१२ एप्रिल २०२६ भावपूर्ण श्रद्धांजली आशाताई
आज सकाळी उठले आणि बातमी वाचली ती आशा ताईंच्या निधनाची. खूप गदगदून आलं आणि मी ओक्साबोक्शी रडायला लागले. आपल्या घरातलेच कुणीतरी गेलयं असे वाटले. सुरांची एक खूप मोठी पोकळी निर्माण झाल्यासारखी वाटली. जेव्हा लताताई हे जग सोडून गेल्या तेव्हा मला रडू नाही फुटले, का ते माहीत नाही. आशा-लता दोघींचे सूर प्रचंड ताकदीचे बनले आहेत. मूळातच आवाजात गोडवा. हा गोडवा दोघींचाही निराळा ! कुणीतरी आपल्यावर जादू करतयं असच वाटतं त्यांची गाणी ऐकताना. दोघींचेही स्वर आसमंतात निनादत राहतीलच आणि आपल्या मनातही ! लता - आशा म्हणजे एक सूर्य तर एक चंद्र. एक राम एक कृष्ण. आशाच्या आवाजाला एक प्रकारची धार आहे, फिरत आहे. गाण्यांमधले शब्द ती अश्याप्रकारे गाते की त्या शब्दांनी आपण आकर्षित होतो. लताचा आवाज ऐकताना डोळे मिटावे, मंत्रमुग्ध व्हावे. एक प्रकारची समाधीच लागते. या दोघींची काही गाणी परत परत ऐकाविशी वाटतात. मन भरतच नाही !