Saturday, May 18, 2013

१८ मे २०१३

आजची रोजनिशी लिहायची म्हणजे मला कालच्या दिवसाची थोडी भर घालायला पाहिजे. काल प्रचंड प्रमाणात गरम होते. उन्हाचा चटका बसेल इतके ! काल ग्रंथालयात जायचे खरे तर ठरवले होते, पण तापमान पाहिले आणि जाण्याचे रहित केले. उन्हामुळे दुपारची झोप खूप लागली. कूलर लावल्याने घर खूप गार झाले आणि कधी नव्हे ती खूप झोप लागली त्यामुळे रात्रीच्या झोपेचे खोबरे झाले !






पहाटेच्या सुमारास झोप लागली. पहाटे अगदी वाटले की घराच्या जवळ (कारने १५ मिनिटे) असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर जाऊन सूर्योदय बघावा की काय! हा कार्यक्रम केव्हा होणार आहे कोण जाणे? त्याकरता भल्या पहाटे उठावे लागते ना? ते कोण उठणार? समुद्रातून उगवणाऱ्या सूर्याचे खूप फोटोज मला अजूनही घ्यायचे आहेत. तो दिवस लवकरच जमवीन असा अगदी निश्चयच केला आहे मी आज ! कालचे जागरण त्यामुळे आज खूप उशीराने उठले. खरे तर उठवतच नव्हते. चहा घेतला. न्याहरी झाली आणि कधी नव्हे ते हेअर कलरही केला. नेहमीची घराची साफसफाई करून बाहेर जायला निघालो. आज मी पूर्वीचे काही पंजाबी ड्रेसही बाहेर काढले. उन्हाळ्यात बाहेर जाताना घालणार आहे. हा पण एक निश्चयच आहे ! आज दिवस आहे निश्चयाचा ! मागचे काही वीकेंड छान मस्त हवा होती आणि माझ्या आवडत्या समुद्रकिनारावर जायचे असे ठरवूनही झाले नाही. त्यामुळे आज काहीही झाले तरी जायचेच असे ठरवले. हवा छान होती, पण खूप छान काही नव्हती. कालच्या मानाने आज गरम खूपच कमी होते आणि जेवल्यावर आमच्या दोघांची स्वारी पोहोचली माझ्या आवडत्या समुद्रकिनाऱ्यावर. साधारण एक तासाचा ड्राईव्ह आहे.





तिथे पोहोचलो आणि नेहमीप्रमाणे थोडे वाळून बसलो आणि मग तिथून रस्याने किनाऱ्याच्या दुसऱ्या बाजूला गेलो. तिथे एक शेड आहे तिथे आम्ही बसतो आणि परत घरी परतायला निघतो. आज त्या शेड मध्ये इतके काही छान गार गार वारे होते की असे वाटले इथेच पथारी पसरून झोपावे !






आज समुद्रकिनाऱ्यावर चक्क दोन लग्ने होती ! लग्नाची गर्दी छान नटून थटून आली होती. सर्वांचे फोटो काढणे सुरू होते. मला पण त्यांचे फोटो काढावेसे वाटले. वाळून बसलो होतो तेव्हा समुद्रकिनारा खूप छान दिसत होता. वर निळे आकाश, निळा समुद्र, आणि तपकिरी वाळू. मस्त रंगसंगती जुळून आली होती. तिथे मी उभे राहिले आणि विनायकला एक फोटो घे असे सांगितले. आज मी टॉप पण खूप जुना घातला होता. हा टॉप मी सहसा घालत नाही. खरे तर तो आवडला म्हणून मी केव्हाचा घेतला आहे. पण आता तो घालणार आहे. तळ्यावर फिरायला जाताना आता जुने पंजाबी सूट घालायचे ठरवले आहे.






घरी आलो आणि गरमागरम चहा घेतला तरीही आज डोके अजूनही तसे दुखतच आहे. भाजी, धिरडे आणि भात केले. आज आता लवकर झोप लागणार असे वाटते. रोजनिशी लिहायचा कंटाळा आला होता पण आज लिहूच असे ठरवून लिहायला बसले. आज दिवस तसा म्हणायला गेला तर खूप छान असा गेला नाही. बरा गेला असे म्हणायला हरकत नाही.

No comments: