Sunday, April 12, 2026

१२ एप्रिल २०२६ भावपूर्ण श्रद्धांजली आशाताई


१२ एप्रिल २०२६ भावपूर्ण श्रद्धांजली आशाताई 

आज सकाळी उठले आणि बातमी वाचली ती आशा ताईंच्या निधनाची. खूप गदगदून आलं आणि मी ओक्साबोक्शी रडायला लागले. आपल्या घरातलेच कुणीतरी गेलयं असे वाटले. सुरांची एक खूप मोठी पोकळी निर्माण झाल्यासारखी वाटली. जेव्हा लताताई हे जग सोडून गेल्या तेव्हा मला रडू नाही फुटले, का ते माहीत नाही. आशा-लता दोघींचे सूर प्रचंड ताकदीचे बनले आहेत. मूळातच आवाजात गोडवा. हा गोडवा दोघींचाही निराळा ! कुणीतरी आपल्यावर जादू करतयं असच वाटतं त्यांची गाणी ऐकताना. दोघींचेही स्वर आसमंतात निनादत राहतीलच आणि आपल्या मनातही ! लता - आशा म्हणजे एक सूर्य तर एक चंद्र. एक राम एक कृष्ण. आशाच्या आवाजाला एक प्रकारची धार आहे, फिरत आहे. गाण्यांमधले शब्द ती अश्याप्रकारे गाते की त्या शब्दांनी आपण आकर्षित होतो. लताचा आवाज ऐकताना डोळे मिटावे, मंत्रमुग्ध व्हावे. एक प्रकारची समाधीच लागते. या दोघींची काही गाणी परत परत ऐकाविशी वाटतात. मन भरतच नाही !



मला लताची हिंदी गाणी जास्त आवडतात तर आशाची मराठी गाणी. उदाहणार्थ लताचे धानी चुनर मोरी हाय रे जाने कहा उडी जाए रे तर आशाचे पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नकीळ फाकती प्रभा ! कितीही लिहिले तरी थोडेच आहे. दोघींची तुलना होउच शकत नाही. दोघींच्या नावाचा एकेरी उल्लेख आदरार्थी आहे. त्यांच्या गायनाने सर्वांनाच खूप जवळ केलयं अगदी आईसारखं ! गाण्यांचा राग, प्रकार कुठलाही असो, जन्मापासून मरेपर्यंतच्या प्रत्येक वळणावर घेऊन जातो. गाणं कळायला लागल्यापासून ते आजतागायत आपण सर्वच त्यांची गाणी ऐकत आहोत. आशा-लताचा आवाज आपल्या सर्वांच्या जीवनात चैतन्य निर्माण करतात हे आपले खूप मोठे भाग्य आहे ! copyright rohinigore

No comments: