Thursday, April 11, 2024

सुंदर माझं घर ..... (५)

२२ मे २००१ रोजी संध्याकाळच्या सुमारास आम्ही आमच्या अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला. या अपार्टमेंटच्या शेजाररच्या अपार्टमेंटमध्ये एक तामिळ भारतीय कुटुंब राहत होते. त्यांच्या घरात म्हणजे अपार्टमेंट नंबर 6 मध्ये आम्ही 8 दिवसा नंतर जाणार होतो, कारण ते जागा सोडून दुसऱ्या शहरात जाणार होते. त्यांच्या जागेचे lease agreement आम्ही take over करणार होतो त्यामुळे त्यांचे त्या जागेचे डिपॉझिट त्यांना मिळणार होते. २०५ नंबर मध्ये आम्ही फक्त ८ दिवस रहाणार होतो. त्या जागेत रहाणारी सत्या मला म्हणाली आज रात्री तुम्ही आमच्याकडेच जेवा, दुसऱ्या दिवशीपासून तुमच्या घरात तुमचे नवीन रुटीन सुरू करा. त्यादिवशी रात्री आयते जेवण मिळाले ते एका दृष्टीने बरेच झाले. नवीन घरात रात्री काही करायला उत्साह नसतोच. त्या कुटुंबात एक शाळेत जाणारी मुलगी होती. त्यांच्याकडे जेवायला गेलो तर सत्याची मुलगी माझ्या मांडीवरच येऊन बसली. मला खूप छान वाटले. तिने जेवणही छान बनवले होते. पोळी भाजी बरोबर तिने डोसाही बनवला होता. तसे अमेरिकेत आल्यावर ८ दिवस आम्ही प्रोफेसरांच्या बंगल्याच्या शेजारच्या छोट्या बंगल्यात राहत होतो पण तिथे भारतीय जेवण नव्हते. त्यामुळे या मैत्रिणीच्या घरी घरचे छान जेवण जेवल्यावर बरे वाटले. जेवण करून घरी आलो. पिवळ्या बल्बमधले मिणमिणते दिवे नकोसे वाटत होते. झोपायचे होते पण गादी नव्हती. या घरात रहायला येण्या आधी प्रोफेसर ऍलन मर्चंड यांनी आम्हाला सॅम्स क्लबमध्ये नेले होते. सॅम्स क्लब हे अमेरिकेतले अवाढव्य दुकान आहे. इथे घाऊक माल विकत घ्यावा लागतो व वर्षाचे पैसे एकदम भरून त्या दुकानाचे सदस्यत्व घ्यावे लागते. इथे आम्ही काही गरजेच्या वस्तू खरेदी केल्या. त्यात 25 किलो तांदुळाचे पोते व 10 किलो मैदा घेतला. हवा भरून तयार करता येईल अशी एक गादी घेतली. खरे तर मला इतका मैदा घ्यायचा नव्हता पण कणिक कधी कोठे मिळते हे माहीत नसल्याने मैद्याच्या पोळ्या करून खाता येतील म्हणून घेतला. त्या गादीत हवा भरून ती फुगवली व त्यावर भारतातून आणलेल्या दोन चादरी घालून झोपलो. उशाला काही नव्हते. झोप येता येत नव्हती. आपण इथे फक्त दोघेच्या दोघेच आहोत याचा एकाकीपणा खूप जाणवत होता. त्या घरात त्यादिवशी आम्ही दोघे आणि आमच्याबरोबर आणलेल्या भारतातल्या ४ बॅगाच होत्या. भारताची प्रखरतेने आठवण येत होती.



२०६ अपार्टमेंट मध्ये आम्ही जाणार होतो कारण या घरापासून विद्यापीठ, वाण सामानाचे दुकान, धुणे धुवायचे दुकान हे सर्व चालत जाण्याच्या अंतरावर होते. शिवाय या घरात जरूरीपुरते सर्व लाकडी सामान होते. अर्थात ते त्यांचे नव्हते. या आधी रहाणाऱ्या माणसांनी ते असेच सोडून दिले होते. झोपायला बेड होता. बसायला फिरती खुर्ची आणि टी पॉय होता. लाकडी सामान जुने असले तरी ते होते हे महत्वाचे. सत्याने मला तिच्याकडच्या रिकाम्या झालेल्या काचेच्या बरण्या व प्लॅस्टीकचे डबे साफ करून दिले. म्हणाली तुला वाण सामान ठेवायला उपयोगी पडतील. Sack & Save अमेरिकन दुकानात रोजच्या वापरातल्या सर्व जरूरीच्या वस्तू म्हणजे टुथब्रश, टुथपेस्ट,अंगाला लावायचा साबण, टिश्यु पेपर, पेपर टॉवेल, साखर, तेल, भाज्या, इत्यादी आणून दिवसाची सुरवात झाली. आठ दिवसानंतर २०६ मधले तमिळ कुटुंब दुसऱ्या शहरी गेले आणि आम्ही २०६ मध्ये शिफ्ट झालो. त्यांना टाटा केला. सत्याने मला जाता जाता फोडणीचे साहित्य पण दिले मोहरी,हिंग हळद. इलेक्ट्रीकच्या शेगड्या, अरूंद स्वयंपाकघर, मिणमिणते दिवे, अंघोळीकरता अरूंद टब सर्व काही नवीनच होते. अंघोळ करताना तर सुरवातीला छोटी बादली व त्यात एक ग्लास टाकून भारतात अंघोळ करतो तशी केली. शॉवरचे पाण्याने केस ओले न होता अंघोळ करायला एक दोन दिवसातच जमवले. फक्त मला इथले एक आवडले ते म्हणजे गरम व गार पाणी दोन्ही होते. त्यामुळे मनसोक्त अंघोळ करता येत होती. इलेक्ट्रीकच्या शेगडीवर चहाला लागणारा वेळ, कूकरला लागणारा वेळ हे काही पचनी पडत नव्हते. इथे घरपोच सेवा नाही. त्यामुळे मुंबईतल्या दिवसांची खूपच आठवण येत होती. घरपोच वाणसामान,घराच्या दाराशी टाकलेले वर्तमानपत्र, गोकुळ दुधाची पिशवी, दारात ठेवलेला केराचा डबा की जो केरवाली घेऊन जाते. धुणे-भांडी करायला येणारी बाई, तिच्याशी होणाऱ्या गप्पा. गप्पांसोबत तिने व मी खाल्लेला फोडणीचा भात व नंतर चहा. या सर्व गोष्टींची तीव्रतेने आठवण येत होती. संध्याकाळी मराठी बातम्या टीव्हीवर पाहण्याची खूप सवय होती तेही खूप जाणवत होते.


अपार्टमेंट मध्ये मोठा फ्रीज, ४ इलेक्ट्रिक शेगड्या, त्याखाली ओवन, मायक्रोवेव्ह, डिशवॉशर, centralized heating/cooling ओट्याच्या वर व खाली डबे ठेवायला कपाटे होती. इथल्या प्रत्येक अपार्टमेंट मध्ये या सर्व गोष्टी असतात. इथे घराच्या बाजूलाच रस्ते क्रॉस केल्यावर धुणे धुवायचे दुकान होते. त्यामुळे सर्व धुणे घेऊन तिथे जायला लागायचे. ८ दिवसाचे कपडे साठवून ते मशीन मधून धू ऊन आणायचे हे मला अजिबात आवडले नव्हते. मुंब ईत रहात दर २/३ दिवसांनी मी वॉशिंग मशीन मधून कपडे धूत होते. विनायक ८ वाजता लॅब मध्ये जायचा. त्यानंतर मी एकटीच घरी असायचे. माझे मी आवरून स्वैपाक करायचे. दुपारी १ ला विनु घरी जेवायला यायचा. नंतरचा वेळ मी बाहेर गॅलरीत उभे राहून परत घरात यायचे. घरात आले आणि एखाद्या कार येण्याचा आवाज आला की लगेच परत बाहेर यायचे. असे वाटायचे की आपल्याकडेच कुणीतरी आले आहे. गॅलरीत उभे राहून बाहेर पाहिले की इथे कोणीही राहत नाही असे वाटायचे कारण की सर्वांची दारे बंद. रस्त्यावर कोणी दिसायचे नाही. सगळे रस्ते सुनसान. आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत इथे रहायला आलो होतो त्यामुळे कुठेही कसलीही रहदारी किंवा माणसे दिसत नव्हती. बरेच विद्यार्थी भारत दौऱ्यावर गेले होते आणि अमेरिकन्स त्यांच्या घरी गेले होते. भारतातल्या सवयीप्रमाणे कॅन मधले दूध मी पातेल्यात ओतून गरम केले, सायीचा पत्ताच नव्हता, साय नाही तर सायीचे ताक लोणी तूप कसे करायचे असे मोठाले प्रश्न माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले. एकदा अशीच गॅलरीत उभी होते तर मला एक भारतीय माणूस खालच्या घरातून बाहेर येताना दिसला. त्याची बायको प्रविणा बाहेर आली आणि मला गॅलरीत पाहून ती वर आली आणि माझी विचारपूस केली. ती म्हणाली की तू नवीन आहेस तर तुला जे हवे ते माग माझ्याकडे मी खालीच रहाते. ती तेलुगू होती. संभाषण इंग्रजी मधूनच केले. प्रविणाने मला दही बनवण्यासाठी विरजण दिले, ती म्हणाली मी घरीच दही बनवते, आम्हाला खूप लागते दही. भारतावरून मी ताक घुसळायला रवी आणली होती. त्यानंतर २-४ दिवसात प्रविणा व श्रीनिवास यांनी आम्हाला त्यांच्या कारमधून भारतीय दुकानात नेले. ते खूप दुरवर होते. भारतीय सामान म्हणजे सर्व प्रकारच्या डाळी, पिठे, पोहे, रवा, साबुदाणा, घेतले. शिवाय भारतीय भाज्याही घेतल्या. (तोंडली, गवार, छोटी वांगी, भेंडी) भाजी चिरायला अंजलीचा चॉपर आमच्या बरोबरच आणला होता. आमचे अपार्टमेंट कॉम्प्लेक्स सी आकाराचे होते आणि त्याला लागूनच वाहता रस्ता होता. रात्रीचे जेवण झाल्यावर आम्ही दोघे एक भली मोठी चक्कर मारायला जायचो. Texas मध्ये प्रचंड उन्हाळा असतो. रात्री दहाला पण गरम हवेच्या हाळा लागायच्या. बाहेरून घरात आलो की घरात कुलर असल्याने थंडगार वाटायचे. काही दिवसांनी आम्हाला रस्त्यावरून चालत असताना माधवी रवी ची जोडी दिसली. आम्ही एकमेकांच्या ओळखी करून घेतल्या. एकमेकांचे फोन नंबर घेतले. माधवी खूपच बोलकी होती. ती हिंदीतून बोलायची. नंतर कविता-पवनकुमार आमच्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्स मध्ये रहायला आले. प्रविणा-कविता आणि मी एकमेकींना वाडग्यातून घरी काही चमचमीत केले असेल तर द्यायचो. अशी देवाणघेवाण छान वाटत होती. बऱ्याच वेळा मी व प्रविणा जिन्यात बसून चहा प्यायचो. या अपार्टमेंटला बाहेरून जिने होते. जेव्हा हिमवृष्टी झाली ती मी पहिल्यांदाच आयुष्यात अनुभवली. गॅलरीत जमा झालेल्या बर्फात मी स्वस्तिक व फूल कोरले आणि त्यावर हळदीकुंकू वाहिले. कविता, प्रविणा, माधवी ही तीन तेलुगु कुटुंबे आणि आम्ही दोघे मराठी असा आमचा छान ग्रुप तयार झाला. नंतर काही दिवसांनी मला कळाले की डॅलस वरून रेडिओवर २४ तास हिंदी गाणी प्रसारित होतात. त्यामुळे आम्ही वाल मार्ट मधून रेडिओ कम टेपरेकॉर्डर विकत आणला. रेडिओ वर जुनी नवी हिंदी गाणी लागत होती आणि मधून एक बाई निवेदन करायची. त्यामुळे थोडेसे का होईना बरे वाटत होते. विनायकच्या लॅब मध्ये एक चिनी काम करत होता. तो विनायकला म्हणाला की तू लगेच टिव्ही घे. नाहीतर तुझी बायको घरी बसून वेडी होईल. त्याकरता तो आम्हाला त्याच्या कारमधून वॉल मार्ट्ला घेऊन आला आणि आम्ही १३ इंची टिल्लू टिव्ही विकत घेतला. या टीव्ही वरूनच ११ सप्टेंबर रोजी अमेरिकेवर इराकी हल्ला झाल्याचे कळाले होते. दिवसभर हीच बातमी प्रसारित होत होती.


सौमित्र गोडबोले नावाचा एक विद्यार्थी ओळखीचा झाला. त्याचे वडील मराठी आणि आई बंगाली होती. त्याला मराठीत बोलता यायचे नाही. हिंदीतून बोलायचा. तो खूप खावस होता. त्याला मी अधुन मधून जेवायला बोलवायचे. तो ग्रीक योगर्टचे श्रीखंड बनवून आणायचा. मी बाकीचा सर्व मराठमोळा स्वौपाक करायचे. नंतर आम्ही व्हीसीआर लावून हिंदी सिनेमे बघायचो. मी आणि माधवीने मिळून बऱ्याच गोष्टी केल्या. मी आई बाबा, सासूसासरे, माझी बहीण यांना पत्र पाठवते हे माधवीला सांगितल्यावर ती पण तिच्या घरी पत्रे पाठवू लागली. ती तिच्या घरातून व मी माझ्या घरातून विद्यापिठातल्या पोस्ट ऑफीस मध्ये यायचो. इथल्या ग्रंथालयात अनेक डेस्क टॉप होते. त्यावरून मी ईसकाळ वाचायचे. रोज दुपारी मी ग्रंथालयात जायचे व तिथून विनुच्या लॅब मध्ये जाऊन आम्ही दोघे घरी परतायचो.
माधवी माझ्या घरी व मी तिच्या घरी चालत जायचो. एकमेकींकडे जाऊन चहा पाणी व्हायचे. सोबत बटाटा वेफर्स असायचे. आम्ही ४ कुटुंबाने ३१ डिसेंबर २००१ साजरा केला. त्यात मी सर्वांना ७०-८० बटाटेवडे केले होते. प्रत्येकीने एकेक पदार्थ वाटून घेतला होता. सर्व जणी खूपच दमलो होतो. त्यामुळे जास्त जेवण गेले नाही. उरलेले सर्व जेवण आम्ही वाटून घेतले आणि १ जानेवारी २००२ ला गरम करून खाल्ले. दोन्ही दिवशी खूप बर्फ पडत होता. आम्ही सर्वांनी मिळून गाण्याच्या भेंड्या खेळल्या. त्यात तेलगू, मराठी हिंदी अशी सर्व गाणी होती. आम्ही आलो ते १ वर्षाचा ( J 1 ) विसा घेऊन. नंतर विनुने दुसरीकडे post doctorate करण्यासाठी विद्यापिठात अर्ज करायला सुरवात केली. त्याला ४ विद्यापिठातून बोलावणे आले होते. त्यापैकी त्याने क्लेम्सन शहर निवडले. क्लेम्सन हे साऊथ कॅरोलायना राज्यात आहे. आमच्या सर्व बायकांचा Dependent visa (J2) होता. मी व माधवीने १०० डॉलर्स भरून वर्क पर्मिट काढले. अर्थात ते मला क्लेम्सन शहरात गेल्यावर उपयोगी पडले. या घरात आम्हाला अमेरिकेतले स्थलांतर कसे करायचे हे शिकायला मिळाले आणि ते नंतर उपयोगी पडले.


डेंटनवरून क्लेम्सनला विमानानेच जावे लागणार होते इतके ते लांब होते. प्रविणा व तिचा नवरा श्रीनिवास यांनी आम्हाला कशा प्रकारे स्थलांतर करायचे हे सांगितले. श्रीनिवास म्हणाला तुम्ही काही काळजी करू नका. मी तुम्हाला पॅकिंग कसे करायचे ते सांगतो. तुम्ही फक्त एक करा मला ५ ते ६ खोकी आणून द्या. त्यादिवशी संध्याकाळी ते दोघे आमच्या घरी आले. गप्पा मारत होते. अधुनमधून मी चहा करत होते. केव्हा जाणार, कोणत्या विमानाने जाणार, असे विचारले आणि त्यांनी हे पण सांगितले की तुम्हाला तुमचे रहाते घर खूप स्वच्छ करून द्यावे लागेल तरच तुम्हाला तुमच्या जागेकरता भरलेले डिपॉझिटचे पैसे परत मिळतील. आम्ही खोकी आणली आणि एकेक करत आमचे सामान पॅक होऊ लागले. खोकी भरायला श्रीनिवासने आम्हाला मदत केली. सर्व पुस्तके आणि काही सामान पॅक केले. आमचा पहिलावहिला खरेदी केलेला टिल्लू टिव्ही खोक्यात गेला. टेप रेकॉर्डर कम रेडिओ पण एका खोक्यात गेला. टोस्टर आणि इतर बरेच सटर फटर सामान खोक्यात जात होते. ही सर्व खोकी आम्ही पोस्टाने (USPS) पाठवणार होतो. खोक्यांना चिकटपट्या चिकटवल्या. त्यावर पत्ताही लिहीला. हा पत्ता आम्ही पवनकुमारच्या मित्राचा दिला. ईमेलने त्याला विचारले आम्ही आमचे काही सामान पोस्टाने तुझ्या पत्यावर पाठवत आहोत, चालेल ना? की जो क्लेम्सन मध्ये रहात होता. क्लेम्सन मध्ये आम्हाला घर मिळाले नव्हते. तिथे गेल्यावर आम्ही पाहणार होतो.


भारतावरून आणलेल्या आमच्या चार बॅगा परत एकदा नव्याने पद्धतशीरपणे लावल्या. एका वर्षात आमचे सामान थोडे वाढले होते. श्रीनिवासने असे सुचवले की त्या शहरात तुम्ही नवीन आहात तर माझा असा सल्ला आहे की तुम्ही थोडेफार भारतीय किराणामालाची पण खोकी तयार करा. त्याकरता तो आम्हाला त्याच्या कारने भारतीय किराणामालाच्या दुकानात घेऊन गेला. काही मसाले, डाळी आणि थोडी कणिक असे परत पॅकीग झाले. इथल्या आणि भारतातल्या स्थलांतरामध्ये बराच फरक आहे. प्रत्येक स्थलांतराच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. जसे की अंतर जर लांब असेल तर विनानाने जावे लागते. काहीजण २० तासाचा प्रवास कारनेच करतात. काही जण U-Haul ट्रक कारच्या मागे जोडून प्रवास करतात. या ट्रकमध्ये सर्व सामान बसवता येते. हा ट्रक भाड्याने मिळतो. खूप फर्निचर असेल की जे आपल्याला उचलणे अशक्य कोटीतील गोष्ट आहे अशामध्ये मुव्हर्स आणि पॅकर्स बोलावतात.


आम्ही जे स्थलांतर करणार होतो ते विमानने जाऊन करणार होतो आणि बाकी सर्व गोष्टी पोस्टाने पोहोचवल्या जाणार होत्या. सर्वात मुख्य म्हणजे इथल्या स्थलांतरामध्ये आपल्यालाच सर्व काही करावे लागते. राहते घरही स्वच्छ करून द्यावे लागते. कामांची नुसती रीघ लागलेली असते. भारतातून येताना ज्या बॅगा आणलेल्या असतात त्याही परत नव्याने लावायच्या म्हणजे डोकेदुखी असते. थोडेफार कपडेही वाढलेले असतात. थंडी असल्याने कोट, टोप्या, चपला बुटे हे पण वाढलेले असते. उन्हाळ्याच्या कपड्यांची पण थोडी भर पडलेली असते. शिवाय जे सामान पोस्टाने अथवा फेडेक्सने पाठवायचे असेल त्या खोक्यांची पण रांग लागलेली असते. त्यावर चिकटपट्या चिकटवून टाईप केलेले पत्ते यांच्या प्रिंटस चिकटवणे व सर्व खोकी एकेक करत उचलून, घर वरच्या मजल्यावर असेल तर खाली आणून परत ती कोणाच्या मदतीने ज्याच्याकडे कार असेल त्याच्या सोयीनुसार त्यात टाकून ती पोस्टात नेण्यासाठी न्यावी लागतात. अशा एक ना अनेक भानगडी असतात.


आम्ही दोघांनी सर्व खोकी भरून तयार केली. एकेक करत वरच्या मजल्यावरून एकेक खोकी उचलून विनायकने श्रीनिवासच्या कार मध्ये ठेवली व ते दोघे पोस्टात गेले. इलेक्ट्रीसिटी कंपनीला फोन करून ती अमूक दिवशी तोडून टाका. आता आम्ही इथे राहत नाही हे कळवावे लागते. टेलिफोन कंपनीलाही तसे कळवावे लागते. हे कळवले नाही तर आपल्या नावाची बिले त्या पत्यावर येत राहतात आणि फुकटचा भुर्दंड बसतो. निघण्याच्या आधी चार पाच दिवस तर हे करू की ते करू असे नुसते होऊन जाते. सामानाच्या आवरा आवरीत बराच कचरा साठलेला असतो तो टाकायला बऱ्याच चकरा होतात. शिवाय सामान जास्तीचे आणून चालत नाही. याउलट एकेक करून घरातले सामानच संपवण्याच्या मार्गावर न्यायचे असते. पूर्ण फ्रीज रिकामा करून जरुरीपुरत्याच भाज्या आणायला लागतात. फ्रीज रिकामा करून तो साफ करायला लागतो. बाथरूम, कमोड, सिंक हे साफ करायला लागते. व्हॅक्युमिंग तर अनेक वेळा करावे लागते. पासपोर्ट, जरूरीचे कागदपत्र आठवणीने एका बॅगेत भरावी लागतात. सगळीकडे पसाराच पसारा असतो. कपडे पण कपडे धुण्याच्या दुकानातून बरेच वेळा बरेच वेळा धुवून आणायला लागतात. कारण की आता लॉंड्री बॅगेत कपडे धुण्यासाठी साठवायचे नसतात. एक दिवस आधिचे कपडे तर तसेच पारोसे घ्यावे लागतात नाहीतर हातानेच धुवून, पिळून ते हँगरवर लटकावून वाळवावे लागतात. आपली अवस्था हमालाच्याही वरताण होऊन जाते. कामे करता करता पिंजरारलेले केस, स्वच्छता करता करता अंगावरच्या कपड्याला पुसलेले हात, त्या अवतारातच मैत्रिणींचे येणार फोन कॉल्स, असे सतत चालूच राहाते. पोटात कावळे कोकलत असतात पण तरीही त्याकडे जास्त लक्ष न देता पटापट कामे हातावेगळी करावी लागतात. स्वयंपाकघर तर स्वच्छ करून खूपच दमायला होते. तिथली सगळी कपाटे आवरून, त्यातले काही जे अगदी थोडे थोडे उरले असेल तर याचे काय करायचे? रागाने ते ही कचऱ्यात फेकून दिले जाते. इलेक्ट्रीक शेगड्या साफ करणे, कुठेही कोणताही कचरा, धूळ, घाण दिसत नाही ना हे बघावे लागते. हे सर्व करण्याचे कारण की आपण ज्या जागेकरता डिपॉझिट भरलेले असते ते जास्तीत जास्त परत मिळावे म्हणून. तरी सुद्धा थोडेफार पैसे कापूनच अपार्टमेंटवाले आपले पैसे आपल्याला परत करतात.


घराची होता होईल तितकी साफसफाई मी केली. विनायक लॅबमध्ये रात्रीपर्यंत काम करत होता. पॅकींग व साफसफाई करून जीव नुसता मेटाकुटीला आला होता. त्याहीपेक्षा सर्व मित्रमंडळींना सोडून जाणार याचे खूप दुःख होत होते. श्रीनिवास व रवी आम्हाला विमानतळावर त्यांच्या कारने सोडायला येणार होते. दोन बॅगा घेऊन मी श्रिनिवासच्या कारमध्ये बसणार होते तर विनायक दोन बॅगा घेऊन रवीच्या कारमध्ये बसणार होता. सकाळी उठून आवरले. त्या जागेतला शेवटचा चहा केला आणि उरलेले दूध प्रविणाला दिले. अजूनही काही नुकत्याच आणलेल्या भाज्याही दिल्या. प्रविणाने केलेली पोळी भाजी एका प्लस्टीकच्या डब्यात बांधून घेतली. पूर्ण सामानाची बांधाबांध झाली होती. एकेक करत सर्व बॅगा खाली उतरत होत्या. सर्वजण आम्हाला भेटायला खाली जमा झाले होते. मला आतून खूप गदगदत होते. घरातल्या प्रत्येक खोलीत जाऊन मी पूर्ण घराला डोळे भरून पाहत होते. प्रत्येक खोलीत जाऊन नमस्कार करून म्हणत होते "या घरातील आमचे वास्तव्य छान झाले. आता या घरात परत येणे नाही" काही राहिले तर नाही ना याची खात्री करून घेतली आणि कुलूप लावून मी खाली आले. सर्वांना आम्ही टाटा करत होतो. कारमध्ये बसताना घराला शेवटचे पाहून घेतले. टाटा करताना काही वेळाने सर्व दिसेनासे झाले आणि आमच्या मित्रांच्या दोन कारने हायवे वरून धावायला सुरवात केली. डॅलस विमानतळावर रवी व श्रीनिवासने आम्हाला सोडले. त्यांनाही टाटा करून काही वेळाने विमानात बसलो.


खरे तर आम्ही डॅलस-ग्रीनविल असे विमानाचे थेट बुकींग केले होते. मी व श्रीनिवास चुकीच्या गेटवर उभे राहिलो होतो त्यामुळे आमचे विमान चुकले. त्यावेळी कोणाकडेही मोबाईल फोन नव्हते. नाहीतर एकमेकांना फोन करून कळवता आले असते. तिथल्या बाईने आम्हाला दुसऱ्या मार्गाने आयत्यावेळी दुसऱ्या विमानाचे बुकींग करून दिले म्हणून बरे झाले. सव्यापसव्य करत आम्हाला क्लेम्सनला पोहोचायला रात्रीचे १२ वाजले. सकाळी ८ ला निघालेलो आम्ही थकून भागून उशिराने दुसऱ्या शहरी पोहोचलो होतो. Copy Right - Rohini Gore
क्रमश : ...

Sunday, April 07, 2024

सुंदर माझं घर ..... (४)

कंपनीच्या मागेच क्वार्टर्स होत्या. साधारण १२०० स्क्वेअर फुटाच्या. दोन बेडरूम, किचन, हॉल, servant's room हॉलला लागून मोठी बाल्कनी. डोंबिवलीतल्या एका माणसाच्या ओळखीने आमचे शिफ्टिंग झाले. त्याचा ट्रक होता. आमचे सामान जास्ती नव्हतेच. भांडीकुंडी एका पोत्यात भरली. एकात कपडे, आणि बाकीचे सुटे सुटे सामान एकेक करत ट्रक मध्ये भरले. हे सर्व करायला माणसे होतीच. त्या ट्रक मध्ये आम्ही तिघेही बसलो. आम्ही दोघे व सुषमा. अग्रेसर ४ मध्ये प्रवेश केल्या केल्या किती छान ! असेच उद्गार निघाले. सुषमा म्हणाली की जेवणात काहीतरी गोड करू. नेमका रवा सापडत नव्हता. त्यामुळे सुषमाने कणकेचा शिरा केला.


आम्ही तिघे जेवलो आणि दुपारचा चहा घेऊन ती डोंबिवलीस परतली. डोंबिवलीच्या घरात लाकडी सामान घेतले नव्हते ते या जागेत घेतले. सोफासेट, वेगवेगळे कप्पे असलेले मोठे कपाट घेतले. ते हॉल मध्ये ठेवले. टीपॉय, फोन ठेवायला कॉर्नरचे टेबल, मोठा बेड, दुसऱ्या बेडरूम मध्ये आमची डोंबिवलीची कॉट ठेवून जमिनीवरचे कार्पेट अंथरले. ओव्हल आकाराचे ६ जणांचे काचेचे डायनिंग टेबल असे सर्व काही घेतले. असे सर्व मनाजोगते फर्निचर १ लाखाचे होते. हे सर्व कंपनीकडूनच (white goods ) लेमन व गुलाबी रंगाची रंगसंगती असलेले पडदेही शिवले. विनु रोज दुपारी घरी जेवायला यायचा. डायनिंग टेबलवर वर बसून जेवायला छान वाटायचे. रात्रीचे जेवण आम्ही खाली बसून जेवायचो आणि एकीकडे आभाळमाया मालिका पहायचो. रोज रात्री जेवण झाल्यावर कंपनीच्या आवारात ३-४ फेऱ्या मारायचो. पॉटलक हा प्रकार मला इथे आल्यावरच कळाला. पहिल्या पॉटलकच्या वेळी मी ७०-८० पुऱ्या केल्या होत्या. दुसऱ्या वेळी ७०-८० बटाटेवडे केले होते. टिव्ही वर मी दुपारी महाश्वेता पहात होते. दर रविवारी सकाळी पार्ल्यात भाजी आणायला जायचे. हा बाजारहाट मला खूपच आनंद देवून जायचा.


Advanced Diploma of Computer Programming हा कोर्स मी डोंबिवलीत करत होते. त्या कोर्सचे शेवटचे उरलेले काही दिवस मी अंधेरी-डोंबिवली ये-जा करून पूर्ण केले. मी अंधेरी ते घाटकोपर बसने जायचे. नंतर घाटकोपर ते डोंबिवली ट्रेनने प्रवास करायचे. परत घरी जाताना डोंबिवली-घाटकोपर-अंधेरी. एक चांगले होते की ट्रेन मध्ये मला ऑफीसची गर्दी लागायची नाही. सकाळी दुधात कॉर्नफ्लेक्स घालून ते खाऊन निघायचे. बरोबर काहीतरी छोट्या डब्यात खायला घ्यायचे. कारण यायला मला दुपारचे २ वाजायचे. ९ ला निघायचे. जाताना बसला गर्दी असायची. प्रोजेक्ट करायला मात्र मी सुषमा नेर्लेकर कडे ४ दिवस राहिले होते. नंतर लेखी परिक्षेसाठी मी अंधेरीवरून दादरला आले होते. परिक्षा झाल्यावर घरी आले तेव्हा खूप हायसे वाटले. हा कोर्स पूर्ण झाला याचे समाधान वाटले. नंतर विचार केला होता की एक कंप्युटर घेऊन जे शिकलोय त्याचा सराव करायचा. मला सी लॅंगवेज मध्ये गोडी वाटु लागली होती. दीपाली मला म्हणाली होती की मी तुम्हाला कोणती पुस्तके घ्यायाची त्याची यादी देईन व तुम्ही सराव करा. काही अडले तर मी सांगेन तुम्हाला. नंतर मला एका मैत्रिणीकडून कळाले की घरबसल्या Data entry चे काम मिळते. घरबसल्या काम मिळाले तर ते चांगलेच होईल असा मनाशी विचार केला होता.


आणि एक दिवस दुपारी श्री नेर्लेकर यांचा आम्हाला फोन आला की आपले पारखी काका गेले. मी जोरात ओरडलेच काय ? विनु व्यायाम करत होता. आम्हाला दोघांनाही हा मोठा शॉक होता. २ जानेवारी २००० सकाळी पारखी काकांचे निधन झाले होते. पारखी काका काकू आमच्या शेजारीच रहात होते. विनुने व्यायाम पूर्ण केला आणि आम्ही डोंबिवलीला गेलो. डोंबिवलीवरून परत घरी अंधेरीला यायला रात्रीचे १२ वाजून गेले होते. सकाळी उठलो तर विनुचा डावा हात खूपच सुजला होता. चांगला टरटरून फुगला होता. लगेचच आम्ही डॉक्टरांकडे गेलो. एक्स-रे काढले तर त्यात असा रिपोर्ट आला की शिरेमध्ये रक्ताची बारीक गुठळी झाली आहे. विनुला Thrombosis झाला होता. लगेचच त्याला दवाखान्यात ऍडमिट केले. ८ दिवस मी एकटीनेच सर्व मॅनेज केले.


विनुला सलाईन मधून गुठळी विरघळण्याचे औषध दिले. ही रक्ताची गुठळी हळूहळूच विरघळायला हवी होती. माझ्याकडे शुभांगी नावाची कामवाली बाई होती. तिच्या मदतीने मी एकटीन सर्व केले. रात्रीचे जेवण करून मी विनुकरता डबा घेऊन दवाखान्यात जायचे. सकाळी दवाखान्यात चहा देत होते. चहा, नाश्ता फक्त पेशंटला होता. सकाळी दवाखान्यातून मी घरी रिक्शाने यायचे. शुभांगीला सांगून ठेवायचे की तू सकाळी माझ्याकडे कामाला आधी ये ८ वाजता. तशी ती बरोबर ८ ला हजर असायची. घरी आल्यावर मी ब्रश, चहा, अंघोळ करून पोळी भाजी भात आमटी करायचे. माझे आवरून होईतोवर शुभांगी झाडू-पोछा, धुणे-भांडी करायची. शिवाय कणिक भिजवून व भाजी चिरून ठेवायची. नंतर मी माझे जेवण करून व थोडी विश्रांती घेऊन ११-१२ च्या सुमारास परत डबा घेऊन दवाखान्यात जायचे. संध्याकाळी परत येऊन रात्रीचा डबा घेऊन दवाखान्यात झोपायला जायचे. तेव्हा विनुला भेटायला श्री नेर्लेकर आले होते. विनुला पथ्य नव्हते. हळूहळू करत ती रक्ताची गुठळी विरघळून गेली. विनुला बिपीचा त्रास ३०व्या वर्षापासूनच आहे. नंतर रक्त पातळ ठेवायच्या गोळ्या सुरू झाल्या.


लग्नानंतर दहा वर्षांनी का होईना सर्व काही छान झाले होते. प्रमोशन, नंतर कंपनीची मोठी जागा, फोन, मनाजोगते लाकडी सामान, कंपनीत जाण्यायेण्याचा त्रास नाही. दुपारचे गरम गरम जेवायला विनु घरी येत होता. हा आनंद अगदी थोडे दिवसच टिकला. कंपनीने विनुला तळोजा फॅक्टरीत जायला सांगितले. तो रोजच्या रोज तळोजाला कंपनीच्या कारमधून जायला लागला. विनुबरोबर मनिशही जात होता. कार चालवण्यासाठी कंपनीचा ड्राइव्हर होता. त्यातही त्याची रात्रपाळी सुरू झाली. कंपनीची कार असली तरी जाण्यायेण्यात २-३ तास मोडत होते. येताजाता ट्रॅफीकचा मुरांबाही होताच. एक दिवस रात्रपाळी संपवून विनायक आणि मनिश कारमधून घरी आले. कार तशीच ठेवली. मनिशलाही तू थांब असे सांगितले. ड्राईव्हरला पण थांबायला सांगितले. विनुच्या पोटात खूपच दुखत होते. घरी आल्यावर कॉटवर तो थोडा आडवा पडला. त्याला ताप भरत होता. त्यातच त्याला खूप मोठी उलटी झाली. उलटीमध्ये थोडे रक्तही गेलेले दिसले. ती उलटी मी लगेच साफ केली आणि मनिशला इंटरकॉमवर फोन केला. नंतर आम्ही दोघे व मनिश डॉक्टरांकडे कंपनीच्या कार मधूनच गेलो. त्यांनी तपासले. एक्सरे काढले. त्यात अपेंडिक्सचे ऑपरेशन लगेचच करायला सांगितले नाहीतर ते आतल्या आत बर्स्ट होण्याची शक्यता आहे.


हॉस्पिटलमध्ये लगेचच ऍडमिट केले. सर्व चाचण्या केल्या. ऑपरेशन पूर्ण होईपर्यंत मनिश माझ्यासोबतच होता. मी मनातून घाबरले होते याचे कारण रक्त पातळ होण्याच्या गोळ्या विनु घेत आहे आणि त्यात ऑपरेशन ! मन अस्वस्थ होते. मनिश म्हणाला तू टेंशन घेऊ नकोस. डॉक्टर सर्व व्यवस्थित करतील. विनुने डॉक्टरांना सांगितले होते की तो रक्त पातळ होण्याच्या गोळ्या घेत आहे. हे सांगून सुद्धा डॉक्टरांनी नीट काळजी घेतली नाही. ऑपरेशन यशस्वी झाले पण जखम बरी न होता त्यातून रक्त वहायला लागले. नंतर लगेचच मी सासरी माहेरी फोन करून कळवले. श्री नेर्लेकर, राहूल जोशीला पण फोन केला आणि सांगितले. डोंबिवली वरून राहूल, वैशाली, जोशीकाका आणि नेर्लेकर लगेचच धावत आले. सलाईन मधून रक्त द्यायला सुरवात केली होती. पण हे असे किती वेळ चालू रहाणार म्हणून मी श्री नेर्लेकर यांना सांगितले की तुम्ही प्लीज डॉक्टरांना विचारता का? की ब्लड का थांबत नाहीये. त्यावर काही उपाय नाहीये का? तसे लगेचच त्यांनी विचारले. तिथले डॉक्टर पण चिंतेत पडले होते. नेर्लेकरांनी मला येवून सांगितले की आता नानावटीला हालवायचे आहे. सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आणि मध्यरात्री तातडीने अंब्युलन्स मधून आम्ही सर्व नानावटी हॉस्पीटल मध्ये गेलो.


तिथे डॉक्टर दिक्षीत म्हणाले की पोटातून रक्त कुठून येत आहे ते पहायला हवे त्याकरता मला एक मोठी सर्जरी करावी लागेल. पोट फाडून बघायला हवे. डॉक्टरांनी सांगितले की सर्जरी कमीतकमी ४-५ तास चालेल. मी तुम्हाला आता काहीही सांगू शकत नाही. डॉक्टरांनी असे सांगितल्यावर माझ्या पायाखालची जमीन पूर्णपणे सरकली. रात्रभर ऑपरेशन चालू होते ते पहाटे संपले. ऑपरेशन यशस्वी झाले. नंतर विनुला शुद्ध आली आणि मला खूपच हायसे वाटले. विनुला सलाईन आणि ब्लडही देत होते. नाकातोंडात नळ्या होत्या. ते बघून मला खूप वाईट वाटत होते.


ऑपरेशन चालू असताना रात्रभर मी गजानन महाराजांचा जप करत होते. तरी सुद्धा अधुन मधून मला हुंदका येत होता. ती रात्र मी कशी काढली ते माझे मलाच माहीत. अर्थात माझ्याबरोबर मला धीर द्यायला डोंबिवलीकर होते. नंतर कंपनीतल्या सर्वांनी मला मदत केली. सकाळी सुषमा आणि पारखी वहिनी आल्या. मौमिताने मला जेवण पाठवले होते. सुषमा म्हणाली की तू आधी शांतपणे जेवून घे आणि थोडी आडवी हो. आम्ही आहोत सोबत. आडवी झाल्यावर मला थोडी डुलकी लागली आणि बरे वाटले. पहाटे आईबाबा- सासूसासरे आले. नंतर थोड्यावेळाने सुषमा, नेर्लेकर, राहूल वैशाली, जोशी काका डोंबिवलीला गेले. मला दोन्ही वेळेला मौमिता जेवणाचा डबा पाठवत होती. हॉस्पिटल मध्ये आधी मी रात्रीची झोपायला जायचे. पण तिथे कूलर असल्याने माझे डोके भणभणायला लागायचे म्हणून मग रात्री सासरे झोपायचे व दिवसा पूर्ण दिवस मी असायचे. शुभांगीला पोळ्याही करत जा असे सांगितले. शिवाय बाहेरून भाजी आणून ती चिरूनही दे. कणिकही भिजवून दे असे सांगितल्यावर ती म्हणाली तुम्ही काहीही काळजी करू नका. धुणे-भांडी-केर-पोछा या कामाशिवाय मी जास्तीचे काम तिला दिले होते. तिला तसे जास्तीचे पैसेही दिले.आई आमटी भात भाजी करायची. नंतर सुरेश-रंजना सई आले. हळूहळू विनायकच्या तब्येतीत सुधारणा व्हायला लागली.


एकाशी एक बसून काय करणार ना? म्हणून मग आईबाबा-रंजन सुरेश पुण्याला गेले आणि सांगताना सांगून गेले की काहीही लागले तरी लगेच फोन कर. नंतर काशी आत्या आल्या. नंतर हळुहळू विनुची तब्येत सुधारत गेली. होळीच्या दिवशी विनू पुर्ण बरा होऊन घरी आला. त्याचे वजनही बरेच कमी झालेले होते. नंतर लगेचच सासूसासरे व काशी आत्या त्यांच्या घरी जायला निघाले. सासरची माहेरची मंडळी, राहूल, वैशाली, जोशी काका, सुषमा आणि नेर्लेकर, काशी आत्या आणि कंपनीतल्या सर्वांनी मला मदत केली. आधार दिला.


ऑपरेशन होण्या आधी हिंदुस्तान लिव्हरचे अंधेरी मधले सेंटर बंद करायच्या मार्गावर आहेत आणि काही जणांना बंगलोरच्या ऑफीस मध्ये पाठवणार आहेत अशी बातमी कळाली. जेव्हा एखादे युनिट बंद होते आणि दुसरीकडे हालवतात त्यात नोकरी जाण्याची दाट शक्यता असते. विनायकने दुसरी नोकरी शोधायला सुरवात केली. दरम्यान विनुचा एक मित्र तांडेल अमेरिकेवरून भारतभेटीसाठी आला होता आणि तो विनायकला भेटण्यासाठी आमच्या घरी आला. तो विनायकला म्हणाला की तू अजूनही अमेरिकेत post-doctorate करण्यासाठी जाऊ शकतोस. त्याने त्याच्या गाईडचा पत्ता दिला. त्यावेळेला नुकतेच इंटरनेट सुरू झाले होते म्हणून विनुने अमेरिकेत post-doctorate साठी अर्ज केला. हे शिक्षण नाही. त्यामुळे पदवी नाही. विद्यापिठात संशोधन करायचे. संशोधन केलेल्या कामाचे पेपर्स Scientific Journals मध्ये प्रकाशित होतात. दोघांचे भागेल इतपत शिष्यवृत्ती असते. गाईडचे लगेचच उत्तर आले. श्री गाडगीळ यांनी रेको दिली आणि विनुने वयाच्या ४० व्या वर्षी अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला. आम्हाला जावेच लागले. अन्नासाठी दाही दिशा म्हणतात ना ! कंपनीचा राजीनामा दिला आणि २००१ साली आम्ही अमेरिकेत आलो.हॉस्पिटलमध्ये असतानाच अमेरिकेचे बोलावणे आले. नंतरच्या भागात लिहीनच अमेरिकेतल्या घरांचे वर्णन व आठवणी. तोपर्यंत वाचत रहा. Copy Right Rohini Gore

क्रमश : ...


Thursday, April 04, 2024

सुंदर माझं घर ..... (३)

डोंबिवलीच्या आमच्याच घरात नाखुशीनेच पाय ठेवला. पेइंग गेस्ट लोकांनी आमची जागा अजिबातच चांगली ठेवली नव्हती. खूप कचरा फेकला आणि फरशी व ओटा खसाखसा घासून जागा स्वच्छ केली. जागेत फक्त एकच कॉट होती पूर्वी एखाद वर्ष विनू या जागेत राहिला होता तेंव्हाची. ही कॉट दोघांना झोपायला पुरेशी नव्हती. त्यामुळे खाली गाद्या घालूनच झोपत होतो. स्वैपाकाची सर्व भांडीकुंडी, डबे, ताटे, कपबशा बसेल अशी एक मांडणी आम्ही बाजारातून आणली. ही मांडणी ६ फूटी होती. मला खूपच आवडली होती. या मांडणीत कपबशाळे, ताटाळे होते. शिवाय झारे कालथे, चमचे अडकवून ठेवता येत होते. पातेल्या, सर्व डबे, अगदी छान बसले या मांडणीत. ओट्यावर गॅस ठेवला आणि आमची दैनंदिनी सुरू झाली. नंतर लगेचच मला काविळ झाली. कडक पथ्य सुरू झाले. उकडून भाज्या आणि हलका आहार सुरू झाला. प्रचंड प्रमाणात अशक्तपणा आला होता. पाणी उकळून व नंतर गार करून पीत होतो. नंतर काही दिवसांनी विनुला मलेरिया झाला. त्यालाही खूपच अशक्तपणा आला होता. डोंबिवली ही डासांकरता खूप प्रसिद्ध आहे. संध्याकाळी आठवणीने सर्व दारे खिडक्या बंद करून घ्यायला लागायची. डासांकरता गुडनाईटच्या वड्या वापरायला सुरवात केली.


मी विनुला म्हणाले की मी तुझा प्रिसिनॉपसिस टाईप करून देते. त्याकरता पाध्ये टाईपराईंटींग संस्थेत आम्ही टाईपराईटर भाड्याने घेतला. त्यावर ८-१० पानी प्रिसिनॉपसिस टाईप केला. पाध्ये यांना सांगून ठेवले की मला नोकरीची अत्यंत आवश्यकता आहे. तुमच्या माहितीत कुठे व्हेकन्सी असली तर मला नक्की सांगा. आमच्या घराचा पत्ता लिहून दिला. त्यावेळी आमच्याकडे लॅंडलाईन फोन नव्हता. मोबाईलचा प्रश्नच येत नाही. विनायक त्याच्या गाईड कडे एका प्रोजेक्टवर काम करत होता त्यामुळे थोडेफार पैसे मिळत होते. त्याकरता तो आठवड्यातून २-३ वेळेला आयायटी मध्ये जात होता. आमच्या घरात विनायकने सतरंजीवर बसून त्याचा थिसीस लिहायला सुरवात केली. मी रोज देवपूजा करताना "देवा देवा मला नोकरी लागू दे" असा जप करत होते. देवाने माझे म्हणणे ऐकले. एके दिवशी दळण गिरणीत टाकले आणि एका दुकानात काहीतरी घेण्याकरता रत्यावरून जात होते. रस्त्यातच श्री पाध्ये मला भेटले आणि मला म्हणाले की बरे झाले तुम्ही भेटलात, मी तुमच्या घरीच यायला निघालो होतो. त्यांनी मला एव्हरी इंडिया लिमिटेडचे श्री देवधर ब्रांच मॅनेजरचे कार्ड दिले आणि सांगितले की डोंबिवली एम आय डी सी मध्ये ही कंपनी आहे तिथे एक व्हेकन्सी आहे. मला आनंद झाला. लगेचच दुसऱ्या दिवशी माझा एक बायोडाटा तयार करून टाईप केला आणि कंपनीत गेले. श्री देवधरांनी माझा बायोडाटा वाचला आणि लगेचच म्हणाले की या उद्यापासून. तुम्हाला ४ वर्षाचा अनुभव आहे. पदवीधर आहात. आणि तुम्हाला बाकीची स्किल्स पण आहेत म्हणजे टायपिंग शॉर्ट हॅंड, पंचिग. शिवाय तुम्ही आधीच्या कंपनीत काय काम केलेत हे पण सर्व लिहिले आहेत. आता अजून मी काय विचारणार? त्यांनी माझ्यासाठी चहा बिस्किटे मागवली. घरी कोण कोण असते विचारले. नवरा काय करतो? विचारल्यावर मी सांगितले की पिएचडी पूर्ण झाली आहे फक्त थिसीस लिहायचा बाकी आहे. त्यांनी लगेच भिवया उंचावल्या आणि म्हणाले व्हेरि गुड !


त्यांनी मला कंपनीची थोडीफार माहिती सांगितली आणि हे पण सांगितले की ही नोकरी कायमस्वरूपी नाही. रोज ५० रूपयेप्रमाणे तुम्हाला पगार मिळेल. आमच्या बाकीच्या ब्रांच मध्ये पण अशा टेंपररी पोझिशन्स आहेत. मी म्हणाले मला मंजूर आहे. मी कामावर रूजू होते. Avery India Limited मध्ये नोकरी मिळाल्यावर आम्हाला दोघांना खूप दिलासा मिळाला. मी विनुला म्हणाले की तू आता कोणतीच काळजी करू नकोस. शांत चित्ताने थिसीस लिही. माझी नोकरी ऑक्टोबर १९९० पासून सुरू झाली. माझा पगार खूप तुटपुंजा होता. वाण्याचे सामान, कामवाली बाई आणि अर्धा लिटर दूध, कामावर जाण्यासाठी जाताना रिक्शाचा खर्च यामध्ये भाजी आणण्याकरता इतके कमी पैसे उरायचे की मी बाजारात न जाता कोपऱ्यावर मिळणाऱ्या भाजीवाल्याकडे जायचे आणि फक्त ५ रूपयाची पावशेर भाजी विकत घ्यायचे. अर्ध्या लिटर दुधामध्ये फक्त २ वेळा चहा आणि सकाळी आम्हाला पिण्यापुरतेच असायचे. दूध पण खूप पातळ असायचे. रात्री मुगडाळीची खिचडी किंवा वरण भात असायचा. सोबत कोशिंबीर, पापड काहीही नसायचे. एखाद वेळेस मी कोशिंबीर करायचे. आम्ही रोजच्या रोज पैसे मोजायचो आणि महिना संपायला अजून किती दिवस बाकी आहेत तेही पहायचो. त्यावेळेला सर्वांनाच कॅश पगार दिले जात होते. मी कामावर जाताना रिक्षेने जायचे कारण आमच्या जवळच्या बस थांब्यावर बस कधीच थांबायची नाही. खूप भरून यायची. सुरवातीला मी मुख्य बस थांब्यावर जाण्यासाठी मी चालत जायचे पण गर्दी असायचीच.
या नोकरीमध्ये अधुन मधुन ब्रेक मिळेल असेही सांगितले होते. त्याप्रमाणे ३१ डिसेंबर ला मला ब्रेक मिळाला. आम्ही परत चिंतेत पडलो. पण २ दिवसातच बोलावणे आले. नंतर काही महिन्यांनी श्री देवधर यांनी पूर्ण १५०० मिळतील असे सांगितले. म्हणजे बरे वाटत नसताना मी कामावर गेले नाही तरी मला ५० रूपये त्या दिवसाचे मिळणार होते. श्री देवधर यांनी माझ्यासाठी "हिची कायमस्वरूपी नोकरी व्हावी" अशी शिफारस मुंबई मधल्या जनरल मॅनेजर कडे केली होती. त्यादिवशी मी ऑफीसममध्ये कुरियरची वाट पहात होते कारण माझे Appointment letter (कायमस्वरूपी) नोकरीचे येणार होते. मला पगार पण चांगला मिळाला असता. शिवाय सर्व बॅंक होलीडेज होते. शनिवारी हाफ डे असायचा. चांगल्या पगाराची कायमस्वरूपी नोकरी आणि ती सुद्धा गावातल्या गावात ! पण माझे नशिब इतके काही छान नव्हते. पत्र आले नाही. त्यामुळे मी खूप नाराज झाले. श्री देवधर म्हणाले मी काही करू शकत नाही. तुझी शिफारस करण्यापलीकडे माझ्या हातात काही नाही. १५०० रूपयांची गावातल्या गावात असलेली नोकरी सोडवत नव्हती. पण नंतर माझ्या काही वैयक्तिक कारणांमुळे मी 1993 साली नोकरीला बायबाय केले.
१९९१ डिसेंबर मध्ये विनायकला हिंदुस्तान लिव्हर - अंधेरी मध्ये (R & D ) सेक्शनला नोकरी लागली आणि आम्ही दोघेही कामावर जाऊ लागलो. विनायक कामावर जाताना डबा नेत नव्हता. मी माझ्यापुरती पोळी भाजी डब्यात घेऊन जायचे. आदल्या रात्री ड्रेस/साडी जी नेसायची असेल ती मी आधीच काढून इस्त्री करून ठेवायचे म्हणजे सकाळी घाई होत नसे. तसेच विनायकच्या शर्ट पॅंटला पण आदल्या दिवशीच इस्त्री करून ठेवायचे. जेव्हा मी एकटीच कामाला जायचे तेव्हा कामावरून आल्यावर विनु मला चहा करून द्यायचा. थिसीस लिहिताना अधुन मधुन ब्रेक घ्यायचा तेव्हा केरवारे करायचा. पूजा करायचा. धुणे-भांडी करायला इंदुबाई यायची. थिसीस लिहून पूर्ण झाल्यावर विनायकने तो एकाकडून इलेक्ट्रोनिक टाईपराईवर टाईप करुन घेतला. अर्थात पैसे देवूनच. त्यावेळेला लेझर प्रिंटिंग नवीनच होते. थिसीसमध्ये केमिस्ट्रीच्या आकृत्याही होत्या. ३३२ पानांचा जाडजूड थिसीस म्हणजे एक पुस्तकच ! मी उत्सुकतेने पाने उलटली पण मला ओ की ठो कळाले नाही. ऑरगेनिक केमिस्ट्रीची भाषा आणि आकृत्या! विनायकने थिसीस सुपूर्त केला. मी आयायटी मध्ये विनायकच्या पिएचडीच्या डिफेन्सला गेले होते. सर्वात मागे बसले होते. विनुचा थिसीस दोन ठिकाणी पाठवला होता. एक भारतामध्ये आणि एक अमेरिकेत. डिफेन्सला भारतातल्या आणि अमेरिकेतल्या परिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची विनुने छान उत्तरे दिली. थोडक्यात तोंडी परिक्षा. डिफेन्स खूपच छान झाला पदवीदान समारंभाला विनायकला हजर रहाता आले नाही कारण नोकरी लागली होती.


पिएचडी झाल्यावर आम्ही आमच्या सोसायटीतल्या लोकांना पेढे दिले. एव्हरी इंडिया लिमिटेडचे ब्रांच मॅनेजर श्री देवधर यांना ठाण्यात त्यांच्या रहात्या घरी जाऊन पेढे दिले. आईनेही पेढे वाटले. आईबाबांनी विनुला टायटनचे घड्याळ व मला लाल रंगाची बडोदा सिल्कची साडी घेतली. हिंदुस्तान लिव्हर मध्ये interview ला गेल्यावर तिथल्या डॉक्टर नंबुदिरी यांनी विनायकला विचारले की आयायटी मधली सर्वजण अमेरिकेत जातात पोस्ट-डॉक्टरेट ( Post Doctorate ) करण्यासाठी. तुझा जर अमेरिकेत जायचा विचार असेल तर जॉइन होऊ नकोस. ते भलतेच खुश झाले होते विनायक वर !हिंदुस्तान लिव्हर मध्ये विनायकला चांगला पगार होताच पण इतर सुविधाही खूप छान होत्या. फक्त एकच होते येण्याजाण्याचा त्रास खूप होता. सकाळी १२ डब्याची लोकल त्याला ७.१२ ला पकडायला लागायची. डोंबिवली वरून घाटकोपरला उतरून अंधेरीत तिघे मिळून शेअर रिक्शाने जायचे. येताना मित्राबरोबर अंधेरी मुलुंड बसने व नंतर मुलुंड डोंबिवली ट्रेन ने. किंवा अंधेरी-दादर आणि दादर सेंट्रलला येऊन ट्रेनने डोंबिवली. येताना-जाताना खूपच गर्दी असायची. जेमतेम उभे रहायला मिळायचे. कामावरून येण्याची वेळ अनिश्चित होती त्यामुळे घरी यायला त्याला आठ ते साडे आठ होत असत. आल्या आल्या लगेच अंघोळ व चहा नाश्ता करायचा व थोड्यावेळाने जेवण.


शनिवारी अर्धा दिवस असल्याने ४ तासांकरता त्याचा पुर्ण दिवस वाया जायचा. आम्ही १० वर्षे डोंबिवली सोडून कुठेही बाहेर फिरायला पडलो नाही. विनुला जेमतेम एकच दिवस मिळायचा विश्रांतीसाठी. आमची करमणूक म्हणजे डोंबिवलीतल्या थिएटर वर सिनेमे पहाणे हिच होती. विनायकला नोकरी लागल्यावर पहिली खरेदी म्हणजे कपडे ठेवायला गोदरेजचे कपाट घेतले आणि व्होल्टाजचा फ्रीज घेतला. फ्रीज व गोदरेज कपाट कंपनीनेच दिले होते. (White goods) हॉलमध्ये कार्पेट घेतले आणि कोणी आले तर बसायला ४ खुर्च्या घेतल्या. दुधही वारणा/गोकुळ घेऊ लागले. घरीच दही, ताक, लोणी, तूप करू लागले. भाजी मार्केट मध्ये जाऊन भरपूर भाज्याही आणायचे. इंदुबाईला सर्व काम दिले होते म्हणजे धुणे-भांडी-केर-पोछा. नंतर काही दिवसांनी वॉशिंग मशीन घेतले. ते गुलाबी रंगाचे होते. १९९२ साली आम्ही दोघे गोव्याला ४ दिवसांच्या ट्रीपला गेलो. ही ट्रीप खूपच छान झाली.



एके वर्षी आम्ही कुलू मनालीला जायचे ठरवले. तिथे हिंदुस्तान लिव्हरचे guest house होते. महालक्ष्मी स्टेशनवरून दिल्लीला ट्रेन होती. मी जाण्यास इतकी उत्सुक नव्हते. माझे मन अस्वस्थ होते. काहीतरी वाईट घडणार असे सारखे वाटत होते. जे वाटत होते ते मी विनुला सांगितले नाही. शेजारच्या पारखी वहिनी मला म्हणाल्या अगं तू कुठे बाहेर फिरायला गेली नाहीस ना कधी म्हणून तुला असे वाटत असेल. बाहेर पडल्यावर तुला उत्साह येईल. मधे वाटेत खाण्यासाठी मी गोडाचा शिरा आणि तिखटामीठाच्या पुऱ्या करत होते. पारखीवहिनी मला मदत करत होत्या आणि सांगत होत्या की जा रोहिणी तू फिरायला मस्त एन्जॉय कर. दिल्लीला जाणारी ट्रेन रात्री १० ची होती. आम्ही आमच्या सामानासकट डोंबिवलीवरून महालक्ष्मी स्टेशनवर पोहचलो. आम्ही दोघांनी नुकतेच काही नवीन ड्रेस घेतले होते. एका आठवड्याची ट्रीप म्हणल्यावर ते सर्व नवीन ड्रेस बॅगेत भरले. एका पिशवीत खाण्यापिण्याचे सामान होते. वरच्या पर्स मध्ये १००० रूपये दिल्लीवरून पुढच्या प्रवासा साठी आणि खर्चाला ठेवले होते. ४००० रूपये बॅगेत ठेवले होते. महालक्ष्मीला दिल्लीला जाणारी ट्रेन लागली. गर्दी नव्हती. जरा विचित्रच वाटत होते. रेल्वेत आम्ही आमच्या सीटवर जाऊन बसलो. आम्हाला समोरासमोर खिडकीजवळच्या जागा मिळाल्या होत्या. आम्ही आमच्या दोन्ही बॅगा आमच्या वर असलेल्या फळीवर ठेवल्या. प्रवासी येत होते पण जास्ती नव्हते. हमाल येवून प्रवासांच्या जड जड बॅगा वर ठेवत होते. रेल्वे रूळावरून हळूहळू जाऊ लागली. काही मिनिटांनी आता थोडे खाऊन घेऊ म्हणून वर पाहिले तर आमची बॅग नाही. पोटात धस्सच झाले. रिझर्वेशन केलेल्या त्या डब्यात आम्ही दोघेही आमची बॅग कुठे कुणी चुकून उचलून दुसरीकडे ठेवली आहे का ते पाहू लागलो. एका प्रवाशाला पुढचे स्टेशन कोणते ते विचारले तर त्याने सांगितले बोरिवली. मनात विचार आला की ट्रेनची चेन ओढायची का? पण नको. आता काय करायचे? एकच पर्याय होता तो म्हणजे बोरिवली स्टेशन वर उतरणे. खाण्याची पिशवी घेतली. पर्स माझ्याजवळच होती. बोरिवली स्टेशनला उतरून स्लो लोकलने आम्ही व्हाया दादर डोंबिवलीस मधरात्री आमच्या घरी आलो. प्रचंड भूक लागली होती. प्रवासात खायला घेतलेले घरीच खाल्ले. खूप रडायला आले मला. सकाळी आमचे घर उघडे कसे? म्हणून वर रहाणारे सुषमा आणि नेर्लेकर आमच्या घरी आले आणि त्यांनी आम्हाला खूप धीर दिला. प्रत्येक बाईला सिक्थ सेन्स असतो. तो माझा खूपच तीव्र आहे. विनायक म्हणाला तुला अस्वस्थ वाटत होते तर मला का नाही सांगितलेस? परत असे कधी वाटले तर मला सांगत जा. त्या घटनेपासून असे काही वाटत असेल तर मी त्याला लगेचच सांगते.


नोकरी लागल्यावर परत आमचा घराचा हफ्ता दादांना पाठवायला सुरवात झाली. १९९५ साली शेवटचा ५०,००० एकरकमी हफ्ता देऊन घराचे एक लाख वीस हजार कर्ज व्याजासकट फेडले. आम्हाला खूप समाधान वाटत होते. ही रक्कम आता खूप थोडी वाटेल पण त्यावेळेला खूप होती. १९९६ साली आमच्या घरी ओनिडा रंगीत टेलिविजन आला व घरच्याघरी थोडी करमणूक व्हायला लागली. एक दिवस चुन्यामध्ये थोडा रंग घालून सर्व फ्लॅटला रंग लावून घेतला. जेव्हा विनू थिसीस लिहीत होता तेव्हा आमच्याकडे अर्चना शिकायला यायची. श्री वाजपेयी जे आमच्या घरी पेइंग गेस्ट म्हणून रहात होते ते आमच्या संपर्कात होते. त्यांच्या मित्राच्या मुलीला ९ वी मध्ये थोडे कमी मार्क मिळाले म्हणून वाजपेयींनी विनुला विचारले होते की अर्चनाचा अभ्यास घ्याल का? त्याप्रमाणे ती यायला लागली. तिच्या ओळखीने अजून ५-६ जणी येवू लागल्या. रविवारी सर्व जणी सकाळच्या यायच्या. मी सर्वांना खायला पोहे-उपमे करायचे. चहाही देत होते. विनुने अर्चनाला १० वी ते बीएससी पर्यंत सर्व विषय शिकविले. ती आमच्या घरी रोज अभ्यासाला यायची. विनु कामावरून आला की नंतर अर्चनाचा अभ्यास घेत होता. शनिवार रविवारही यायची. मी रोज संध्याकाळी तिची वाट बघायचे. ती पण आल्यावर विचारायची आज काय केले काकू खायला? रविवारी मी तिला आमच्याबरोबरच जेवायला बस असे सांगायचे. आम्ही दोघे पण तिच्या घरी शनिवार-रविवार कडे रात्री जेवायला जायचो. काकू नक्की या हं जेवायला असे बजावून सांगायची. अर्चना आमच्या घरातलीच एक होऊन गेली. अर्चनाची बहिण अदिती पण शिकायला यायची. अर्थात नंतर ती कॉमर्सला गेली. ती फक्त ९वी १०वी मध्ये होती तेव्हा यायची. त्या दोघींना आम्ही १० वी १२ वी झाल्यावर ड्रेसला कापड गिफ्ट म्हणुन दिले होते. गणपतीत आम्ही दोघे त्यांच्याच घरी जेवायचो. गणपतीचे आग्रहाचे निमंत्रण असायचे. शिवाय मला अर्चनाची आई नवरात्रात सवाष्ण म्हणून बोलवायच्या. अर्चना व इतर मुलींना विनुने फुकट शिकविले. तो म्हणाला विद्या नेहमी दान करावी. मलाही तेच वाटत होते.
नोकरी सोडल्यावर मी जेव्हा घरी होते तेव्हा अधुन मधून आमच्या शेजारच्या पारखी वहिनींबरोबर मी सकाळी बाजारात भाजी घ्यायला जायचे. दोघी घरी आलो की चहाबरोबर खारी खायचो. त्यादिवशी आम्ही दोघी एकत्रच जेवायचो. जेवण आमच्या घरीच व्हायचे. त्यांना माझ्या हातची मुगाच्या डाळीची खिचडी खूप आवडायची. मुगाच्या डाळीच्या खिचडीबरोबर भाजलेला पोह्याचा पापड, खिचडीवर साजूक तूप आणि चिरलेली कोथिंबीर व ओल्या नारळाचा खव. शिवाय एका ताटलीत भरपूर गोल पातळ कांदा, टोमॅटो, काकडी, गाजर व मुळ्याचे कापही करून ठेवायचे. नंतर सायीचे दही व ताजे ताक. असा आमच्या दोघीचा बाजारहाट खूप मजा देऊन जायचा. लिंबू सरबत, लोणची, मुरांबे गुळांबे करायला मला उत्साह आला होता.दळणांमध्ये गव्हाच्या पीठाबरोबर, डाळीचे, तांदुळाचे पीठ, अंबोळीचे पीठ आणि थालिपीठाची भाजणी आनंदाने करू लागले होते.


मी कंपनी सेक्रेटरीचा कोर्स केला पण माझ्या काही वैयक्तिक कारणांमुळे तो पूर्णत्वास नेला गेला नाही. नंतर मी सी-डॅकचा Advanced Diploma of Computer Programming चा कोर्स केला. १९९९ साली विनुला प्रमोशन मिळाले आणि आम्ही अंधेरी मधल्या कंपनीच्या क्वार्टर्स मध्ये रहायला गेलो. Copy Right - (Rohini Gore)

Sunday, March 31, 2024

स्वातंत्र्यवीर सावरकर

 सर्व भारतीयांनी पाहीलाच पाहिजे असा हा चित्रपट आहे. सर्व इतिहास दाखवला आहे. सर्व स्वातंत्र्यवीर दाखवले आहेत. गांधी, टिळक, गोखले, सुभाषचंद्र बोस, सेनापती बापट, कान्हेरे, चापेकर बंधू ,नथुराम गोडसे, मदनलाल धिंग्रा, भगतसिंग. सावरकर यांना इंग्लंडला जाण्यासाठी टिळक यांनी शिफारसपत्र दिले. शिवाय सावरकरांच्या बायकोच्या वडिलांनी पैशाची तरतुद केली. विदेशी वस्तुंची होळी दाखवली आहे. सावरकरांची समुद्रातली उडी दाखवली आहे. हुडा यांनी सावरकरांचा अभिनय तर चांगला केलेलाच आहे. शिवाय सिनेमाचे दिग्दर्शन अप्रतिम आहे. इतिहास दाखवणे हे सोपे काम नाही. काश्मिर फाईल्स, कलम ३७०, सॅम बहादुर हे सर्व सिनेमे विनायकला व मला दोघांनाही खूपच आवडले. पण सर्वार्थाने चांगला स्वातंत्र्यवीर सावरकर ! सर्व क्रांतीकारकांचा इतिहास दाखवला आहे हे खरच खूप विशेष आहे. काळ्या पाण्याची शिक्षा बघताना हृदय पिळवटून निघते आणि ओक्साबोक्शी रडायला येते. असे दाखवणे हे सोपे काम नाही. सर्व वडिलधाऱ्या भारतीयांनी तर हा सिनेमा पहावाच. सोबत पुढील पिढीला बघण्याचा आग्रह करावा. Rohini Gore

Friday, March 29, 2024

सुंदर माझं घर ..... (२)

 

आयायटी - पवईच्या आवारात काहीही मिळत नसल्याने आम्हाला गेटच्या बाहेर भाजीपाला आणि वाण सामान आणण्याकरता जावे लागे. रस्ता क्रॉस केल्यावर मोजकीच काही दुकाने होती. त्यात महाराष्ट्र ग्रेन नावाचे वाणसामानाचे दुकान होते. तिथे मी दर महिना सामानाची यादी टाकायचे आणि सामान घरपोच यायचे. या दुकाना शेजारीच एका केरळी माणसाचे भाजीचे दुकान होते पण तिथे सर्वच्या सर्व भाज्या मिळायच्या नाहीत. माझी मुंबईत भाजी खरेदी करण्याची पहिलीच वेळ होती. पुण्यात आईकडे असताना आम्ही दोघी बहिणी आईबरोबर मंडईत जायचो. मुंबईत भाजी ठेवण्यासाठी कॅरी बॅगा मिळत. शिवाय ४ आण्याचा मसालाही मिळतो हे माझ्यासाठी नवीन होते. या मसाल्यात मिरच्या, कोथिंबीर, कडीपत्ता आणि आलं मिळायचे. मी व भैरवी एक दिवसा आड भाजी खरेदीसाठी जायचो. भाजी दुकानाच्या थोडं पुढे गेले की एक लक्ष्मी नावाचे टपरीवजा हॉटेल होते. तिथे आम्ही दोघे कुल्फी खायचो. ही कुल्फी ६ रूपयाला मिळायची. गोल आकाराची कुल्फी एका स्टीलच्या छोट्या थाळीत मिळत असे. चांगली जाडजूड असे.


लग्नानंतर आम्ही आमच्या सणांना पुण्याला जायचो. आम्ही रिझर्व्हेशन करून कधीच गेलो नाही. रेल्वे मध्ये उभे राहून प्रवास करायला आम्हाला मजा वाटायची. आम्ही पुण्याला जायचो तसेच डोंबिवलीलाही अधुन मधून जायचो. महाराष्ट्र ग्रेन किराणामालाच्या दुकानात अमुल श्रीखंड मिळायचे व त्रिकोणी जाड पुठ्याच्या अमुल दुधाच्या पिशव्या मिळायच्या. ह्या पिशव्या आयत्यावेळी कोणी आले तर चहा करण्यासाठी उपयोगी पडायच्या. नंतर आयायटी ते घाटकोपर बससेवा सूरू झाली. ही बस सूरू झाली तेव्हा आम्हाला खूप उपयुक्त ठरली. त्यावेळेला घाटकोपरला जाऊन पाणी पुरी व भेळ पुरी खाणे होत असे. एकदा उन्हाळा सुरू झाला तेव्हा मी व भैरवीने घाटकोपरला जाऊन गार पाण्याचे "माठ" आणले होते बसमधून!! गाऊनही घेतले होते.


भाजीच्या दुकानातला केरळी मुलगा रोज रात्री वसतिगृहात यायचा २ मोठ्या पिशव्या घेऊन. त्यात केळा वेफर्स, सर्व प्रकरची बिस्कीटे, चिवडे, फरसाण ब्रेड व अंडी असायची. एकदा आम्ही सर्व बायकांनी मिळून त्याला पटवले की आमच्याकरता तू रोज भाजी आणशील का? त्याने अजिबात आढेवेढे घेतले नाहीत कारण त्याचीच भाजी विकली जायची. जेव्हा तो मुलगा केळा वेफर्स वगैरे घेऊन यायचा तेव्हा आम्ही बायका भाज्यांची यादी तयार ठेवायचो व त्याला द्यायचो. तो दुसऱ्या दिवशी सकाळी भाजी आणून द्यायचा. वसतिगृहामध्ये आमच्या कोणाचे फोन आले की रखवालदार खूप जोराने ओरडून नंबर पुकारायचा. आमच्या खोल्या तिसऱ्या मजल्यावर होत्या. जिने भराभर उतरून खाली जास्तपर्यंत काही वेळा फोन ठेवलेला असायचा. आईबाबा मला फोन करायचे माझी खुशाली विचारण्याकरता. तिथे खालीच एका बोर्डवर आम्हाला आलेली पत्रे असायची. त्यात पोस्ट कार्ड व इनलॅंड पत्रेही असायची. त्यात आईबाबांचे पत्र आलेले दिसले की मला खूपच आनंद होत असे. पत्रे वाचताना मनामध्ये त्यांचे चेहरे उमटत. मी पण आईबाबांना पत्रे लिहायचे पण त्यात मी केलेल्या पदार्थ्यांच्या रेसिपीच जास्त असायच्या.
६ महिन्या नंतर विनुची शिष्यवृत्ती १२०० वरून २१०० रूपये झाली. डोंबिवली मधल्या जागेत पेइंग गेस्ट पण नंतर मिळेनात म्हणून ९०० रूपये हफ्ता दादांना पाठवून आम्ही परत १२०० मध्येच होतो. शिष्यवृत्ती वाढल्यावर पहिले काय केले असेल तर २ गाद्या, २ उशा, करून घेतल्या. नंतर मला कळाले की आयायटीच्या बाहेर एक बाई शिवण शिकवते. त्यामुळे मी शिवणाचा क्लास लावला व धुणे-भांडी-केर-पोछाला भारतीला काम दिले. ही मुलगी खूप चुणचुणीत होती. हा क्लास दुपारी ३ ते ५ होता आणि खूपच लांब मी जाता येता चालत जायचे. मला पंजाबी ड्रेस आणि ब्लाऊज शिवायला शिकायचे होते. त्या बाई म्हणाल्या आधी बाळाचे छोटे कपडे, म्हणजे लंगोट, झबली टोपडी शिवा म्हणजे तुम्हाला सराव होईल.


एके दिवशी आम्हाला कळाले की लग्न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ब्लॉक्स देणार आहेत आणि ते सुद्धा लाकडी सामानासह! आम्ही रोज पहायला जायचो बांधकाम कुठपर्यंत आले आहे ते पाहण्यासाठी. नाव पण किती छान "तुलसी" ब्लॉक्स. हे एका छोट्या टेकाडावर होते वसतिगृहाच्या आवारातच! छोट्या टेकाडावर असल्याने भरपूर वारे!! हे ब्लॉक्स खूपच छान नवे कोरे करकरीत होते. यामध्ये एक मोठा हॉल व त्याला लागून बाल्कनी होती. बाल्कनीला काच असलेली दुमडती दारे होती. बाल्कनीत उभे राहिले की थंडगार वाऱ्याच्या झुळका यायच्या. या दाराला पडदा मी शिवला होता. स्वयंपाकघर व हॉलच्या मधे नाडीवर्कचा पडदा लावला होता. स्वयंपाकघराला मोठाल्या काच लावलेल्या खिडक्या होत्या. त्याची दारे सरकती होती. कडप्प्याचा गुळगुळीत ओटा होता. या घरातही स्वैपाकघरात कोनाडे होते. त्यात मी सर्व डबे, पातेल्या, भाज्यांच्या टोपल्या ठेवल्या होत्या. एका कोनाड्यात देव्हारा होता. फरशा पण छान गुळगुळीत होत्या. हॉलमध्ये भिंतीतले मोठे कपाट होते. मोठा, बेड, टेबल, खुर्च्याही होत्या. टेबलाचा उपयोग आम्ही डायनिंग म्हणून करत होतो. याच टेबल खुर्चीवर बसून मी आई बाबांना पत्रे लिहायचे. त्यावरच आमचा ट्रान्झिस्टर पण ठेवला होता. दुपारी विनु जेवायला घरी आला की जेवायला बसायचो.


दुपारच्या जेवणानंतर थोडावेळ आम्ही दोघे वामकुक्षी घ्यायचो. बाल्कनीच्या लगतचा दरवाजा होता त्याला पडदा होता. तो पडदा दोन्ही बाजूने बंद करून घ्यायचो. बाईकचा हॉर्न वाजला की विनायक उठून परत लॅबला जायचा. विनायकचा मित्र देसाई त्याला जेवायला येताना व जाताना बाईकने सोडायचा. संध्याकाळी परत दोघे यायचे. मी चहा पोहे बनवायचे व ते खाऊन परत दोघे लॅब मध्ये जायचे. रात्रीच्या जेवणानंतही परत लॅब मध्ये काम ! मी काहीवेळा विनुला चिडून म्हणायचे माझ्याशी लग्न कशाला केले? लॅबशीच करायचे. मोठ्या बेड शेजारची रिकामी जागा होती तिथे गादी व त्यावर बेडशीट व मागे उशा ठेवल्या होत्या भिंतीला टेकून. यावर दुपारचे बसणे होत असे. या जागेमध्ये बाथरूम , कमोड , व वॉश बेसिन होते इमारत गोलाकार होती. बाहेरून जीने खूप वेगळे व छान होते.


शिष्यवृत्ती वाढल्याने काहीनी छोटे टीव्ही तर काहीनी टु-इन वन घेतले होते. मला आठवत आहे आमची पहिलीवहिली खरेदी टु-इन - वनची. त्यात आम्हाला एक कॅसेट फ्री मिळाली होती. ती आम्ही आँधी व मौसमची घेतली होती. या ब्लॉकमध्ये मी आँधी चित्रपटातले "तुम आ गये हो नूर आ गया है... " हे गाणे बरेच वेळा ऐकले. . या टु-इन-वन मध्ये मी रेडीओवरची आवडती गाणी टेप केली होती. रेडिओ वर गाणे लागले की मी त्यातच असलेल्या टेप रेकॉर्डरचे प्ले+ रेकॉर्डचे बटन दोन्ही एकत्रच दाबायचे म्हणजे रेडिओवर लागलेले गाणे आपोआप टेप मधल्या कॅसेट वर रेकॉर्ड व्हायचे. आमच्या या घरी ४ दिवस आई बाबा रहायला आले होते तेव्हा टु-इन-वन वर बाबांनी आणि मी असे एकेक गाणे रेकॉर्ड केले होते. बाबांनी "वाजवी पावा गोविंद" हे गाणे गायले. बाबा गाणे रेकॉर्ड करत आहेत ते लक्षात आले नाही. मी आणि आई स्वयंपाकघरात जोरजोरात गप्पा मारत होतो आणि मी भांडी लावत होते ते आवाज पण रेकॉर्ड झाले ! पण ही आठवण कायमची होऊन गेली.


तुलसी ब्लॉक्स मध्ये मी माझ्या बहिणीचे म्हणजेच रंजनाचे डोहाळेजेवण केले. भैरवीकडून अन्नपूर्णा पुस्तक आणले व त्यातून रेसिपी शोधून स्वयंपाक केला होता. गाजर घालून भात केला. टोमॅटो सूप व बटाट्याचे पराठे बनवले. कोबीची भजी केली व गोड म्हणून शेवयाची खीर बनवली. नेमका गॅस संपल्याने सर्व स्वयंपाक स्टोव्ह वर करायला लागला. रंजना म्हणाली की तू आधी सर्व स्वयंपाक उरकून घे. मग मी बसल्या बसल्या पराठे करते. तिचे पराठे होईपर्यंत मी पानाची तयारी केली. रांगोळी काढून मग आम्ही चोघे म्हणजेच रंजना, सुरेश मी व विनायक जेवायला बसलो. रंजनाला द्यायला म्हणून एक साडी आणली होती. ही साडी आम्ही दोघांनी घाटकोपर मधल्या एका दुकानातून आधीच खरेदी करून ठेवली होती. तिचा रंग निळा व थोडा मोरपंखी रंगाकडे झुकणारा होता. त्यावर मॅचिंग ब्लाऊज पीसही आणले होते. रंजना व सुरेश काही कामानिमित्ताने मुंबईला आले होते आणि म्हणूनच आमच्या घरी आले होते. मी तसे त्यांना फोन करून कळवले होते. मला तिचे डोहाळेजेवण करता आले म्हणून मला खूप आनंद झाला होता.घाटकोपरवरून छोटे छोटे खूप सुंदर फ्रॉक आणले. त्याचे रंगही मला अजून आठवतात. गुलाबी, लाल, आकाशी, पिवळा ! मी आधी शिवलेले सर्व लंगोट, झबली टोपडी मी स ईच्या बारशाला दिली. मी तिला चांदीच्या तोरड्याही दिल्या. मला खूपच आनंद झाला होता. आम्ही दोघेही रंजनाच्या डोहाळेजेवणाला आणि सईच्या बारशाला उपस्थित होतो. विनायकचे भाऊ व भावजय त्यांच्या लग्नानंतर आमच्या जुन्या हॉस्टेल म्हणजेच एच ११ ला आली होती. वसुधाला मी साडी घेतली होती. त्याचा रंग लाल होता आणि दीराला शर्टपीस.


विनायकची शिष्यवृत्ती संपल्यावर आम्हाला तुलसी ब्लॉक्स सोडावे लागले. आम्ही आमच्या सामानाची बांधाबांध केली. आमच्या घरी जे पेईंग गेस्ट होते त्या वाजपेयींनी आमच्याकरता टेंपो ठरवला होता पण तो आलाच नाही. शेवटी वाट पाहून पाहून आशा म्हणाली की तुम्ही आमच्याकडेच जेवा. त्या दिवशी तिने वांग्याचे भरीत व भाकरी केली होती. दुसऱ्या दिवशी पण दुपारपर्यंत टेंपो आलाच नाही. शेवटी आम्हीच एक टेंपो ठरवला व डोंबिवलीस जायला निघालो. दुपारचे जेवण परत आशाकडे केले. तिने इडली सांबार केले होते. आयते इडली सांबार खायला खूपच छान वाटत होते. निघताना भैरवी, आशा होत्या. आम्ही त्यांचा निरोप घेतला. आशाच्या डोळ्यात पाणी आले. मी पण रडले. भैरवीने माझा डोंबिवलीचा पत्ता तिच्या डायरीत लिहून घेतला. ती अमेरिकेत तिच्या नवऱ्याबरोबर जाणार होती. ती म्हणाली की मी तुला पत्र पाठवीन. आशा म्हणाली की डोंबिवलीवरून तू केव्हाही येत जा रोहिणी माझ्याकडे. स्वरदा डिपार्टमेंटला गेली होती त्यामुळे तिची भेट झाली नाही. आमच्याकडे सामान खूपच कमी होते. आमच्या दोघांच्या बॅगा, गाद्या उशा, पांघरूणे आणि भांडीकुंडी. सर्व सामान पोत्यात भरले. गाद्यांची एक वळकटी तयार केली होती. टेंपोत आमचे सामान टाकले. मी व विनायकही टेंपोत सामानासोबत बसलो आणि आमचा टेंपो डोंबिवलीच्या दिशेने निघाला. सोबत मित्रमैत्रिणींच्या छान आठवणी होत्या. टेंपोत मागे बसल्याने आमच्या डोळ्यासमोरून मागचा दिसणारा रस्ता भराभर पुढे सरकत होता. अंतःकरण खूप जड झाले होते. आता पुढे काय? स्कॉलरशिप संपली होती. रहायला फक्त आमचे घर होते. थिसीस लिहून पूर्ण करायचा होता. डोंबिवलीच्या जागेत झोपण्यासाठी एक कॉट सोडली तर दुसरे काहीही सामान नव्हते. माझे मन तर डोंबिवलीच्या जागेत जायला मुळीच तयार नव्हते. Copy Right (Rohini Gore )
 
क्रमश : ...

Thursday, March 28, 2024

सुंदर माझं घर ..... (१)

आमचे लग्न १९८८ साली झाले आणि नव्यानेच सुरू झालेल्या वैवाहीक जीवनाची सुरवात झाली. विनुची पिएचडी अजून थोडी बाकी होती. तो ऑरगॅनिक केमिस्ट्री मध्ये संशोधन करत होता. शिष्यवृत्ती १२०० फक्त. आमचे घर जरी डोंबिवलीला होते तरी आम्ही २ वर्षे वसतिगृहात राहिलो याचे कारण संशोधनात लॅब मध्ये विनू दिवसरात्र काम करायचा. असे काम डोंबिवलीला राहून करणे शक्य नव्हते. डोंबिवलीच्या घराकरता विनुच्या वडिलांनी महाराष्ट्र बॅंकेतून लोन काढले होते आणि त्याचा ९०० रूपये हफ्ता विनु न चुकता दर महिन्याला पाठवत होता. तो मनी ऑर्डर करायचा. डोंबिवलीला जागा घेतली होती याचे कारण विनु आधी एका बहुराष्ट्रीय औषधी कंपनीत मुलुंडला नोकरी करत होता. डोंबिवलीची जागा घेण्या आधी तो त्याच्या काकाकडे बोरिवलीला रहायचा. बोरिवलीवरून मुलुंडला कामासाठी ये-जा करायचा. २ वर्षात त्याने नोकरी सोडली आणि पिएचडी साठी आयायटी (IIT) पवईत वसतिगृह ९ मध्ये रहायला गेला होता. विनुने डोंबिवलीची जागा पेईंग गेस्टना रहायला दिली होती. हफ्ता भरण्यासाठी मदत होत होती. त्यामुळे नोकरी सोडल्यावर शिष्यवृत्तीतले ६०० आणि पेइंग गेस्ट कडून मिळालेले ३०० रूपये असे ९०० रूपये हफ्ता पाठवण्याला सुरवात केली. अर्थात आमचे लग्न झाले तेव्हा फक्त पेइंग गेस्टचे कडून मिळणारे रूपये आम्ही दादांना पाठवत होतो. आमचा संसार १२०० रुपयांमध्ये सुरू झाला. 

 
 
लग्न झालेल्या जोडप्यांना आयायटीने वसतिगृहात रहायला जागा दिली. वसतिगृह ११ हे मुलींचे होते. तिथे बऱ्याच खोल्या रिकाम्या होत्या. प्रत्येकी २ खोल्या लग्न झालेल्या जोडप्यांना दिल्या होत्या. आमच्या खोल्यांचे नंबर होते ६९, ७० आणि या खोल्या तिसऱ्या मजल्यावर होत्या. त्यावेळेला लिफ्ट नव्हत्या. विनुचे डिपार्टमेंट पण तिसऱ्या मजल्यावर होते. लिफ्ट नाही. डिपार्टमेंटला जाण्यायेण्यासाठी विनुकडे एक सायकल होती. आयायटी - पवईचे आवार खूपच मोठे आहे. आवारात अर्थातच काहीही मिळत नव्हते. भाजीपाला आणि किराणा आणण्यासाठी आम्हाला जाऊन येऊन २ मैल चालायला लागायचे. धुणे भांडी मी घरीच करत होते. शिवाय दोन्ही खोल्यांचा केर काढून फरशी पण पुसून घेत होते.प्रत्येक खोलीत एक टेबल, एक खुर्ची, एक कॉट, व एक लोखंडी कपाट होते. आम्ही जेव्हा या दोन खोल्यांचा ताबा घेतला तेव्हा एका खोलीचे बेडरूम बनवले व एका खोलीचे स्वैपाकघर. बेडरूम मध्ये दुसऱ्या खोलीतली एक कॉट आणली व त्या खोलीतल्या कॉटला जोडून ठेवली. अश्याने आमचा मोठा बेड तयार झाला. विनायककडे त्याच्या बॅचलर जीवनातली एक गादी होती. ती कॉटवर घातली व शेजारी एकावर एक अशा सतरंज्या, बेडशीटा घालून त्या गादीच्या लेव्हलला आणल्या. विनु म्हणाला मला सतरंजीवर झोपायची सवय आहे, तू गादीवर झोपत जा. त्या खोलीतल्या लोखंडी कपाटात आम्ही आमचे सर्व कपडे ठेवले. पावडरीचा डबा, कुंकू, कंगवे ठेवले. तिथल्या टेबलावर काही पुस्तके ठेवली. टेबलावर घड्याळ ठेवले किती वाजले आहेत ते बघण्यासाठी. मी रोज रात्री पहाटे ६ चा गजर लावायचे. गजर बंद करून आम्ही परत झोपायचो. ७ वाजता उठून चहा ब्रेकफास्ट अंघोळ करून विनु ८ ते ९ च्या दरम्यान लॅब मध्ये जायचा. 
 
 
रुखवतात आम्ही दोघी बहिणींनी मिळून केलेला नाडी वर्क पडदा बेडरूमच्या दरवाज्याला लावला. या पडद्याचे खूप कौतुक झाले. जो तो विचारी कसा केला हा पडदा! नाडीवर्कचा जो पडदा होता त्यावर पाने फुले छापली होती आणि फुलाची प्रत्येक पाकळी पांढऱ्या शुभ्र नाडीने भरली होती. पांढऱ्या शुभ्र पाकळ्या मरून रंगाच्या पडद्यावर खूपच उठून दिसत होत्या. प्रत्यक्ष पाकळ्या चिकटवल्या आहेत की काय असे वाटे. या खोलीत विनयने पेंट केलेला गणपती लावला होता. रात्री जेव्हा झोपायला या खोलीत यायचो तेव्हा आठवणीने पाण्याने भरलेले तांब्या भांडे आणायला लागायचे, कारण की झोपताना दुसऱ्या खोलीला कुलूप लावायला लागायचे. ही कुलुपे पण निराळीच होती. कुलूप लावताना किल्ली लागायची नाही. फक्त उघडायला लागायची. दोन्ही खोल्यांना एकेक खिडकी होती त्यामुळे घरात वारा आणि प्रकाश दोन्ही छान येत होते. रात्री झोपताना ट्रॉंझिस्टर वर छायागीत, बेलाके फूल ऐकूनच झोपायचो. झोपताना हा ट्रान्झिस्टर आम्ही कॉटच्या जवळच असलेल्या कोनाड्यात ठेवायचो. दुपारचे व रात्रीचे जेवण करताना पण सोबत आम्हाला दोघांना ट्रान्झिस्टर लागायचा. खिडकीतून बाहेर बघितले की सगळीकडे हिरवेगार दिसायचे. पावसाळ्यात खूप अंधारून यायचे. सकाळी उठून अशा अंधारलेल्या वातावरणात दिवा लावायला लागायचा. एकीकडे चहाचे आधण गॅसवर ठेवायचे व खिडकीतून पावसाला बघत रहायचे. आले घालून केलेला चहा मग आम्ही दोघे प्यायचो. 
 
 
स्वयंपाकाच्या खोलीतल्या कपाटामध्ये सर्व पीठाचे डबे व इतर पोहे, साबुदाणे वगैरे ठेवले. टेबलावर गॅस ठेवला. त्यावरच एकीकडे पोलपाटावर मी पोळ्या करत असे. कुणी आले तर बसायला खुर्ची होतीच. दोन्ही खोल्यांना भिंतीतले कोनाडे होते. ते मला खूपच आवडायचे. जमिनीलगतचा एक आणि त्यावर एक असे प्रत्येक खोलीत ६ कोनाडे होते. बेडरूमच्या कोनाड्यांमध्ये आम्ही आमच्या दोघांच्या बॅगा ठेवल्या. एकात पांघरूणे - बेडशीटा, एकात ट्रान्झिस्टर ठेवला. स्वैपाकघरातल्या कोनाड्यात एकाचे देवघर बनवले. एकात भाजीपाल्यासाठी ३ जाळी असलेल्या टोपल्या एकावर एक ठेवल्या. एकात कांदे बटाटे, एकात फळभाजी, एका छोट्या टोपलीत, मिरच्या, कोथिंबीर, आलं असे होते. कोथिंबीर मी ओल्या फडक्यात ठेवायचे. ज्या टेबलावर गॅस होता त्या टेबलाच्या शेजारी मी पिण्याचे पाणी व स्वैपाकाला लागणारे पाणी स्टीलच्या बादलीत आणि कळशीत ठेवायचे. हे पाणी मी रोजच्या रोज बदलायचे. एका कोनाड्यात मी एका टबात खरकटी भांडी ठेवायचे. एक कोनाडा स्टोव्ह, रॉकेलचा डबा याकरता होता. त्यावेळेला फ्रीज नव्हते कोणाकडेच ! फक्त एकीकडे होता. लोणी दही याकरता मी एका ताटलीत पाणी घालून त्यात ते लोण्या-दह्याचे सट ठेवायचे. मिक्सरही नव्हता. मी आईकडून एक दगडी रगडा आणला होता. आईकडे दगडी रगडे विकायला एक बाई यायची. पुण्यावरून हा दगडी रगडा आणला होता. त्यात मिरची कोथिंबीरीचे वाटण व थोडी चटणी होईल इतका छोटा होता. त्यावर चटणी वगैरे करताना खाली आवाज जाऊ नये म्हणून मी एक तरट घालायचे. तरटाची चौकोनी घडी त्यावर टॉवेल पागोट्यासारखा गुंडाळून, त्यावर हा रगडा ठेवायचे !. 
 
 
सुरवातीला आम्ही एका गवळ्याकडून दूध घ्यायचो. ते खूपच पातळ होते. त्यावर साय अगदीच थोडी धरायची. पण त्या सायीचे दही-लोणी-तूप ताजे ताजे बनवायचे. दूध पातळ असल्याने जास्त साय येत नव्हती तरी मी रोज थोड्या सायीचे विरजण लावून रोज सायीचे ताजे ताक करायचे व रोज थोडे थोडे लोणी काढायचे. पूजा करताना काही वेळा मी लोणी साखरेचा नैवेद्य दाखवायचे. ४ दिवसाचे लोणी अगदी थोडेच साठायचे. रोजच्या रोज लोणी पाण्याने धुवून मी ते सटात ठेवायचे व तो सट एका ताटलीत गार पाणी घालून त्यात ठेवायचे व ४ दिवसांनी लोणी कढवून तूप करायचे.विनुने त्याच्या बॅचलर जीवनातली एक गादी, एक कपड्यांनी भरलेली बॅग, ट्रान्झिस्टर व हॉटप्लेट वसतिगृह ९ वरून आणलेलीच होती. हॉट्प्लेट बघितल्यावर मला इतका आनंद झाला आणि ठरवले की आपण सर्व स्वैपाक यावरच बनवायचा. कूकर लावला. एक तास झाली तरी कूकरला वाफ धरेना. हॉटप्लेटच्या तीव्र आचेमुळे पहिली पोळी करपली. प्लग काढून दुसरी पोळी करून घ्यावी तर ती खूपच कडक बनली. या माझ्या सर्व करामतींमध्ये मोठा आवाज झाला तो फ्युज उडाल्याचा होता. गॅसला नंबर लावला होता पण तो यायला महिनाभर तरी लागेल असे कळाले तेव्हा विनु म्हणाला की मी आधी बाहेर जाऊन स्टोव्ह विकत घेऊन येतो. स्टोव्ह आणण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. 
 

 
आईकडे स्टोव्हमध्ये रॉकेल कसे भरतात, स्टोव्हला पिना कशा करतात ते पाहिले होते पण प्रत्यक्ष अनुभव नव्हता. स्टोव्हच्या एकूणच खूप भानगडी असतात. रॉकेलचा डबा, रॉकेल स्टोव्हमध्ये भरण्याकरता एक काचेची बाटली, रॉकेल ओतताना वापरायचे नरसाळे, पिनांचे व काडेपेटीचे बंडल, स्टोव्हमध्ये रॉकेल भरताना ते जर बाहेर आले तर पुसायला लागणारी फडकी! नुसता व्याप नि ताप! सुरवातीला त्रास झाला व खूप चिडचिड झाली पण नंतर हे सर्व सवयीने जमायला लागले. एकदा स्टोव्ह पेटवला की त्यावर स्वयंपाक कसा उरकायचा तेही कळाले. आधी कूकर लावायचा, तो होईपर्यंत भाजी चिरून घ्यायची. कूकर झाला की भाजी करायची. भाजी परतता परतता कणीक भिजवायची, भाजी झाली की पोळ्या, पोळ्या झाल्या की वरण फोडणीला टाकायचे. ते झाले की सर्वात शेवटी दुध तापवून घ्यायचे कारण की दुध नासले की दूध बाहेरून आणायला परत दीड दोन मैल पायपीट! स्टोव्हवर क्रमाक्रमाने करण्याच्या स्वयंपाकामध्ये जर का काही उलटेसुलटे झाले तर एका भांड्यात नुसते पाणी घालून ते तापवत ठेवायचे कारण एकदा का स्टोव्ह बंद झाला तर परत तो कोण पेटवणार? वाजणारा स्टोव्ह बंद झाल्यावर कसे शांत शांत वाटायचे. नंतर १५ दिवसांनी गॅस शेगडी आणि सिलिंडर आला तेव्हा खूपच हायसे वाटले.
 

 
विनुने लॅब मधून ३ वेगवेगळ्या आकाराचे काचेचे प्लास्क आणले होते दुध गरम करण्यासाठी हॉटप्लेटवर त्याच्या बॅचलर जीवनात. लग्न झाल्यानंतर मी सकाळी हॉटप्लेटवर दूध गरम करायचे ते मोठ्या काचेच्या फ्लास्कमध्ये. नंतर दोन छोट्या फ्लास्कमध्ये मी दोघांकरता दूध घ्यायचे. त्यात इंस्टंट ब्रु कॉफी घालायचे. एकीकडे विब्सचा ब्रेड भाजून त्याला अमुल बटर लावायचे. कॉफी, ब्रेड असा छान ब्रेकफास्ट झाला की विनु लॅब मध्ये जायचा. त्यावेळी आम्ही १०-१२ जोडपी होतो, त्यात चार महाराष्ट्रीयन. या जोडप्यांमध्ये काहींच्या बायका पी. एचडी करणाऱ्या होत्या व त्यांचे नवरे बाहेर कंपनीत कामाला जायचे. तर १-२ जोडपी दोघेही पी.एचडी करणारी होती, तर काहींचे नवरे पिएचडी करत होते आणि आम्ही बायका घरकाम करायचो. काही रसायनशास्त्र व भौतिक शास्त्रामध्ये संशोधन करणारे होते, तर काही अर्थशास्त्र व गणिता मध्ये.


आम्ही सर्व बायका घरीच धुणे भांडी करायचो. तिथे एक भारती नावाची मुलगी सर्वांना विचारायची. भांडी घासायला कुणी हवे आहे का? भांड्यांचे ७० रुपये होते पण १-२ जणींनीच तिला कामावर ठेवले होते. बाथरूम टॉयलेट व बेसिन बाहेरच कॉमन होते. त्या वसतिगृहात २ ठिकाणी ३-४ बाथरूम होत्या. एकीकडे बायकांची व दुसरीकडे पुरुषांची झाली. हसतखेळत धुणेभांडी व्हायची. सकाळी ९ वाजता आपापल्या नवऱ्यांना त्यांच्या कामावर पाठवून दिले की आमचेच राज्य. वसतिगृहाच्या सर्व खोल्या समोरासमोर होत्या, त्यामुळे आम्ही सगळ्याजणी पॅसेजमध्ये जमा व्हायचो. एकीकडे गप्पा, गाणी ऐकणे व धुणे भांडी व आमच्या अंघोळी करता नंबर लावायचो. ए तुझी भांडी झाली की मी शिरते हं बाथरूममध्ये. एकीची भांडी, तर दुसरीचे धुणे तर तिसरीची अंघोळ, असे सर्व २ तास चालायचे. मग मात्र स्वयंपाकघरात शिरायलाच लागायचे कारण की १ वाजता सर्वांचे 'हे' जेवायला घरी यायचे. भांडी घासायला ओणवे बसायला लागायचे. धुणे पण आधी धुणे भिजवणे, नंतर ब्रशने कपडे घासणे, धोपटणे, २ ते ३ वेळा वेगवेगळे पाणी घेऊन आघळणे आणि मग पिळणे. भांडी घासताना खरकटी भांडी आधी टबा बाहेर काढायचे. टबही घासून स्वच्छ विसळून घ्यायचे. नंतर एका बादलीत पाणी घेऊन घासलेली भांडी कमरेत वाकून विसळायचे व टबात टाकायचे. अंघोळीच्या पाण्याकरता आम्हाला एक नळ स्पेशल गरम पाण्याचा होता. त्यामुळे गरम पाणी अंघोळीला आयते मिळायचे. विनू रोज गार पाण्याने अंघोळ करायचा. 
 

 
आईकडे धुणे भांडी करायची कधीच सवय नव्हती. स्वैपाक पण मोजकाच येत होता कारण लग्ना आधी आम्ही दोघी बहिणी नोकरी करायचो तेव्हा आईच आम्हाला डबा भरून देत होती. धुणेभांड्याची सवय नसल्याने चादरी व विनायकचे शर्ट पॅन्ट धुवून हात दुखायला लागायचे. धुणे वाळत घालण्यासाठी खोलीत ज्या तारा बांधल्या होत्या त्या खूपच उंच होत्या. खुर्चीवर उभे राहून मी काठीने धुणे वाळत घालायचे. वर पाहून मान दुखायला लागायची. धुणे धुतल्यावर पिळताना माझ्या हातून कपडे नीट पिळले जायचे नाहीत, बरेच पाणी रहायचे. म्हणून मग विनायक मला सर्व कपडे नीट पिळून द्यायचा. वर पाहून एका रेषेत काठीने कपडे वाळत घालताना मान दुखायची. विनु मला म्हणाला की चादरी धुवायला अवघड आहेत त्यामुळे त्या फक्त भिजत घालून ठेव. चादरी मी धुवत जाईन.
काही दिवसांनी आमच्या घोळक्यामध्ये एका छोट्या मुलाची भर पडली. मीनाक्षीला एक "सुंदर" नावाचा गोंडस मुलगा झाला. तो त्याच्या आईकडे कधीच नसायचा. त्याला घेण्यासाठी आमचे नंबर लागायचे. तो पूर्ण पॅसेजमध्ये या टोकापासून त्या टोकापर्यंत रांगायचा. मीनाक्षीला तिचे काम करायचे असेल तर मला विचारायची "सुंदर को देखेगी क्या? " . मी लगेचच होकार द्यायचे. . मला त्यानिमित्ताने सुंदरशी खेळायला मिळायचे. मीनाक्षीने मला सांगून ठेवले होते की तुझी पुजा झाली की मला बोलवत जा. मग ती व सुंदर येऊन नमस्कार करून जायचे. सुंदरला सांगायची "भगवान को प्रणाम करो" की लगेच सुंदर त्याचे छोटे हात जोडायचा व "जयजय" म्हणायचा. एकदा सुंदरच्या हातात मी हापूसचा आंबा सोलून दिला. तो त्याने त्याच्या इवल्याश्या हातात धरला आणि आंबा खात होता. खाताना त्याच्या तोंडावर हातावर व झबल्यावरही आंब्याचे तुषार उडले होते. आंबा खाण्यात तो अगदी मग्न होऊन गेला होता. 
 

 
हा सुंदर रांगत रांगत प्रत्येकीच्या घरी जायचा. रांगताना मध्येच बसायचा. आमच्या घोळक्यामध्ये कुणी जात असेल तिच्या मागोमाग जायचा, मग ती उचलून परत त्याच्या आईकडे द्यायची. मी भांडी घासून आले आणि जर का सुंदर आमच्या घरात असेल तर धुतलेली सर्व भांडी टबाच्या बाहेर आलीच म्हणून समजा! सुंदर एकेक करत सर्व भांडी टबाच्या बाहेर काढायचा. वाट्या, कालथे, झारे तर त्याला खूप प्रिय. फरशीवर दणादणा आपटायचा वाट्या! त्याचा अजिबात राग यायचा नाही. आम्ही हसलो की त्याला अजुनच चेव चढायचा. एकदा तर सगळी भांडी बाहेर आणि हा टबात जाऊन बसला! एकदा मी पूजा करताना आला. मग मी त्याच्या कपाळावर गंध लावले, नैवेद्याचे लोणी साखर खायला दिले. एकदम खुश झाला ! मी त्याला बाप्पाला "जयजय" करायला शिकवले. आईने मला पुजेसाठी देव्हारा दिला होता, शिवाय तेल व तूप वाती. त्यावेळी फुलपुडी पण चांगली येत असे. लाल, पांढरी, पिवळी फुले, दुर्वांची जुडी, तुळस, बेल असे सर्व काही. त्यामुळे पूजाही साग्रसंगीत व्हायची. तेला-तुपाचे २ दिवे आणि उदबत्ती पण लावायचे. पूजेत लग्नात आईने दिलेले २ देव होते. देवी आणि बाळकृष्ण. शिवाय देवात मी १ रूपयाचे नाणेही ठेवले होते. 
  
आमचे बिऱ्हाड वेगळे स्थापन होणार आहे म्हणून विनुच्या ५ आत्यांनी व २ काकांनी व २ मावश्यांनी सर्वच्या सर्व संसाराला लागणाऱ्या स्टीलच्या भांड्यांचा, डब्यांचा कूकर व मिसळणाच्या डब्यासकटअहेर दिला होता. आम्ही फक्त विळी, पोलपाट लाटणे, कढई, सोलाणं, लिंबू पिळायचे यंत्र घेतले. सर्वच्या सर्व भांडी पोत्यात भरून वसतिगृहात घेऊन आलो होतो. - Copy Right (Rohini Gore )

 


Sunday, March 24, 2024

गृहव्यवस्थापन

 फेबुवरच्या छंद नावाच्या ग्रूपवर थीम होती गृहव्यवस्थापन. मी लिहिणार नव्हते कारण मी बरीच घरे बदलली. विचार केला की भारतातल्या आणि अमेरिकेतल्या २ घरात मी सलग १० वर्ष राहिली आहे. अमेरिकेतल्या घराबद्दल लिहिले तर ते चित्र डोळ्यासमोर येणार नाही म्हणून भारतातल्या घराबद्दल लिहिले आणि माझा मलाच खूप आनंद झाला. अजून एक लक्षात आले की बाकी बरेच फोटो काढले पण कोणत्याही घराचे फोटो काढले नाहीत. कोणत्या तरी निमित्ताने काही ना काही लक्षात येते. मन भूतकाळात गेले आणि लेख लिहिला गेला. इथे शेअर करत आहे. ही थीमवजा स्पर्धा होती. साधारण ६० ते ७० लेख आले असावेत. त्यात पहिल्या ४ क्रमांकाना ऑनलाईन सर्टीफिकेट आणि काही रोख रक्कम भेट म्हणून होती.

 
 
- गृहव्यवस्थापन - मी लिहिलेला लेख -
 
 
गृह व्यवस्थापनात सर्वात महत्वाचे काय असेल तर ते स्वैपाकघर. ते नेहमीच स्वच्छ ठेवायला लागते. भारतात असताना माझ्याकडे स्टीलचे आणि हिंडालियमचे डबे होते. मी दर २ ते ३ महिन्यांनी सर्व डबे घासायचे. ओटा कडप्प्याचा होता आणि त्या खाली कडप्प्याचे कप्पे होते. हे कप्पे मी ओल्या फडक्याने पुसून घ्यायचे. डबे धुतल्यावर ते उपडे करून ठेवले की लगेच वाळतात आणि त्यात जे काही असेल ते परत लगेच भरता येते. पूर्वी कपडे वाळत घालायच्या काठ्या असायच्या त्याला झाडू बांधायचे आणि भितींवरली आणि छतावरची जळमटे साफ करायचे. झाडू हा बुटका असतो त्यामुळे तो काठीला बांधला की छ्तावरची सर्व जळमटे निघतात. कुंचा भिंतीवर फिरवून मग कानाकोपऱ्यातून केर काढायचे. पूर्ण घराची साफसफाई मी वर्षातून एकदा दिवाळीपूर्वी करायचे. पूर्वी फ्लॅटमध्ये हॉल आणि बेडरूमला पाणी जाण्याकरता थोडी जागा असायची. फरशी पण कढत पाण्यात धुणे धुण्यासाठी जो डिटर्जंट असतो तो घालून त्याचा फेस व्हायचा आणि तो फरशीवर घालून ब्रशने फरशी घासायचे. सगळे साबणाचे पाणी खराट्याने ढकलून बाहेर घालवायचे. पंख्यावरची जळमटे कुंच्याने साफ करून नंतर विनायक उंच असल्याने तो स्टुलावर उभा रहायचा आणि ओल्या फडक्याने पंख्याची पाती साफ करायचा. रोज रात्री झोपताना ओटा घासून पुसून लक्ख करायचे.
 
 
कामवाली बाई जरी कामाला होती तरी मी रोज सर्व फर्निचर ओल्या फडक्याने पुसून काढायचे. शिवाय सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपताना केर काढायचे. दर महिन्याला सर्व चादरी, अभ्रे, पांघरूणे धुवून वाळवून ठेवायचे. जेव्हा धुणे-भांडी करायला बाई यायची तेव्हा आणि मी घरी धुणे-भांडी करायचे तेव्हाही मी सर्व ताटे विसळून टबात ठेवायचे. कढई, आणि इतर भांडी सुद्धा थोडी घासणीने हात फिरवून विसळून ठेवायचे. टबात ठेवल्यावर सुद्धा त्यात मी थोडे पाणी घालायचे. असे केल्याने भांडी घासायलाही किळस वाटत नाही. शिवाय जास्त स्वच्छ निघतात. कप बशा, पाणी प्यायची भांडी मी घासून विसळून ठेवायचे. धुणे धुताना सुद्धा ते आधी एका बादलीत गरम पाण्यात त्यात धुण्याची पावडर टाकून भिजवून ठेवायचे. जेव्हा वॉशिंग मशीन घेतले तेव्हा पण मी आधी धुण्याचे कपडे गरम पाण्यात भिजवायचे व नंतर १ तासाने ते मशीनमध्ये धुण्याकरता टाकायचे. माठातले पिण्याचे पाणी आणि पिंपातले स्वैपाकासाठी लागणारे पाणी रोजच्या रोज भरून ठेवायचे. आधीचे पाणी काढून पिंप घासून मग ताजे पाणी भरायचे. डोंबिवलीत आल्या आल्या मला काविळ झाली. त्यामुळे पिण्याचे पाणी तापवण्याचे काम वाढले. मोठ्या पातेल्यात पिण्याचे पाणी उकळवून ठेवायचे. ते पूर्ण गार झाले की प्लॅस्टीकच्या बाटलीतून भरून ते फ्रीज मध्ये ठेवायचे किंवा माठात भरून ठेवायचे. नंतर पाणी भरून ठेवायला फिल्टर घेतला. तोही महिन्यातून एकदा साफ करायला लागायचा. केराचा डबा असतो त्यात तळाला जुन्या वर्तमानपत्राची जाड घडी करून मग त्यात कचरा टाकायचे. शिवाय कचऱ्याचा डबा दर २-३ दिवसांनी घासून उपडा करून वाळवायला ठेवायचे.
 
 
भाजी खरेदी साठी मी मंडईत जायचे. तिथे भाज्या स्वस्त आणि ताज्या मिळायच्या. घरी आले की मिरच्यांची देठं काढून ती एका जाळी असलेल्या प्लॅस्टीकच्या डब्यात ठेवायचे. कोथिंबीर निवडून ती पण दुसऱ्या प्लॅस्टीकच्या डब्यात ठेवायचे. आठवडाभर मिरच्या कोथिंबीर ताज्या रहातात. १ नारळ खरवडून तो स्टीलच्या डब्यात भरून तो फ्रीजर मध्ये ठेवायचे. उन्हाळ्यात लिंबाचे सरबत करून तेही फ्रीज मध्ये ठेवायचे. लिंबाचा रस, त्यात तिपटीने साखर घालायची व काचेच्या बरणीत भरताना तळाशी मीठ घालायचे. खूप दिवस टिकते. विनायक डोंबिवलीवरून अंधेरीला कामाला जायचा तेव्हा उन्हाळ्यात कामावरून आल्यावर रोज एक ग्लास लिंबाचे सरबत प्यायचा. कोणी पाहुणे आले तरी हे सरबत उपयोगी पडायचे. त्यात बर्फाचे तुकडे फ्रीजर मध्ये तयार असायचे. त्याकरता मी ४-५ प्लॅस्टीकचे ट्रे आणले होते की ज्यामध्ये पाणी घालून ते फ्रीजर मध्ये ठेवले की बर्फाचे छोटे तुकडे तयार होतात. या ट्रेमध्ये छोटे चौकोनी आकार होते. विनायक कामावरून आल्यावर थेट बाथरूम मध्ये अंघोळीला जायचा. रोजच्या रोज शर्ट, पॅंट, रूमाल, पायमोजे नवीन असायचे.
 
 
पहिले दूध तापले की ते गार झाल्यावर फ्रीज मध्ये ठेवायचे. दुपारी चहा करताना दूध बाहेर काढले की त्यावर जमा होणारी जाड साय एका पातेल्यात काढायचे. अशी ४ दिवसांची साय जमा झाली की त्याचे ताक करायचे. लोणी भरपूर यायचे. हे लोणी मी रोजच्या रोज पाण्याने धुवून फ्रीजमध्ये ठेवायचे. असे लोणी बरेच जमा झाले की त्याचे तूप बनवायचे. घरच्या घरीच दुधाचे सर्व प्रकार व्हायचे. सायीचे दही, अदमुर दही, ताक, लोणी आणि तूप. मी कधीच बाहेरून दही, लोणी तूप विकत आणले नाहीये. आळीपाळीने कोरड्या चटण्या करायचे. लसणाची, दाण्याची, कारळाची इत्यादी. आलं किसून एका डबीत ठेवले आणि ते फ्रीज मध्ये ठेवले की चहात घालायला त्यातूनच आलं घालायचे. आलं, लसूण, मिरचीची पेस्ट करून ठेवायचे. किराणा सामानाची यादी दर महिन्याला एका कागदावर लिहून मग दुकानात जायचे. त्यात सण येतील त्याप्रमाणे काही जास्तीचे सामान आणायचे. दुकानात जाऊन गहू, तांदुळाची क्वालिटी आणि किंमत पाहून त्याप्रमाणे ठरवायचे. तांदूळ पण दर महिन्यात वेगळा आणायचे. सोना मसूरी, आंबेमोहोर, सुरतीकोलम इत्यादी.
 
 
दळणा मध्ये गहू पीठाबरोबर, हरबरा डाळ, ज्वारी-बाजरी, तांदुळ, अंबोळीचे पीठ आणि थालिपीठाची भाजणी करायचे. वर्षाचे लाल तिखट, हळद आणि गोडा मसाला केला की प्रत्येक वेळी सामानात हळद, तिखट आणायला लागत नाही. त्याकरता मी सुक्या लाल मिरच्या व हळकुंड आणून ती उन्हात ठेवून मग दळून आणायचे. हळद तिखट दळायच्या गिरण्याही वेगळ्या असायच्या. सीझनप्रमाणे फळेही आणायचे. हिवाळ्यात लिंबे स्वस्त मिळतात तेव्हाच लिंबाचे सरबत करून ठेवायचे. उन्हाळ्यात कैरीचे खार असलेले नेहमीचे लोणचे, गोड लोणचे व पन्हे करायचे. कैऱ्या उकडून त्याचा गर काढून दुप्पट साखर घालून काचेच्या बरणीत हा पन्ह्याचा गर ठेवला की आलेल्या पाहुण्यांना पन्हे देता येते. शिवाय कोकमचे सरबत पण असेच साखर मीठ घालून तयार ठेवता येते. गुळांबा आणि मुरांबा करून तो काचेच्या बरणीत ठेवायचे. पावसाळ्यात मी सुंठ, गुळ, तूप एकत्र करून त्याच्या अगदी छोट्या गोळ्या करून ठेवायचे. चहाच्या आधी ही गोळी खायची व नंतर चहा प्यायचा.घरात काही गोष्टी मी कायमस्वरूपी ठेवते. यात थर्मामीटर, क्रोसीनच्या गोळ्या, अमृतांजन, व्हिक्स, बर्नॉल, आयोडेक्स, कफ सिरप. कापसाच्या तेलाच्या व तुपाच्या वाती करून ठेवायचे. बाहेर जेवायला वर्षातून आम्ही फक्त ३ वेळा जायचो. आमच्या दोघांचे वाढदिवस व लग्नाचा वाढदिवस. बाहेर हॉटेलमध्ये क्वचित जायचो. पदार्थ जितके घरी करता येतील तितके मी केलेले आहेत. यातून पैशाची बचतही होतेच होते. शिवाय तब्येतीही चांगल्या रहातात.
 
 
लग्नानंतर मी काही वर्ष नोकरी केली. आम्ही दोघेही नोकरी करायचो. विनायक ७.१२ ची फास्ट लोकल पकडायचा. माझी नोकरी डोंबिवलीतच होती. मी नंतर निघायचे. सकाळी घाई गडबड होऊ नये म्हणून विनायकचा शर्ट-पॅंट, रूमाल, पायमोजे, घड्याळ, टॉवेल, रेल्वेचा पास, पैसे, आतले कपडे, तसेच माझेही आतले कपडे, पंजाबी ड्रेस, रूमाल, घड्याळ, कानातले, एके ठिकाणी काढून ठेवायचे. आदल्या दिवशी माझ्या ड्रेसला व विनायकच्या ड्रेसलाही इस्त्री करून ठेवायचे.
पूर्वी गीझर नव्हते त्यामुळे अंघोळीचे पाणी गॅसवर तापवायला लागायचे. सकाळी उठल्यावर एका शेगडीवर एकीकडे चहा आणि दुसऱ्या शेगडीवर मोठ्या पातेल्यात अंघोळीकरता पाणी तापवत ठेवायचे. विनायक बाहेर पडला की मी माझे अंघोळीचे पाणी तापत ठेवून एकीकडे माझ्यापुरत्या डब्यात नेण्यासाठी दोन पोळ्या आणि भाजी करायचे. विनायक डबा न्यायचा नाही. तो कंपनीतल्या कॅंटीन मध्ये जेवायचा. पोळी भाजी झाली की अंघोळीचे पाणी तापलेले असायचे त्याने अंघोळ करून मग पूजा करायचे. पिण्याकरता दूध तापवून घ्यायचे. विनायक पण दूध पिऊन जायचा. दुधात घालायला मी काजू-बदाम-पिस्ते याची पूड करून ठेवायचे. नंतर कपडे भिजत घालून, व्यायाम करून, कामावर निघायच्या वेळी वेणीफणी करून ड्रेस घालून, सर्व काही बंद आहे ना याची खात्री करून कुलूप लावून निघायचे. मी रोज रिक्शाने कामावर जायचे. डोंबिवली एम आय डी सी मध्ये कंपनी होती. आमच्या घराजवळच्या बस स्टॉप जवळ बस कधीच थांबायची नाही.
 
 
घरखर्चाला लागणारी ठराविक रक्कमच आम्ही बॅंकेतून काढायचो. त्यात मी थोडे पैसे बाजूला ठेवायचे आणि त्याचा उपयोगही व्हायचा. आम्हाला दोघांना शनिवारी हाफ डे होता. त्यामुळे फक्त एक रविवार मिळायचा. माझी नोकरी गावातच असल्याने मला घर आणि नोकरी सांभाळता येत होते. नंतर काही वर्षांनी मी नोकरी सोडली.डोंबिवलीत आलो तेव्हा विनायकची स्कॉलरशिप संपली होती त्यामुळे आम्हाला आयायटी- पवईचे वसतिगृह सोडायला लागले. डोंबिवलीत आमचा फ़्लॅट आहे. घरात काहीही नव्हते. विनायकचा थिसीस लिहायचा बाकी होता. तेव्हा आमची खरी कसोटी लागली. मी रोज देवाजवळ प्रार्थना करायचे की मला नोकरी लागू दे आणि देवाने तथास्थू म्हणले आणि मला नोकरी लागली. ही नोकरी कायमस्वरूपी नव्हती. रोज ५० रूपये मला मिळत होते. महिन्याचे १५०० रूपये. यातच सर्व भागवले. किराणामाल, वर्तमानपत्र, धुणे-भांड्यांना बाई लावली तिचे पैसे, दूध, भाजीपाला यातच निम्याच्या वर खर्च व्हायचे. उरलेले पैसे आम्ही दिवस किती आणि पैसे किती हे मोजूनच खर्च करायचो. तेव्हा मी मंडईत कधीच गेले नाही. बजेट ठरवले. कोपऱ्यावर एक भाजीवाला बसायचा. तिथून ५ रूपये पाव किलोच भाजी आणायचे. दुपारी पोळी भाजी. दूध अर्धा लिटरच घ्यायचे. सकाळचा दुपारचा चहा आणि सकाळी आम्ही दोघांनी नाश्त्याला दूध प्यायले की दूध संपायचे. रात्री फक्त मुगाच्या डाळीची खिचडी खायचो. त्याकरता फक्त आधा पाव किलो दही आण्याचो त्याचे मी ताक बनवायचे भरपूर पाणी घालून. तेच पुरवायचो. नंतर विनायकला अंधेरीत हिंदुस्थान लिव्हर मध्ये नोकरी लागली. पण तो १ ते दीड वर्षाचा काळ आम्हाला खूप काही शिकवून गेला. घरी फोन, टिव्ही, फ्रीज, कपाट काहीही नव्हते. डबे आणि पातेली कपबशा ठेवायला एक मोठी मांडणी होती. कपडेही बिग शॉपर बॅगेत ठेवायचो. माझा तुटपुंजा पगार तांदुळाच्या डब्यात ठेवायचो. विनायकला थिसीस लिहायला टेबल खुर्चीही नव्हती. त्याने सतरंजीवर बसून थिसीस लिहिला. 
 
 
फक्त धुणे-भांडी करायला बाई लावली होती. विनायक रोजच्या रोज केर काढायचा व पूजा करायचा. आठवड्यातून एकदा फरशी पुसून घ्यायचा. मी त्याला नको नको म्हणत असतानाही तो ही कामे आपणहून करायचा. तो म्हणायचा की थिसीस लिहिता लिहिता मला पण मध्ये ब्रेक घ्यावासा वाटतो तेव्हा ही कामे होऊन जातात. रोजच्या रोज व्यायाम आम्ही दोघेही करतो. कोणताही आजार झाला की तो लवकरात लवकर बरा होण्यासाठी व्यायामाचा उपयोग होतो. बायकांना घरच्या घरी रोजच्या रोज होणारा व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार. आम्ही दोघे सूर्यनमस्कार, जोर बैठका घालतो. शिवाय योगाही करतो. शिवाय रोजच्या रोज रात्रीचे जेवण झाल्यावर आम्ही एक चालत चालत चक्कर मारायचो.जेव्हा अमेरिकेत आलो तेव्हा गृहव्यवस्थापन बदलले. किराणामाल,-दूध,प्यायचे पाणी, भाजीपाला हा दर आठवड्याचा आणावा लागतो. कोव्हीड मुळे आता सर्व घरपोच येते. पण इथे घरपोच सेवा नाहीये. इथे घाऊक मालाची दुकाने आहेत. त्याचे वार्षिक ५० डॉलर्स भरुन सदस्यत्व घ्यावे लागते. या दुकानातून आम्ही साखर, तेल, मीठ, धुण्याचे व भांडी घासायचे डिटर्जंट, पेपर टॉवेल, टिश्यु पेपर, कचरा भरायच्या पिशव्या, दाढी करण्यासाठी लावायचा फोम, जंतुनाशक ओली फडकी, भाजके दाणे, सुकामेवा, प्रोटीन पावडर, टुथपेस्ट, पिण्याचे पाणी, या आणि अशा सर्व प्रकारच्या रोजच्या रोज वापरातल्या गोष्टी आम्ही आणतो. भाजी फळांमध्ये मी पालक, संत्री, केळी, काकडी, टोमॅटो, कांदे घेते. बाकीच्या खरेदी आम्ही अमेरिकन आणि इंडियन दुकानातून आणतो. जिथे जे जे चांगले मिळेल ते ते सर्व काही ! इथे सर्व किराणामाल जसा लागेल तसा आणतो. भाजीपाला-किराणामालाची मी दर आठवड्याला वेगळी यादी करते. आठवणीने काय काय आणायला झाले आहे ते पाहून त्याची यादी बनवते. याचे कारण एक जरी गोष्ट राहिली की परत कारने जावे लागते. पटकन चालत जाऊन भाजी आणू असे इथे होत नाही. इथे दुकाने खूप लांब असतात. विशेष करून थंडीच्या दिवसात हवामान पाहूनच बाहेर पडावे लागते. बर्फ पडणार असेल तर आठवणीने सर्व काही घरात आहे ना ते पहावे लागते.
 
 
इथेही मी काही वर्ष नोकरी केली. तेव्हापासून मी रात्रीचे जेवण व दुसऱ्या दिवशीचे डब्यातले जेवण असे एकदाच करते. रात्री भांडी तर इथे घासायलाच लागतात. इथे डिश वॉशर आहेत पण न घासता भांडी त्यात ठेवली तर ती नीट निघत नाहीत. मी भांडी घासते आणि नळाखाली पटापट विसळल्यासारखी करते आणि मग ती डिश वॉशर मध्ये टाकते. डिश वॉशरचा वेगळा डिटर्जंट मिळतो. अशाने भांडी खूप छान घासली जातात. शिवाय वाळूनही निघतात. रोजच्या रोज ओटा ओल्या फडक्याने पुसायचा. रोजच्या रोज ओला कचरा कचरा कुंडीत टाकायचा. कोरड्या कचऱ्याच्या पिशव्या भरल्या की त्याही टाकायच्या. कोरडा कचराही इथे भरपूर साठतो. पाणी पिण्याच्या बाटल्या, दुधाचे, ज्युस चे कॅन्स, इथे जे काही मिळते ते सर्व प्लॅस्टीकच्या डब्यातून. ते संपले की त्या प्लॅस्टीकच्य बाटल्या, डबे असे सर्व काही असते. इथे पोस्टाच्या पेटीत बरीच पत्रे साठतात की ज्यामध्ये जाहीराती असतात. असा अनावश्यक कचराही बराच साठतो. रोजच्या रोज किचनच्या फरशीचा केर काढतो आणि पुसुनही घेतो. तसेच बाथरूम कमोड मधल्याही फरशा पुसून घेतो. केर-फरशी पुसणे, कार्पेट असेल तर व्ह्य्क्युमिंग करतो, दर महिन्यात सर्व लाकडी सामान पुसून घेतो. इथे भारतीय दुकानात काही स्टीलच्या वस्तू असतात पण त्या खूप महाग असतात. इथे मी स्टीलचे डबे कधीच आणले नाहीत. सर्व काही प्लॅस्टीकच्या बरण्यांमध्ये ठेवते. फक्त कूकर, इडली पात्र आणि काही स्टीलच्या चायना डिश जेवणासाठी आणल्या. इथे गिरणी नाही त्यामुळे दळणाची कामे नाहीत. दूध वेगळे तापवायचे काम नाही. आधी मी विरजण लावून दही घरीच बनवायचे. तूपही इथे मिळणाऱ्या मीठविरहीत बटरचे घरीच करायचे. आता दही, तूप विकत आणते.
 
 
अमेरिकेत हवामानाप्रमाणे कपड्यांचेही व्यवस्थापन करावे लागते. हिवाळ्यात, हातमोजे, पायमोजे, उबदार जाकिटे, फूल टी शर्ट, जीन्स टोप्या बाहेर काढून ठेवायच्या. हिवाळा संपला की सर्व उबदार कपडे धुवून वाळवून बॅगेमध्ये ठेवायचे. उन्हाळा आला की हाफ टी शर्ट, घोळदार पॅंटी, उन्हाळ्याच्या टोप्या असे बाहेर काढायचे. थंडीत कफ सिरप, आयब्रुफेनच्या गोळ्या, फ्ल्युचे च्या लसी टोचून घ्याव्या लागतात. तसेच वसंत ऋतूमध्ये पोलन ऍलर्जी होते. श्वास घेताना त्रास होतो त्याच्या गोळ्याही आणून ठेवाव्या लागतात. अमेरिकेत एका शहरात गेल्यावर आम्हाला घर मिळायला खूप वेळ लागला. एका स्टुडिओ अपार्टमेंट मध्ये आम्हाला नाईलाजाने जावे लागले. स्टुडिओ अपार्टमेंट म्हणजे एकच खोली. त्या खोलीत डिश वॉशर नव्हते. धुणे धुवायचे दुकानही लांब होते. सर्व काही एकाच खोलीत! हा एक गृहस्थापनाचा वेगळाच अनुभव आला. अर्थात तो कसा होता त्याचा वेगळा लेख होईल. लग्न झाल्यावर सुरवातीला वसतिगृहात राहिलो. तिथले व्यवस्थापन पण वेगळे होते. मी नंतर कधीतरी "सुंदर माझे घर" ही लेखमाला लिहिणार आहे. लेखात एकूणच घराचे व्यवस्थापन थोडक्यात लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. मी १०-१२ घरे बदलली. घराचे वर्णन व आठवणी असे एकत्रित लेखन मी लेखमालेत करणार आहे.
- रोहिणी गोरे