Thursday, July 28, 2011

माझे आजोबा





माझ्या आजोबांचे नाव "बाळकृष्ण" त्यांच्या वडिलांचे नाव दत्तात्रय, बाळकृष्ण दत्तात्रय घाटे. घाटे नावालाच, मूळ आडनाव काळे. माझ्या खापर पणजोबांनि एका घाटाचा जीर्णोद्धार केला त्यावरून आमचे आडनाव घाटे पडले.







माझे आजोबा उंच, धिप्पाड, घारेगोरे होते. माझ्या आजोबांना भरपूर भाचवंडे त्यामुळे ते सर्वांचे लाडके "मामा" होते. सर्वजण मामा म्हणत त्यामुळे माझे बाबा, काका, आई व आम्ही दोघी बहिणी त्यांना "मामा" म्हणत. माझी आई त्यांची थोरली सून. सून नावालाच मुलगी जास्त. सासऱ्यांनी सुनेवर मुलीप्रमाणे प्रेम केले. जेव्हा माझ्या बाबांसाठी आईचा मुलगी म्हणून दाखवण्याचा कार्यक्रम झाला तेव्हा मामा म्हणाले "निळू हीच तुझी बायको. मला हिच्यात आपली बेबी दिसली. बेबी मामांची मुलगी. अल्पायुषी ठरली. मामांनीच सुनेचे नामकरण केले. "निर्मला" घाट्यांच्या घरात आली. रेवतीची निर्मला झाली. आईला जेव्हा माझ्या वेळेस दिवस गेले तेव्हा मामांना खूप आनंद झाला होता. दवाखान्यात मला ते रोज बघायला येत. मला दुपट्यात गुंडाळलेली बघून त्यांना खूप आनंद झाला होता. मामा माझ्या आईला म्हणाले "निर्मला हिचे नाव "रोहिणी" ठेवायचे. दवाखान्यात मला बघायला येत असत तेव्हा बाहेरून ते कॉफी मागवत त्यांना पिण्यासाठी, तेव्हा ते खूप छोट्या चमच्याने मला कॉफी पाजायचे. मला दुपट्यात असतानाच कॉफीची चव कळाली होती. जशी मी रांगायला लागले, चालायला लागले तेव्हा तर मी एक कपभर कॉफी पिऊ लागले. तेव्हापासून आईने मामांसाठी दोन कप कॉफी करायला सुरवात केली. मी पहिली मुलगी म्हणून माझे मामांनी खूप लाड केले. मामा मला गोष्टी सांगत. त्यांच्या पोटावर बसून मी गोष्टी ऐकत असे. त्यांच्या पोटावर एक उशी व त्यावर मी बसून गोष्टी ऐकत असे. काही दिवसांनी माझी बहिण आली. तिचे नाव आईने रंजना ठेवले. तिचेही मामांनी भरपूर लाड केले. आम्हाला दोघींनाही ते गोष्टी सांगू लागले.




काही काही गोष्टी अशा असत की आम्ही दोघीही म्हणायचो थांबा मामा "लगेच त्या गोष्टीमधल्या हत्तीची नक्कल करायचो. जसे हत्ती चिखलात पडतो मग त्याला वर कसे काढायचे? थांबा मामा " आमच्या दोघीॅन्ही ऍक्शन सुरू व्हायची. हत्तीला दोऱ्या बांधलेल्या आहेत आणि त्या दोऱ्या आम्ही ओढतोय अशी ऍक्शन" मग हत्ती डुलत डुलत त्याच्या घरी जातो. लगचे आमची ऍक्शन सुरू. आमचे उजवे हात म्हणजे हत्तीची सोंड! उजवा हात हलवून हत्ती डुलण्याची ऍक्शन! माझी आई जेव्हा मंडईत भाजी आणायला जायची तेव्हा मामा आम्हाला दोघींना दाण्याचे कूट व त्यात साखर घालून खायला द्यायचे. शाळेत जायला लागलो तेव्हा आम्ही दोघी व मामा पत्ते खेळायचो. पत्यांमध्ये हात कमी झाले की त्यांना खूप राग यायचा. सगळी चांगली पाने तुमच्याकडे कशी जातात असे म्हणून ते आमच्यावर रागवायचे. मामा आमच्याशी कॅरमही खेळायचे. आम्ही शाळेमध्ये असतानाच मामा खूप थकले होते. त्यांना जेवणासाठी स्वयंपाकघरात हात धरून न्यावे लागायचे. पाटावर बसल्यावर ताटात कुठे काय वाढले आहे हेही दाखवायला लागायचे. आम्ही तिघे सकाळी १० वाजता जेवायला बसायचो. आई आम्हाला तिघांना गरम पोळ्या वाढायची. शाळेत निघाल्यावर आम्हाला बजावून सांगायचे. सावकाश जा. वेळेवर बस पकडा. रस्ता क्रॉस नीट करा. संध्याकाळी शाळा सुटल्यावर आम्ही बसने घरी यायचो. बसला खूप गर्दी असायची त्यामुळे शाळेतून घरी यायला आम्हाला उशीर होत असे. संध्याकाळ झाली की त्यांचे घड्याळ बघ्णे चालू व्हायचे. आईला विचारायचे का गं अजून आल्या नाहीत मुली घरी? दारात जाऊन वाट बघायचे. आई म्हणायची अहो मामा येतील इतक्यात. काळजी करू नका. बसला गर्दी असते खूप म्हणून उशीर होतो त्यांना. आम्ही जेव्हा घरी येत तेव्हा मामांच्या चेहऱ्यावर आनंद पसरायचा. बाबाही ऑफीसमधून घरी यायचे. मग आम्ही सर्व खायला बसायचो. सर्वांनाच खूप भूक लागलेली असायची. मग कधी पोहे, कधी तिखटामिठाचा शिरा तर कधी भाजणीचे थालिपीठे असे आई करायची. नंतर गरम गरम चहा प्यायचो. रात्री जेवायला गरम आमटी भात असायचा.







आई जेव्हा मंडईत जायची तेव्हा आधी आम्हाला मामा दाण्याचे कूट व त्यात साखर घालून द्यायचे. नंतर नंतर आम्ही आधी कुट खायचो व नंतर तेल तिखट मीठ पोहे खायला लागलो. एकदा मामांनी आम्हाला विचारले काय गं खाता दोघीजणी. आम्ही म्हणायचो की आम्ही तेल तिखट मीठ पोहे खात आहोत तुम्हाला पाहिजे आहेत का? त्यांना थोडे पोहे खायला दिले तर त्यांना ते खूपच आवडले! तिखट पदार्थ त्यांना खूप आवडत असत. नंतर मग जेव्हा आई बाहेर जात असे तेव्हा तेच आम्हाला तेल तिखट मीठ पोह्यांची आठवण करून द्यायला लागले. आई बाहेर गेली आणि थोडा वेळ गेला की लगेच म्हणायचे ते ते काय.. तुम्ही करता ते केले का? आम्हाला माहीत असायचे त्यांना काय हवे आहे ते. मग आम्ही उगीचच म्हणायचो, कि उप्पीठ का? भजी का? मग म्हणायचे नाही गं ते तुम्ही काय करता ते कांदा घालून. त्यांना पटकन आठवायचे नाही. मग आम्ही म्हणायचो पोहे का? हां हां तेच तेच. करा लवकर खायला. जरा जास्त तिखट घाला. एकदम त्यांच्या चेहऱ्यावर आनंद. आम्ही तिघेही मोट्या वाडग्यातून पोहे खायचो. कच्चे पोहे, तिखटमीठ, कच्चा कांदा व कच्चे दाणे असे एकत्र करून पोहे करायचो.





एकदा आमच्या दोघींची खूप भांडणे झाली कामावरून. जेवण झाल्यावर उष्टी खरकटी भांडी कोणी गोळा करायची त्यावरून. आईबाबा दोघेही चिडले. कामांच्या वाटण्या कशाला करता तुम्ही? आणि त्यावरून भांडता कसल्या? बाबा तर खूप चिडले आणि म्हणाले की कामाच्या वाटण्या आणि त्यावरून जर भांडणे करणार असाल तर या घरात राहायचे नाही. बाहेर निघून जा, म्हणून आम्हाला घराबाहेरील अंगणात उन्हात उभे केले. आम्ही दोघी खूप रडत होतो, तेव्हा मामा सारखे पायरीवर उभे राहायच, परत आत जायचे. असे सारखे त्यांचे चालू होते. शेवटी ते म्हणाले "निळू घरी घे आता त्यांना. बाहेर खूप उन आहे" तेव्हा बाबा म्हणाले की तुम्ही म्हणता म्हणून नाही तर दोघींनीही कबूल केले पाहिजे आम्ही यापुढे कधीही भांडणार नाही. तेव्हा मग आम्ही दोघीनी. बाबांची माफी मागितली आणि सांगितले की आम्ही कधीही कामाच्या वाटण्या करणार नाही व भांडणार नाही. तेव्हा मग बाबांनी आम्हाला घरात घेतले. माझ्या बाबांना ते निळू म्हणून हाक मारत. निळकंठ नाव म्हणून निळू.





हळूहळू मामा बरेच थकत चालले होते. जेवण कमी झाले होते. दृष्टी कमी झाली होती. एकदा असेच झाले आई जेव्हा मला ओरडली तेव्हा माझी बाजू घेऊन मामा तिला म्हणाले अगं ओरडू नको तिला. नाही असे करणार ती पुन्हा. रंजनाची म्हणजे माझ्या बहिणीची बाजू त्यांनी कधी घेतली नाही जेव्हा आई रंजनाला ओरडायची तेव्हा. एकदा रंजना जाम चिडली. मामांना म्हणाली की तुमचे ताईवरच जास्त प्रेम आहे, माझ्यावर नाही. आई माझ्यावर ओरडली की तुम्ही कधीही माझी बाजू घेत नाही. तेव्हा तिला म्हणाले अंग असे नाही रंजे, तुम्ही दोघीही मला सारख्याच आहात. तेव्हापासून त्यांना काहीही लागले तरी रंजे म्हणून हाक मारत असत ते अगदी शेवटपर्यंत! रंजनाचे म्हणणे त्यांना अगदी मनोमन पटले होते.







एकदा आईला म्हणाले की मला तुझ्याशी बोलायचे आहे, तर आई म्हणाली बोला ना मामा. काय पाहिजे तुम्हाला. तर म्हणाले "अगं निर्मला मला असे वाटते आहे की मी लवकर मरेन, जास्त दिवस नाही जगणार मी आता. त्यांचा हातातली अंगठी आईला दिली आणि आईला म्हणाले की ही अंगठी दोघींना अर्धी अर्धी करून दे" तशी आई म्हणाली की मामा, असे काय म्हणता तुम्ही. तुम्हाला काहीही झाले नाहीये. तुम्ही अजून बरेच दिवस जगणार आहात. इतक्यात मरून कसे चालेल? नात जावई बघायचा आहे ना तुम्हाला अजून! मग! मामा हसले आणि म्हणाले हो हो. तर! अगं मी काही इतक्यात मरत नाही. आपल्याला अजून नातजावई बघायचा आहे या जाणिवेने त्यांना एकदम आनंद झाला आणि हुरूपही आला.






त्यांना तिखट पदार्थ खूप आवडायचे. भजी व चिवडा हे अत्यंत आवडीचे पदार्थ होते. पाऊस पडायला लागला की आईला भजी तळायला सांगायचे. मामांना भरपूर भाचवंडे होती. भाचवंडांवर त्यांनी मनापासून प्रेम केले. आजी लवकर गेली. त्यामुळे ते भाचवंडांमध्ये खूप रमायचे. सर्वांना ते डोंगरावर फिरायला नेत असत. डोंगरावर फिरून आल्यावर सगळ्यांना भेळ व आईस्क्रीम खाय्ला घालायचे. त्यात माझे बाबा व काकाही असत. मामांच्यासारखीच आईलाही भरपूर भाचवंडे त्यामुळे त्यांच्या सर्वांचीच ते आवर्जून चौकशी करायचे. कुणाचे लग्न ठरले की त्याला म्हणत की "मी तुझ्या लग्नाला येणार आहे बरं का? " खूप हौशी आणि प्रेमळ होते मामा! आईबाबांच्या संसारात येणाऱ्या प्रत्येक संकटात मामा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे होते.







आम्ही कॉलेजमध्ये जायच्या आधीच मामा खूपच थकले होते आणि काही दिवसांनी तर त्यांनी पूर्णपणे अंथरूण धरले होते. जेवण कमी झाले. माझ्या आईने त्यांची मनापासून न कंटाळता सेवा केली. डॉक्टर रोज घरी त्यांना बघायल यायचे. हळुहळू त्यांनी अन्न सोडले. त्यांना फक्त दूध, पाणी, फळांचे रस एवढेच जात होते. नंतर तेही कमी कमी होत गेले. एखादा पाण्याचा घोट, १-२ चमचे कॉफी, तर काही वेळेला अगदी थोडा फळांचा रस, इतकाच आहार झाला. एके दिवशी ते खूप घोरत होते. आईला त्यांचे घोरणे विचित्र वाटले. लगेच तिने डॉक्टरांना घरी बोलावले. डॉक्टरांनी सांगितले की हे घोरणे नाही, तर शेवटची घर्घर आहे. आता ते कधी जातील काही सांगता येत नाही. आम्हाला मामा जाणार या कल्पनेनेच कसेसे होत होते. मामा आपल्यात नाहीत ही कल्पनाही सहन होत नव्हती. शेवटची घर्घर लागण्या आधी ते काही वेळेस अर्धवट डोळे उघडत तर काही वेळेस अगदी थोडे ज्युस घेत. एके दिवशी त्यांनी खुणेनेच सर्वांना जवळ बोलावले व सर्वांकडे डोळे भरून पाहिले. काहीतरी हातवारे करून सांगण्याचा प्रयत्न करीत होते.






त्या दिवशी रात्री बाबांनी अगदी हळू आवाजात टेपवर गीतरामायण लावले होते. गाद्या घातल्या होत्या झोपण्यासाठी पण कोणालाही झोप लागत नव्हती. डॉक्टर एकदा येऊन बघून गेले. मामांची घर्घर चालूच होती. एक मंद दिवा चालू होता. आम्ही दोघी या कुशीवरून त्या कुशीवर होत होतो. एकीकडे रडत होतो. आईबाबा डोळ्यात तेल घालून जागे होते. जरा कुठे डोळा लागेल असे वाटले तर दचकायला होत होते. आई बाबांना म्हणाली तुम्ही झोपा जरा वेळ मी आहे जागी. रात्रीचे बारा वाजून गेले होते. अई अधून मधून उठून पाणी पीत होती. आई अंथरूणावर फक्त पाठ टेकण्याकरता आडवी झाली होती. आम्ही दोघी डोक्यावर पांघरूण घेऊन आत रडत होतो. काळ व वेळ जवळ येत चालली होती. पहाटे चारच्या सुमारास अगदी काही क्षण आईला डुलकी लागली आणि त्याच वेळेस घर्घर बंद झाली. काही क्षण असेच स्तब्धतेत गेले. आम्हाला सर्वांना झोपवून मामा हळूच दार उघडून निघून गेले होते.......






आईला जाग आली. घर्घर बंद झाली होती हे आईला कळलेच. आईने दिवा लावला. मामांचे हातपाय बघितले. हातपाय थंड पडत चालले होते. आईने बाबांना उठवले "बरं का हो, मामा गेलेत बहुतेक" बाबांनीही उठून बघितले. बाबा डॉक्टरांना बोलवायला गेले. डॉक्टरांनी तपासून सांगितले की मामा गेले आहेत. आम्हाला दोघीनाही जाग आली आणि कळून चुकले की मामा नाहीत. तो क्षण खूप मोठी पोकळी निर्माण करणारा होता. आम्ही दोघी खूप जोरजोरात रडायला लागलो. आईबाबाही खूप रडत होते. कोणालाही अश्रू आवरता येत नव्हते. हळूहळू करत सर्व नातेवाईक आले आणि दुपारच्या २ च्या सुमारास मामांचा पार्थिव देह बानांनी व काकाने उचलला. मामा शांतपणे पडले होते. त्यांच्या चेहऱ्यावर तेज आले होते. खूप समाधानाने जणू काही आम्हा सर्वांना ते सांगत होते..... "आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा.... "



निधन : २० जुलै १९८०..... वय वर्षे ८३

18 comments:

Anonymous said...

तुमच्या मामांमुळे आमच्या दादांची आठ्वण झाली. छान आठवणी जाग्या केल्यात तुम्ही.

rohinivinayak said...

Anek Dhanyawaad!

Anonymous said...

khooopach chhan vartan.. DoLyaat paaNi aala..

- Deepali

priyanka said...

Khoop chan aahe mala maza aajobanchi athvan zali.tesudha khoop pramal hote. Thank you.

rohinivinayak said...

Thanks priyanka! :)

Prasad Dudhgaonkar said...

सुंदर लिहिलंय.

rohinivinayak said...

Deepali, Prasad, thank you so much! tumchya sarvanche abhipray vachun khup chhan vatle. dhanyawaad! :)

aativas said...

Very touching narration. There is nothing dramatic in what you have written, ... simplicity is always attractive!

rohinivinayak said...

aativas,Thanks a lott...:)

दिप्ती जोशी said...

khup sundar aathavani, oghavate likhan. khup aavadale.

rohinivinayak said...

Thanks Dipti!!

Nisha said...

Far chan lihilay Tai. mala kadhich konatech Aajoba nvaate karan mi mazya aai pappana khup ushira zale pan kadachit aajoba asate tar te asech asate asa vatta tumcha lekh vachun...

Anonymous said...

नमस्कार रोहिणीवहिनी,

आजोबांच्या आठवणी खूप छान आहेत. तुम्ही त्याचे निवेदनही अतिशय सुंदर केले आहे. लेखाचे सामूहिक वाचन केले. घरातील सर्वांना आवडला.

आपला
(कु्टुंबवत्सल) प्रवासी

rohinivinayak said...

pravassee, abhipray khupach aavadla. anek dhanyawaad!! :)

Anonymous said...

It is really a wonderful and touching essay.

rohinivinayak said...

Thank you very much for your wonderful comment !!

श्रिया (मोनिका रेगे) said...

खूप सुंदर वर्णन रोहिणी ताई ..
भूतकाळातील आपल्या आठवणी आणि आपली माणसे आपल्याला बरेच काही देऊन जातात!!

rohinivinayak said...

Thank you so much monica !!! :)