आम्ही तिथे पोहोचल्यावर आणि अपार्टमेंटचा ताबा घेतल्यावरच आणा असे दोघांना सांगितले. ते म्हणाले तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही तुमचे सामान व्यवस्थित नेतो आणि तुम्हाला अपार्टमेंटचा ताबा मिळाला की आम्हाला फोन करा. ट्रक निघाल्यावर सर्व घरभर एकदा नजर फिरवली. काही राहिले तर नाही ना?
शांतपणे मी रिकाम्या घरात मांडी घालून बसले. विनायक व देसाई बोलत होते." फिर मिलेंगे" असे बोलून देसाई निघाला. यावेळी आम्हाला निरोप द्यायला फक्त तोच होता. बाकी कोणीही नव्हते. या शहरात प्रत्यक्षातली मित्रमंडळी अजिबात नव्हती. त्यामुळे मित्रमंडळींच्या आठवणी नाहीत. याउलट आत्तापर्यंतच्या स्थलांतरामध्ये जी काही मित्रमंडळी होती त्यांच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. माणसांच्या नाही पण निसर्गाच्या आठवणी मात्र आमच्या दोघांच्याही बरोबर होत्या. आता निघायलाच हवे म्हणून मी उठले आणि आम्ही दोघे सगळ्या तयारीनिशी कारमध्ये बसलो. कार सुरू केल्यावर आधी मेक्सिकन उपहारगृहात गेलो आणि जेवलो. नंतर महामार्ग ४० वरून आमची कार वेगाने धाऊ लागली. विल्मिंग्टन ते ब्रेव्हार्ड - हँडरसनवील आम्ही साधारण जाऊन येऊन ४ चकरा मारल्या होत्या म्हणजे जवळजवळ साधारण १६०० मैल प्रवास स्थलांतराच्या आधी झाला होता. नेहमीच स्थलांतरची चक्रे जोराने फिरतात हा आमचा अनुभव आहे. लेखाचा पुढील भाग लवकरच घेऊन येते. :) Rohini Gore
क्रमश : ....

No comments: