Wednesday, August 01, 2007

मैत्री (2nd online competition on H4 marathi mulinche mandal)

२५ जुलै रोजी रात्री झोपायच्या आधी ऑर्कुटवर अदितीने एच ४ वर स्पर्धेचा विषय घोषित केलेला धागा वाचला आणि मन भूतकाळात गेले. मैत्रिणींच्या आठवणींनी मन तरंगायला लागले आणि मैत्रीबद्दल काय लिहावे याबद्दल डोक्यात विचारांची गर्दी उसळली आणि त्यातच मला झोप लागली.

दुसऱ्या दिवशी उठल्यावर कामे करता करता मैत्रिबद्दलच्या लिखाणाचा एक आराखडा तयार झाला आणि तोच मी तुमच्यापुढे सादर करत आहे. माझ्या मते मैत्री म्हणजे गप्पा मरताना मिळालेला निखळ आनंद, एकमेकांना वाटणारा आधार, मनातल्या गोष्टी बोलून दाखवण्याचे एक स्थान, काही गोष्टी एकत्र करताना घालवलेला वेळ. मात्र यासाठी एकमेकांचे विचारप्रवाह जुळायला हवेत.

आपला जन्म म्हणजे एक मैत्रिचा प्रवास आहे असे मला वाटते. या मैत्रिच्या प्रवासात प्रत्येक टप्प्यावर आपल्याला विविध प्रकारचे मित्रमंडळ भेटत रहाते ते अगदी जीवनाच्या अंतापर्यंत. अशा या प्रवासात जीवाला जीव देणारी मैत्रिण काही कारणाने एकदम पाठ फिरवते तेव्हा अतोनात वाईट वाटते किंवा एखादी लहानपणची मैत्रिण लग्नानंतर एकदम आपल्या समोर येऊन उभी रहाते आणि विचारते, "अगं तू इथे कशी काय?" तेव्हा वाटते आपण स्वप्न तर बघत नाही ना!! तर मंडळी आपल्या या मित्रमैत्रिणींमध्ये काही मित्रमैत्रिणींच्या आठवणी मनात कायम घर करून रहातात आणि त्या नुसत्या आठवल्या ना, तरी सुद्धा छान वाटते.

आता ही शैलाच पहा ना!! गोल चेहऱ्याची व पांढऱ्या शुभ्र दातांची, दोन वेण्या रिबीनीने शेवटपर्यंत नेऊन परत वर्पर्यंत बांधणारी. तिचे कुंकू नेहमी कपाळाच्या मध्यावर व काळ्या रंगाचे व दुपट्टा उपरण्यासारखा घेत असे. ही हसतमुख चेहऱ्याची शैला अजुनही माझ्या डोळ्यासमोर जशीच्या तशी आहे. सर्व प्रकारची कलाकुसर अवगत असलेल्या भैरवीला तर मी कधीच विसरू शकत नाही. मी तिला कधी रिकामी बसलेली पाहिली नाही. आशा व सुषमा या दोघीजणी इतक्या काही प्रेमळ आहेत ना की अजूनही मी त्यांच्याकडे चार दिवस मोकळेपणाने राहू शकते.

अमेरिकेत पाऊल टाकल्यावर भेटलेली माधवी. तास न तास दूरध्वनीवर मारलेल्या गप्पा, आम्ही दोघींनी मिळून निसर्गाची काढलेली छायाचित्रे, एकमेकींच्या घरी जाऊन वेगवेगळे पदार्थ बनवून ते रेडिओ ऐकता ऐकता खाणे, हे मी कसे काय विसरू शकेन? याहू निरोपकावर भेटलेली इंग्लंडमधली श्रावणी तर खूपच लाघवी. मी सकाळी उठून संगणक सुरू करताच यायची आणि म्हणायची "सुप्रभात रोहिणी, चहा झाला का?" आणि मग मी पण लगेच "चहाच घेत आहे. तुझे झाले का जेवण? आज काय बेत होता?" आणि मग गप्पा मारता मारता अधुनमधून इतर कामे असा माझा दिवस सुरू व्हायचा.

मित्रत्त्वाच्या नात्याबद्दल लिहिता लिहिता मी स्पर्धेतल्या शब्दांची मर्यादा ओलांडली तर नाही ना?!! मोजक्या मित्रांच्या गोड आठवणी सांगायच्या राहूनच गेल्या की!!

रोहिणी गोरे

3 comments:

Anonymous said...

खुप छान लेख आहेत तुझे. मी या ठिकाणावर शब्दश: तरंगत आले. सर्फ करताना सापडलं आणि वाचतच राहिले. साधं लिखाण आहे पण खुप मनापासुनचं आहे. अशिच लिहिती रहा.

शिनु said...

खुप छान

rohinivinayak said...

Thank you so much to Anonymous and shinu for your compliment!