Tuesday, May 21, 2013

माझे बाबा




"विसर प्रीत, विसर गीत, विसर भेट आपुली, यापुढे न चांदरात यापुढे न सावली" संगीतकार व गायक सुधीर फडके यांचे हे गाणे,, बाबा आम्हाला सांगतात, "मी हे गाणे ऐकले, गायक संगीतकार कोण हे सर्व जाणून घेतले" आणि बाबांनी रेडिओ घरी आणला आमच्या लहानपणीच. बाबांचा आवाज "सेम टु सेम" सुधीर फडके यांच्यासारखा आहे. बाबा पेटी खूप छान वाजवतात. त्यावर त्यांचे ३३ राग शिकून झाले आहेत. बाबा नेहमी म्हणतात की गाणे असावे तर ते सुधीर फडक्यांसारखे, जसे काही ते गाणे हवेतून तरंगत तरंगत येऊन आपल्यापर्यंत येऊन पोहोचते. गाण्याप्रमाणेच बाबा उत्तम गोष्टी सांगतात. आम्ही दोघी बहिणी लहानपणी बाबांकडून गोष्टी ऐकायचो. रात्रीची जेवणे झाली की ते आम्हाला गोष्टी सांगायचे. बाबांना गोष्ट सांगायचा कंटाळा आला तरी सुद्धा बाबांना आम्ही म्हणायचो, बाबा एक तरी गोष्ट सांगा ना? मग आमच्या आग्रहाखातर ते एक गोष्ट सांगायचे आणि आम्ही झोपायचो. सर्व गोष्टींमध्ये आम्हा दोघी बहिणींना एक गोष्ट खूप आवडायची आणि ती म्हणजे रंजा रोह्याच्या बाहुल्या मंडईत जातात! पूर्वी सांगली मिरजेला त्यांच्या नातेवाईकांमध्ये त्यांच्या भाच्यांची लग्ने झाली त्यामध्ये त्यांच्या एका भाचीच्या लग्नात ती सासरी जाताना बाबांनी "लाडकी शकुंतला" हे गाणे गायले होते. त्या वेळेला आम्ही दोघी बहिणी शाळेत जात होतो. बाबांचे हे गाणे ऐकताना तर मला खूप रडू फुटते.  दुसरे एक गाणे म्हणजे गीतरामायणातले "बोलले इतुके मज श्रीराम" हे गाणे बाबा इतके काही छान गातात की ऐकताना अश्रुंच्या धारा वाहतात.







गाणी गाणे आणि गोष्टी सांगणे याप्रमाणेच बाबांमध्ये अजून एक छान कला आहे ती म्हणजे बाबा उत्तम रांगोळ्या काढतात. आईबाबांच्या भाचवंडांची लग्नाची केळवणे आमच्या घरी झाली होती तेव्हा बाबांनी त्यांच्या ताटापुढे खूप सुरेख रांगोळ्या काढल्या होत्या. ताटाभोवती सुंदर महिरप बाबा खूप छान काढतात. त्यांच्या एका भाच्याच्या लग्नात त्यांनी नवरा नवरीची जी खास पंगत असते त्यांच्या प्रत्येक ताटाभोवती सुरेख महिरप काढली होती. पूर्वी कार्यालयात लग्नाच्या पंगती खाली बसत असत. पाटावर बसून पंगती जेवत असत. दिवाळीत आमच्या घरी सकाळी सडा घालून बाबा व आम्ही दोघी खूप रांगोळ्या काढायचो. बाब निसर्गाची चित्रे काढायचे व आम्ही दोघी बहिणी ठिपक्यांच्या रांगोळ्या दारासमोर अंगणात काढत असू.







बाबा मला पहिलीत असताना शाळेत सायकलवरून सोडायचे. आमच्या घरी बाग असल्याने मी शाळेत जाताना माझ्या बाईंना द्यायला एक गुलाबाचे फूल घेऊन जायचे. ते मी माझ्या डाव्या हातात अलगद धरायचे. बाल शिक्षण मंदीर या शाळेमध्ये बाबा मला सायकलवरून सोडायचे. बाबांना मी सांगायचे. बाबा माझी शाळा सुटेपर्यंत नक्की शाळेमध्ये थांबाल ना? बाबा म्हणायचे "हो हो मी नक्की थांबणार. तू काळजी करू नकोस" माझी शाळा सुटेपर्यंत बाबा शाळेतच थांबले आहेत या भरवशावर मी शाळेत जायचे. एकदा काय झाले मधल्या सुट्टीत पाणी प्यायला मी खाली आले आणि बाबा आहेत का हे बघावे म्हणून शाळेच्या ऑफीसमध्ये पाहिले तर तिथे बाबा नव्हते. मी नंतर बाबांना तसे सांगितले की बाबा तुम्ही शाळेमध्ये नव्हता. तुम्ही मला खोटे सांगता तुम्ही शाळेच्या ऑफीसमध्ये बसलेले असता म्हणून. मग बाबा म्हणाले केव्हा पाहिलेस तू मला? त्यावर मी सांगितले की पाणी प्यायला आले होते तेव्हा मला तुम्ही कुठे दिसला नाहीत. तेव्हा म्हणाले हा तेव्हा होय? अग मला थोडे ऑफीसमध्ये काम होते म्हणून तेवढयापुरते मी गेलो होते. एकदा शाळेची सवय झाली तेव्हा नंतर मग मला कळाले की बाबा मला शाळेमध्ये सोडून तसेच ऑफीसमध्ये जात होते.






आमच्या घरापासून कमलानेहरू पार्क जवळ होती. आम्ही त्या बागेत खिंड ओलांडून चालत चालत चौघे जायचो. मी आईबाबा, रंजना व मी. तिथे आई बसायची हिरवळीवर व बाबा आमच्या दोघींबरोबर शिवाशिवी, लपंडाव खेळायचे. नंतर बाबांचा एक भेळवालाही ठरलेला होता. खेळून झाल्यावर मग घसरगुंडी, झोपाळा यावरही खूप खेळायचो आणि नंतर भरपूर भेळ खायचो. अजून मोठ्या झाल्यावर मग पाणीपुरी भेळ रगडा पॅटीस असे सर्व खायचो. हा कार्यक्रम आमच्या दोघींच्या लग्नानंतरही खूप चालला. मी डोंबिवलीवरून आले की मग आम्ही चौघे कमलानेहरू पार्क मध्ये जायचो, पण त्यावेळी चित्र वेगळे असायचे. आमच्या दोघींचे लग्न झाले होते. बाबा पार्कला एक मोठी चक्कर मारून यायचे. तोवर आम्ही तिघी, म्हणजे मी आई व माझी बहिण हिरवळीवर बसून खूप गप्पा मारायचो. नंतर ठरलेली खादाडी. नंतर आमच्यामध्ये एक मेंबर वाढला तो म्हणजे माझी भाची सई. चित्र परत पालटले. बाबा सईबरोबर बागेत खूप खेळायचे, आम्ही तिघी गप्पा मारायचो. नंतर खादाडी ठरलेली. जाता येताना मात्र सई आजी आजोबांबरोबर रिक्शाने जायची. आम्ही दोघी चालत जायचो. त्यावेळच्या आमच्या दोघींच्या छान गप्पा व्हायच्या. रिक्शात बसताना आई आम्हाला बजावायची. रेंगाळत बसू नका हं. लवकर या घरी. आम्ही दोघी पण हो गं आई! असे म्हणायचो. आम्ही निवांतपणे गप्पा छाटत घरी यायचो.






रेडिओप्रमाणेच आमच्या घरी टेपरेकॉरर्डर आणि टेलिव्हिजन अचानक आले. बाबा खूप हौशी आहेत. टेपरेकॉरर्डर तर आम्ही अगदी खेळण्यासारखा वापरला. त्यावर गाण्याच्या भेंड्या, जाहिराती आम्हीच म्हणलेल्या, शिवाय गोष्टी, भांडणे, सर्व टेप केली. उन्हाळ्यात आमच्याकडे आईची भाचवंडे आली की बाबा आम्हाला सर्वांना अंगणात सतरंज्या अंथरून गोष्टी सांगायचे. भूताच्या गोष्टी सांगायचे. मग आम्ही जाम टरकायचो. कोणाला तहान लागली की त्याला अंगणातून स्वयंपाकघरात जाताना जाम भीती वाटायची. आमी दोघी बहिणी जेव्हा सज्ञान झालो तेव्हा आम्हाला आमच्या नावाने बाबांनी बँकेत खाते उघडून दिले होते. बाबांना फोटोग्राफीची खूप आवड आहे. त्यांच्याकडे पूर्वी बॉक्स कॅमेरा होता. त्यांनी २/४ पेट्या भरतील इतके फोटो काढले होते. त्यातले पुरात खूप वाहून गेले. बाबांनी १९५१ ते १९६१ पर्यंत लोकांना इंग्रजी व गणित फुकट शिकवले. पूरानंतर आईबाबांनी दोघानीही शिकवण्या सुरू केल्या.







माझे बाबा स्वभावानी खूप तापट आहेत पण तितकेच ते प्रेमळही आहेत. त्यांचा वाढदिवस मे महिन्यातला. त्यामुळे आमरस पुरीचा बेत ठरलेला असतो. २६ मे रोजी त्यांचा वाढदिवस आहे. यावर्षी ते ८२ वर्षाचे पूर्ण होतील. त्यांना रोहिणीविनायक कडून वाढदिवसाच्या अनेक उत्तम हार्दिक शुभेच्छा !



16 comments:

barve said...

Happy birthday Baba

rohinivinayak said...

thanks !

Anonymous said...

kai sangtes aga, we share same bday.. many wishes to him - May mahinyatle lok khrach khup houshi :D hehe..Pallavi.

Anonymous said...

ani 18 dec la amche anniversary jo tuza bday asto na bahutek ..lakshyat thevayla sopa ahe bagh -Pallavi

श्रिया (मोनिका रेगे) said...

रोहिणी ताई,तुमचा हा लेख खूप आवडला.
तुमच्या वडिलांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
आई वडिलांच्या,भावंडांच्या स्मृती ह्या फारच मोलाच्या असतात.त्या जपून ठेवायच्या आणि शब्दात अश्या सुंदर रीतीने उतरवून ठेवायच्या हे फार थोड्यांना जमते.पण खरच सहज सोप्या भाषेत आणि मनोरंजक व्हावे असे तुमचे लेखन आहे.

rohinivinayak said...

ho pallavi,, same same,, 18 dec aani 26 May,, mastach na !

monika,, tula ha lekh aavadal he vachun khup chhan vatle ga mala !

thanks for comments pallavi monika :)

Nisha said...

khup sundar lekh !!! Tumchya babana many many happy returns of the birthday :)

rohinivinayak said...

thanks Nisha !!!

Anonymous said...

रोहिणी ताई,
रंजना ला नाही का कुणी भाचा/ भाची....?
मला कधी पासून प्रश्न पडला आहे!
सॉरी हं!


आरती

rohinivinayak said...

aarati,, tuzya prashnache uttar "nahi" ase aahe

Pravin said...

छान लेख! गतकाळातील रम्य स्मृतींचा हा भावोत्सव!

rohinivinayak said...

thank you so much !

Nisha said...

rohinitai kadachit tumchi photography chi aawad babankadunach aale aahe :)))

rohinivinayak said...

Ho Nisha :) aani aaikadun recipe :) thanks for comment, manapasun pratisad detes tu, chhan vatate nehmi mala !

विनयाताई said...

रोहिणी खूप छान आठवणी...मलाही दादरला आल्यावर ते गोष्टी सांगत त्यां मला शिकवलेले वाफेवर चालणारे इंजिन व शास्त्रातले वहन अभिसरण व उत्सर्जन असे ताजेच्या ताजे लक्षात आहे

rohinivinayak said...

विनयाताई, प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद ! तुझी कमेंट वाचून मला खूप आनंद झाला आहे ! बाबा आपल्या सगळ्यांचे लाडके होते !