Sunday, May 11, 2014

११ मे २०१४


आज सकाळी जाग आली आणि बाहेर बाल्कनीत जाऊन उभी राहिले तर आकाशात काही ढग जमा झाले होते आणि थोडे रंगही होते पण सूर्योदय मात्र होऊन बराच वेळ झालेला दिसत होता.  थोडी आधी जाग आली असती तर छान सूर्योदय बघायला मिळाला असता. चहा घेतला आणि दिनक्रमाला सुरवात केली. काल ठरवलेली साफसफाईची कामे झाली नाहीत म्हणून आज करावी असे मनात घोळत होते. पण करावी का, किंवा करूच नयेत? परत झोपावे? असे मनातल्या मनात ठरवत होते आणि कामे सुरू केली. कामाला सुरू करायलाच वेळ लागतो. आपण आपल्याला "चला आता कामाला लागा"  अश्या सूचना द्याव्या लागतात तरच काहीतरी होते. तर ते असो. गेले तीन चार दिवस तापमान चांगलेच चढे होते त्यामानाने आज कमी होते म्हणून आम्हाला दोघांनाही आवडणाऱ्या समुद्रकिनारी जायचे ठरवले.






बाहेर जेवून थेट समुद्रकिनारा गाठला. आज हवा थोडी ढगाळ होती आणि विशेष म्हणजे हवेत आद्रता नव्हती त्यामुळे समुद्रावर गेल्यावर छान वाटले. आज गर्दी होती. आज समुद्रावर नेहमीपेक्षा जास्त भरती होती. लाटा खटाखट खडकांवर आदळत होत्या. मुले मजा करत होती. नेहमीप्रमाणे चालायला सुरवात केली. आज समुद्रावर रंगांच्या छटा छानच उमटल्या होत्या. निळा, हिरवा, मातकट, असे रंगांचे थर खूपच छान दिसत होते. वरती आकाशात निळा रंग आणि त्यावर थोडे पांढरे, निळे व काही काळे ढगही चान दिसत होते. मस्त वारा सुटला होता. हवेत आद्रता नसल्याने बरे वाटत होते. नेहमीची चाल पूर्ण केली आणि समुद्राच्या दुसऱ्या टोकाला जाऊन वाळून बसायचे ठरवले. वाळूत बसलोही. पण आज भरती अशी काही जोराची होती की पाण्यात जावेसे वाटत होते. अर्थात आम्ही दोघे पाण्यात कधीच जात नाही. एक तर मला समुद्राच्या पाण्याची आणि लाटांची खूप भीती वाटते. आणि खारट पाण्याने पाय चिकट होतात म्हणूनही जात नाही. पण आज पहिल्याप्रथम इतक्या वर्षानंतर पाण्यात उभे राहिलो. मला तर भीतीच वाटत होती. लाटा जोराच्या येत होत्या. पण थंडगार पाणी पायावर आल्यावर इतके काही छान वाटले की तिथेच पाण्यात बराच वेळ उभे राहिलो. तिथून हलावेसेच वाटत नव्हते. नंतर पाण्याबाहेर आलो आणि तिथल्या एका खडकावर बसून लाटांकडे खूप वेळ बघत बसलो. असे वाटत होते की उठूच नये. थोडे ढगाळ वातावरण वाढले आणि दोन चार पावसाचे थेंबही पडले. पाऊस आला असता तर पावसातही भिजायला नक्कीच आवडले असते पण पाऊस पडला नाही. समुद्रावर असताना मुसळधार पावसाला बघायची माझी खूपच इच्छा आहे.






आज अंजलीला फोन केला होता तर तिने सांगितले की फिरायला जाताना पंजाबी सूट घाल म्हणून घातला. तसे तर मी ठरवलेच आहे की उन्हाळ्यात बाहेर जाताना पंजाबी सूट घालायचे नाहीतर बॅगेत पडून राहतात. पण तरीही मैत्रिणीने सांगितले म्हणून माझ्या ठरवण्याला अजूनच उत्साह आला आणि ड्रेस घातला. तशी तर मी पण तिला सांगते. की बाग केलीस तर फुलांचे फोटो काढ. झोपाळ्यावर बसून फोटो काढ. तर तसे तिनेही केले.  मैत्रिणींचे असे एकमेकींना सांगणे किती छान असते ना ! घरी आलो तर डोके ठणठण करत होते. चहा घेतला. कशीबशी मुगाच्या डाळीची खिचडी टाकली. पापड तळले. टोमॅटो काकडीचे काप केले आणि याबरोबर दही आणि खिचडी असा जेवणाचा बेत केला. जेवलो तेव्हा जरा थोडे डोके उतरल्यासारखे वाटत आहे. आज सूर्यास्तही खूप छान होता. आज एक खूप सुंदर फुल पहायला मिळाले. आजचा एकूण दिवस खूप छान गेला. लक्षात राहील असा गेला. अजूनही समुद्राचे पाणी, लाटांचा खळखळाट, समुद्राचा थंडगार पाण्याचा पायाला झालेला थंडावा, मनात साठून राहिले आहे.  आहाहा एकूणच सर्व काही छान छान !!

No comments: